श्री संभाजी बबन गायके
☆ “माझी वारी ! माझा अनुभव !” – लेख क्र. ७ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
☆
दिंडी अशी वाटचाल करते!
पंढरपूर जर समुद्र आहे अशी कल्पना केली तर या समुद्राला येऊन मिळणा-या दिंड्या या नद्या म्हटल्या पाहिजेत. ज्ञानोबाराय गंगा, तुकोबाराय यमुना तशाच इतर संतांच्या दिंड्या जणू लहान-मोठ्या नद्या, ओढे म्हणावेत अशा. पंढरीनगरीमध्ये प्रवेश करण्याआधी सुमारे पाच-आठ मैलांवर वाखरी नावाचं छोटं गाव आणि मोठं माळरान लागतं. दिंड्यांचे हे सर्व प्रवाह या ठिकाणी एकजीव होतात. ज्ञानदेव-निवृत्तीनाथ-मुक्ताई येथेच एकमेकांना भेटतात. सोपानदेव तर माउलींच्या सोबतच चालत आलेले असतात. तिकडून तुकोबारायही या मेळ्यात सामील होतात. दुपारचा उभे रिंगण सोहळा याच माळावर रंगतो. पंढरी डोळ्यांना दिसत असते. थकलेल्या पावलांच्या मनातून थकवा आता नाहीसा झालेला असतो. आता केवळ प्रतीक्षा उरलेली असते.
रिंगण सोहळा म्हणजे वारीतील लष्करी शिस्तीचा परिपाठच असतो जणू. यानंतर पावले पंढरीच्या दिशेने चालायला लागतात. अंतर तसे इतर मुक्कामांच्या मानाने अगदीच कमी असले तरी सर्व प्रवाह एकत्रित झाल्याने दिंड्या रात्री उशीरापर्यंत पंढरीत पोहोचत असतात. अनेक दिंड्या मुख्य मंदिरापासून काहीशा दूरवर मुक्कामी असतात राहुट्या ठोकून. ज्यांच्या गावच्या धर्मशाळा पंढरीनाथाच्या मंदिराच्या परिसरात आहेत, त्यांना तसे सोयीचे जाते. आता पंढरपूरचा विस्तार चारही बाजूंनी झालेला आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांनी पंढरपूर परिसरात जागा विकत घेऊन स्वत:च्या धर्मशाळा उभारल्या असून त्यांची बांधकामे दानशूर लोकांच्या आर्थिक साहाय्यातून होत असतात. धर्मशाळांत स्वयंपाकाची स्वतंत्र व्यवस्था असते. त्यासाठी लागणारी भांडी, शिधाही दान स्वरूपात प्राप्त होत राहतो. वारीत दिंडीच्या भोजनाचा खर्च करण्याला पंगत देणे असे म्हटले जाते. द्वादशीला दिली जाणारी पंगत विशेष महत्त्वाची समजली जाते. या दिवशी सूर्योदयापूर्वीच एकादशीचा उपवास सोडून भोजन करण्याचा संकेत आहे. त्यामुळे द्वादशीला अगदी भल्या पहाटे स्वयंपाकाची तयारी सुरु केली जाते.
परंतू एका वारक-याचा इथपर्यंतचा प्रवासही समजून घेण्यासारखा असतो. गावातील किंवा आसपासच्या काही गावांतील वारकरी मंडळी एकत्र येऊन दिंडीची स्थापना करतात. या दिंडीस परिसरात होऊन गेलेले संत, अध्यात्मिक गुरु, ग्रामदैवत यांचे नाव दिलेले असते. ही दिंडी संबंधित पालखी सोहळ्याकडे नोंदवावी लागते. त्यानुसार सोहळा व्यवस्थापन या दिंडीला नोंदणी क्रमांक देतात. या नावाचे फलक तयार करून ते दिंडीच्या वाहनांवर लावले जातात. सोहळ्यात जे रथ चालतात त्या रथाच्या लगेचच लागून पुढे चालणारी दिंडी ही रथापुढे क्रमांक एक अशी ओळखली जाते. तिच्या पुढची क्रमांक दोन अशा क्रमाने इतर दिंड्यांना क्रमांक मिळतात. तसेच रथामागील दिंड्यांच्या बाबतीत होते. रथामागे लगेच असणारी दिंडी ही रथामागे दिंडी क्रमांक अशी ओळखली जाते. या दिंड्या याच क्रमाने वारीत चालाव्यात असे शिस्तीसाठी अपेक्षित असते. आणि ही शिस्त पाळण्याचा प्रयत्न नेटाने केला जातो. सोहळ्याचे चोपदार ही शिस्त पाहतात.
