सुश्री नीता कुलकर्णी
मनमंजुषेतून
☆ “संक्रांत… भोगी…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
जानेवारी आला की आठवते संक्रांत… त्याच्या आधीचा दिवस भोगीचा.. त्या दिवशी भोगीची भाजी, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, मुगाची खिचडी आणि कढी करायची आपली परंपरा आहे.
काय म्हणता… भोगीची भाजी तुमच्याकडे कोणाला आवडत नाही…
मी एक गंमत सांगते तुम्हाला..
तशी भाजी करून बघा बरं…
मटार, चवळी, घेवडा, डबल बी, वाल पापडी, तुरीच्या शेंगा, पावटा यातील ज्या मिळतील त्या शेंगा घेऊन यायच्या. त्याच्या आतले दाणे (बीया) काढायचे. कोवळ्या शेंगा चिरून घ्यायच्या. मीठ घालून हे सगळे कुकरमध्ये शिजवायचे. फ्लॉवर लवकर शिजतो. म्हणून तो थोड्या पाण्यात वेगळा शिजवून घ्यायचा. वांगी, गाजर पण घेऊ शकता. दोन बटाटे मध्यम आकारात चिरून, तेलात तळून बाजूला ठेवायचे. त्याच तेलात कुटलेलं आलं, लसूण, मिरची घालायची. टोमॅटो घालून चांगले परतायचे. मग त्यात शिजवलेल्या भाज्या, फ्लॉवर, बटाटा घालायचे व मीठ घालायचं. ही कोरडी भाजी झाली. रस्सा हवा असेल तर थोडं पाणी घालायचं.
झाली भोगीची भाजी…
आता मजा सांगते…
साई सकट दूध कढईत आटवायचं.
(भाजीच्या प्रमाणात) भाजी गॅसवरून खाली घेतली की कोरड्या भाजीत हे घालून मिक्स करायचं. छानशा बाऊलमध्ये भाजी काढायची. कडेला टोमॅटोच्या चकत्या ठेवायच्या.. मुलांना सांगायचं तुम्ही हॉटेलात तीनशे रुपयाला घेता ना.. ती आज तुमच्यासाठी स्पेशल
” मलई नवरत्न व्हेज”
बनवली आहे कार्टी(खूप दिवसांनी हा शब्द वापरला) उड्या मारत आवडीने खातात.
रस्सा केला तर आवडीनुसार मसाले घालायचे.
बाजरीच्या पुरी एवढ्या छोट्या भाकरी तीळ लावून करायच्या..
त्या खाताना मुलांना गंमत वाटते…
गरम तेलात जिरे घालून त्यात भात कालवला.. थोडसं मीठ घातलं की जिरा फ्राईड राईस…
भातात या ऊकडलेल्या भाज्या व मीठ घातले की प्लेन व्हेजिटेबल राईस तयार…
तुरीच्या सरबरीत वरणात तिखट, मीठ घालायचं भरपूर लसूण घालून फोडणी दिली की” लसुणी तडका डाल ” या भाताबरोबर खायला..
यात मेथी किंवा पालक घातला की नाव फक्त बदलतं आणि त्याची किंमतही वाढते..
पोळी तूप टाकून दोन्ही बाजूने छान कुरकुरीत करून घ्यायची. त्याचे दोन भाग करायचे. त्यावर पिझ्झा सॉस लावायचा आणि ही कोरडी भाजी टाकायची. त्यावर चीज पसरायचे आणि पोळी फोल्ड करायची की झाली मुलांची आवडती फ्रॅकी तयार…
आपले पूर्वज फार ज्ञानी होते. त्यांनी हवामान, ऋतू यांना अनुसरून आपला आहार पौष्टीक कसा होईल हे विचारपूर्वक ठरवले आहे.
आपली भारतभूमी सुजलाम सुफलाम आहे. अनंत प्रकारच्या भाज्या, फळं या दिवसात मिळतात.
ती खाल्ली जावीत हा या मागचा हेतू आहे. आरोग्य आपोआप सांभाळले जाते.
रुढी आणि परंपरा म्हणून आपण त्या कराव्यात. त्यात थोडेसे बदल केले की या भाज्या मुलांनाही आवडतील. त्याच्या मागचे शास्त्र आणि हेतू मात्र मुलांना समजावून सांगावा. त्यांच्या भाषेत सांगितले की त्यांना ते पटते.
मल्टीग्रेन च्या नावाला भूलून महाग गोष्टी कशाला घ्यायच्या? आपली पारंपरिक भाजणी काय आहे…
त्यात पालक, मेथी, कांदा घालून केलेली थालपीठ…
कसली भारी लागतात…
जवार कुरकुरे खाण्यापेक्षा ज्वारीच्या पिठात तिखट, मीठ, कांदा, कोथिंबीर घालून केलेलं थालीपीठ खा…
काकडी, कांदा, काॅर्न, सिमला मिरची तुपावर परतून घ्या. ती थालपीठावर घाला. थोडा साॅस घाला. वरून चीज घातलं की थालीपीठ पिझ्झा तयार…
लेकरं चवीनी खातात..
घरची मुग डाळ, तांदूळ घालून केलेली खिचडी गार झाली की घट्ट होते. हॉटेलातली डाळ खिचडी कशी मऊसर पातळ असते.
द, तूप घालून भात करून घ्यायचा.
मूग डाळ शिजवून त्यात कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर घालून त्याला फोडणी द्यायची. खायच्या वेळेस जेवढं पाहिजे तेवढीच डाळ व भात… दोन्ही प्रमाणात घेऊन गरम करायचं. त्यावर ताजी फोडणी घालायची…
हॉटेलात दीडशे रुपयाला मिळणारी डाळ खिचडी रेडी…
पापडाचे चार तुकडे करून तळून घ्यायचे. (एक एक तुकडा उचलून खाता येतो) त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, चाट मसाला घालायचा. वर शेव भुरभुरली की मसाला पापड तयार…
आहे काय नाही काय…
मिलेटस म्हटलं की फार काहीतरी वेगळं आहे असं हल्ली वाटतं. आपली जवस, तीळ, खोबरं,
शेंगदाणा यांची एकत्रित चटणी केली तीला” मिक्स मिलेट्स ” म्हटंल की त्याचं वजन वाढतं… तरुणाईला जी भाषा आवडते.. समजते.. ती वापरायची…
घरच सकस, अन्न खायची सवय आपणच मुलांना लावूयात. भोगीला अजून अवकाश आहे. आधीच हे करून बघा… आणि कशी झाली ते मलाही सांगा. आपली हिंदू संस्कृती किती महान आहे… तुमच्या लक्षात आले असेल…
हे आपल्याच निरामय, आरोग्यपूर्ण जीवनासाठी आहे. वर्षानुवर्षे चाललेली आपली परंपरा जतन करून ठेवूया. तरच ती पुढच्या पिढीला समाजेल.
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





