डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

खरंच!! “स्वर माणिक” डॉ. माधुरी जोशी 

१९६४/६५चा काळ… आमची अकरा साडेअकरा ही शाळेत जायची रोजची वेळ.. मैत्रिणींना गोळा करत, वाड्यांमध्ये, दुकानांच्या खुणेच्या जागी जात जात जमून दोन चौक पुढच्या शाळेत जाणं… रोजचंच… जुन्या पुण्यातला रस्ता… दुतर्फा घरं, वाण्याची, भाजीची, टेलरची दुकानं…. सगळीकडे रेडिओ वाजत रहात आणि कानावर पडतं अमृताहुनी गोड, घननीळा, त्या सावळ्या तनुचे… एकापेक्षा एक अवीट गोडीची मधुर गाणी, भावगीतं भक्तीगीतं अभंग… अन् अनेकदा माणिकबाईंचाच मधाळ स्वर…. तो खोल मनावर ठसला, कानात रेंगाळत राहिला… फार फार आवडला… शाळकरी वयात त्या मधाळ स्वरानं नकळत संस्कार केला… असं हवं गाणं! ! ! घरात आई पण ती गाणी अतिशय मधुर आवाजात गुणगुणत राही… माणिक बाईं बद्दल सगळ्यांच्या मनात जिव्हाळा… आपलेपणा… तीन पिढ्यांवर ठसा उमटत होता.

 ” माणिक” तेजस्वी श्रीमंत रत्न… त्याला दैवी स्वरांचा गंध.. आशीर्वाद… तो स्वर भावनेनं ओथंबलेला… सहजपणे ऐकणाऱ्याच्या ह्रदयातंच ठाण मांडणारा… तिथे निवांत राहणारा… सुखद… आणि शेवटी काय तुम्ही कितीही विद्वान, अभ्यासू, नावारूपाचे, मोठे, तयार कलावंत असाल तरी तुमचा भाव जोपर्यंत श्रोत्यांच्या ह्रदयात वसत नाही तोवर तुम्ही रसिकांचे होत नाही. माणिकबाई इतक्या गोड, लाघवी, सहज गाणाऱ्या… त्यांनी तर राज्य केलं मनामनावर…. त्या आमच्या झाल्या… घराघरांच्या झाल्या… इतक्या जवळच्या की त्यांना कुणी कधी विसरलोच नाही… आज जन्मशताब्दीच्या निमित्तानं लिहीत्येय मनातलं.. इतकंच….

 १६ मे १९२६ चा जन्म त्यांचा…. १० नोव्हेंबर १९९६ ला त्या गेल्या. आमच्या आधीच्या पिढीनं तो स्वर ऐकला… आम्ही आणि पुढच्या पिढ्यांनी पण… आजवर ती गाणी सोबत आहेत… अत्तराच्या सुगंधा सारखी… रेंगाळतात मनात स्वर, शब्द…. तो लक्ष्मी सारखा गोड, प्रसन्न, सात्विक चेहरा….

कुणीही विसरलोच नाही तर शताब्दी म्हणून वेगळं स्मरण कशाला… रोज भेटतात त्या.

 मी पिंपळखरे गुरूजींकडे गाणं शिकणारी… स्वरात रमलेली… लहान वयापासून आजतागायत माणिक बाईंची गाणी केवळ आनंदासाठी नाही तर अभ्यास म्हणून ऐकते तेव्हा दरवेळी थक्क होते अचंबित होते त्या स्वरातली आर्तता, मार्दव, माया तयारीचा हात धरूनही सतत जागं असतं सगळं…

अनेक गुरूंकडची ऊत्तम डोळस तालीम, आवाज, स्वर, लय सारं सर्व दिशांनी तय्यार.. आणि त्याला भावनेच्या ओलाव्याचा पदर…. अस्तर… सोबत शब्दांची सुंदर जाण, तानेचा अचूक योग्य वापर, देखण्या मिंडचा गोलावा… किती तरी संगीतकारांकडे गायल्या त्या. आपल्या रचना माणिकबाई गायल्या याचाही गौरव वाटला असेल त्यांना… आज असं वाटतं त्या प्रत्येकाची आपली शैली होती, ताकद होती, कल्पना होत्या…. पण माणिकबाईंनी ते गाणं आपलं केलं… जीव ओतून गायल्या अक्षरशः आणि प्रत्येक गाणं माणिकबाईंचं होऊनच समोर आलं…. इतकं एकरूप, एकजीव होणं दुर्मिळ…

 त्या वयात ऐकलेलं दुर्वांची जुडीतलं “लाविते मी निरांजन”साधं ओवीच्या छंदाचं चालीचं गाणं गाताना वाटलं “वाटलं तितकं सोपं नाही हं हे”

या साधेपणातही पिलुची गोडी, भाव किती जपलंय… ती ओवी, कविता श्रीमंत केली त्यांनी…. मग अनेक गाणी समोर येत गेली आणि प्रत्येकाचं वेगळेपण भावतंच गेलं. वाटलं हे काही ” सुगम” नाही. फार फार मिती, पैलू आहेत सतत…

माजघरातल्या शांत प्रकाशातली मायाळू ओवी, देव घरातली शांत तेवणारी समई, कधी जाळीमंदीमधे लावणीचा ठसका, भिंगरीची वेगवान तान कधी त्या चित्त चोरट्याला मधे लग्गीला उचललेल्या ओळीत का आपुले म्हणू मी असा प्रश्न.. चांदण्या रात्रीतले ते मधलं वैफल्य अन् सर्व तू विसरून जा अशी वैफल्यातली समजूत…. सारं स्वरातून व्यक्त होत राहतं… आणि गोकुळीचा राजा, येऊ कशी घनशाम, घननीळा…. भक्तीच्या अनेकविध छटा… किती रस भेटत राहतात. किती किती गाणी… नुसत्या यादीनं एका लेखाचा ऐवज होईल इतकी गाणी…. वेगळी… मधुर… भावपूर्ण! ! !

गायकीची तर किती अंग भेटतात. १३ व्या वर्षी त्या गायल्या आणि त्या नासिकायुक्त

गोड वजनदार आवाजानं अक्षरशः राज्य केलं अनेक दशकं संगीत क्षेत्रात… सुगम संगीताला अमुकच जातीचा आवाज हवा हे विधानंच मोडीत गेलं जणू……..

शास्त्रीय संगीताची प्रचंड जाण, संस्कार, अभ्यास यामुळे त्यांनी कोणत्याही वळणाचं गाणं गायलंय… समर्थपणे. त्यांची ही ताकद, आत्मविश्वास जाणून संगीतकारांनी चाली बांधल्या असणार आणि आपल्याला एक अनमोल खजिना मिळाला हे भाग्यच आपलं….

 अगदी शाळकरी वयापासून मोठं होईपर्यंत स्पर्धेसाठी, कार्यक्रमासाठी गाणी बसवताना जाणवलं ऐकायला सोपी वाटणारी गाणी गायला किती अवघड आहेत हे… गाण्यांच्या अगणित जागांमधली सहजता थक्क करतं राहिली तर बारकावे साधतांना अक्षरशः धावपळ झाली. खरं तर प्रांजळपणे सांगते आजही काही जागा त्याच वजनानी, नोटेशन बरहुकूम नाही येत…. असलं हे समर्थ गाणं सुगम कसं? याला सहज सोप्पं कुणी ठरवलं?

 इथे भेटला आत्यंतिक प्रेमळ सुरेलपणा…. भक्ती भावाची सचैल भिजवणारी गंगा…. ठुमरी तली उठान… बनारस बाजाची तयारी… पण तसूभरही पदर ढळू न देणारी…. काही लग्गी किंवा ओळींनंतर सहज मूळ ठेक्यात नेण्याची हुकूमत…. किंवा ॲडलीफ ओळीतले अचूक लय, भाव, कहन जपणारे शब्द… कारण गाणं परत कुठे, कधी, कसं उचलायचंय या जाणिवेची प्रचंड ताकद आहे मागे…. कल्पना संगीतकारांच्या पण सोनं केलं माणिकबाईंनी सगळ्या सगळ्या रचनांचं, बंदिशींचं…..

प्रत्येक गाणं वेगळं, भाव छटा, गायकीचा ढंग सगळ्यांची जाण भेटतच राहते. शब्द स्वच्छ, स्पष्ट, थेट भेटत राहतात. “ळ” अक्षर देखील घननीळाइतकंच लडीवाळ होतं. इतकं रूक्ष अक्षर छळत नाही तर गोड होतं…. बारकावे इतके जपत त्या… सगळे आत्यंतिक सुरेल, लयबद्ध, मोजकं… पण लघूमात्राभरही सरकत नाही कुठे… जाळी मधली फिरकी रानातल्या खट्याळ वाऱ्यासारखी तर नाथ हा माझामधली कसदार तान गंधर्व युगाच्या मखमली मुलायम पडद्याची धूपाच्या मंद वलयांची याद देणारी…

किती उदाहरणं द्यावीत. त्या खरंच कमाल होत्या. त्यांचा भटीयार ऐकताना शास्त्रीय संगीताचा कसं, अभ्यास, विचार, रियाज, ज्ञान, गुरू निष्ठा सारं जाणवतं…. आणि प्रचंड सहजता, सात्विकता लाविते मी निरांजन या भाबड्या भावपूर्ण ओळीतही…. सुगम संगीताच्या जितक्या म्हणून गुणवत्ता असतील त्या सगळ्या त्यांनी भेटवल्या….

कारण सुगम संगीताच्या त्या भरजरी वस्त्राला भावनेच्या, सुरेलतेच्या, शब्दोच्चाराच्या कशीदाकारीचा पदर होता… किनार होती.. अनमोल नाजुक पण सशक्त रंगीत अन् जरीच्या धाग्यांचा कशीदाच तो…. माणिकबाई आजही आम्ही त्या वस्त्राच्या श्रीमंतीची ऊब अनुभवतोय!!!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted