श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)
मनमंजुषेतून
☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ५ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆
चंद्रशेखर गोखले यांची एक चारोळी आहे.
*”घर दोघांचे असते, ते दोघांनी सावरायचे असते, एकाने पसरले तर दुसऱ्याचे आवरायचे असते…!! “*
सध्या मुलामुलींची वाढती वये आणि त्यांचे विवाहसंबंधीचे त्याचे आधुनिक विचार आपल्याला विचार करायला लावतात…
कोणताच विचार वाईट नसतो, जोपर्यंत तो आचरणात येत नाही, अर्थात त्याचे बरेवाईट परिणाम आपल्याला कळत नाहीत…
पारंपरिक विवाहपद्धतीतील सर्व दोष आधुनिक विवाह पद्धतीमुळे पूर्णपणे नष्ट झाले असे म्हणता येत नाही. सध्या तरुण पिढी नवनवीन प्रयोग करून पहात आहे. विवाह संस्था कधी अस्तित्वात आली हे सांगणे अवघड आहे. पण आज जसे त्याबद्दल नवनवीन प्रयोग होत आहेत, मागील काळात अनेक वेळा झाले असतील असे म्हणायला संधी आहे. कारण येणाऱ्या पुढील पिढीस मागील गोष्टी रुचत नसतात, त्यामुळे आपण ज्याला पारंपरिक विवाह पद्धती म्हणतो, ती अशा अनेक स्थित्यंतरातून हा स्थितीत आपल्या हाती आली असेल, पहा हा तर्क रुचतोय का?
सध्याच्या काळात विवाह करण्याच्या वेळी उपवर मुलामुलींच्या असलेल्या अपेक्षा पाहिल्या की या मुलांना पैशाशी लग्न करायचे आहे की ब्लॉकशी, त्या संबंधित मुलाशी लग्न करायचे आहे की त्याच्या स्टेटसशी, मुलीशी लग्न करायचे आहे की ती कमवून घरी आणणाऱ्या पैशाशी? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात…! एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ते योग्य असतीलही, पण वेळा काळ पाहून विवेकाने शक्य ती तडजोड केल्याशिवाय विवाह होऊच शकणार नाहीत. पूर्वी सुद्धा लोकं अशा तडजोडी करीतच होते…
माझी एक विनंती आहे. विवाह करताना मुलगा अथवा मुलगी कोणीही असो, दोघांनी आपलं वय, आपली एकूण कुवत, आपल्या घरातील एकूण वातावरण, आपला स्वभाव, आपली समज, याचा विचार करून आपल्याला अनुरूप असण्यापेक्षा, आपल्या स्वभावाला, संस्कारांना आणि भावी आयुष्याला अनुकूल ठरेल असा जोडीदार निवडण्याचा प्रयत्न करावा…
एक भारतात घडलेली सत्य घटना सांगतो…
*एका तरुणाने पण जिंकून राजकन्येला वरले. आणि आपल्या घरी घेऊन आला. जगात नाव असलेल्या घराण्यात मुलगी नांदायला आली. काही दिवस गेले न गेले, त्याचा राज्याभिषेक ठरला, पण लक्ष्मी नारायणाची जोडी असतानाही त्या दोघांना वनवासात जावे लागले, ज्या मुलीने कधीही दुःख नावाचा प्रकार अनुभवला नव्हता, तिला जंगलातून अनवाणी चालावे लागले, कायम मौल्यवान वस्त्रे, अलंकार परिधान करणाऱ्या राजकन्येला वल्कले परिधान करावी लागली… *
*आपल्या सर्वांच्या मनात असलेल्या प्रभू श्रीराम आणि सीता माते बद्दलच बोलत आहे… *
*अहो, जिथे रामाला वनवास चुकला नाही, तर आपल्या सारख्या सामान्य जनांचे काय होणार…? *
त्यामुळे मनुष्याने आपल्याला चांगला जोडीदार. चांगली सून, चांगला जावई मिळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न जरूर करावेत, अतिरेकी अट्टाहास करू नये. याउलट, विवेकाने योग्य वयात, अनुकूल जोडीदार पाहून विवाह करावा, बाकीच्या *वेताळांना* आपल्या मनात शिरू देऊ नये…!!
पहा पटतंय ना?
– लेख क्र. पाचवा
© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)
मो. 8380019676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर





