शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ खडू आणि फळा! ☆ शीला पतकी ☆
☆
नव्याने लग्न झालेली मुलगी जेव्हा माहेरी येऊन बोलायला लागते आमच्या घरी असं आहे, आमच्या घरी तसं करतात, आमच्या घरी हे चालत नाही, तेव्हा समजावे ती मुलगी तिच्या संसारात पूर्णपणे रुळली आहे तसे शिक्षकी पेशात नव्याने शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर फलक लेखन सुरू होते, सुरुवातीच्या फलक लेखनात लिहिलेले लिखाण तिरके तिरके तिरके होत जाते… जेव्हा फलकावरचे लिखाण सरळ रेषेत येईल तेव्हा समजावे आपण आता पूर्ण शिक्षक झालो आहोत. ही खरी शिक्षक होण्याची पहिली पायरी आहे.
खडू आणि फळा ही नुसती दोन साधने नाहीत तर विद्यार्थ्याच्या मेंदूवर दृश्य स्वरूपात काहीतरी साठवण्याचा तो भाग आहे. की बाईंनी किंवा सरांनी अशी आकृती काढली होती त्याला इथे नावे दिली होती आणि मग तो सगळा भाग आठवतो त्यामुळे हा दृकश्राव्य प्रकारातला अत्यंत साधा आणि पहिल्या पायरीचा प्रकारचा शोध लागला आणि तीच अनेक वर्षे शिकवताना वापरली जाऊ लागली
ज्या शिक्षकाचे फलक लेखन उत्तम त्याचे पाठही सुंदर होतात. काही शिक्षकांची सवय असते की वर्गात गेल्याबरोबर फळा स्वच्छ पुसणे आपला विषय, आजच्या शिकवण्याचा विषय काय आहे तो फलकावर लिहिणे आणि शिकवायला सुरुवात करणे. नकाशा काढणे भूमितीच्या आकृत्या फलकावर काढणे हे शिक्षकाचे कौशल्य त्यामुळे तुमचे शिकवणे प्रभावी ठरते.
काही शिक्षकानी फलकावरती लिहिलेले किंवा फलकावरती काढलेल्या आकृत्या या आजही आपल्या स्मरणात असतील सुंदर हस्ताक्षराचे शिक्षक हे नेहमी मुलांच्या स्मरणात राहतात जिल्हा परिषद शाळेतअसंख्य शिक्षकांचे अक्षर, फलक लेखन हे पाहण्यासारखे असते. त्याला जर चित्रकलेची जोड असेल तर फळा उत्तम सजतोच.
प्रत्येक शिक्षकाच्या सवयीनुसार त्याचे फलक लेखन असते काही शिक्षक फळ्यावर न लिहिता लिहिले आहे असे समजून शिकवतात आमचे कॉलेजमधील एक शिक्षक पिरॉडिक टेबल एका बाजूला आहे असे गृहीत धरून आम्हाला मेटल शिकवत असत आणि पिरॉडिक टेबल मध्ये त्याचे स्थान सांगताना वारंवार त्या बाजूच्या कोपऱ्याला येरझाऱ्या घालत असत. काही शिक्षक मुद्दे फलकावर मांडून… काही जण उगाचच गोल खुणा मांडून… रेषा ओढवून टिंब देऊन गोल करून फलक लेखन कैल्याचे समाधान मिळतात ती त्यांची सवय असते
दारचे अंगण घराची कळा दाखवतात असे म्हणतात तसे शाळेच्या इमारती भोवती असलेले फळे हे शाळेचे वैभव सिद्ध करतात. आमच्या शाळेच्या बाह्य भागात तीस-पस्तीस फळे होते व सर्व शिक्षकांना आठवड्यातून तीन वेळा लेखन करणे कंपल्सरी असे आमचे मुख्याध्यापक रोज लिहीत असत तेव्हा google youtube असल काही नव्हतं त्यामुळे माहिती वाचून मिळवून लिहावी लागे. आमची एक विद्यार्थिनी माझ्याकडून कविता घेऊन लिहीत असे आज ती फार मोठी लेखिका आणि कवयित्री झाली आहे. तिच्या अनेक पुस्तकांना पारितोषिके प्राप्त झाली आहेत. हा फलक लेखनामधून निर्माण झालेल्या आवडीचाआणि संस्काराचा भाग आहे. वर्ग मॉनिटरला फळ्यावर लिहिण्याची मुभा असे. एकदा एका वर्गात एका मुलीने सुविचार लिहिला… एक रुपया चांदीचा सारा देश गांधींचा… मी कपाळावर हात मारून घेतला अगं हा कुठला सुविचार.. पण मला आता कळतंय हा सु नसला तरी विचार नक्की होता असो
फलक लेखनाच्या काही शिक्षकांच्या गमतीजमती आजही आठवतात दयानंद महाविद्यालयामध्ये झूलॉजीचे एक शिक्षक होते झूलॉजीच्या वर्गामध्ये एकावर एक दोन फळे होते म्हणजे एक फळा लिहून झाला की तो वर ढकलायचा दुसरा फळ खाली येत असे त्यावर कुणीतरी टारगट विद्यार्थ्यांनी मोठा बेडूक काढला त्या बेडकाला चश्मा दाखवला बेडकाच्या शरीराच्या मधल्या मोठ्या भागात लिहिले… सर इज अ बिग फ्रॉग… वर्ग शांतपणे शिकत होता सर बेडका संबंधी बोलत होते त्या फलकावर लिहून झाल्यावर तो फळा त्यांनी वर ढकलला आणि पाठीमागचा फळा खाली आला विद्यार्थी मोठ्यांना हसायला लागले. सर ही आकृती पाहून क्षणभर रागावले आणि मग त्या आकृतीचे कौतुक करीत मधले नाव पुसून त्यानी रंगीत खडूने बेडूक सजवला आणि म्हणाले धिस इज फ्रॉक आणि त्यांनी आपला चष्मा नेहमीच्या स्टाईलने सरळ केला… फळ्यावरील लेखनाच्या कितीतरी आठवणी आहेत आमच्या कॉलनीतील फळ्यावर दररोज एक सुविचार लिहीत असे सवय जात नाही ना कॉलनीतले एका गेट समोरून बिडी घेऊन जाणाऱ्या बायका कॉलनीतून ये जा करीत असतात त्यातील एक महिला आपल्या टोपलीतील छोटी वही काढून त्यात मी फलकावर लिहिलेला सुविचार लिहून घेऊन जात असे. ” तू फळ्यावरचे बघून काय लिहून घेतेस आणि कोणासाठी? ” ती लोधी समाजाची होती ती म्हणाली, ” आपका सुविचार बहुत अच्छा होता है बच्चों के लिए लिखके ले जाते है” आपल्या मुलांच्या चांगल्या जडणघडणीसाठी सकाळच्या गडबडीच्या वेळेतही एका छोट्या वहीत ते लिहून घेऊन जाणाऱ्या त्या महिलेचे मला कौतुक वाटले पुढे पुढे तर मी तिच्यासाठीच लिहीत होते.
सोलापुरातील हदे प्रशाला सेवासदन प्रशाला सुयश विद्यालय सरस्वती मंदिर ज्ञानप्रबोधिनी कुचन प्रशाला अशा कितीतरी शाळा आहेत की गेटमधून आत गेल्याबरोबर उत्तम हस्ताक्षरातले आणि सुंदर चित्रांनी सजवलेले फळे स्वागत करीत असतात. त्या शाळेतील विद्यार्थी हे फलक लेखन कधीच विसरू शकत नाहीत ते दृक असल्यामुळे मेंदूच्या पटलावर छापून गेले आहे.
महाराष्ट्रातील कित्येक शिक्षक उत्तम फलक लेखनात माहीर आहेत त्या त्या दिवशी चे वैशिष्ट्य जाणून घेऊन फलकावर रंगीबेरंगी चित्रे काढण्यात प्रसिद्ध आहेत त्यापैकी हिरे सर हे नाव… हे शिक्षक फार सुंदर फलक लेखन करतात आमच्या शाळेतील पोरे सर यांचे फलक लेखन कोणीही विद्यार्थिनी कधीच विसरू शकणार नाही इतके सुंदर असे आणि ते फार आत्मीयतेने लिहीत असत
फळा आणि खडू यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोरआपला विषय शिकवणे हे कौशल्य पूर्वीच्या शिक्षकांकडे होते कारण कोणती आधुनिक उपकरणे हाताशी नव्हती या दोन साधनाने उत्तम आणि संस्कारक्षम पिढ्या घडविल्या केवळ खडू आणि फळा या माध्यमातून शिकवणाऱ्या शिक्षकांच्या या पिढीने या माध्यमातून खूप संस्कार दिला त्या समस्त शिक्षकांच्या पिढीला आदरपूर्वक नमस्कार.
© शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈





