संध्या बेडेकर
मनमंजुषेतून
☆ “आई म्हणजे भेटीला आलेला देव…“ ☆ संध्या बेडेकर ☆
“आई म्हणजे भेटीला आलेला देव असतो. तर पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट असते. ”
आज ताई कडे गेले होते. सध्या ताई कडे खूप आनंदी, उत्साही वातावरण आहे. गप्पांमध्ये कसा वेळ जातो कळतच नाही. तरी गप्पा संपतच नाही. म्हणून पुन्हा पुन्हा जायचे. असच सुरू आहे.
अजय चे लग्न ठरले आहे. त्यामुळे काम पण भरपूर आहेत व गप्पा पण. एकंदरीत सर्व आनंदात आहोत.
आज जेंव्हा मी पोचले, तेंव्हा भाऊजी जरा वेगळ्याच मूड मधे दिसले. मी जाऊन त्यांच्या मीटिंग मधे सामिल झाले. आपलंच घर आहे. म्हणून संकोच न करता मी बसले. सर्वांनी नेहमी प्रमाणेच माझ्या येण्याची दखल घेतली. भाऊजी म्हणाले,
अग!! अजय चे ‘Training ‘ सुरू आहे. पूढच्या महिन्यात त्याचे लग्न आहे ना. तेंव्हा त्याला काही गोष्टी सांगणे गरजेचे आहे, असे मला वाटले. आमचा अनुभव, आम्ही केलेल्या चूका, ज्या आम्हाला बऱ्याच उशिरा कळल्या. तेंव्हा त्याला, त्याच्या पूढच्या जबाबदारी करिता तयार करावे. म्हणून आम्ही बोलत बसलो होतो.
भाऊजी म्हणाले, अरे!! लग्न म्हणजे तुझे नवीन जबाबदारी चे काम सुरू होणार आहे. आपण नेहमी लग्न म्हणजे सासू, सून हीच मुख्य पात्रे आहेत असं समजतो. यांच्या बाबतीत बोलतो. पण माझ्या मते ज्या घरात सून येणार असते तेथे नवऱ्याचा (पुरुषांचा) रोल महत्वाचा असतो. जबाबदारीचा असतो. त्याचे ‘ Balanced ‘ वागणे, घराला जोडून ठेवते. एकीकडे आई वडील तर दुसरीकडे बायको. दोघे ही महत्वाचे. दोघांना सांभाळायचे असते.
आपणच तिला आपल्या घरी आणले आहे. दुसऱ्या घरातून आलेली ही मुलगी, आपल्या विश्वासावर आली आहे. आपले आई-वडील सोडून, दुसऱ्या घरात जाणे ही सोप्पी गोष्ट नाही. तेंव्हा तिला मानाने सांभाळणे. आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. आजपर्यंत तुम्ही दोघे जे भेटत होता, ती एक झलक आहे. ‘ just introduction ‘ आहे ते. जेंव्हा बरोबर राहू लागाल, तेंव्हा अनेक गोष्टी स्वभावाच्या, सवयीच्या तुझ्या लक्षात येतील. सर्व चांगलेच, तुला आवडणाऱ्या गोष्टी असतील, असं नक्कीच नसणार. पण हळूहळू त्यांची सवय होते. तसेच तिचे पण असणार आहे. तेंव्हा ‘patience ‘ हीच एक लग्न successful होण्यासाठी यशाची गुरुकिल्ली आहे. शांत राहणे शिकावे लागेल. , लगेच ‘reaction ‘ देणे, remark देणे, समजूत करून घेणे, चूकीचे आहे. ते टाळावे लागेल. एकमेकांना समजण्यात पूर्ण आयुष्य निघून जात. एकमेकांना सांभाळणे महत्वाचे आहे. लहान सहान वाद टाळणे. एकमेकांच्या चूकांकडे दुर्लक्ष करणे, अपेक्षा कमी ठेवणे. गरजेचे आहे. तिला ‘Protect ‘ करणे हे तुझे कर्तव्य आहे. तिने असेच वागावे, तसेच करावे. असे हट्ट चूकीचे आहेत. बाहेरच्यांसमोर तिचा मान ठेवायचा. तिच्या माहेरच्या लोकांचा अपमान, खिल्ली उडवणे वगैरे कधीच करायचे नाही. भांडण, वादविवादाचे कारण नेहमी अगदी शुल्लक असते.
ही एक बाजू झाली. आता दुसरी बाजू म्हणजे, आम्ही, आई-वडील, बहिण भाऊ. आम्ही नेहमीच तुमच्या बरोबर असणार आहोत. तू आमच्या बरोबर जसं वागशील तसंच ती वागणार. काही सवयी सुरवातीपासून लावायच्या असतात. दिवसांतून एकदा तरी सर्वांनी एकत्र बसून जेवायचे. गप्पा मारायच्या. संवाद साधायचा. हळूहळू प्रेम वाढत. तिचा बरोबर आईचाही मान ठेवायचा. हळूहळू तिच्या वर जबाबदारी टाकायची. तूला समजत नाही. तुला येणार नाही, जमणार नाही. ही भाषा वापरायची नाही.
आमच लग्न झालं तेंव्हा आजी आणि तुझ्या आईचा वादविवाद कधी झाला नाही असं नाही. पण ती गोष्ट माझ्या पर्यंत आणायची नाही हे मी दोघींना सांगितले होते. मी त्या मधे कधी पडलो नाही. दोघींनी कधी अबोला धरायचा नाही. हे ही मी निक्षुन सांगितले होते.
घरच्या बायका नेहमी आनंदात असाव्यात. त्यांना मान मिळाला पाहिजे. त्यांची तुलना आपापसात किंवा अजून कोणाबरोबर कधी करायची नाही. प्रत्त्येक व्यक्तिमत्त्व वेगळं असतं. घरच्या गोष्टी घरातच असाव्यात. दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकुन तस आपल्या घरात वागायचा प्रयत्न करायचा नाही. प्रत्त्येक घरची समीकरण वेगळी असतात.
माझ्या जवळ जे आहे ते उत्तम आहे. असं समजलं तर सर्व गोष्टी जमतात. घरात बायकांचे मत महत्वाचे असते. त्यांना ‘त्या ‘गोष्टी समजतात ‘ज्या ‘ कधी कधी आपल्या लक्षातही येत नाही. घरचे वातावरण प्रसन्न ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्याकरिता दोन पावलं मागे घ्यावी लागली, तर ती हार नसते. आपल्या माणसांसाठी गरज पडल्यास असे केले तर तुमचा मान वाढतो. कमी होत नाही.
बाकी पैशाचे व्यवहार, व्यवस्थापन या गोष्टींची, एकमेकांच्या सल्ल्याने सुरवातीपासून च काळजी घेतली, तर पूढील आयुष्यही मजेत जाते. हे सर्व तुम्ही तुमच्या हिशोबाने करावे. घरातील खर्चाचा हिशोब आई जवळ असल्यास, सवयीप्रमाणे ती उत्तम पार पाडेल याची खात्री आहे.
आम्ही दोघे काही चूका करणारच नाही असे नाही. जसजसे वय वाढत जाईल तसतसे ‘ चूकांचे प्रकार व प्रमाण ‘ दोन्ही वाढायची शक्यता नाकारता येत नाही. तेंव्हा वेळोवेळी आम्हाला पण सांगत रहा.
सर्वांनी एकमेकांना धरून राहणे महत्वाचे. सर्वांमध्ये स्पष्ट संवाद असावा. आनंद घरातच असतो. लहान सहान गोष्टींत घ्यायचा असतो.
मला भाऊजींचे कौतुक वाटले. आयुष्याचे गणित किती सोप्या भाषेत समजावून सांगितले. काही गोष्टी आधीच बोलायच्या असतात. नंतर बोलून त्याचा उपयोग नसतो. प्रत्त्येक कामाची सुरवात कशी होते हे नेहमीच महत्वाचे असते. त्यावरच शेवट अवलंबून असतो.
मी हसून म्हंटले, “भाऊजी!! नवरा संस्कार केंद्र उघडा की तुम्ही. खूप चालेल. “
भाऊजी हसले व म्हणाले, आपलं कर्तव्य वेळेवर पार पाडणे, ही आपली जबाबदारी असते.
भाऊजी म्हणाले, अरे, अजय लक्षात ठेव,
“आई म्हणजे भेटीला आलेला देव असतो, तर पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट असते. “
म्हणतात ना,
“संबंध, प्रेम, ‘वर्षा ‘ जैसा नहीं होना चाहिए, जो बरस कर खत्म हो जाए।
बल्कि संबंध ‘शीतल हवा ‘ की तरह होना चाहिए, जो खामोश हो, परंतु सदैव आसपास हो ।”
© संध्या बेडेकर
वारजे, पुणे.
7507340231
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