सोहळ्यापुढे चौघड्याचे वाहन असते. तुतारी वादक असतात. मानाचा अश्व असतो. त्यासाठी खास गणवेशधारी स्वार नेमलेले असतात. पालखी रथ ओढण्यासाठी बैलांच्या जोड्या वापरल्या जातात. आणि हा मान आपल्या बैलांना मिळावा, यासाठी शेतकरी बांधव भक्तीभावनेने चढाओढ करतात.
पालखी जागेवरून पुढे जाण्यासाठी निघण्यापूर्वी शंखनाद केला जातो. चोपदारांच्या हातात मानदंड असतो. त्या दंडाच्या इशा-यावर थांबणे, पुढे जाणे या क्रिया होतात.
पालखी रथापुढे दिंड्या क्रमाने उभ्या राहिल्या की चोपदार सूचना आणि इशारा देतात. यात पालखी कुठे विसावा घेणार आहे, कुठे मुक्काम करणार आहे, किती वाजता प्रस्थान ठेवणार आहे, याची माहिती दिली जाते. रात्रीच्या मुक्कामासाठी पालखी तळावर पोहोचल्यानंतर समाज आरती होण्यापूर्वी पालखी प्रमुख, चोपदार दिंड्यांना सूचना देतात, हरवल्या-सापडलेल्या वस्तूंची यादी वाचून दाखवली जाते, पूर्वी पोस्टखाते दिंडीमध्ये पोस्टकार्ड्सही पोहोचवत असे. म्हणजे दिंडी क्रमांक आणि नाव लिहिलेले पत्र गावातील पोस्ट ऑफिसमध्ये द्यायचे… पोस्टखाते वारीमार्गावर ज्याठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी सोहळा प्रमुखाकडे ही पत्रे नेऊन देत असे. दिंडीत चुकलेल्या व्यक्तींच्या नावांचाही पुकारा केला जातो. अशावेळी एखाद्या दिंडीला काही सूचना द्यायच्या असतील, तक्रार नोंदवायची असेल अशावेळी संबंधित दिंडीमधील लोक टाळांचा गजर करीत राहतात. तो ऐकून सोहळा प्रमुख त्यांच्याशी तेथेच संपर्क साधतात. त्यानंतरच आरती म्हटली जाते. आणि मगच वारकरी आपापल्या मुक्कामाच्या ठिकाणांकडे जातात. पालखीतील पादुकांचा मुक्काम खास उभारण्यात आलेल्या तंबूत किंवा गावातील मंदिरात असतो. स्थानिक लोक या ठिकाणी पादुकांचे दर्शन घेऊ शकतात. गावकरी लोक वारकरी मंडळीची भोजनाची व्यवस्था करतात. पालखी तळावर सोहळ्यातर्फे मुक्कामाच्या जागी कीर्तन आयोजित केले जाते.
इकडे दिंडीमधील वारक-याचा दिनक्रम साधारण असा असतो. पहाटे लवकर उठून आपापली वळकटी व इतर साहित्य दिंडीच्या वाहनात ठेवायचे. आजचे आंघोळीचे कपडे, आवश्यक वस्तू, अल्पोपाहाराचे पदार्थ सोबत घ्यायचे. मुक्कामाच्या ठिकाणी एवढ्या मोठ्या समुद्यासाठी प्रात:र्विधीसाठी जागा उपलब्ध नसते. यामुळे बरेच वारकरी लवकर उठून पालखीच्या मार्गावर बरेच अंतर पुढे चालत जातात. पूर्वी पालखी मार्गावर शेती, मोकळ्या जागा, विहिरी, तळी इत्यादी भरपूर असे. पुढे चालत गेलेले वारकरी योग्य ठिकाण शोधून आंघोळ, अल्पोपहार उरकून आपल्या दिंडीची प्रतीक्षा करीत रस्त्याच्या कडेला थांबून राहतात. आंघोळीसाठी वापरलेले कपडे शक्य होतील तिथे धुवून वाळायला घातले जातात. गावातून रथ निघाल्यानंतर आपण जिथे बसलेलो असू तिथपर्यंत आपली दिंडी येण्यास बराच अवकाश मिळतो. आपल्या दिंडीचे विणेकरी आणि इतर सभासद चालत येत असतात. आपण सोहळ्याच्या रथाच्या मार्गावरची माती कपाळाला लावायची आणि वाटेवर पाऊल टाकायचे. रथ, रथापुढे चालणारा अश्व आपल्याला भेटेल तिथे नमस्कार करून घ्यायचा आणि वाट चालायला लागायची.
कोणताही मोठा पालखी सोहळा एकावेळी सलग तास-दीड तासापेक्षा जास्त वेळ सलग चालत नाही. वाटेत अनेक गावे लागतात. स्थानिक नागरिक पालखीच्या दर्शनार्थ मार्गावर मोठ्या संख्येने उभे असतात. त्यांच्यासाठी काही क्षण रथ थांबवला जातो. वाटेत विसावा घेण्याच्या जागा ठरलेल्या असतात. त्यामुळे रथ ओढणारे बैल, चालणारे वारकरी यांना अल्प विश्रांती मिळत राहते. दुपारच्या भोजनाच्या ठिकाणी दिंडीची वाहने आधीच येऊन थांबलेली असतात. आपल्याकडील पिशवी या वाहनांत ठेवायची. दुपारचे भोजन उरकायचे आणि थोडे पुढे चालत जाऊन विश्रांतीसाठी जागा शोधायची. काही वेळाने रथ निघतो… आपली दिंडी शोधायची आणि सामील व्हायचे. दिवसभर आपण आणि दिंडी यांची गर्दीमुळे चुकामुक झालेली एकवेळ चालते. पण दिवसाच्या शेवटी मात्र दिंडी सोडून चालत नाही. प्रचंड गर्दी असते. दिंड्यामध्ये शिस्तबद्ध वाटचाल असते. कुणी कुणाला मध्ये शिरू देत नाही. अन्यथा माणसांची चुकामूक होऊ शकते. अंधार पडू लागलेला असतो.. त्यामुळे आपापल्या दिंडीसोबत चालत राहिले की मुक्कामाची जागा शोधण्याची वेळ येत नाही… आपल्या दिंडीच्या चोपदारांच्या मार्गदर्शनानुसार झपाझप चालत राहायचे की झाले! दिंडीच्या वाहनातून आपली वळकटी खाली घ्यायची, आपल्या ठरलेल्या तंबूत, राहुटीत वळकटी घालायची आणि क्षणभर विश्रांती घ्यायची. काही वेळाने रोजच्या नियोजनाप्रमाणे प्रवचनाचा कार्यक्रम असतो. तो झाल्यावर पंगती पडतात. रात्रीच्या अंधारात, गर्दीत तंबूपासून दूर गेले की पुन्हा तो तंबू आणि दिंडी सापडणे अवघड होऊन जाते… कारण सर्वच तंबू सारखेच भासतात. रात्री अनोळखी लोकांना कुणी त्यांच्या तंबूत आश्रय देईलच असे नसते. अशावेळी पोलिसांची मदत घ्यावी लागते. जेवण उरकल्यावर ज्यांना आवड, सवड असेल असे नेमाचे लोक दिंडीच्या मुख्य तंबूत जमतात. इथे भजनाची व्यवस्था असते. वारकरी रात्री उशीरपर्यंत अभंग गात बसतात… याला जागर म्हणतात… रात्र पुढे सरकत जात असते… कुठे ना कुठे भजन सुरूच असते… दमलेले वारकरी झोपून जातात. काही मुक्काम तर अक्षरश: स्मशानांच्या बाजूलाही असतात. माळरान असते, काटेकुटे असतात, अंधार असतो… पण शारीरिक थकवाच इतका असतो की कशाचाही विचार मनात येत नाही. हल्ली मोबाईल आणि इतर साधने आहेत. पूर्वी तारीख आठवत नसे, वेळ समजत नसे. घरची आठवण येत नसे. काही संपर्काचे साधनही नसे… आणि ते बरेच होते. हल्ली मोबाईलमुळे चार्जिंगची काळजी वाढली आहे!
आणखी एक गोष्ट वारकरी करतात. जसजसा सोहळा पंढरपूरजवळ जात राहतो, काही ठिकाणी दोन दोन दिवस मुक्काम पडतो अशावेळी काही वारकरी मिळेल त्या वाहनांनी पंढरपूरला पोहोचतात. दर्शन घेतात आणि पुन्हा मुक्कामाच्या जागी परततात. कारण यात्रा काळात विठ्ठलदर्शन करायला प्रचंड मोठी बारी लागते. नेमाचे वारकरी मात्र दोन दोन दिवस बारीत उभे राहून दर्शन करूनच माघारी फिरतात! काही ज्येष्ठ वारकरी पुढील चार महिने अर्थात चातुर्मासानिमित्त तिथेच मुक्कामी राहतात. तर काही गुरु पौर्णिमेच्या काल्याचा प्रसाद घेऊनच घरी परततात.
पंधरा-अठरा दिवस घरापासून दूर राहिलेले वारकरी मात्र द्वादशीचा उपवास सोडला रे सोडला की काहीही करून घरी परतण्याचा प्रयत्न करतात. माघारी जाणारे दिंडीची काही वाहने, एस. टी. बसेस एकदम भरभरून जातात… संसाराची ओढच तशी असते. पूर्वी बहुसंख्य वारकरी शेतकरी वर्गातून आलेले असत. शेतीची कामेही डोक्यावर असत. पुढे नोकरदार मंडळी, व्यावसायिक लोकांना रजेचा प्रश्न असतो. पुण्याच्या आसपासच्या गावांत राहणा-या काही जणांना अगदी आळंदी किंवा देहूपासून वारीत सहभागी होता येत नाही. अशी मंडळी मग पुण्यापासूनच्या पुढच्या मुक्कामी दिंडीत सामील होतात! हे अनेक दृष्टीने सोयीचे ठरते.
काही लोक दरवर्षी एक एक मुक्काम चालतात. म्हणजे सासवड येथे आपले वाहन आधीच पाठवायचे किंवा येताना वाहन व्यवस्था पहायची. पुण्यातून सासवडला चालत जायचे. सासवडवरून रात्री पुण्यात माघारी यायचे. पुढील वर्षी सासवडला रात्री पोहोचायचे. वाहन पुढील मुक्कामी पाठवायचे… सासवड ते जेजुरी चालत जायचे व रात्री पुण्यात परत यायचे! लोक अशा नानाप्रकारे वारीत सहभागी होत असतात.
वारीपूर्वी चालण्याचा सराव केलेला बरा असतो. अंगमेहनत, दूर अंतर चालणे इत्यादीची सवय असलेल्या शेतकरी, ग्रामीण भागातील वारका-यांना वाटचालीचे फारसे श्रम वाटत नाहीत, म्हणून आजही नव्वदी, शंभरी गाठलेले ग्रामीण भागांतील वारकरी भेटू शकतात. शहरी लोकांना मात्र सराव आवश्यक असतो. दूरचे अंतर सलग चालण्यासाठी पादत्राणे योग्य निवडावी लागतात. त्यांचा सराव पायांना करून घ्यावा लागतो.. अन्यथा त्रास होऊ शकतो! नेहमीची औषधे सोबत ठेवणेही श्रेयस्कर ठरते! प्रत्येक दिंडी खर्चासाठी ठराविक शुल्क अर्थात भिशी आकारते. वारी तशी सोपी आहे… मानसिक तयारी मात्र पाहिजे!
अर्थात परिस्थितीनुसार परंपरा, पद्धती निरनिराळ्या असू शकतात.
– लेख क्र. ७
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






