श्री संदीप काळे

??

☆ “तीन तिघाडा…!” – भाग – २ ☆ श्री संदीप काळे ☆

(ती एक मुलगी आणि त्या दोन महिला माझ्यासाठी जिवंत केस स्टडी होत्या — गरिबी आणि लाचारीत जगणारा महाराष्ट्र माझ्यासमोर उभा राहिला. पण या गरिबीतही त्यांनी आपला स्वाभिमान कधीच विकला नव्हता — हाच महाराष्ट्राचा चेहरा आहे.) – इथून पुढे —– 

आमचा जेवणानंतरचा तो संवाद असाच मनात घुमत राहिला. त्यांनी जणू आपलं सगळं दुःख माझ्यावर सोपवलं होतं, आणि मी ते घेऊन निघालो. मन जड झालं होतं.

त्यांच्याशी बोलताना माझा चालक कधी माझ्या बाजूला येऊन बसला, हेही मला कळलं नव्हतं. त्या संवादात प्रचंड दुःख होतं, पण त्याचबरोबर एक मोठा जीवनधडा होता — सामाजिकतेचा खरा आदर्श.

मी ज्या लहान मुलीशी बोलत होतो तिचं नाव सानुली उर्फ अवनी. माझ्यासोबत जी दुसरी महिला बोलत होती तिचं नाव गौरी, आणि तिसरीचं नाव राधा.

या तिघी बहिणी आहेत. आम्ही त्या जंगलामध्ये ज्या नितळ वाहणाऱ्या झऱ्याच्या समोर बसलो होतो, तिथून सहा ते सात किलोमीटर अंतरावर एका छोट्याशा गावात त्या राहतात.

संदेश धामणे आणि ज्योती धामणे — पती-पत्नी. या तिघी त्यांच्या मुली. याशिवाय एक मुलगा. चार अपत्यं आणि स्वाभिमानाचा दागिना लेवून या सर्वांचं आयुष्य अगदी सुख-समाधानात चाललं होतं.

शेतीत उगवणारी लहान पिकं, गावात असणारे छोटे व्यवसाय — पण काळाच्या ओघात सगळ्यावर घरघर आली. माणसं शेती विकून पडीक ठेवू लागली. गावकुसातील व्यवसाय बंद होऊन लोक मोठ्या शहरात जाऊन राहू लागले. याचा परिणाम संदेश आणि ज्योती यांच्या संसारावर झाला.

गावात कितीही फिरलं तरी रोजगार मिळेना. उपासमारीची वेळ आली. संदेश एका मित्रासोबत जंगलात गेला. दुपारी लाकडं आणली, संध्याकाळी लगेच पैसे मिळाले. रोजंदारीवर दिवसभर काम करण्यापेक्षा जंगलात जाऊन लाकडं आणायची, ती विकायची आणि पैसे कमवायचे — हे काम संदेशला आवडलं. काही दिवस मित्रासोबत, मग पत्नीला घेऊन तो जंगलात जाऊ लागला. लाकडं आणून विकायची आणि घर चालवायचं — हाच संसाराचा हिशोब झाला.

मोठी बहीण गौरी सांगत होती —

“त्या दिवशी आई आणि बाबा सकाळी जंगलात गेले. जंगलात जितके आत जाल, तितकी चांगली लाकडं सापडतात आणि त्याला जास्त पैसे मिळतात. आई जवळच थांबून लाकडं गोळा करत होती. बाबा मात्र खोल दरीत गेले होते. बराच वेळ झाला, पण बाबा आले नाहीत. दिवस कलायला लागला. आईच्या पोटात धस्स झालं. तिने लाकडाची मोळी डोक्यावर घेतली आणि गावात आली. लोकांना सांगितलं. तेव्हा लोक म्हणाले — गेल्या महिन्याभरापासून दोन वाघ जंगलात पिसाळल्यासारखे वावरतायत, हे माहीत असताना तुम्ही त्या भागात गेला का? ”

वाघाचं नाव ऐकताच आईचा हंबरडा फूटला. गावच्या सरपंचांनी जंगल खात्याच्या दोन माणसांना बोलावलं. त्यांनी इतर माणसं घेऊन, बंदूक आणि बॅटरीसह बाबांना शोधायला जंगलात गेले. आईही सोबत होती. रात्रभर शोधूनही बाबा सापडले नाहीत.

चार दिवसांनी बाबांचे रक्ताने माखलेले कपडे आणि शेजारीच रक्ताने माखलेली कुऱ्हाड आणून दिली. त्या जागी वाघ आणि बाबांमध्ये झटापट झाल्याचं जंगल खात्याच्या माणसांनी सांगितलं. पिसाळलेल्या वाघाने बाबांना ठार केल्याचं निष्पन्न झालं.

चार-पाच दिवस रडापड झाली. पण रिकाम्या पोटाने रडणं किती दिवस? आईने बाबांसोबत आणलेली लाकडाची मोळी विकली आणि दोन दिवसांचा उपवास सुटला. मग आम्हा चार भावंडांना सावरून आई पुन्हा बाबांच्या रक्ताळलेल्या कुऱ्हाडीवर हात ठेवून जंगलात लाकडं आणायला निघाली.

मी राधाला विचारलं, “तुमचा भाऊ कुठे आहे? ”

ती म्हणाली, “गोवर्धन आमच्या आधारासाठी मामाच्या मुलीशी लग्न करून दिलं. पण महिन्याभरात ती म्हणाली — मी इथे राहणार नाही. कितीही समजावलं तरी ती ऐकली नाही. दादा तिच्यावर प्रेमात होता. तो तिच्यासोबत राहायला गेला. आता कित्येक वर्ष झाली, त्याने आम्हाला विचारपूसही केली नाही. ”

आई खचली नाही. ती कष्ट करत राहिली. पण नियतीचा पिच्छा संपेना.

एकदा आम्ही दोघी बहिणी आईसोबत जंगलात गेलो. आई पलीकडे गेली आणि एका मोठ्या रानडुकराचा सामना झाला. आईच्या खांद्यावर बाबांची धारदार कुऱ्हाड होती, पण डुकराच्या झडपेत तिची कंबर मोडली. डुकरानं दोन्ही पायांची हाडं फोडली. किंचाळण्याचा आवाज ऐकून लोक धावले आणि बंदुकीच्या धाकानं डुकराला पळवलं. फाटक्या साडीत आईला गुंडाळून दोन माणसांनी डोक्यावर घेऊन घरी आणलं.

आई बेशुद्ध होती. पंधरा दिवस उपचारानंतर तिने डोळे उघडले. अनेकदा ती विचारायची — देव असं का करतोय? आम्हीही रडत रात्र काढायचो. आता तीन वर्ष झालीत. आई अंथरुणाला खिळली आहे.

मी विचारलं, “मग घर कसं चालतं? ”

गौरी आणि राधा म्हणाल्या, “बाप गेला तेव्हाही खचलो नाही, आई अधू झाली तेव्हाही नाही. आम्ही रोज कष्ट करतो. अवनी शाळेत शिकते, सुट्टीत आमच्यासोबत जंगलात येते. लाकडं आणायला बाप गेला, मग आई गेली, आणि आता मी जाते. माझ्यानंतर बहीण जाईल. ”

गौरीने हातातली कुऱ्हाड दाखवत म्हटलं, “हीच ती कुऱ्हाड, जिनं वाघालाही वाटलं होतं की आता आपण संपलो, आणि डुकरालाही वाटलं होतं की आज शेवटचा दिवस आहे. ”

त्यांच्या डोळ्यांत भीती नव्हती — तिथं चमक होती. वडिलांचा आणि आईचा प्रसंग अनेकदा सांगून त्याची भीती त्यांनी संपवली होती.

मी विचारलं, “तुम्ही एवढं करता, तुमच्या नातेवाईकांना अभिमान वाटतो का? ”

राधा हसली, “कसलं कौतुक, दादा! उलट आम्हाला ‘तीन तिघाड्या’ म्हणतात. सगळ्यांचं म्हणणं — या तिघी आई-बाबांसाठी उपद्रवी आहेत. ”

त्यांनी लाकडं डोक्यावर ठेवायला सांगितली. मी ठेवली. त्यांचं गाव माझ्या रस्त्यावर असल्याने पत्ता घेतला आणि पुढे गेलो. राधाच्या गावात जाऊन मी तिच्या आईचा पत्ता विचारत तिच्या घरी गेलो. सोबत नेलेली फळं दिली. त्या तिघींची भेट सांगितली. आईनंही सगळं सांगितलं.

– – – मी निघणार तितक्यात त्या तिघी आल्या. मला पाहून त्यांनाही धक्का बसला. अवनीची वही पाहिली — मोत्यासारखी अक्षरं. ती दरवर्षी शाळेत पहिली येते.

मी आईला म्हटलं, “ताई, मुली मोठ्या झाल्या. लग्नाचा विचार करा. ”

ती म्हणाली, “स्थळं येतात. पण त्या म्हणतात — लग्न झालं तर आईला कोण सांभाळणार? ”

खिशातून पैसे काढून तिच्या हातावर ठेवले. ती म्हणाली, “दादा, पैसे घेणं म्हणजे नातं तोडणं. ”

मी शांत बसलो. थोडा वेळ थांबून निरोप घेतला. काही काळजी करू नका मी आपल्या सोबत आहे असा आशावाद मी त्यांना दिला.

… परिस्थिती कितीही वाईट असली तरी खचायचं नाही.

आज नाही, उद्या चांगले दिवस येतील — या भावनेनं जगायचं.

चांगलं करत राहायचं, स्वाभिमान जपायचा — हेच त्या बहिणींनी मला शिकवलं.

मी तिथून निघालो, पण माझं मन ‘त्यांच्या’ स्वाभिमानात अडकून राहिलं. त्या तिघी तिघाडा नव्हत्या एक सामाजिक पायवाट होती ममतेकडून समतेकडे जाणारी बरोबर ना..!

– समाप्त –

© श्री संदीप काळे

चीफ एडिटर डायरेक्टर एच जी एन मीडिया हाऊस मुंबई.

व्हाइस ऑफ मिडिया, मुंबई 

मो. 9890098868

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted