डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
मनमंजुषेतून
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “भिकारी…???” – भाग १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
भिकारी…???
अं… हं……. भिक्षेकरी किंवा याचक म्हणूया हवं तर…..!
समाजात मात्र भिकारी हाच शब्द प्रचलित आहे…….
कोण असतो हा भिकारी…..?
सध्या आंब्याचा सिझन चालू आहे, लोक आंबे आणतात, तो कापून खातात किंवा आमरस करतात…….
परंतु त्याची कोय जी असते तीला मात्र कोणी जपून ठेवत नाही, एका क्षणामध्ये या कोयीला डस्टबिन मध्ये टाकलं जातं…….!
– – – काही माणसं अशीच गोड असतात आंब्यासारखी, हा *गोडवा* असतो दरमहा मिळणाऱ्या पगाराचा / पेन्शनचा, प्रॉपर्टीचा किंवा सोन्या नाण्याचा, FD चा किंवा आणखी कशाचाही…….!
मग हा गोडवा त्यांच्याच घरातले लोक चाटून-पुसून खातात किंवा खरवडून खरवडून गर काढून त्यांचा आमरस करतात…….
एकदा का हा *”गोडवा”* संपला की, मग पुन्हा उरते ती कोयच…….!
आता गोडवा नसलेल्या या कोयीचा काय उपयोग…….?
गोडवा संपल्यानंतर या कोयीना सुद्धा डस्टबिन, म्हणजेच उकिरड्यात फेकलं जातं…….!
मी लहान असताना खेड्यात “कोयनापानी” नावाचा खेळ खेळायचो…….
यात एका कोयीला दुसऱ्या कोयीने नेम धरून उडवायचे……. या कोयी जिंकायच्या……. ज्याच्याजवळ जास्त कोयी त्याला सर्वात श्रीमंत समजले जाई…..!
ज्याच्याजवळ जास्त कोयी, तो स्वतःला अलेक्झांडर समजून चालत असे, आणि आम्ही त्याच्याकडे आदर युक्त भीतीने नम्रतेने पाहत असु…….!
जे खेड्यातील असतील त्यांना हा खेळ नक्की आठवेल…..!
– – कोयनापानी खेळून, कोयी जमवून श्रीमंत होणे हा खेळ आता कधीच संपला आहे, या गर आणि गोडवा नसलेल्या *कोयी* घरात ठेवणे आता कोणाला परवडणार आहे???
आई बापाला घरात ठेवण्याचा “डाव” सुद्धा आता संपला आहे…..!
आज अशा रस गर आणि गोडवा संपलेल्या कोयी घरातल्या कुठल्यातरी कोपऱ्यात पडून असतात, थेरडी, म्हातारी, मरायला टेकलेलं म्हातारं, रिटायर्ड झालेला बिनकामाचा बाप किंवा आजारपणात अडकलेली, लवकर मरत पण नसणारी म्हातारी आई……. अशी या कोयीना नावं आहेत…….!
कधीतरी सुंदर आंबा असणाऱ्या, या कोयी आता घरातल्या जागा अडवून ठेवतात, खाटा अडवून ठेवतात, खातात चारच घास परंतु स्वयंपाक करावा तर लागतोच ना…….?
‘यांची फालतूची आजारपणं काढायची का पोरांच्या शाळेचं बघायचं…….? यांच्यामुळे सगळं महिन्याचं गणित बिघडतं…….! ‘
“मरत पण नाहीत मेली लवकर”, “खायला कार भुईला भार’
……. हे शब्द ऐकून त्या कोयी आणखी कोमेजून जातात…..!
डोक्यावर घेतलेली फाटकी चादर किंवा पदर भिजून जातो, बघायला कोणाला वेळ असतो…….?
चादर किंवा तो पदर हेच या मूक अश्रूंचे “माफीचे साक्षीदार”…….!
कारण आई बाप कधी कोणाला शिक्षा करतात का?
त्यांनी मुलांना माफ केलेलं असतं…….!
– – किती दिवस सांभाळायचं अशा या कोयीना? म्हणत मुलं, सुना, नातवंडं यांचा बांध फुटतो आणि वैतागून, घरातले हेच लोक या “कोयी”……. रस्त्यावरच्या उकिरड्यात फेकून देतात.
कसं सांगू…..???
सूर्य मावळल्यावर नाही, “बाप विझला” की आयुष्यात अंधार होतो…..!
आई गेली की आईचा नाही, “बाळा” या कानावर येणाऱ्या गोड शब्दाचा, कायमचा “अंत्यविधी” होतो…..
आई कुठेच कधी जात नाही….. जातो तो “हा शब्द”…!!!
घरातल्या या कोयी फेकणाऱ्या मित्रानो आणि अगं ताई…..
इथून पुढच्या आयुष्यात जखमांनी जेव्हा जीव जाईल थकून……… तेव्हा मायेच्या ओलाव्याने आता कोण सांग, हळद लावेल फुकून…….????
आणि हो……. आता पावसाळा सुरू होईल, दारं नीट लागणार नाहीत……. ती फुगून बसतील, तेव्हा मित्रा आणि अगं ताई पावसाला दोष देऊ नकोस…….
कदाचित तुमच्या आई बापाचे, सासू सासऱ्यांचे पाय उंबऱ्यात अजूनही अडकून बसले असतील, तुमच्याच आठवणीत……. म्हणून दारं नीट लागत नाहीत…….!
कसं सांगू तुम्हाला…….????
तरीही या कोयी फेकल्या जातात उकिरड्यावर…….
अंगात त्राण नाही, या वयात कुठलंही काम करायचे बळ नाही, हातात डिग्र्या घेऊन कितीतरी तरुण बेरोजगार म्हणून भटकत आहेत, अशावेळी या म्हाताऱ्या माणसांना काम कोण देणार…..?
……. इथून खेळ सुरू होतो जगण्याचा…..
जगण्यासाठी नाईलाजाने भीक मागण्याचा…….!
आता या कोयीना नवीन नाव आपण देतो… भिकारी…!
मी आणि मनीषा मग या उकिरड्यात पडलेल्या कोयी उचलतो, त्यांना साफ करतो, आणि मायेचं पाणी घालतो, एक छोटासा खड्डा खणून त्यात यांना पुन्हा रुजवतो, थोडं खत घालतो आणि पुन्हा त्यांच्यापासून एखादं हापूसचं आंब्याचं झाड तयार करण्याचा प्रयत्न करतो….!
– – – आमच्या भाषेत आम्ही याला पुनर्वसन म्हणत होतो…!
(आम्ही पुनर्वसन त्यांचेच करतो, ज्यांना भीक मागायची नाही, सन्मानाने जगायचे आहे, जे घरातून बाहेर फेकले गेले आहेत, किंवा ज्यांना कोणाचाही आधार नाही आणि यांना भीक मागण्याशिवाय पर्याय सुद्धा नाही.)
काम नको म्हणून ज्यांनी भिकेचा धंदा केला आहे, असे धंदेवाईक भीक मागणारे, भिकेच्या दलदलीतून बाहेर येण्याची इच्छाच नाही असे, यांनी यातून बाहेर यावे यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहेत, परंतु जोपर्यंत समाज, पुण्य मिळेल या भावनेने यांना “दान” समजून “भीक” देत आहे, तोपर्यंत धंदेवाईक लोक यातून बाहेर येणार नाहीत, हे सुद्धा एक कटू सत्य आहे…..! )
मी दरवेळी सर्वांना सांगतो, कोणालाही “भीक” देऊ नका, “दा” म्हणून त्याला “मदत” करा…..!
भीक आणि मदत मध्ये फरक आहे…..
“भीक” म्हणजे आपली कोणतीही कृती, ज्यामुळे समोरची व्यक्ती आपल्यावर किंवा दुसऱ्यावर पुन्हा अवलंबून राहणार आहे, परावलंबी होणार आहे…….
आणि “मदत” म्हणजे आपली कोणतीही कृती, ज्यामुळे समोरची व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल किंवा कोणावरही अवलंबून राहणार नाही, स्वावलंबी होणार आहे…!
एखाद्याला सन्मानाने जगण्यासाठी, खड्ड्यातून बाहेर येण्यास “मदत” करूया…….!
एखाद्याला “भीक” देऊन, त्याला परावलंबी करून पुन्हा खड्ड्यात नको ढकलुया…..!!
असो, मला अपेक्षित असलेल्या गोष्टी साध्य करण्यासाठी हरतऱ्हेने आपण “मदत” करत आहात आणि म्हणून हा लेखाजोखा आपणास सविनय सादर…….!
विषय आंब्यापासून सुरू झालाय, तर आंब्यापासूनच सुरुवात करतो.
अन्नदान….. नव्हे क्षुधाशांती आणि तृषाशांती
- रस्त्यावरील आमच्या या लोकांना आंबे खायला कधी मिळत नाहीत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वृद्ध आणि बाल बच्चे यांना हापूसचे आंबे खायला दिले आहेत.
- रस्त्यावर अन्नावाचून रस्त्याकडेला पडून असणारे वृद्ध आणि आजारी लोक तथा वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असणारे अत्यंत गरीब लोक यांना दररोज संपूर्ण जेवण दिले आहे.
अन्नदान म्हणण्यापेक्षा “क्षुधाशांती” हा शब्द जास्त योग्य वाटतो. दान देण्याइतपत मी अजून श्रीमंत झालो नाही, जे काही दिलं, ते आपण… ती आपल्या मनाची श्रीमंती होती…!
