डॉ मकरंद पिंपुटकर

? मनमंजुषेतून ?

☆ व्यसन – तसे आणि असे ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

साक्षी शहरात लहानाची मोठी झालेली, पण तरीही बऱ्यापैकी orthodox मुलगी. गावातल्या शेती सांभाळून नोकरी करणाऱ्या मुलाशी लग्न झालं, आणि साक्षी अधून मधून शेतावरही जायला लागली.

दिवसभर शेतात काम करणाऱ्या बायका पाहिल्या की राहून राहून तिला प्रश्न पडायचा – यांची बाळं दिवसभर आयांशिवाय कशी राहत असतील?

न राहवून एके दिवशी तिने हा प्रश्न शेतात काम करणाऱ्या एका बाईला विचारलाच. आणि तिचं उत्तर ऐकून अवाक झाली. “तुला माहितीये की ती बाळं आयांशिवाय दिवस – दिवस कशी राहतात ते?  अग, त्या बायका त्या एवढ्याश्या मुलांना कप कप ताडी (दारू) पाजतात. मग काय दिवसभर ती लेकरं झिंगलेल्या गुंगलेल्या अवस्थेत रहातात.

जसजशी मुलं मोठी होतात, तशी आणखीन आणखी ताडी रिचवतात. बरं, आई वडिलांनी चार उपदेशाचे सल्ले सांगावेत, तर ते स्वत:च मुलांसमोर – आज काय आनंद झाला आहे म्हणून, तर उद्या दु:ख झालं म्हणून, नि परवा सहज म्हणून दारू पितात. मुलांना काय आदर्श रहाणार?

ही व्यसनं मुलांची आयुष्यं बरबाद करत आहेत. “

काळ वाटचाल करत राहिला.

नवऱ्याची नोकरी बदलल्यावर साक्षी त्याच्याबरोबर शहरात आली होती. तिलाही एक गोजिरवाणा मुलगा झाला होता आणि तो आता तेरा वर्षांचा – म्हणजे इंग्रजी परिभाषेत teen ager झाला होता. आज साक्षी, त्याच मैत्रिणीला, मुलगा सदैव कसा मोबाईल घेऊन बसला असतो ही तक्रार करायला फोन करत होती.

“अग, आल्या गेल्याशी सोड, आम्हा आई बाबांशीही बोलणं नाही. धड अभ्यासाकडे लक्ष नाही की खाण्याकडे. शाळेत जातो हे आमच्यावर उपकारच समज. घरी आला की मोबाईल सुरू.

रात्री कधी उठून पाहिलं तरी हा मोबाईलमध्ये डोस्कं खुपसून बसलेला असतो. रात्री झोपायला उशीर म्हणून सकाळी उठायला उशीर. चष्मा लागला आहे, मान दुखते म्हणतो.

या सगळ्याला तो जळला मोबाईल कारणीभूत आहे. आम्ही दोघंही त्याच्या कानीकपाळी ओरडत असतो – ठेव तो मोबाईल, जरा मैदानी खेळ खेळायला जा, जरा घाम तर येऊ दे. पण उपयोग शून्य. “

मैत्रिणीला साक्षीचेच जुने डायलॉग आठवले.

लहानपणी या मोबाईलचं व्यसन साक्षीनेच मुलाला लावले. त्याला दोन घास भरवायचे असले की ती त्याला मोबाईलवर व्हिडिओ लावून द्यायची. आपल्याला सीरिअल पहायची असली की त्याला मोबाईल गेम चालू करून द्यायची.

तोंडाने सांगायचं मोबाईल वापरू नकोस, पण या ना त्या कारणाने स्वतः साक्षी आणि नवरा, दोघेही खूप मोबाईल वापरायचे.

मग करोना काळात तर मुलांना, शाळेच्या बहाण्याने, मोबाईल वापरायचं परमिटच मिळालं. लेकाला स्वतंत्र मोबाईल घेऊन दिला गेला आणि मग तो जास्तच वहावत, जास्तच गुरफटत गेला.

“माझं ऐकशील का? , ” मैत्रीण साक्षीला विचारत होती. “पहिलेप्रथम तुम्ही दोघं नवराबायको आपला मोबाईल वापर मर्यादित करा. मुलं तुमचं अनुकरण करतात. तुम्ही तोंडाने त्यांना उपदेश करत असाल पण स्वतःच त्यात आकंठ बुडाले असाल, तर ही विसंगती मुलं पटकन ओळखतात.

मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम त्याला सांगा, समजावून द्या. त्याच्या झोपेची गणितं कशी बिघडली आहेत, आणि त्याने आरोग्य कसं बिघडलं आहे, ते दाखवून द्या.

Family time ठरवा, त्यात कोणी मोबाईल वापरणार नाही, एकमेकांशी गप्पा मारू असं ठरवा आणि अंमलात आणा.

हे सगळं एका दिवसात होणार नाही, पण सुरुवात तर करा. दारूचं व्यसन असो वा मोबाईलचं, ते सोडलं पाहिजे असं व्यसनी माणसाला स्वतःहून वाटलं पाहिजे.

पण याची सुरुवात स्वतःपासूनच केली पाहिजे. लहान मुलाला गूळ खाऊ नकोस म्हणून उपदेश करण्यापूर्वी, स्वतः रामकृष्ण परमहंसांनी आठवडाभर गूळ खाणं सोडलं होतं, आणि मगच उपदेश केला होता.

व्यसन, मग ते दारूचं असो वा मोबाईलच्या अति वापराचं, दोन्हीही घातकच. ” समेवर येत मैत्रीण म्हणाली आणि साक्षीच्या विचारांना आणि तदनुसार कृतीला चालना देत, तिनं फोन ठेवला.

© डॉ. मकरंद पिंपुटकर 

 चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted