राधिका भांडारकर

??

☆ टपरीवरचा चहा… भाग – २ ☆ राधिका भांडारकर ☆

(चहा, पाऊस आणि कांदा भजी यांचं काय नातं असेल ते असो पण त्यात ब्रह्मानंद आहे नक्की. आम्ही “माऊली अमृततुल्य” चहाच्या टपरीजवळच आलो होतो. वंदना अगदी उत्साहात होती. “चल! चल! आता मस्त चहा पिउया. ”) 

इथून पुढे – – 

टपरीभोवती चहा-बाज लोकांची गर्दी होतीच. अनधिकृतपणे का असेना त्या भर गर्दीतही फुटपाथवरच समोरासमोर दोन बाके, बसून चहा पिणाऱ्यांसाठी होती. रस्त्यावरच्याच बोर्डवर खडूने चहाबाबतचा मेनु लिहिला होता किंमतींसह. गुळाचा चहा, साखरेचा चहा, बिनसाखर चहा, आलं गवतीचहा, वेलदोडा चहा वगैरे. फुल कप, हाफ कप, कटींग असेही शब्द वाचायला मिळाले. माझ्यासाठी खरोखरच हे सगळं अनोळखी, गंमतीदार होतं.

वंदना अगदी सराईतपणे त्या चहावाल्या जवळ जाऊन म्हणाली, “भैय्या दो कप कमशक्करवाली चाय दो. ” खरं म्हणजे चहावाला मराठी माणूसच होता पण वंदनाने कदाचित सवयीने त्याला “भैय्या” म्हटले असणार. या उत्तर प्रदेशीय लोकांचं वर्चस्व महाराष्ट्रात किती आहे हे सहज जाणवलं.

दणदण गॅस स्टोव्ह पेटलेला आणि त्यावर मोठ्या ॲल्युमिनियमच्या भांड्यात उकळणारा चहा. ऑर्डर प्रमाणे तो दूध, पाणी, चहाची पत्ती, काही आस्वाद वाढवणारे मसाले एकापाठोपाठ एक भराभर टाकत होता आणि एका डवल्याने ते सर्व मिश्रण खालीवर इतकं काही लयीत ढवळत होता की ते पाहताना माझ्या मनात सहज आलं, ” काम कुठलेही असो, कुठेही असो पण त्यातली तल्लीनता, एकाग्रता महत्त्वाची. शिवाय ग्राहकांची खुशी ही विक्रेत्यांच्या यशाची गुरू किल्ली! हेही जाणवलं चहाची ही टपरी नक्कीच लोकांची आवडती जागा असेल. काही लोक उभे होते. काही बाकावर बसले होते पण एक कपभर लज्जतदार चहासाठी त्यांच्यात असलेली थांबण्याची चिकाटी कौतुकास्पद होती. तिथे असलेल्या सर्वांसाठीच तो एक मस्त स्पेस टाइम होता. तिथे राजकारणावरच्या चर्चाही घडत होत्या. मतं मांडणारा प्रत्येक जण जणू काही त्या विषयात त्याच्या इतकं पारंगत कुणीच नव्हतं अशा अविर्भावात होता. घरापासून दूर वसतीगृहात राहणारे विद्यार्थी तिथे श्रमपरिहारासाठी थांबले होते. त्यांच्यात आगामी परीक्षांविषयी, शिक्षण पद्धतीविषयी, ऐकायला मिळत होतं. कुणाला सरकारी दिरंगाईमुळे हवी ती ओळखपत्रे मिळण्यास विलंब होत असल्यामुळे भविष्याची काळजी होती. त्याच जमावात पुणं पाह्यला आलेले पर्यटकही होते. त्यातले काही ज्येष्ठ पूर्वीचं आणि आजचं पुणं यावर बोलता बोलता मानवाचं सारंच जीवन कसं यांत्रिक झालं आहे यावरची खंतही व्यक्त करत होते. मग विकास, पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, हरित वायू, जागतिक परिषदांपर्यंत ते युद्धांपर्यंत सर्व विषय घुसळले जात होते. या व्यतिरिक्तही अनेक विषय होते. ती केवळ चहाची टपरीच नव्हती तर एक भलीमोठी गाव चावडी होती असे मला वाटले. एक चालतं बोलतं मुक्त बातमीपत्रच म्हणाना. लोकशाही तत्त्वांचं प्रतीकच जणू काही!

इतक्या सर्वांसाठी चहा बनवणारा तो चहावाला मला खरोखरच एक महात्मा वाटू लागला. त्या चहातलं एकतत्त्व या वैविध्यपूर्ण, वेगवेगळ्या स्वभाव जाती धर्मातल्या जनसमूहात आनंदमयी होउन, उर्जा बनून एकवटलं होतं. वंदना मला सांगत होती, ” अगं! पुण्यातली ही “माऊली चहा टपरी” अनेक वर्षांपूर्वीपासून आहे बरं का? टपरीचं थोडंफार आधुनिकीकरण झालं असेल पण बाकी सारं अगदी ४०/५० वर्षांपूर्वी होतं तसंच आहे. चहाची चव सुद्धा बदललेली नाही. आता तिसरी चौथी पिढी असेल पण या कामात त्यांच्या कुटुंबातलीच माणसं आहेत. इथे तुला एकही बालकामगार दिसणार नाही. गरजूंना रोज मिळतो. मात्र. हा मुलगाही पदवीधर आहे पण याच पारंपरिक व्यवसायात त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. नाही तरी नोकऱ्या कुठे मिळतात? हा व्यवसाया उत्तम! या क्षणी माझ्या मनात विचार येत होता की बहुसंख्य चहाप्रेमी लोकांची गरज ओळखून या व्यवसायाची परंपरा सांभाळणारे हे खरोखरच थोर लोक नाहीत का? काम हीच प्रतिष्ठा असते. या व्यवसायांद्वारे इतकी सधनता प्राप्त करूनही त्यांनी या टपरीचे चांगल्या हॉटेलमध्ये का नाही रूपांतर केले?

पण तसं नसतं.

इथे एक मानवी मानसशास्त्र असतं. टपरीवरचा चहा आणि चहा पिणारे यांची भावनिकता ही या टपरीशीच परंपरेप्रमाणे जोडलेली असते. तो आनंद, ती भावनिकता, ते वातावरण आणि तो स्वाद जपणं हा त्यामागचा प्रयत्न आणि हेतू असावा. शिवाय टपरी चहा ही एक आगळीवेगळी संस्कृती आहे.

टपरीवर चहा पिण्याचा अनुभव माझ्यासाठी पहिलाच होता. तो कडक, सुगंधी, मसालेदार, वाफाळलेला कपात ओसंडून बशीत सांडलेला चहा मला चहापानाचा एक वेगळाच आनंद देत होता जणू काही मी त्या वातावरणातला एक भाग बनले होते आणि ते फीलिंग मला आवडत होतं. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे, स्टेडीअममध्ये जाऊन क्रिकेटची मॅच पाहणे आणि टपरीवरचा चहा पिणे यातला आनंद एकाच जातीचा आहे असेच मला वाटले. चहापानाची माझी चौकट मी मोडली होती पण या निमित्ताने मी मानवी जीवनाचं एक वर्तमानपत्र जणू काही वाचत होते.

म्हटलं तर तो एक उनाड दिवस होता पण त्या उनाड दिवसांने मला एक वेगळी दृष्टी मात्र नक्कीच दिली. जीवनातली ही रांगडी सार्वजनिकता मला मजेची वाटली. असेही जगावे..

वंदनाने रिक्षानेच मला एका सोयीच्या वळणावर सोडले. उतरताना मी तिचा हात धरला आणि म्हटले, ” थँक्यू वंदना! आज मला खूप मजा आली. “माऊली अमृततुल्य चहा” प्यायला आपण परत या टपरीवर नक्की जाऊया.” 

 समाप्त –

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted