सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ संबंध… ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“Graceful, durable old furniture आणि New fashionable furniture ची सांगड घालून घर सजवू या. ” 

काल छायाचा फोन आला. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मला तिने विचारले, “मागच्या वर्षी तुझ्या नेहाचे लग्न झाले ना. तुमच्या काय अपेक्षा होत्या ग?? नेहाच्या काय अटी होत्या?? “

मी म्हंटले, “काय ग?? काय झाले आज?? अचानक हा प्रश्न कुठुन डोक्यात आला?? असं का विचारते आहेस?? “

छाया म्हणाली, “अग!! यावर्षी अजयचे लग्न करायचा विचार आहे. एका विवाह संस्थेत‌ नाव नोंदवले होते. काही मुलींची नावे शॉर्टलिस्ट केली आहेत. मुलींकडच्यांचे फोन पण येत आहेतच. मला तर हे खूप कठीण काम वाटतंय ग. कसं करावं की मुलींची पण dignity राहिल, व सर्व दृष्टीने समाधान होईल. खूप जास्त मोठ्या अपेक्षा नाहीत आमच्या, आपल्या सारखीच असावी. एकदा वाटतं मुलीला आधी आम्ही बघून, मग अजयने बघावी का? एकदा वाटतं, आधी अजयनेच बघावी, तिच्याशी बोलावे, भेटावे व नंतर जर गोष्टी पूढे गेल्या तर मग पूढच्या गोष्टी कराव्यात. “

 छाया पुढे म्हणाली, “मला वाटलं तुझ्याशी थोडं बोलावं म्हणजे, माझे‌ विचार थोडे स्पष्ट होतील. तुला मुलीच्या आईचा अनुभव आहे ना. तेंव्हा मुलीकडे कसा आणि काय विचार करतात हे कळेल. खूप अपेक्षा असतात का ग?? आजकाल म्हणे मुली आधी मुलाचे पॅकेज किती?? व प्रोपर्टी किती आहे?? हेच बघतात. खरं आहे का?? “

मी म्हंटले, “खरं सांगू का?? अग! प्रत्त्येक घर वेगळं असतं. अग! आपली मुलगी आनंदी रहावी यापेक्षा दुसरे काय हवं असतं ग?? आम्ही नेहाला पहिल्या पासून हेच सांगत आलो, की लग्न झाल्यावर दोनाचे चार हात होतात. तेंव्हा दोघे मिळून खूप कमवू शकता. मुलगा चांगला पाहिजे व घरचे अन्य सदस्य पण महत्वाचे असतातच. पैशापेक्षा माणसं महत्वाची.

मला अस वाटते, आधी तुम्हीच बघा. घरदार बघून बरंच लक्षात येतं. चौकशी करा. एखादी चांगली फॅमिली, म्हणजे तुमचे, त्यांचे विचार जुळत असतील तर, दोन्ही कडील पूर्ण फॅमिलीने दोन तिनदा भेटण्यास काही हरकत नाही. गप्पांमध्ये बरेच कळते. तुमचे विचार, अपेक्षा, परिस्थिती, त्यांच्या घरचे सणवार लक्षात येतात.

आजकाल मुली शिकलेल्या असतात, त्यांना डायरेक्ट प्रश्न विचारणे बरोबर वाटत नाही. तेंव्हा अशा भेटीत सर्व प्रश्नांची उत्तरे सहज मिळतात. बोलताना त्यांचा विचारांचा कल कळतो. व्यक्तिमत्त्वाचा अंदाज येतो. जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन कळतो. चांगले होमवर्क करून जा, म्हणजे बोलण्यात कोणते विषय काढायचे??? याची तयारी होईल.

सध्याची‌ परिस्थीती म्हणजे, समाजात सध्या चालू असलेली प्रथा बदलायला हवी आहे. मुलींचे विचारही सध्या वेगळ्या दिशेने जात आहेत. घरातील माणसांपेक्षा घरातील वस्तूं जास्त महत्त्वाच्या वाटतायेत.

आजकाल मुलांचे आई-वडीलही आधीच माघार घेतात. आधीच ठरवून मोकळे होतात. आधीच असे दाखवतात की लग्न झाल्यावर वेगळे राहणेच बरं राहील. व त्याअर्थाचे वक्तव्य देतात. तयारी करतात. हा शेवटचा option असावा. “

“मुलाला मुलगी पसंत पडली की, तिने अजयला नीट साथ द्यावी. बस, एवढीच अपेक्षा आहे आमची. बाकी आमची काही अपेक्षा नाही. आमचा भार आमच्या मुलावर नाही. ते वेगळे राहिले तरी चालेल, वगैरे वगैरे बोलून मोकळे होतात. आधी पासून असे सिग्नल आपल्या बोलण्यातून द्यायची काय गरज?? त्यापेक्षा आम्हाला सून मुलीच्या रुपात हवी आहे, घराला सांभाळणारी, आमच्यात मिळुन मिसळून राहणारी. तिच्या नोकरी करण्याला आमचे बंधन नसेल. दोघांना दोन्ही घरचा आधार असणारच आहे. दोन्ही घरी अडीअडचणी ला ही मुलं असतीलच.

लग्न म्हणजे दोन्ही घरचा नेहमीचा संबंध असायला हवा. दोन्ही घरच्या सुख दुःखात एकमेकांची साथ हवी.

अहो! एकाच घरच्या दोन भावांची घरे वेगळी असतात. कारण दोन्ही घरच्या बायका वेगवेगळ्या घरातुन येतात ना म्हणून. आपल्या बाबतीत तर आपण अगदी दोन वेगळ्या फॅमिलीज आहोत. तेंव्हा फरक असणारच आहे. तुमच्या आणि आमच्या काही चांगल्या पद्धती मिळुन‌ नवीन काही चांगल्या पध्दती दोन्ही घरात सुरू होतील. नक्कीच चांगले होईल. आणि घाई कशाचीच नाही. adjust व्हायला थोडा वेळ लागेल एवढंच. ‘ अशा अर्थाचे बोलणे जास्त चांगले व‌ positive वातावरण निर्माण करेल.

मुलगा लग्न झाल्यावर आपला रहात नाही असा विचारच करायचा नाही. मी छायाला म्हंटलं, “तू आपल्या सूनेबद्दल जे चित्र मनात रेखाटलं आहे ते तसंच व्हायला तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. हे बघ आरामदायी म्हातारपण हवे असेल तर एकत्र राहणं तुमच्या करिता चांगलेच आहे व नोकरी करणाऱ्या सूनेकरिता पण ते सोईस्करच असणार आहे. दोन पीढी एकत्र रहायचे म्हणजे सोपं गणित नाही. तडजोड करावीच लागणार आहे. कारण जनरेशन गॅप एवढा मोठा आहे की सर्वांचे सर्वांना सर्व पटेल हे शक्यच नाही.

अग! पस्तीस वर्षे झाली आम्हा दोघांना बरोबर राहून. तरी प्रत्त्येक गोष्टी वर एकमत असतंच असं नाही. पण आपल्या माणसांसाठी तडजोड केली तर काय हरकत आहे?? नोकरी करणारी सून पाहिजे तर तडजोड जास्तच करावी लागेल. स्पष्ट व गोड बोलून सर्व सहज शक्य होऊ शकतं. मनातल्या मनात धूसफूस, भुणभुण करणे, बाहेरच्या लोकांना घरातील गोष्टी सांगण्यापेक्षा घरातील लोकांशी स्पष्ट बोलून मार्ग काढणे जास्त चांगले नाही का?? त्यामुळे कान भरणे हा प्रकार होणारच नाही.

सून म्हणजे, तुझ्या एवढाच तिचा पण मान‌ या घरात असायला हवा आहे. ती तुमची पूढची पीढी आहे. तुझ्या लाडक्याची अर्धांगिनी आहे. मुलगा तेवढा माझा, मग सून‌ तुझी नाही का?? हा दूजाभाव नको.

अजयला नुसता खोकला झाला तरी तू काळजी करते, तेवढेच प्रेम आपल्या सूनेवरही करायचे. आपण आपल्या कडून पूढाकार घ्यायचा. सूनेला आपलं मानणे व ते आपल्या कृतीतून दाखविणे ही या नात्याची सर्वात महत्त्वाची व आवश्यक पहिली पायरी आहे.

माझी आजी म्हणायची, मुलगा तर माझा आहेच. सूनेला आपलसं करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करते. तिच्या घरच्यांचा मान ठेवते. शेतावरून आंबे आले, धान्य आले की आधी त्यातले थोडे तरी मी सूनेच्या माहेरी नक्की पाठवते. सूनेचा वाढदिवस मी आठवणीने साजरा करते. हे असे प्रसंग नातं घट्ट करतात.

माझा मुलगा आता फक्त माझा नाही त्याच्यावर माझ्या इतकाच हक्क असणारी त्यांची बायको ही आहे, हे सत्य पचले पाहिजे. आता सूनेचे माहेर ही माझ्या मुलाची extended फॅमिली असणार आहे. हे ही सत्य पचले पाहिजे.

मन मोठ्ठं व मोकळं ठेवावे लागेल. लहान सहान गोष्टींवर दुर्लक्ष करणे, प्रतिक्रिया न देणे, body language वर लक्ष देणे हे प्रयत्नपुर्वक शिकावे लागेल.

सूनेच्या नावाने बोंब मारणे, सर्वात सोप्पे काम आहे. पण त्यात आपण आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडण्यात कमी पडलो‌ का?? हाही अर्थ निघतोच. तेंव्हा home work खूप करायचे आहे.

Ego, पैसा, practical approach, प्रतिष्ठा, formal relations, चढाओढ, शोबाजी, property, माणसांपेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा, ही समज या सध्याच्या परिस्थितीत हावी आहे. या पेक्षा प्रेम, संबंध, आत्मियता, एकमेकांची काळजी, आधार, समाधान या जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत हे पुन्हा एकदा समाजात युवा मंडळीला समजावयाची गरज आहे. सुरवात करायला हवी आहे. वेळ लागेल, उशिरा का होईना पण परीणाम नक्की दिसतील.

पैसा व माणसं हे दोन्ही आयुष्यात महत्वाचे व आवश्यक आहेत पण त्याचा बॅलन्स सांभाळता आला पाहिजे.

कुठे थांबायचे??? हे प्रत्येकाला प्रत्त्येक क्षेत्रात नेहमी समजलंच पाहिजे. मग ते प्रकृतीवर अतिक्रमण असो किंवा पैशामागे धावणे असो. जूनी पीढी असो नाही तर नवीन पिढी असो.

आपली पीढी म्हणजे नवीन व‌ जून्या पद्धती रितीरिवाज, संस्कार यांना जोडणारा ब्रिज आहे व त्यामधून मार्ग काढायला आपण शिकलो आहोत. अनेक challenges बघीतले आहेत, झेलले आहेत, व यशस्वीपणे पार केले आहेत. आता हे challenge ही सफलतेने पार पाडू या. नवीन वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलायचा प्रयत्न करू या. विचारांचे नातं इतकं घट्ट करूया की मतभेद पण हसत हसत स्विकारायला शिकूया. Graceful, durable Old furniture व New fashionable furniture ची सांगड घालून पुन्हा एकदा घर सजवू या.

सामान्य जीवन जगणे हे खरंतर प्रत्येकाकरिता व त्याच्या कुटुंबीयांकरिता असामान्य व आनंददायी गोष्ट असते.

सूनेला पारखायचा नाही, समजायचा प्रयत्न करावा. म्हणतात ना, ‘रिश्ते बरकरार रखने के लिए एकही शर्त है, किसी की कमियां नहीं, अच्छाइयां देखें। ईश्वर तो सिर्फ मिलाने का काम करता हैं। संबंधों में नजदीकियां और दूरियां बढ़ाने का काम तो इन्सानही करता हैं।’

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments