श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)
मनमंजुषेतून
☆ आदर्श कुटुंब… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆
साऱ्या विश्वाला कुटुंब व्यवस्था देण्याचे महत्वपूर्ण कार्य भारतीय संस्कृतीने केले असे म्हटले जाते. मला त्यात तथ्य आहे असे वाटते…
वरदेव आणि वधू यांचा विवाह झाला की दोघे पती पत्नी होऊन जातात…
लग्न लागताना ते लक्ष्मी आणि नारायणाचे रूप असतात असे मानले जाते..
*”कर्तव्य”* पूर्ती करण्यासाठी दोघे लगीन गाठीत बांधले जातात…
हे बंधन दोन कुटुंबांना आणि त्यांच्या परिवाराला एकत्र आणत असते…
दोघे मिळून आपला प्रपंच सुरू करतात, यथावकाश त्यांचा प्रपंचवेली वर फुले फुलतात…
प्रपंच त्याच्या त्याच्या गतीने कधी सुखात तर कधी दुःखात गटांगळ्या खात असतो…
या सर्वांचा ते कमीअधिक प्रमाणात उपभोग घेत असतात…
… कुटुंबासाठी आपल्याकडे एक महान असे उदाहरण किंवा ज्याला प्रमाण मानता येईल असे कुटुंब आहे… तुमची उत्सुकता फार ताणत नाही…
हम दो हमारे दो
एका मुलाला आद्य पूजेचा मान.
त्याला दोन पत्नी
एक बाल ब्रह्मचारी
आई खरं तर राजकन्या
पण तपस्या करून वर निवडला तो कैलास पर्वतावर राहणारा…
अर्थात लौकिक सुखाची वानवा…
… बर हे इथेच संपत नाही
यांची प्रत्येकाची वाहने पाहू…
प्रत्येक जण एकमेकांचे शत्रू म्हणता येतील…
एकाचे उंदीर…
दुसऱ्याच्या गळ्यात साप…
तिसऱ्याच मोर…
तर मातेचे वाहन सिंह किंवा वाघ…
… तरीही हे कुटुंब आनंदात आहे…
ज्याला त्याला नेमून दिलेली कर्तव्ये अतिशय आनंदाने करीत आहे असे आपल्या लक्षात येईल…
… सर्वसामान्य घरात इतका विरोधाभास नक्कीच नसेल…
यावरुन मला असे वाटते की आपल्या घरात असलेल्या विविध स्वभावाच्या सदस्यांचा विचार करून आपण गुण्यागोविंदाने राहण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतो…
… पहा, पटतंय का?
शब्दांकन : संदीप सुंकले (दासचैतन्य)
मो. 8380019676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर





