श्री संभाजी बबन गायके
☆ “माझी वारी ! माझा अनुभव !” – लेख क्र. ६ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
☆
मरणाचा सोहळा आणि सोहळ्यातील मरण!
काही परंपरा परिस्थितीनुरूप तयार होतात आणि जोवर परिस्थिती बदलत नाही, तोवर टिकून राहतात. देहू-आळंदी ते पंढरपूर हे अंतर किलोमीटर्सच्या भाषेत सुमारे २५० किलोमीटर्स एवढे आहे. श्री संत गजानन महाराज पालखी शेगाव ते पंढरपूर हे अंतर येताना सुमारे ७५० किलोमीटर्स अंतर कापते… तर येताना मार्ग वेगळा असल्याने ५५० किलोमीटर्स चालावे लागते. कोथळी जिल्हा जळगाव येथून मुक्ताबाई तर थेट जाऊन येऊन थेट सुमारे १५०० किलोमीटर्स अंतर चालतात. पैठण ते पंढरपूर सुमारे ३५० किलोमीटर्स भरते.
देहू-आळंदी, पैठण, मुक्ताईनगर, शेगाव इत्यादी ठिकाणाहून पालखीसोबत पंढरीस येणारे बरेचसे वारकरी आषाढी एकादशीनंतर दुस-या दिवशी वाहनांनी घरी परततात. काही मोजके वारकरी पालखी सोबत चालत माघारी जातात… त्याला परतवारी म्हणतात. आणि परत येतानाचा आव्हानात्मक निम्म्याच दिवसांत प्रवास उरकला जातो!
पूर्वी आजच्या इतके रस्ते विकसित नव्हते. बैलगाडी हे वाहन वारीसोबत नेता यायचे. क्वचित घोडागाडी सुद्धा. पण स्वयंचलित वाहनांची सोय नव्हती. वारी काळात पावसाची सोबत असली तरी हवामानानुसार ऊनही असते कित्येकवेळा. दिवसभराची पायी वाटचाल, त्यामानाने लाभणारी कमी विश्रांती, जेवणाच्या वेळांतील, पदार्थातील बदल, पाणी बदलल्यामुळे, दुषित हवामानामुळे काही वारकरी लोकांची प्रकृती बिघडण्याची शक्यता असतेच. जुन्या काळी तर अनेक आरोग्य समस्यांना वारकरी तोंड देत असत.
लाखो लोक सहभागी असलेल्या वारीदरम्यान वारकरी मृत होण्याचे प्रकार घडणे साहजिकच असे. अशावेळी मृतदेह त्या व्यक्तीच्या मूळगावी घेऊन जाणे अशक्यप्राय होत असे. दळणवळणाची, संपर्क साधने फारशी उपलब्ध नसल्याने मृताच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी बोलावून घेणे वेळेच्या कमतरतेमुळे व्यावहारिक ठरत नसे. मग अशा प्रसंगी ज्या ठिकाणी वारकरी मयत झालेला असेल त्याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार केला जाई. तोवर पालखी सोहळा थांबून राही. टाळ-मृदुंगाच्या आणि अभंगांच्या साथीने अंत्यसंस्कार केले जात. आणि मगच सोहळा मार्गस्थ होई!
भक्तिभाव असल्याने वारीच्या मार्गावर एखाद्यास मृत्यू आला तर ती व्यक्ती दैववान होती, त्याला नामस्मरण करता करता देवाने त्याच्याकडे बोलावून घेतले, अशी लोकभावना होती.
हल्ली वारीत वैद्यकीय उपचार, रुग्णवाहिका मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. वाहनांची उत्तम सोय असते. त्यामुळे असा काही प्रसंग उद्भवला तर मृतदेह त्या व्यक्तीच्या गावी पाठवणे शक्य झाले आहे.
एका वारीच्या प्रवासात माझे ज्येष्ठ स्नेही श्री. संभाजी वाघेरे यांना मुतखड्याचा आत्यंतिक त्रास होऊ लागला. आम्ही नेमके वाखरीवरून पुढे निघण्याच्या गडबडीत होतो. त्या प्रचंड गर्दीतही एक डॉक्टर उपलब्ध झाले. त्यांनी प्रथमोपचार केले परंतू रुग्णाला दुखणे असह्य होत असल्याचे पाहून त्याला रुग्णवाहिकेतून पंढरपूरला पाठवण्याचा निर्णय घेतला गेला. आणि रूग्णाला सोबत म्हणून मी ही त्या रुग्णवाहिकेतून निघालो. लाखो लोकांचा समुदाय लगबगीने पुढे निघालेला होता… पण रुग्णवाहिका पाहताच वाट करून दिली जाई… काळजीपोटी वारकरी आत डोकावून पहात… आणि या माणसाला लवकर बरं वाटू दे… अशी विठ्ठलास प्रार्थना करीत… पंढरीस पोहोचल्यावर शासकीय रुग्णालयात योग्य ते उपचार मिळाले. मात्र रात्री पुन्हा त्रास होऊ लागल्याने एका खाजगी डॉक्टरांकडून औषधे घ्यावी लागली.
आम्ही खरं तर औषधोपचार झाल्यानंतर पंढरीत जाऊन आमच्या मुक्कामाच्या जागी पोहोचणार होतो. पण नेमकी त्याचवेळी माझी तब्येत खूप बिघडल्याने मलाही काही सुचत नव्हते. मीही औषधे घेतली. जिथे आम्ही दवाखान्यात गेलो होतो तिथून आमची मुक्कामाची जागा खूपच दूर होती… गर्दीत चालणे अवघड होते. म्हणून आम्ही मंदिराजवळच्या एका धर्मशाळेत रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. पण इकडे दिंडीत खूपच गोंधळ उडाला होता. दुपारी निघालेलो आम्ही दोघे… आमचा आणि त्यांचा संपर्क होऊच शकला नाही. कारण त्यावेळी मोबाईल नव्हते. आम्ही शासकीय रुग्णालयात गेलो तर होतो पण तिथून आमचे आम्ही दुस-या दवाखान्यात गेलो होतो. शासकीय रुग्णालयात खूप गर्दी असल्याने आम्ही कुणाला काही निरोपही देऊ शकलो नाही. त्यामुळे आमची दिंडी आणि आम्ही एकमेकांपासून दुरावलो होतो. दिंडीतील कारभारी लोकांनी विविध माध्यमातून आमचा शोध घेत होते. वारीसोबत असलेल्या पोलिसांची मदत घेण्यात आली. त्यांनी रुग्णालयात आमचा शोध घेतला खरा… पण आम्ही तिथे नव्हतोच. सर्वजण अत्यंत काळजीत पडले… रात्र झाली होती… लाखो लोक पंढरीत पोहोचत होते. ठिकठीकाणी तंबू पडलेले होतेच.
रात्रीचे दहा-साडेदहा वाजले होते. संभाजीरावांना आता थोडे बरे वाटू लागले… वेदना कमी झाल्या होत्या. मग आम्ही मुक्कामाची जागा शोधण्याचा प्रयत्न केला… पांडुरंगाची प्रार्थना केली… गर्दीतून कशीबशी वाट काढीत, पत्ता विचारीत विचारीत चालू लागलो… आणि काहीच वेळात आमची माणसं दृष्टीस पडली… सर्वांचाच जीव भांड्यात पडला… पण आधी लोक मला खूप रागावले… पण मीही आजारी पडल्याचे समजल्यावर सर्वांनी मग माझीही आपुलकीने चौकशी केली… जेवू घातले… आणि आमची आरामदायक जागेत सोय केली… बारा वाजले होते… एकादशी सुरु झाली होती… तंबूत भजनी जागर सुरु झाला होता… कुणी आजोबा गात होते… जाऊ देवाचिया गावा… देव देईल विसावा! वारीचे दिवस छान होते…! छान असतात! रामकृष्णहरी!
– लेख क्र. ६
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






