डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ भिकारी…???” – भाग २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

(आत्ता आत्तापर्यंत आईचा पदर धरून भिकेतले मिळालेले पैसे वाटून घेण्याचा “हट्ट” धरणारा ‘तो” आणि आता टॅलीचे क्लास लावा म्हणून “हट्ट” धरणारा “हा”…! एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत झालेला हा अचंबित करणारा बदल ज्याच्या समोर झाला आहे, त्या कुणाच्याही डोळ्यात, हा बदल पाहून नक्की पाणी येईल… मी तरी काय वेगळा…?) 

इथून पुढे – – – 

मी या अगोदरही सांगितलं आहे, मी बारावीपर्यंत पूर्णतः वाया गेलेलं एक नालायक कार्ट होतो, माझ्या दहावीत मला बीजगणित आणि भूमिती मध्ये 120 पैकी 18 मार्क पडले होते, याच गणितामुळे मला दहावी रिपीट करावी लागली होती, घरच्यांचा मार आणि बाहेरच्यांचे टोमणे खावे लागले होते. गणितावर माझा भयंकर राग आहे…!

आणि म्हणूनच आमच्या दोघांमध्ये “36 चा आकडा” आहे…

आजही गणित माझ्या वाट्याला जात नाही आणि मी त्याच्या…!

आज त्याच गणिताच्या नाकावर बुक्की मारून, मी गणितावर घ्यायचा सूड माझ्या या मुलाने पूर्ण केला 

मला बीजगणित जमलं नाही… पण याचना करणाऱ्या माऊलींच्या मुळाशी जाऊन, आपल्या सर्वांच्या साथीनं, त्यांचं “बीज ” शोधून, तिथे खत पाणी घालून आलो, आयुष्यातील चुकलेल्या गणितातील, वाईट गोष्टी “वजा” करून, “बेरीज” मांडून आलो…!

भूमिती मधली प्रमेयं आणि सूत्र, मला पाठ झाली नाहीत, पण रस्त्यावरच्या लोकांची दुःखं मला पाठ झाली, त्यांना यातून बाहेर काढायचे “सूत्र” समजावून घेण्याचा प्रयत्न केला…!

अल्फा साईन कॉस थिटा मला कधीच समजलं नाही, मात्र या लोकांची दुःख, भाव भावना, मन:स्थिती समजून घेता घेता, नमःस्थिती म्हणजे काय हे मात्र समजले…!

प्रत्येक झाडानं फळ द्यावं असं काहीच नाही… जमेल त्यांनी सावली द्यावी…!

मी झाड झालो… फळ देण्याची माझी पात्रता नव्हतीच, मग मी सावली देण्याचा प्रयत्न केला, अर्थात तुम्हा सर्वांच्याच साथीनं…!

छान छान फुलं सुद्धा माझ्या झाडाला लागली नाहीत, मग बाभूळ होऊन कोणालातरी जपण्याचा प्रयत्न केला…!

आणि…

‘लावाल ना टॅलीचा क्लास…??? ‘ त्याच्या या प्रश्नाने मी तंद्रीतून जागा झालो.

योगायोगाने याच दिवशी फादर्स डे होता, तसा तो रोजच असतो हे वेगळं…!

माझ्यासाठी टॅलीचा क्लास लावा, म्हणून मागे लागणाऱ्या या मुलाच्या हट्टापेक्षा आणखी कोणतंही मोठं गिफ्ट माझ्यासाठी असूच शकत नाही…!

360 अंशाच्या कोनात या मुलाचा झालेला हा बदल असो किंवा दोन वर्षांपूर्वी रस्त्यावर पडलेल्या एका मुलाने स्वतःला बदलून जॉब करायला सुरुवात केली आणि पगारातले पैसे संस्थेला देणगी म्हणून द्यायला आलेला असो. (“देणगी” याच नावाने या मुलाविषयी सविस्तर लिहिले होते)

फुटबॉल च्या खेळात अव्वल असूनही, केवळ फुटबॉलचे स्टड नाहीत म्हणून नाकारला गेलेला, अन्याय झालेला भिक मागणाऱ्या एका आईचा मुलगा.

फोडणे, तोडणे, मारणे, झोडणे हिच भाषा तोंडात…

आज तोच मुलगा तुम्हा सर्वांच्या मदतीमुळे येत्या काही दिवसात फुटबॉल कोच होत आहे. ‘गरीब मुलांना मी फ्री मध्ये शिकवणार सर, मला नोकरी लागली की काही गरीब मुलांना मी सुद्धा शैक्षणिक मदत करणार सर… ‘ 

आज हि भाषा घेऊन तो “माणूस” झाला आहे.

(“घातक” या नावाने याच्यावरही सविस्तर लेख लिहिला होता)

तर… गेल्या अकरा वर्षात खोटे वाटतील, इतके खरे आणि डोळ्यासमोर घडणारे हे बदल पाहायला खरंच खूप भाग्य लागतं, आणि तो भाग्यवान मी आहे…

हे भाग्य आपणा सर्वांमुळे आमच्या पदरी पडलं…!

मी आणि मनीषा आम्ही कृतज्ञ आहोत आपले

उद्या ही मुलं मोठी होतील, स्वतःबरोबर इतरांचंही आयुष्य बदलतील…

जगणं असं या मुलांसारखं असावं… फुलांसारखं… विखुरले तरी सुगंध मागे राहतोच…!

*वैद्यकीय. 

आतापर्यंतच्या कामात मला एक कळलंय, “जिवंत हाय तवंर जगून घ्या… मेल्यावर जाळायची / पुरायची गडबड करून लोकांना घरी लवकर जेवायला जायचं असतं… “

हेच अंतिम आणि अंतिम सत्य आहे… काहीही म्हणा…!!!

इथं सर्व काही महाग आहे परंतु वेदना मोफतच मिळतात आणि या वेदना देणारा आपलाच असतो…

अशा या वेदनायुक्त आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यात एक हळुवार फुंकर घातली आहे, आपल्या सर्वांच्या मदतीने…!

  1. अंध अपंग आणि वृद्ध असे जे लोक आजारी आहेत, अशांना रस्त्यावरच तपासून वैद्यकीय सेवा दिली आहे, कमरेचे, मानेचे, गुडघ्याचे पट्टे, वॉकर, कुबड्या, काठ्या इत्यादी साधने देऊन शारीरिक दृष्ट्या उभे केले आहे.

 

  1. ज्या गोष्टी रस्त्यावर करणे शक्य नाही उदा. रक्त लघवी तपासणी, सोनोग्राफी एक्स-रे वैगरे वैगरे… या गोष्टी हॉस्पिटलमध्ये करवून घेतल्या आहेत. ज्यांना गरज आहे अशांना मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी एडमिट केलं आहे.

पूर्णपणे बरे झाल्यानंतर, तुमच्या मुळगावी जाऊन किंवा इथं पुण्यात काहीतरी व्यवसाय किंवा नोकरी करा… भीक मागणं सोडा, अशी प्रेमाची गळ, नेहमीप्रमाणे घातली आहे…!

सन्मानाचे स्वावलंबी जीवन… Rehabilitation

वैद्यकीय सेवा रस्त्यावर देत असलो, तरीही हे माझे प्रमुख उद्दिष्ट नाही. त्यांच्यात उठून – बसून, त्यांच्यासोबत जेवण करून, भीक मागण्याचे मूळ कारण त्यांच्या नकळत शोधणे आणि हळूच त्यांच्या हृदयात प्रवेश करून, या लोकांना सन्मानाने जगायला शिकवणे, भीक मागणे सोडायला लावून काहीतरी व्यवसाय करायला तयार करणे, त्यांना तो व्यवसाय टाकून देणे, भीक मागणाऱ्या पालकांशी चांगलं नातं करून, त्यांच्या मुलांनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी त्यांची परवानगी मिळवणं, आणि “भिक्षेकरी” म्हणून नाही तर “गावकरी” म्हणून जगायला लावणं… हे माझे प्रमुख ध्येय आहे…! 

  1. जगायलाच थकलेले एक आजोबा, काही काम करू शकतील अशी शारीरिक कुवत नाही. या आजोबांना एक वजन काटा घेऊन दिला आहे. लोक येतील, या वजन काट्यावर स्वतःचे वजन करतील आणि आजोबांना पैसे देतील.

हे कोणालाही करायला जमेल असं सोपं आणि बैठं काम आहे.

प्रचंड गर्दी असणाऱ्या रस्त्यावर, परंतु यांना काही त्रास होणार नाही, अतिक्रमण होणार नाही, अशा ठिकाणी त्यांना बसवलं आहे.

आयुष्यातून कायमचे “उठण्याआधी” शांतपणे काहीतरी काम करत ते आता “बसले” आहेत…!

लोकांनी वजन काट्यावर केलेल्या “वजनामुळे” यांच्या आयुष्याचा “भार” थोडा हलका होईल, अशी आशा करतो.

या महिन्यात एक जण सुलभ शौचालयात (Public Toilet) व्यवस्थापक म्हणून काम करू लागला आहे. याच्या मुलालाही आपण शैक्षणिक प्रवाहात आणले आहे.

याचं जगणं आणखी “सुलभ” करण्यासाठी प्रयत्नात आहे…!

इतर… 

  1. तीव्र उन्हाळा आणि पुढे येणारा पावसाळा दोन्ही लक्षात घेऊन सर्वांना आपण छत्र्या घेऊन दिल्या आहेत.
  2. जी पुरुष मंडळी काम करू लागली आहेत त्यांना पुढील महिन्यात आपण रेनकोट देणार आहोत.
  3. आंघोळ… किती साधी गोष्ट…! आपण या गोष्टीचा विचार सुद्धा करत नाही.

परंतु रस्त्यावर राहताना आंघोळ करणे हा एक मोठा टास्क असतो, आंघोळीसाठी पैसे लागतात, साबण लागतो, आंघोळ केल्यावर घालायला कपडे नसतात, असलेच तर कपडे धुवायला साबण नसतो, अंगावरचे कपडे धुवून वाळायला टाकले, तर अंगावर घालायचे काय…? अजूनही बरंच काही प्रश्न असतात…

आणि मग आंघोळ टाळण्याकडे कल वाढतो…

आपण म्हणतो हे लोक किती गलिच्छ राहतात…

अनेकांना गलिच्छ राहायची इच्छा नसते, परिस्थिती त्यांना तसे राहायला भाग पाडते…!

आंघोळीसारखी साधी सर्वसामान्य गोष्ट, पण रस्त्यावर राहणाऱ्यांसाठी हा एक फार मोठा टास्क आहे, याची कुणालाच जाणीवही होत नाही…

बरोबर आहे, ठेच लागल्यावरच अंगठा असल्याची जाणीव होते, तोपर्यंत नाही, “हि वस्तुस्थिती आहे…! “

असो, आंघोळीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी उदा. टॉवेल, अंगाचे – कपड्याचे साबण आणि इतर कपडे दिले आहेत.

बऱ्याच लोकांचे, आंघोळ करण्यासाठी सुलभ शौचालयामध्ये ऍडव्हान्स पैसे भरले आहेत.

या महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ स्तरावरून, भीक मागणाऱ्या लोकांचे पुनर्वसन कसे करता येईल, या चर्चेसाठी बोलावले होते.

मला आलेल्या अनुभवांच्या आधारावर, पुनर्वसनासाठी सहज करता येतील असे 14 मुद्दे मी सादर केले आहेत.

चर्चेत उपस्थित असणाऱ्या इतर मान्यवरांनीही अत्यंत उपयुक्त सूचना दिल्या.

या सर्वांची अंमलबजावणी झाली, तर महाराष्ट्रात खरोखर एकही व्यक्ती भीक मागताना दिसणार नाही.

असो…

माझे आणि मनीषा चे दोन दोन हात आणि तुम्हा सर्वांचे हजारो हात घेऊन, माझ्या सदसद्विवेक बुद्धीला जे पटलं ते या महिन्यात केलं… आपल्यासमोर मांडलं…

खूप लोक म्हणतात, ‘तुम्ही हे काम करता, रात्री किती शांत आणि सुखाने झोप लागत असेल तुम्हाला…? ‘

खरं सांगू…???

स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे लोटली, पण या दुर्लक्षित समाजाचा अजूनही विकास झाला नाही… झोप कशी येणार…?

आपल्या साथीने गेली अकरा वर्षे पूर्ण वेळ मी या लोकांसाठी काम करत आहे… अजूनही म्हणावं तसं यश हाताला लागलं नाही… अजूनही वरच्या पायरीवर सरकलो नाही… झोप कशी येणार…?

अकरा वर्षे काम करून आज सुद्धा, मला असं वाटतं की मी आजही – अजूनही या कामाच्या बालवाडीच्याच इयत्तेत आहे… वरच्या इयत्तेत मी कधी जाणार…? मग झोप कशी येणार…?

अकरा वर्ष एकाच इयत्तेत राहणं, याच्या वेदना काय असतात कशा सांगू…? झोप कशी येणार…??

तुम्ही सर्वांनी मिळून माझ्या हातात पाटी पेन्सिल दिलीत,

पण आज 11 वर्ष, बाराखडी शिकताना अजूनही मी पाटीवर अ.. अ… आंघोळीचा, हेच गिरवत आहे, याची खंत आहे…

झोप कशी येणार…??

प… प… पसायदानाचा मी कधी गिरवणार…?

ज्ञ… ज्ञ… ज्ञानेश्वर माऊलींचा…

हा “ज्ञ” माझ्या पाटीवर उमटून, माझी बाराखडी पूर्ण होऊन वरच्या इयत्तेत माझे लोक कधी जाणार? याच विचारात मी असतो…! मग शांत सुखाने कशी झोप येणार…?

मध्यरात्री एखाद वेळी वाटतं, जाऊ दे थांबवू हे सर्व… बास झालं आता…! या विचाराने शांत सुखाने कशी झोप येणार…?

केव्हातरी पहाटे मग, कुशीवरून वळताना, तुमची आठवण येते…

तुमची प्रत्येक कृती, तुमचे मदतीचे हात आणि कौतुकाचे शब्द… माझ्यासाठी गाणं होऊन कानात रुंजी घालतात…

रुक जाना नहीं तू कहीं हार के 

काँटों पे चल के मिलेंगे साए बहार के… ओ राही, ओ राही…

तू तो चला था सपने ही ले के 

कोई नहीं तो हम तेरे अपने हैं, 

रुक जाना नहीं… रुक जाना नहीं… ओ राही, ओ राही…

तुम्ही गायलेलं हे गीत, माझ्यासाठी जीवन गाणं बनतं…!

हे गाणं ऐकता ऐकता मात्र मी निश्चिंत झोपी जातो, “उद्याची सकाळ” होण्याची वाट पहात…!!!

– समाप्त – 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted