प्रा. भरत खैरकर
मनमंजुषेतून
☆ “आठवडी बाजार…” ☆ प्रा. भरत खैरकर ☆
गावाला प्रायमरी शाळेत असताना बुधवारची आम्ही वाट बघत असायचो, कारण ह्या दिवशी आठवडी बाजार असायचा. दर बुधवारी आमची सकाळची शाळा असायची. आणि ती सकाळी दहाला संपायची.. त्यामुळे बुधवार हा आमच्यासाठी भारी असायचा. आमचं गाव परिसरात मोठं असल्याने आजूबाजूच्या पंचवीस तीस खेड्यातून या ठिकाणी बाजारासाठी लोक यायचे. हा काळ साधारण ९० च्या दरम्यानचा आहे. तेव्हा बरेचसे लोक बैलगाडी.. रेंग्या.. दमणी.. सायकलने.. पैदल.. असे ह्या बाजारात दाखल व्हायचे.
बैलगाड्यांनी येणारा शेतकरी वर्ग गावाच्या बाहेर असलेल्या एका पटांगणामध्ये आपापल्या बैलगाड्या ‘पार्क’ करायचा. तिथे बैलांना चारापाणी घालून.. ते कासऱ्याच्या साह्याने चाकालाच बैलांना बांधून ठेवायचे. मग आपापल्या पिशव्या.. पोते.. विकायला आणलेलं जे काय सामान.. असेल ते घेवून ही मंडळी आठवडी बाजारात पोहोचायची.. काहीजण आपल्या सोबत तंबू किंवा राहूट्या आणायचे.. ऊन पावसापासून वाचण्यासाठी तसेच मालाचे रक्षण करण्यासाठी या तब्बूंचा.. राहूट्यांचा उपयोग व्हायचा.. काहीजण मात्र बाजाराच्या साथीमध्ये खाली पोतं टाकूनच आपलं दुकान थाटायचे!
इकडे बसस्टॉपवर मात्र खचाखच भरून आलेल्या गाड्या.. जिपा.. मेटॉडोर.. ट्रक आणि बसेस ह्यामुळे ट्रॅफिक जाम झालेलं असायचं. प्रत्येकाची सामान खाली उतरवण्याची घाई असायची.. ह्या दिवशी हमाल कमी पडायचे.. गावातील ठरलेले मुलं दोन-तीन चा ग्रुप करून भरपूर कमाई करायचे.. तालुक्याच्या ठिकाणाहून आलेले व्यापारी अशा मुलांना पकडून आपापला विक्रीचा माल ठरलेल्या बाजारओट्यापर्यंत पोहोचवून घ्यायचे.. त्यासाठी मुलं मागील तेवढी रक्कम व्यापारी देत असतं. विशेषता ‘झाडी’तून म्हणजे भिशी, चिमूर, नांद इथून येणारा तांदूळ हा मोठ्या प्रमाणात मेटॅाडोर मधून यायचा.. तो तंबूमध्ये थप्पी थप्पी ने लावण्यासाठी खूप दणकट असे हमाल लागायचे.. त्यासाठी ह्या मुलांना मोबदलाही भरपूर मिळायचा.
बाजाराची सुरुवातच मुख्यतः देशी दारूच्या दुकानापासून व्हायची.. त्यामुळे हौसे, नवसे, गवसे, आठवडी बाजारासाठी आणलेला पैसा बऱ्याचदा तिथेच खर्च करून दिवसभर बाजारात बोंबलत फिरायचे. काहीजण सट्टापट्टीच्या नादी लागून नंबरगेम मध्ये अडकायचे.. तर काही मित्रासोबत शेवचिवडा, आलूबोंडे, भजे खात हॉटेलिंग करायचे..
तिथून पुढे कपडे वाल्यांची रांग सुरू व्हायची.. त्या ठिकाणी गरीब, मजूर लोकं आपल्या मुलांसाठी आंगळ टोपडं खरेदी करायचे. सोबत आलेली पोरं आई-वडिलांकडे आईसप्रोटसाठी हट्ट धरायचे.. आंगळ टोपडं आणि सोबत आईसप्रोट मिळाल्यामुळे मुलांचा बाजार मस्त झालेला असायचा.. ते दिवसभर मग आईच्या मागे मागे बाजार भर फिरायचे. काही फुगेवाले, खेळणीवाले दुकानदार सायकलवर आपला व्यवसाय करायचे.. त्यांच्या सायकलला लावलेले भोपू वाजल्यावर मुलं फुगे किंवा खेळणीसाठी रडारड करायचे.
पुढे भुसार मालाची म्हणजे धान्य, डाळी, गहू, ज्वारी इत्यादींची ओळ होती.. त्या ठिकाणी शेतकरी बायका घमेल्यामध्ये किंवा एखादं दुसऱ्या पोत्यामध्ये आपल्या शेतात पिकलेलं वरील प्रकारचे कोणतेही धान्य घेऊन बसायच्या.. एक दोन तासात ते सर्व धान्य विकल्यावर मिळालेल्या पैशांमध्ये आपला आठवडी बाजार करायच्या!
अजून थोडं पुढे गेल्यावर मात्र ठोक व्यापारी व त्यांची दुकाने असायची.. त्यामध्ये तेलाचे व्यापारी, गुळाचे व्यापारी, चिकन सुपारी व्यापारी, सोन्या चांदीचे व्यापारी, आपापल्या दुकानात नोकर चाकरासह बसलेले असायचे.. ह्या ठिकाणचा मोठा व्यापार.. मोठी उलाढाल व त्यातील ग्राहक सुद्धा ठरलेले होते.. गरीब, मजूर ह्या मोठ्या दुकानांमध्ये जायची हिंमत करायचा नाही..
पुढे गेल्यावर बांबू पासून तयार केलेल्या टोपल्या.. तट्टे.. चटया.. ढोल्या.. इत्यादीसह त्या ठिकाणी लाकडाचे मोठमोठे फाटे.. वासे.. मयाली.. दरवाजे.. खिडक्या.. विकायला ठेवलेल्या असायच्या.. ज्याच्या कुणाच्या घराचे बांधकाम चालू आहे, असे लोक या ठिकाणी येऊन सौदेबाजी करून हा फौजफाटा घेऊन जायचे..
बाजारातला मुख्य रस्ता दुतर्फा हॉटेल.. पानठेले.. कृषी केंद्र. सायकल मार्ट.. किराणा.. कापडाचे मोठे व्यापारी. मिठाईची दुकाने.. फरसाण.. मुरमुरे फुटाणे.. गळ्यातलं नाकातलं विकणारे.. सलूनवाले.. प्रेसवाले.. टेलरिंग कामवाले.. मोटर रिवाइंडिंगवाले.. इलेक्ट्रिकल दुकान.. हार्डवेअर इत्यादींनी सजलेला होता. ही गावची आणि बाजारातली मुख्य लाईन होती. ह्याच ओळीमध्ये जर्मन पितळेची भांडे विकणारे व्यापारी तसेच शेवटी शेवटी कुंभाराची रांजण, गाडगे, मडके विकण्याची जागाही होती..
मासे, मटण, डुक्कर, भाजल्या मासळ्या, झिंगे, इत्यादी मांसाहारी पदार्थासाठी बाजारात एक कोपरा ठरवून दिला होता.. त्या ठिकाणी लाकडाच्या तीपाईवर लटकवलेल्या बोकडाची.. डुकराची.. उलटी टांगलेली शरीरे.. तसेच खाली घमेल्यामध्ये जमा केलेल्या रक्ताची.. शिवाय माशांची.. खेकड्यांची.. मिळून एक अजब प्रकारची दुर्गंधी वजा हवीहवीशी वाटणारी बाजाराची खास ओळखही होती.
तिथून पुढे लागूनच गरम मसाल्याची दुकाने यात मीरे, दालचिनी, लवंग, तिखट, मीठ, हळद, घरचे कुटलेले मसाले, अद्रक, लसूणासह अनेकानेक जिभेचे चोचले पुरवणाऱ्या वस्तू मिळायच्या.. त्याला लागूनच पुढे शाकाहारी म्हणजे शेतकऱ्यांचा भाजीपाला वांगे, टोमॅटो, कोबी, गवार, फुलकोबी, पालक, मेथी, इत्यादीसह कांदे, बटाटे विकणाऱ्यांची पालं किंवा तंबू होते. उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या मोसमात या ठिकाणी दूरवरून येणारे सर्व प्रकारचे आंबे मिळायचे.. त्यानंतर उंदीर मारण्याचं औषध विकणारे.. जडीबुटीवाले.. तवा, कढई, तलवार, चाकू, पोळपाट, लाटणं, इत्यादी तयार करणारे शीख म्हणजे सरदार लोकांचे तंबू असायचे.
नदीच्या पलीकडे पारध्यांनी आणलेल्या लावा, तीतरं, कबूतरं, इतर पक्षी, हरीण, ससे, ईत्यादी ह्या बाजारात मिळायचे.
बाजारात फक्त उलाढाल.. व्यापार.. पैशाची देवाणघेवाण.. एवढेच होत नव्हते तर ह्या ठिकाणी वीस-पंचवीस गावातला संवाद.. भेटीगाठी.. नातेसंबंध.. सुखदुःखाच्या बाता.. निरोप.. विरह.. देवाणघेवाण.. इत्यादींचाही ऊहापोह व्हायचा.
सायंकाळच्या वेळी उरलीसुरली दारू पिऊन एखादं दुसरे भांडण.. किंवा मारामारी हा ठरलेला कार्यक्रम असायचा! सगळ्यांची घरी परतण्याची घाई असायची.. गावातलं कोणी मागे राहिला कां? ठरल्यानुसार सगळ्या वस्तू खरेदी केल्या कां? किती नफा किती तोटा झाला? इत्यादींच्या चर्चा.. गप्पा मारत दहा-बारा किलोमीटर वरून आलेली मंडळी भरभर पैदल.. बैलगाडीने.. नाही तर कुणी आणलेल्या वाहनाने.. आपापल्या गावी परतायची, ती आठवडाभरानंतर पुन्हा एकत्र येण्यासाठी..
आता आठवडी बाजाराची वाट पहावी लागत नाही.. सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे.. स्वीगी.. झोमॅटो.. ॲमेझॉन रिलायन्स बाजार.. आपल्या घराच्या आत घुसलेला आहे.. आठवडाभर थांबायला कुणाला फुरसत नाही वेळ नाही.. एकमेकांशी बोलायला तर मुळीच नाही.. गाडीघोडा सगळ्यांकडे उपलब्ध आहे.. त्यामुळे आठवडी बाजाराची वाट पाहायची गरज नाही.. त्यामुळे संवाद नाही.. भेटणं नाही.. विरह नाही.. सुख दुःख नाही.. कुणाचचं कुणाला घेणंदेणं नाही.. त्यामुळे केवळ दोन दशकात बदललेल्या आठवडी बाजाराच्या ह्या स्वरूपाचं आणि अशा कित्येक नामशेष होत चाललेल्या चांगल्या परंपरांचा -हास होताना बघून मन भरून येतं.. गदगदून जातं..
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





