डॉ. धनंजय देशपांडे
मनमंजुषेतून
☆ लग्न… ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆
नुकताच एका लग्नाला निमंत्रित असल्याने गेलेलो. तर तिथे थाट काय वर्णावा ??? दारातच डाव्या उजव्या बाजूला बर्फात कोरलेले पाच पाच फुटाचे दोन राजहंस उभे….. ते बर्फ लवकर वितळू नये म्हणून त्याभोवती थंड हवेचा झोत सोडणारे अजस्त्र पंखे, त्यात पण रोज वॉटर जोडलेलं त्याचा सुगंधी फवारा येणाऱ्याच्या अंगावर फवारला जात होता.
आत गेल्यावर खुर्चीत बसल्यावर लगेच एकामागून एक असे केटररचे वेटर आलुबोन्डा, चीज टिक्की, हरभरा कबाब असलं काय बाय सर्व्ह करत होते. आणि हे सगळं शूट करण्यासाठी दोन क्रेनवर दोन मोठे कॅमेरे विथ फोटोग्राफर बसलेला, शिवाय दोन ड्रोन वरती घिरट्या घालत शुटिंग करत होतेच, कोपऱ्यात एक म्यूजिकल ग्रुपचा आर्केस्ट्राही सुरु होता !
आणि नंतर लग्न थाटात लागलं.
त्यानंतर मंडळी जेवणाकडे आली. अक्षरशः मी मोजले तर ३७ टेबल होते. पंजाबी, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन…. कॉन्टिनेन्टल; असे बोर्ड लावलेले….. सगळंच हाय फाय आणि उच्च….. मात्र चार आठ लोक एक एक ग्रुप करून त्यातच रमलेले….. इतरांशी काही देणेघेणे नाही… अशा टाइपमध्ये !!
का कोण जाणे….. माझा जीव गुदमरला तिथं…. ना जेवणात इंटरेस्ट उरला ना त्या एकूणच “सोहळा” डेकोरेशन मध्ये !
आणि त्यावेळी मला एक जुनी घटना आठवली…..
माझा एक अवलिया मित्र….. भटकंती आणि जमलं तर अडचणीतल्याना मदत करणं.. हा समान धागा आमच्यात… तर अचानक एका दिवाळीच्या काळात त्याचा फोन आला… “उद्या काय करतोय?” मी म्हटलं, “विशेष काही नाही बाबा… सुट्टी आहे दिवाळीची बास !!”
तर म्हणाला, “सकाळी तयार राहा.. जरा एका ठिकाणी न्यायचं आहे तुला… चल तरी… वेगळं विश्व दाखवतो. “
मी नकार देण्याचा प्रश्नच नव्हता.
दुसऱ्या दिवशी मग त्याच्या सोबत निघालो. आणि दीड दोन तासात एका वाडीवर पोचलो… आदिवासी टाईप लोकांची साठ सत्तर घरे असलेली ती वस्ती… मित्र जवळच्या डोंगरावर ट्रेकिंगला जायचा त्यावेळी या वाडीतच गाडी लावून जात असल्याने सगळी वाडी त्याच्या ओळखीची… हा अधून मधून त्या लोकांसाठी कपडे, धान्य, औषधे वगैरे नेवून द्यायचा.
तिथल्या अनेकांना तर मराठी काय पण हिंदीही येत नव्हती… त्यांचा जो एक मुखिया होता त्याला तोडकंमोडकं हिंदी येत होतं. पण तरी “संवादाला भाषा लागत नाही तर प्रेम लागत” हे त्यादिवशी कळलं!
जमेल तशी फुलांची रांगोळी काढून त्यांनी दिवाळीच्या जेवणाची पंगत मांडलेली…. मी, माझ्या शेजारी आमचा अवलिया मित्र, त्याशेजारी ग्रामसेवक…. आणि पाड्याची बाकी पुरुष मंडळी बसलेलो… साधाच बेत होता… पोळी, एक सुकी भाजी… पातळ वरण टाईप काहीतरी आणि शिरा… पण काय तुडुंब जेवल्याचा आनंद झाला.
आणि जेवण झाल्यावर झाडाखाली गप्पा मारत बसलेलो तेव्हा थोडा वेळ त्या लोकांनी त्यांचा पारंपरिक डान्स सादर करून दिवाळीला जणू चार चांद लावले.
ते झाल्यावर मुखियाने एका मुलीला हाक मारून पुढं बोलावलं…. सुमारे वीस बावीस वर्षाची असेल.. गर्द हिरवी साडी, हातात हिरव्या बांगड्या… सगळं नवं नवं दिसत होत… इतक्यात तिने आधी मित्राच्या आणि नंतर माझ्याही पायाला हात लावून नमस्कार केला. मी दचकलो… पण असू दे… माझ्या लेकीसारखीच असं म्हणत आशीर्वाद दिला. मात्र तिच्या मागे (कदाचित तिची आई असावी) ती डोळे पुसताना पाहिली.
मी मुखियाला विचारलं की त्या बाई का रडत आहेत ? त्यावर त्याने जे सांगितलं ते ऐकून मी स्तब्ध झालो. काहीच बोलणे सुचेना.
मुखिया सांगत होता, “गेल्या वर्षी या मुलीचे लग्न झाले. त्यासाठी आईवडिलानी खाजगी सावकाराकडून कर्ज काढलं…. फक्त तेराशे रुपयांचे….. मात्र ते फेडणार कस ? इथं आम्हीच रानातली पाखर मारून जगतो… जोडीला तुमचं धान्य येत तितकंच ! मग रोख पैसे येणार कुठून?
मग सावकाराने मार्ग सुचवला आणि त्याप्रमाणे हे दोघे आईवडील गेले वर्षभर झाले त्याच्याकडे शेतावर मजुरीला जात आहेत आणि त्या मजुरीतून तो सावकर दरमहा पैसे सगळे वळते करून घेतोय. (म्हणजे थोडक्यात फुकट हमाली वर्षभर सुरु आहे)
*
मी सोबतच्या ग्रामसेवकाला विचारलं… “तो सावकार भेटेल का आता ?”
त्यानेही होकार देत लगेच त्याला फोन करून वाडीवर बोलावलं… तोही त्याची हिशोबाची चोपडी घेऊन आला. सावकारीचे लायसन्स पण दाखवले. आणि हिशोब पण !
मित्राने त्याला विचारलं… “आता अजून किती कर्ज फेडणे बाकी आहे ?”
तर म्हणाला, “व्याज फक्त फिटत आहे… मुद्दल अजून तसेच बाकी आहे… तेराशे रुपये. “
(सावकारी कर्ज आणि त्यावरचे व्याज हा वेगळाच मुद्दा आहे. महिना दोन टक्के असा काहीतरी रेट असतो म्हणे म्हणजे वार्षिक तो २४% इतका मोठा होतो… त्यात परत चक्रवाढव्याज गणित त्यात बसवले जाते त्यामुळे कैच्या काय व्याजात पैसे जातात) असो.
ते सगळं ऐकून मी हतबुद्ध… ! माझ्या मित्राने तात्काळ खिशात हात घातला…. हजारेक रुपये निघाले…. माझ्याकडे वळत म्हणाला, “तुझ्याकडे आता कॅश किती आहे ?”
मी काही न बोलता खिशातून त्याला तीनशे काढून दिले. मित्राने मग ते तेराशे रुपये सावकाराला दिले. सावकारानेही इमानदारीत त्या चोपडीतील कर्जाचे पान फाडून त्या आईवडिलांना दिले. (याला ग्रामीण भागात “पान फाड… व्यवहार” म्हणतात) आणि ते आईवडील कर्जमुक्त झाले. आता त्यांना फुकट मजुरी करायला जायची गरज राहणार नव्हती…
*
थोड्या शांत पण तरीही आतून विषण्ण मनाने तिथून निघालो…. आणि अचानक पुन्हा ते गर्द हिरव्या साडीतलं लेकरू धावत जवळ आलं आणि गच्च मिठी मारून रडत बसलं… अर्थात ते आनंदाश्रू होते…. तिचे आईवडील मुक्त झाल्याचे !!
इथं आम्ही तेराशे रुपये दिले म्हणजे फार काही केले नाही… नाहीतर पुण्यात हॉटेलात फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत गेलो तरी याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट बिल येतेच की ! पण त्या वर्षीची ती दिवाळी… ते रानातले जेवण…. त्या लेकीची गच्च मिठी… आजही आठवलं की…. देवाचे आभार मानतो की…. त्यांच्यामुळे आपल्यामार्फत हे सगळं घडत… आपण निमित्तमात्र !
(माझी एक दिवाळी अशी आगळीवेगळी घडवून आणणारा तो मित्र मात्र कोरोनाचे निमित्त होऊन “वर” गेला… मात्र एक छान आठवण “खाली” ठेवून गेला)
*
आता मूळ मुद्दा पुन्हा तोच की…. एकीकडे जो नुसता बर्फाचा राजहंस उभा होता त्याचा खर्च किमान पाच हजार… बाकी बडेजावचे बिल वेगळेच आणि दुसरीकडे तेराशे रुपयांत लग्न करणारी (तेही कर्जात) आदिवासी मंडळी… मात्र तरी समाधानी आणि आनंदी…. मग खरा आनंद कशात आहे ? पैसे उडवण्यात…. लोकांना श्रीमंती दाखवण्यात की माणुसकी जपून आनंद घेण्यात ?
तुमच्याकडे खूप पैसा असेल तरी मुलांची लग्न साधेपणाने करा रे… कारण तरी त्यांना मुलं होणार आहेतच. डीजे लावल्याने, लाइटिंग केल्याने काही सटासट मुलं होणार नाहीत !
त्यापेक्षा तोच वायफळ वाया जाणारा पैसा हवं तर मुलांच्या नावाने बँकेत फिक्सला ठेवा…. त्यालाच पुढं जाऊन तो कामाला येईल. नाहीतर सरळ एखाद्या आनंदवन सारख्या संस्थेला दान करून टाका. जास्त पुण्य मिळेल.
तुम्ही कितीही शानदार लग्न सोहळा केला, आणि तेराशे खर्चले तरी काय आणि तेरा लाख खर्चले तरी काय…. लोक नंतर विसरून जाणारच आहेत. तर नको उगीच “दाखवण्यासाठी” म्हणून स्वतःला आर्थिक खड्ड्यात टाकून घेऊ !
विचार करा ! आणि पटलं असेल तर इतरांनाही हे पाठवा ! यातून कदाचित १०० मधली १० लग्न जरी आटोपशीर होणे सुरु झाले तरी खूप मोठी चळवळ उभी राहील ज्याचे तुम्ही एक साथीदार असाल !! धन्यवाद.
© डॉ. धनंजय देशपांडे
(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)
मो न. ९४२२३०४३४४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