- तीव्र उन्हाळ्यात एकतर अंगाची लाही लाही होत असताना त्यात पाण्याची कमतरता, अशावेळी रस्त्यावरील वृद्धांना आणि लहान मुलांना पॅक केलेल्या पाण्याच्या बाटल्या दिल्या आहेत.
याच सोबत शरीरातील कमी झालेले पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स (क्षार) भरून काढण्यासाठी “ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ORS)” संपूर्ण उन्हाळ्यात आपण दिले आहे.
- खराटा पलटण – (Community Cleanliness Team)-
पूर्वी भीक मागणाऱ्या आज्या आणि मावश्या यांची एक टीम तयार केली आहे, या टीम मार्फत परिसरातील स्वच्छता करून घेत आहोत. स्वच्छता केल्यानंतर ज्यांच्याकडे स्वयंपाक करण्याचे काही साधन आहे अशांना 7 किलो साखर तथा महिनाभर पुरेल इतका कोरडा शिधा / किराणा / राशन दिले आहे.
– – मागितलेली भीक हि लाचारीने मिळते, पण आपण केलेल्या कष्टाचा मोबदला सन्मानाने मिळतोय… तोही भरपूर प्रमाणात, हा विचार त्यांच्यात रुजावा हि यामागे भावना आहे.
“हातात नको भिकेची वाटी… चल हातात घेऊ पेन्सिल आणि पाटी”… अर्थात शैक्षणिक मदत…!
भीक मागणाऱ्या लोकांचे संपूर्ण पुनर्वसन करताना, मुलांची भीक थांबवणे हा एक फार मोठा चॅलेंज आहे.
एक तर भरपूर खायला – प्यायला आणि पैसे मिळत असल्यामुळे मुलांना शाळेत जायची इच्छाच होत नाही आणि मुलांकडून दररोज भिकेतील पैसे पालकांना मिळतात यासाठी पालकांना मुलांनी शाळेत जावे असे वाटतच नाही.
– – परंतु गेल्या अकरा वर्षाच्या त्यांच्याबरोबर झालेल्या एका चांगल्या रिलेशनशिप मुळे आपण भिक्षेकर्यांच्या अनेक मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणले आहे.
यात नर्सरीपासून ते बीबीए / एमबीए पर्यंतची मुले आहेत, हे सांगायला अभिमान वाटतो.
आपण या सर्व मुलांना गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक मदत करत आहोत.
यात शाळा कॉलेजच्या फी, वह्या, पुस्तके, गाईड, युनिफॉर्म शाळेचे दप्तर, बूट सॉक्स, काही वेळा प्रायव्हेट ट्युशन इत्यादीचा अंतर्भाव असतो.
यावर्षी दरवर्षी पेक्षा जास्त मुलं आणि भिक्षेकरी पालक यांच्याकडून आम्हाला सुद्धा शैक्षणिक मदत करा, म्हणून विचारणा झाली.
खरं तर माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची, जमेची आणि सकारात्मक बाजू आहे!!!
भीक मागणाऱ्या पालकांची, नवीन पिढी शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली, तर हळूहळू का होईना, परंतु भीक मागणाऱ्या समाजाची संख्या आपोआप कमी होत जाईल.
दरवर्षाचे जून जुलै ऑगस्ट हे तीन महिने आमचे प्रचंड शैक्षणिक खर्चाचे असतात.
यावर्षी जून महिन्यात जे करायचे ठरवले होते, त्याहीपेक्षा जास्त मुलांना आपल्यामुळे मदत करता आली.
ओळख – देख नसणाऱ्या या मुलांच्या भविष्यासाठी आपण आपल्या घासातला घास काढून दिलात, ऋण व्यक्त करायला खरोखर माझ्याकडे शब्द नाहीत.
नुकताच अकरावी कॉमर्स ला गेलेला एक मुलगा, मला आत्तापासूनच टॅलीचे क्लास लावून द्या म्हणून हट्ट धरून बसला.
– – टॅली (Tally) हे एक (गणितातील) अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे. जमा-खर्च, हिशोब, बिले, कर अशा व्यवहारांची नोंद ठेवण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो. या क्षेत्रातील नोकरी मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले हे सॉफ्टवेअर.
– – आत्ता आत्तापर्यंत आईचा पदर धरून भिकेतले मिळालेले पैसे वाटून घेण्याचा “हट्ट” धरणारा ‘तो” आणि आता टॅलीचे क्लास लावा म्हणून “हट्ट” धरणारा “हा”…!
एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झालेला हा अचंबित करणारा बदल ज्याच्या समोर झाला आहे, त्या कुणाच्याही डोळ्यात, हा बदल पाहून नक्की पाणी येईल… मी तरी काय वेगळा…?
– क्रमशः भाग पहिला
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : abhisoham17@gmail.com,
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





