श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)
मनमंजुषेतून
☆ मरण : एक चिंतन… ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆
मरण हा शब्द उच्चारला तरी मनुष्याला भीती वाटते. मरणाची भीती का वाटतं असावी? याचा विचार करताना असे जाणवले की मरणानंतर आपण कुठे जाणार हे माहित नाही, तसेच आज जे मी मिळवलं (? ) आहे, (त्यात स्थावर, जंगम मालमत्ता आणि आप्तस्वकीय सर्वच आले…) ते मला सोडून जावं लागेल…
विरह मनुष्याला सहन होत नाही… , त्याला सतत वाटतं असते की जे मी मिळवलं आहे ते कायम टिकेल…
*उगवलेला सूर्य देखील संध्याकाळ झालीं की अस्ताला जातो, तिथे या मर्त्य मानवाची काय कथा…? *
– – मनुष्याला मरणानंतर आपले काय होणार याची भिती असते असे मानले तर जन्म होण्या आधी हा कुठे होता? म्हणजे ते सुद्धा त्याला माहित नव्हतेच…
थोडक्यात हा प्रवास आहे…
*अज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणारा… *
मग, आज आपल्याला ज्ञात काय आहे? तर मी जिवंत आहे…
– – सर्व संतांनी सांगितले आहे की *”उपजे ते नासे”*, मग अशावेळी मनुष्य म्हणून माझं आद्य कर्तव्य काय असेल?
तर *त्यावर सर्व संत एकच गोष्ट सांगतात की स्व ची ओळख करून घे… *
८४ लक्ष योनींमध्ये फक्त मानवाला हा अधिकार आहे…
इथे तुला मानवाचा देह भाड्याने मिळाला आहे…!! त्याचं अखंड स्मरण ठेवणे हे भाडं ठरलं आहे…! आईच्या गर्भातून बाहेर पडतानां मनुष्य भगवंताला वचन देतो की मी तुझे सतत स्मरण ठेवीन, पण नंतर इथल्या मोहमायेला भुलून तो देवाला पूर्णपणे विसरतो…
मरण म्हणजे देवाची भेट आहे… , तेव्हा तो मनुष्याला विचारतो की शंभर वर्ष तू या देहात राहिलास, पण भाडं काही दिले नाहीस…?
– – मग या जन्माचे भाडं चुकविण्यासाठी देव त्याला पुन्हा अन्य योनीत जन्म देतो, मग हे चक्र अव्याहत सुरू राहते…
*”पुनरपि जननं पुनरपि मरणं*
*पुनरपि जननी जठरे शयनं”*
समर्थ रामदास आपल्याला सांगतात – –
*मरणाचे स्मरण असावे।*
*हरिभक्तीस सादर व्हावे।*
*मरोन कीर्तीस उरवावे।*
*येणे प्रकारे।।*
(दा. १२- १०-१३)
श्री गोंदवलेकर महाराज सांगतात की मनुष्याचा पुढील क्षणाचा भरवसा नाही…
*एखादा मनुष्य झोपला आणि सकाळी उठलाच नाही तर तो मेलेला आहे असे म्हणावे लागते… *
– – म्हणून मृत्यू कधी येईल हे कोणाला माहीत नाही… , म्हणून प्रत्येकाने अगदी आतापासून नामस्मरण करायला अर्थात आपले भाडं चुकतं करायला सुरुवात करू…
*कर्जाचा EMI भरला की कर्ज घेणाऱ्याला आनंद होतो, चला एक हफ्ता कमी झाला असे त्याला वाटतं असते. तसे नाम घेतले की आपला भाड्याचा हप्ता फिटायला सुरुवात झाली असे वाटले पाहिजे… *
*हळूहळू मनुष्य अखंड नाम घेऊ लागेल, मग त्याचे कर्ज कधी फिटले, भाडं देऊन कधी संपले हे आपल्याला कळणार नाही… पुढे पुढे अशी वेळ येऊ शकेल की आपण घेतलेल्या नामाचे देवावर कर्ज होईल आणि ते फेडायला तो आपल्या दारी येईल… (जसे श्रीखंडया बनून भगवंताने नाथांच्या घरी पाणी भरले, पांडवांच्या घरी उष्टी काढली…)*
– – त्यासाठी मरणाचे भय गेले पाहिजे, त्यासाठी सर्व संतांनी सांगितलेला सोपा मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण!!!
श्रीराम जयराम जयजयराम!!
© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)
मो. 8380019676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर





