श्री जगदीश काबरे

??

☆ प्रश्न, प्रश्न, आणि प्रश्न !!! ☆ श्री जगदीश काबरे ☆

कोण होतास तू काय झालास तू…! 

ना अत्र ना तत्र ना परत्र…. ना भूमी ना आकाश…

समन्वयाच्या वाळवंटात…. संभ्रमाच्या मृगजळात…. भयावह घुसमटणारा अंधार सर्वत्र.

अख्खा समाज झालाय बहिरा आणि मुका सरून जातंय माणसाचं उमेदीचं आयुष्य.. वटवृक्षाचे बोन्साय बनवण्यातच त्यांना समजलंच नाही.. विष्णुमय जग विषाणूमय कधी झालं ते…

धमन्यातून वाहणाऱ्या रक्तासारखी स्वयंभू होती भूमिका.. तिचं दावणीला बांधलेलं जनावर कधी झालं.. तेही कळलंच नाही…

परधर्माच्या द्वेषाचा विषाणू शरीरात, मनात, मेंदूत, फुफ्फुसात.. सर्वत्र भरून राहिला आहे.

इथे भक्त असू शकतो प्रतिगामी वा पुरोगामी.. भक्त सहज बुद्धाकडून युद्धाकडे येतो..

.. उजवीकडे पहा विकासाच्या जपमाळेखाली दडला आहे हिंसेचा संहार 

.. तर डावीकडे सहिष्णुतेच्या नावानं असहिष्णु फुत्कार!

.. कोणाला झाकू कुणाला काढू?.. या विखारी पर्यावरणाचे झाले आहेत परिणाम..

धार्मिक ध्रुवीकरणाचे, राजकीय अस्मितेचे, आणि दुभंगलेल्या समाजाचेही.. अकस्मात पोहोचले आहेत बहीणभाऊ लांब लांबच्या किनाऱ्यावर 

.. गावकुसाबाहेरच जगणं झालंय किडामुंगीसारखं 

.. शहरी नर-नारी सरपटताहेत सापसुरळ्यांसारखं 

रोज रोज दंगल झाली तरी हरकत नाही. धर्मासाठी, जातीसाठी, वादासाठी, सत्तेसाठी माणसे मेली तरी हरकत नाही… आभासी का असेना ‘शत्रू असणे’ हीच मूलभूत प्रेरणा झाली आहे..

देशभक्तीच्या नावानं परधर्मीयांना कापून काढणे हीच इतिकर्तव्यता ठरली आहे..

.. वाढली महागाई तर वाढू दे.. वाढली बेरोजगारी तर वाढू दे.. झाले हुंडाबळी तर होऊ दे.. झाला शिक्षणाचा बट्ट्याबोळ तर होऊ दे…. पण परधर्मीयांना सर्वात आधी कापू दे

या कापाकापीच्या गदारोळात 

.. कधीतरी माणसे भेटतील का? 

.. कधीतरी माणसे बोलतील का? 

.. कधीतरी संवादाच्या पुलावर जमतील का?

 – – मला पडले आहेत प्रश्न, प्रश्न आणि प्रश्नच…

…. त्यांची उत्तरे कधीतरी मिळतील का? 

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted