श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)
मनमंजुषेतून
☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ७ – ट्रेंड ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) ☆
ट्रेंड
आज मनुष्य अनेक गोष्टी स्वतःला आवडते म्हणून करीत नाही, तर सध्याचा *”ट्रेंड* पाहून करतो असे म्हणावे लागते…
बरं यातील बरेचसे ट्रेंड हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात जाणारे आहेत, असे आपल्या लक्षात येईल…! काळानुरूप सभ्यतेचे मापदंड बदलत असले तरी नीतीचे मोजमाप मात्र कोणत्याही काळात बदलत नसते…! आणि कोणत्याही ट्रेंडपेक्षा नीती कधीही उच्च असणारच, राहणारच आहे, त्यामुळे मनुष्याने त्याचा विचार आधी करायला हवा, नाही का?
पोशाख हा सर्वसाधारणपणे संस्कृतीचा निदर्शक मानला गेला आहे…! पोशाखामध्ये हे विशिष्ट शास्त्र दडलेले असते…! उदा. उष्ण कटिबंधात सैलसर पोशाख प्रामुख्याने आढळतो, तर शीत कटिबंधात घट्ट पोशाख आढळतो…! पण सध्या अंधानुकरण हा स्थायीभाव झाल्याने मनुष्य विवेक न करता अनुकरण करत आहे, पटतंय ना?
आपल्याकडे एक म्हण आहे.
‘ एक नूर आदमी.. दस नूर कपडा…’
थोडक्यात मनुष्याची पत प्रतिष्ठा मोजण्याचे, जाणून घ्यायचे पोशाख हे एक माध्यम आहे.
आपल्या प्रकृतीला, आपल्या संस्कृतीला, आपल्याकडील भौतिक परिस्थितीला झेपेल त्याप्रमाणे पोशाख परिधान करणे उचित नव्हे काय? पण याचा विचारच केला जात नाही असे पुढील उदाहरणातून आपल्या लक्षात येऊ शकेल…
आपल्याकडे साधारण मे महिन्यात लग्नाचा हंगाम असतो. रणरणत्या उन्हात, खास करून गावाकडे जिथे पंख्याची किंवा शीतलीकरण साधनांची सोय करणे शक्य नाही, अशावेळी, अशा ठिकाणी नवरदेव सुटबुट घालून घामाने थबथबून विवाह वेदीवर उभा रहात असतो… (कदाचित म्हणून त्या जागेला वेदी म्हणत असावेत…! ) त्या नवरदेवाची स्थिती काय होत असेल…?
लग्नाच्या नावावर लोकं करीत असलेले अतिरिक्त खर्च, सध्या निघालेले विवाहपूर्व छायाचित्रीकरणाचे फॅड, विवाहातील मौल्यवान संस्कार सोडून त्याला आपण सर्वांनी मिळून दिलेले एखाद्या तांत्रिक सोहळ्याचे अर्थात इव्हेंटचे स्वरूप, तसेच दैनंदिन जीवन जगताना मनुष्य खोट्या प्रतिष्ठेसाठी करीत असलेले अनावश्यक खर्च, या सर्व गोष्टी वेताळ बनून आपल्या मानगुटीवर बसल्या आहेत, नाही का?
यातून आपण बाहेर पडायला हवे.
पटतंय ना?
– लेख क्र. ७
© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)
मो. 8380019676
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर




