श्री मयुरेश उमाकांत डंके
☆ म्हणोनि ठेविली पायी डोई… ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
“माऊलींची माया हाये ओ आमच्यावर. ती तुमास्नी नाय कळायची. ” असं तो म्हणाला अन् डबडबलेल्या डोळ्यांतून अश्रूंचे दोन चार थेंब ओघळले. समोर माऊलींच्या तळावर तंबूचे कळस दिसत होते अन् त्या कळसांकडे पाहून हात जोडून तो आनंदानं रडत होता. नेमकं काय घडलं होतं, ते त्याला अन् माऊलींनाच ठाऊक. त्यांचं नाव घेणाऱ्या प्रत्येकाशी त्यांचं काही ना काहीतरी नातं असतंच.
“त्यांच्यामुळं तरलो बगा यंदा. ” असं म्हणत त्यानं हात जोडले. माझ्याकडं लक्षच नव्हतं. त्याचं आपलं स्वतःशीच बोलणं सुरु होतं. तो इतका भावूक झाला होता की, कुणी नुसता स्पर्श जरी केला असता तरीही त्याच्या भावनांचा बांध फुटला असता.
माऊलींशी आणि तुकोबारायांशी असा भावनिक संवाद साधणारे कितीतरी वारकरी आपल्याला दिसतील. इतक्या सहजतेनं ते माऊलींशी मनातलं सगळं सगळं बोलतात, सुख-दुःखाच्या गूजगोष्टी करतात, त्यांना प्रश्न विचारतात, त्यांचा सल्ला घेतात, कधी कधी त्यांच्यावर रागावतात सुद्धा. पण हेही तितकंच खरं आहे की, त्यांना त्या संवादातून मार्ग सापडतात, प्रश्नांची उत्तरं मिळतात, रस्ते दिसतात, आपल्या हातून जाणते- अजाणतेपणी घडलेल्या चुकांची जाणीव होते. अशावेळी, पटकन क्षमा मागून मोकळेही होतात.
वारी हा स्वतःला अधिकाधिक निर्मळ, अधिकाधिक सात्विक करण्याचा एक प्रवास आहे. शुद्ध सकारात्मक वातावरणात महिनाभर राहण्याचा अनुभव मोठा विलक्षण असतो. अत्यंत साध्या जीवनशैलीत राहायचं, पहाटेपासून ते रात्रीपर्यंत आपल्याला जगण्याचं शहाणपण शिकवणाऱ्या संतांच्या अभंग रचना गात गात चालायचं, निश्चित वेळी मोजकं आवश्यक तितकंच खायचं, आवश्यक तेवढंच पाणी घ्यायचं, संपूर्ण स्वावलंबी आयुष्य जगायचं, आपल्यापासून कुणाला उपद्रव त्रास होऊ नये याची पूर्ण काळजी घ्यायची, तोंडून चुकून सुद्धा एकही अपशब्द येऊ द्यायचा नाही, ऊन- वारा- पाऊस- थंडी जे जे अनुभवाला येईल ते गोड मानून घ्यायचं, कुठल्याही अपेक्षांमध्ये अडकून पडायचं नाही, असं जगणं आपल्या जगण्याचा पाया दिवसेंदिवस भक्कम करत जातं.
रोज संध्याकाळी मुक्कामाच्या ठिकाणी थांबलं की, पालखी तळावर कीर्तन असतं. आपण एकटेच असतो. दिवसभर चालून पाय थकलेले असतात. पण मन मात्र थकलेलं नसतं. अशावेळी साध्या पण अत्यंत मार्मिक संतवचनांमधून जगण्याचं प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारांच्या प्रासादिक वाणीचा प्रभाव पडतोच. संतांची चरित्रं उलगडली जातात. पुस्तकी साक्षरता आणि प्रत्यक्ष जगण्यासाठी लागणारी मूल्यं यांच्यात किती फरक असतो, याची जेवढी अनुभूती कीर्तनातून होते, तेवढी अन्य कोणत्याही माध्यमातून होणं कठीण. आपण माणूस म्हणून स्वतःमध्ये आणखी किती सुधारणा करायला हवी, याची फार रोखठोक जाणीव कीर्तनकार करुन देतात. कीर्तनानंतर हरिपाठ झाला की, धरणीवर अंग टाकून द्यायचं. एका क्षणात आपण निद्रादेवीच्या अधीन होतो. वारीच्या वीस दिवसांत जशी गाढ झोप लागते, तशी पुन्हा वर्षभर लागत नाही, असा अनुभव तुम्हाला कित्येकजण सांगतील. म्हणूनच, आपली विस्कटलेली आयुष्यं अन् चुकलेली जीवनशैली ताळ्यावर आणण्यासाठी वारी केली पाहिजे.
“काय झालं माऊली? ” मी अगदी शांतपणे विचारलं.
“काय नाय ओ. माऊलींनी माजं भिजत पडलेलं घोंगडं निस्तारलं बगा. ” तो रडत म्हणाला.
“कसलं घोंगडं? ” मी विचारलं. वारीत मुक्कामाच्या जागी असा संवाद होतोच. पण, एक फार मोलाची आणि आपण शिकण्यासारखी गोष्ट माझ्या लक्षात आली की, खरा वारकरी कधीही रडगाणं गात नाही. तोही माणूस आहे, त्यालाही भावना आहेत. पण समस्या, अडचणी यांना आहे तसं स्वीकारुन पुढं पाऊल टाकण्याची एक विलक्षण क्षमता त्यांच्याकडं आहे.
“अवो, पोरगा गेली तीन वर्षं ऐकतच नव्हता. यंदा तयार झाला. ” असं तो म्हणाला, पण मला काहीच उलगडा झाला नाही.
“जरा विस्कटून सांगा की. ”
“काय नाय. बारावीला दोनदा नापास झाला. मी त्याला सांगत हुतो, आपल्याला जे जमंल ते करावं. उगं दुसऱ्यानं अमकं केलं म्हंजे आपनही त्येच करायला जाऊ नये. पन ऐकायला तयारच नई. “
“मग? “
“मी लई गोष्टी सांगून बघितल्या. इलेक्ट्रिक काम शिक, मोटार मेकॅनिकी शिक, टेलरिंग शिक. पन ते काय त्येला समजत नव्हतं. त्येच्या डोक्यात एकच खूळ – फॉरेनला जायचं अन् भरपूर पैसा मिळवायचा. ”
“पण हे फॉरेनचं अचानक कुठून आलं डोक्यात? ”
“अवो, मोबाईलवर काय ते बघायचं अन् तेच धरुन बसायचं. फॉरेनला जाऊन मोठ्या हॉटेलात काम करतो असं म्हनायचा. आता माजी धा एकर शेती, वीस पंचवीस जनावरं हयेत. एक पिठाची चक्की हाये. एक दुकान गाळा भाड्यानं दिलाय. उन्हाळ्यात ऊसाचं गुऱ्हाळ असतंय. डेअरीला दूध घालतो. थोडीफार तरकारी केली तर ती विकतो. आजून काय पायजेल सांगा. “
एक मिनिटभर मला काही कळलंच नाही. माझ्या शेजारी साध्या प्लॅस्टिकच्या कागदावर बसलेला तो माणूस. पायात साधी चप्पल, शेजारी एक कपड्याची पिशवी. दोन जोड कपडे, एक पंचा, एक पांघरुणाची गुलाबी शाल, एक टाळ एवढ्यावर पंचवीस दिवस पायी प्रवास करणारा एकदम कॉमन मॅन. त्याचं वार्षिक उत्पन्न बारा-चौदा लाख रुपये असेल असं मलाच काय, पण कुणालाच खरं वाटलं नसतं.
“पण मग हा तिढा सुटला कसा? “
“असल्या गोष्टीत घाई करुन उपयोग नसतोय, हे मी आमच्या मंडळीला अगोदरच सांगितलं होतं. त्यामुळं, घरी आमी त्याला काय टोचत बिचत नव्हतो. एक दिवस मी आमच्या चक्कीवर बसलो होतो. मनात विचार आला, हा गुंता माऊलींना सांगाया पायजे. घरी बोललो. दुसऱ्या दिवशीची एसटी धरली अन् पोराला घेऊन आळंदीला गेलो.”
“मग? “
“देवापाशी डोकं टेकीवलं अन् अजानबागेपाशी सावली धरुन बसलो. मी पोराला म्हनलं, ‘हे काय खरं नाय गड्या. दोन वर्षं झाली, आपन अडकलोय. काई तरी तोड काडली पायजेल. मला काय वाटतं तुला सांगू का? ‘”
“मग पोरगा काय म्हणाला? ”
“पोरगा म्हनला ‘सांगा.’
“मी म्हनलं, भायेर जाऊन नोकरी करायची, यापतुर आपलंच कायतरी सुरु करु. हा अभ्यास काय तुला झेपत नई. मग कशाला वेळ काढायचा? मी म्हनलं, ते पोराला पटलं. इचार करु म्हनला. ”
“मग जमलं का? “
“जमलं तर. दुसऱ्या दिवशी गडी एकटाच कॉलेजात गेला. बारावीला बाहेरुन बसायचा फॉर्म भरला. विषय बदलले. त्येचं तेनीच केलं. कॉलेजातले सर म्हनले, कुठं काय अडलं तर मी सांगतो. कामच झालं. रोज संध्याकाळी मी डेअरीला दूध घालून येईस्तोवर चक्कीवर बसायचा. दुपारी अभ्यास करायचा. “
“व्वा. चांगलं झालं की माऊली. तुमचं टेन्शनच गेलं. ” मी म्हटलं.
“तर ओ. फेब्रुवारीत परीक्षा पार पडली. दुसऱ्या दिवसापासून आमच्या एका मित्राच्या हॉटेलात त्येच्या हाताखाली कामाला जायला लागला. वडे, भजी, पुऱ्या तळायला शिकला. दीड दोन महिन्यात चांगला तयार झाला. लग्नसराई जोरदार सुरु होती. मसालेभात, रस्सा करायला शिकला. चांगला खुश असायचा. रात्री दमून भागून येऊन गाढ झोपायचा. त्येच आमचं सुख. ”
मी एकदम गहिवरुन गेलो. कुणालाही न लुटता, न लुबाडता, खोटारडेपणा फसवाफसवी न करता, इमाने इतबारे कष्ट करुन, आपलं पोरगं दमून गाढ झोपलंय, यातच सुख मानणारा बाप मी बऱ्याच वर्षांत पहिल्यांदाच बघत होतो. सरळमार्गानं जग अन् हवा तेवढा मोठा हो, एवढीच अपेक्षा होती त्याची. “जिथे राबती हात तेथे हरी” इतकाच त्या वडिलांचा साधा सिद्धांत..!
बऱ्याचदा मुलांच्या त्यांच्या आयुष्याविषयीच्या अवास्तव अपेक्षा तयार होतात, त्याला कारणीभूत असतात पालकच..! पण इथं प्रकरण उलटं होतं.
“बारावी सुटला की नाही? ” माझी उत्सुकता तिथंच घुटमळत होती.
“सुटला? चांगल्या मार्कानी सुटला. साठ टक्के पडले. स्वतःच्या हातानं शिरा केला, सगळ्याना खाऊ घातला. आता दिवसभर हॉटेलात काम करुन नाईट कॉलेजात शिकायचं म्हनतोय. तर आपन कशाला अडवा? चांगलंच ठरवलंय त्यानं. “
“हे सगळ्यात बेस्ट. काम करत करत शिकलेलं चांगलं. त्याचं त्याला जाणवलं, हेच सगळ्यात महत्त्वाचं. पण मग आता डोळ्यात पाणी कशाला आणताय? ”
“मी तुमाला काय म्हनलं, माऊलींची माया हाये आमच्यावर. इतरांना ती कळायची न्हाई. यंदा वारीला निघालो. आठ तारखेला प्रस्थान. मी तीन दिवस आधीच जात असतो, पन यावर्षी पाऊस जोरदार झाला. आळंदीला कुठनं जानार? पुन्यातच थांबायचं ठरत होतं. तर आमचा लेक आला पुढं अन् म्हनला, मी येतो दिंडीत. आचाऱ्याच्या हाताखाली काम करीन. मी कशाला नाई म्हनतोय? म्हनलं चला. पोरगं मार्गी लागतंय. आज रात्रीचा दीडशे मानसांचा पिठलं भाताचा सैपाक त्येनं एकट्यानं केलाय. सगळी दिंडी जेवून झोपली. नंतरच दोन घास खाऊन झोपलाय बगा तिथं. आता पहाटं तीनाला उठून चहा करंल. ”
मी मागं वळून बघितलं. सामानाच्या ट्रकबाहेर एक विशितला पोरगा बसल्याजागी गाढ झोपून गेला होता..
“आपन एकदा त्यांना मनातलं सांगितलं की, मार्ग काढायची जबाबदारी त्यांची. ते बरोब्बर वाट दावत्यात. बसल्याजागी काय सुदा मिळत नाई ओ. आता पोरगं फॉरेनला जाईल नायतर नाई जाईल, पन आज घाम गाळाया शिकलं ना.. हुईल की तयार हळूहळू. बाकी काय का असंना, आज मोबाईल मधून भायेर आला, काम कराया लागला. परीक्षा पास झाला. आपनहून वारीला आला. आता देवानं अजून काय द्यावं म्हनता? सांगा.. “
विष्णुविण जप व्यर्थ त्याचें ज्ञान ।
रामकृष्णीं मन नाहीं ज्याचें ॥१॥
*
उपजोनी करंटा नेणें अद्वय वाटा ।
रामकृष्णीं पैठा कैसेनी होय ॥२॥
*
द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।
तया कैचें कीर्तन घडे नामीं ॥३॥
*
ज्ञानदेव म्हणे सगुण हें ध्यान ।
नामपाठ मौन प्रपंचाचे ॥४॥
हा माऊलींचा शब्द त्यांनीच सकळ सिद्ध करुन दाखवला. गुरु आपल्याला आपला हात धरुन योग्य वेळी योग्य मार्गे नेतातच, याची खात्री पटण्यासाठी आणखी दुसरा कुठला दृष्टांत हवा?
“चित्ती असो द्यावे समाधान” चा खरा अर्थ मला माऊलींच्याच तळावर माऊलींच्याच समोर साक्षात अनुभवायला मिळाला होता. शिबी आणि मिडास दोघेही राजेच होते. पण शिबी राजाला त्याचं कर्तव्य पूर्ण समजलं होतं अन् मिडास राजा मात्र सोन्याच्या मोहातून बाहेरच येऊ शकला नाही. जितक्या कमी अपेक्षा, जितक्या कमी महत्त्वाकांक्षा, तितकं समाधान जास्त.. दोघांपैकी कुणाची निवड करायची, याचा निर्णय आपणच घ्यायचा. मी शिबी राजाची निवड केली. माऊलींच्या सहवासात, त्यांच्या प्रकाशात…
©️ श्री मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, समुपदेशक, करिअर मार्गदर्शक
संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





