सौ. ज्योती कुळकर्णी 

? मनमंजुषेतून ?

☆ परंपरा.. जुन्या,नव्या स्वरूपात!… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

श्रावण सोमवारी मी ह्यांना सांगून पूजेला बसले. ह्यांना म्हटलं “बाहेर कोणी आलं, बेल वाजली तर जरा दार उघडायला उठाल.”

हे म्हणाले; “ठीक आहे.”

पूजा सुरू झाली आणि थोड्या वेळातच बेल वाजली. यांनी दार उघडलं तर वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते नितीनजी आलेले होते. आमच्याकडे नेहमी येणं जाणं होतं त्यांचं. यांना म्हणाले काय करतायेत वहिनी? ह्यांनी सांगितलं ती पूजा करते आहे. महादेवाला शिवा मुठ वगैरे वाहण्याचा कार्यक्रम चालू आहे. थोडा वेळ लागेल तिला. आपण बोलत बसुयात.

तर ते म्हणाले

”आज आम्हाला वहिनींशीच काम आहे. बसतो आम्ही त्यांची पूजा होईपर्यंत.”

माझी पूजा आटोपली आणि मी समोर येऊन बसले. पूजा करत होते तरी बाहेर काय चाललंय इकडे माझं लक्ष होतच. त्यांना म्हटलं काय काम काढलंय माझ्याकडे? तर ते म्हणाले;

“वहिनी दरवर्षी आमच्या कल्याण आश्रमातर्फे आम्ही महिलांकडून शिवामूठ गोळा करत असतो आपल्या धर्माचाच कार्य आहे हे पण एक. आमच्या वनवासी आश्रमात असणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय आम्हाला करावी लागते. आम्ही समाजाकडूनच मागून ते करत असतो आणि घराघराला आमच्या कामाची माहिती मिळावी याकरता आम्ही फूल ना फुलाची पाकळी गोळा करत असतो. समाजाने दिलेले आम्हाला हवेच असते. म्हणून आम्ही दरवर्षी महिलांना आवाहन करत असतो की श्रावणात तुम्ही शिवा मूठ वाहता ती आमच्या कल्याण आश्रमासाठी देत जा. मूठ मूठ धान्य तुम्ही परिसरातल्या महिलांकडून शिवा मुठीच्या स्वरूपात गोळा करून दिलं तर आम्हाला आमच्या काही विद्यार्थ्यांची सोय करता येईल. तुम्ही चार महिन्यात पण असा नेम करू शकता की रोज मूठभर धान्य एका पिशवीत त्यांच्या नावाचं वेगळं काढून ठेवायचं आणि चार महिने आटोपल्यावर ते आम्हाला द्यायचं.”

मला त्यांची कल्पना एकदम आवडली.मला आठवले; माझ्या माहेरी पण परंपरा आणि नवता याचा संगम साधल्या जात असे. माझ्या माहेरी महालक्ष्म्यां करता दोन सवाष्णी सांगितल्या जायच्या. त्यातली एक खालच्या वर्गातली सवाष्ण रहायची. माझी आई आणि काकू आमच्या काम करणाऱ्या बाईलाच सवाष्ण सांगायच्या. आणि पंक्तीत सुद्धा तिला बरोबरीचा दर्जा देऊन, मान देऊन जेवू घालायच्या. मी स्वतः सुद्धा शुक्रवारची सवाष्ण माझ्या काम करण्याऱ्या बाईलाच व्यवस्थित पुरणाचं जेवू घालून चांगल्या कपड्याची ओटी भरून करायचे. मला काही खूप देवाचं करण्याचं वेड नसलं तरी आपली परंपरा जपावी ही आवड मात्र आहे.

म्हणून  नितीनजींनी सुचवलेली कल्पना मला फार आवडली.  मी म्हटले,”मला तुमची कल्पना खूप आवडली आहे.मी नक्की तुम्हाला मैत्रिणीकडून धान्य गोळा करून देईन.”

माझा प्रतिसाद बघून त्यांनी पुढे मला सांगितले,

“वहिनी, पितृपक्षामध्ये पण आमच्या छात्रावासातील मुलांना एक दिवस जेवू घालून आमचा भार हलका करू शकता.जुन्या परंपरांचं नव्यात रुपांतर करून तुम्ही आपली परंपराही जपून, नवे काहीतरी प्रस्थापित करून समाजकार्य करण्याचे पुण्यही पदरात पाडून घेऊ शकता.”

ही कल्पना पण मला एकदम आवडली.

मी समविचारी मैत्रिणी, शेजारी, यांच्यापुढे कल्पना मांडली. एक-दोघींनी विरोध केला.त्यांना घरातल्या पद्धतीप्रमाणे साग्रसंगीत केले नाही तर काहीतरी अनिष्ट घडेल असे वाटत होते.पण बाकी सगळ्यांनी उचलून धरली.आम्ही सगळ्यांनी मिळून जवळपास दोन पोते धान्य गोळा करून दिले.

नितीनजी ते न्यायला आले.त्यांच्या चेहेऱ्यावर आनंद मावत नव्हता.ते म्हणाले,

“वहिनी, तुमच्या सगळ्यांच्या रुपात कृष्णच नवा धर्म स्थापन करायला आला आहे असे वाटले.”

मी म्हटले; “नितीनजी आम्ही फक्त येवढाच हातभार लावला.तुम्ही तर तुमचे पूर्ण जीवन या कार्याकरता खर्ची घातले आहे.”

त्यावर ते म्हणाले; “तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद वहिनी.”

माझ्या मनात विचार आले – – –” खरोखर आपले सण कोणाचं ना कोणाचं ऋण व्यक्त करणारे आहेत.पूर्वीची साजरा करण्याची पद्धत बदलून आपण नव्या स्वरूपात साजरा करू शकतो.पोळा साजरा करतो पण आपल्या कडे शेती पण नसते व बैल पण नसतात.मग एखाद्या गरीब शेतकऱ्याला बैल अथवा शेतीची अवजारे घेऊन देऊनही पोळा साजरा करू शकतो.

माणूस उत्सव प्रिय असतो.सण साजरे करणं सोडू शकत नाही.फावल्या वेळात ‘पब’ संस्कृती अंगिकारण्यापेक्षा आपल्याच परंपरांमध्ये नवता शोधून साजऱ्या करणे मला खूप आवडेल.आपली नाळ आपल्याच संस्कृतीशी जोडलेली रहायला हवी नं!”

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted