श्री राजेश्वर बी. पारखे
☆ व्यवसायातील राज ☆ श्री राजेश्वर बी. पारखे ☆
☆
आज सकाळीच गणेश सलून मध्ये कटिंग करण्यासाठी गेलो असता माझ्या आधीच एक गृहस्थ त्यांची कटिंग चालू होती,.. जुन्या ओळखीतून नमस्कार झाला,
स्व.अशोकराव अग्रवाल शेठ यांचे धाकटे चिरंजीव सन्माननीय विकास अग्रवाल यांची भेट झाली,
अनेक जुन्या आठवणीला वळसा घालताना फ्लॅश बॅक मध्ये गेलो,
त्यांच्या मोहक लाघवी गोड वाणीतून मनाला खूप बरे वाटले…
मला ते म्हणाले “माफ करा साहेब तुमचे नाव मला माहित नाही परंतु लॉर्ड्स मारुती व्हॅन वाले म्हणूनच आम्ही तुम्हाला ओळखतो…
इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असताना मी त्यांना विचारले… “गोपाल प्रिंटिंग प्रेस” चे नाव तुम्हीं अजूनही व्यवसायातून जपून ठेवले आहे,
“ते म्हणाले आमच्या आजोबांची आणि वडिलांची ती कृपा आणि संस्कार आहेत…”
या यशस्वी व्यवसायाचे अती महत्वाचे राज त्यांनी बोलून दाखविले…
ते म्हणाले…”आमच्या वडिलांनी आम्हाला म्हणजे आमच्या तिघा भावांना दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी शिकविल्या…”
“एक प्रत्येक ग्राहकांशी अगदी प्रेमाने अदबीने विनम्रपणे वागायचे कारण प्रत्येक ग्राहक आम्हाला काही न काही देऊनच जातो, “
“आणि दुसरे अतिशय महत्वाचे आपल्या कामगारांचे पगार दुनिया इकडची तिकडे होवो महिन्याच्या 1 तारखेला त्यांचा पगार झालाच पाहिजे, “
एवढे बोलल्यावर त्यांच्या आवाजात एक कंपन आले आणि गंभीर आणि भावनिक शब्दात ते सांगू लागले…
“वडील म्हणायचे महिन्याच्या 1 तारखेला कामगार नाही तर त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक लहान थोर त्याच दिवसाची प्रकर्षाने वाट पहात असतो, “
घरातील किराणा असेल, लेकरांची कपडे लत्ते असतील, शालेय सामग्री असेल, चपला असतील, दूधवाला असेल, प्रत्येकाची देणेदारी, दवाखाना असेल…अशा अनेक गरजू गोष्टीची पूर्तता महिन्याच्या 1 तारखेला मोठी आशा धरून दरवाजाच्या उंबऱ्यावर उभी असते, “
“त्या एक तारखेला जेंव्हा आपला कामगार घरी जातो ना! “
“तेंव्हा त्यांच्या घरातील प्रत्येक जण मोठ्या आशेने दरवाज्याकडे टक नजर लावून बसलेले असतात, “
“आणि म्हणून त्यांच्या स्वप्नांचा आपण हिरमोड कधीच करायचा नाही”
थोडेसे भावनिक ते म्हणाले,
“या दोन वडिलांच्या तत्वावर आज आम्हीं “गोपाल प्रिंटिंग प्रेस” ला इथपर्यंत म्हणजे 82 वर्षानंतर ही व्यवस्थित चालू शकलो…”
पुढे जाऊन ते हेही म्हणाले…”आजही आम्ही तिघे भाऊ दीपक शेठ, संदीप शेठ आणि मी विकास एकत्र आहोत…”
“आमचे विचार आचार एक आहेत…”
“आमचे तिन्ही भावांचे कुटुंब एकत्र आहे…”
मी मनाशीच पुटपुटलो…
पवित्र ग्रंथ सांगतो…”तीन पदरी दोर सहसा तुटत नाही”
याचा प्रत्यय आज याची देही आला…
1943 साली अग्रवाल कुटुंबियांनी सुरू केलेले हे श्रीरामपूर शहरातील मेनरोड वरील दालन आजही “गोपाल प्रिंटिंग प्रेस” या नावाने दिमाखात यशस्वी रित्या चालू आहे…
छोट्याश्या भेटीतून दोन मूलमंत्र उराशी घेऊन आजचा दिवसाचे अत्यंत सार्थक झाल्याचे खूप मोठे समाधान आज मला झाले…
© श्री राजेश्वर पारखे
जिल्हा अहिल्यानगर, श्रीरामपूर
9822258403
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





