श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग १०१ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- डॉ. परांजपे हे आमचे फॅमिली डॉक्टर. त्यांच्याशी ताईच्या प्रॉब्लेमबद्दल मोकळेपणाने बोलून मनावरचं ओझं हलकं करावसं वाटलं. त्यांना फोन करून मी त्यांच्या भेटीची लगेचची वेळ ठरवली, तेव्हा मनातला अंधार दूर करणारा त्यांच्या रूपातला एक आशेचा किरण तोवर अंधारात चाचपडणाऱ्या मला पुढं पाऊल टाकण्याची प्रेरणा देत होता! )
“तुम्ही त्यांचे रिपोर्टस् मला दाखवण्याची व्यवस्था करू शकाल कां? त्यांनाही इथे घेऊन येऊ शकलात तर बोटाची जखमही मला तपासता येईल. ” डॉक्टर म्हणाले. ते रास्तही होतंच. पण हे सगळं जमवता येईल कां हा मात्र प्रश्न होता. याला कारणही तसंच होतं.
तो शनिवार होता. तसंही मी आज ताईला भेटायला कोल्हापूरला जाणार होतोच. त्यामुळे सगळ्या रिपोर्टसच्या झेराॅक्स काॅपीज् आणणं कठीण नव्हतं. पण ताईला कसं आणायचं? मुळात तिकडे आॅपरेशनची तारीख ठरवण्यापूर्वी दुसऱ्या एका आॅर्थोपेडीकचे सेकंड ओपिनियन घेतलेले होते. मग पुन्हा मुद्दाम सांगलीला तिला आणून दुसऱ्या एका डॉक्टरांचं मत विचारण्याची आवश्यकता नाही असं ताईच्या घरच्यांना वाटलं तर? आज मी दुपारनंतर तिथं जाऊन, सर्वांशी चर्चा करून निर्णय घ्यायचा म्हंटलं तरी लगोलग आजच ताईला आणणं शक्य कसं होणार? उद्या रविवार म्हणजे परांजपे डॉक्टरांचं क्लिनिकला उद्या सुट्टी आणि सोमवारी ऑपरेशनची तारीख आहे. मग करायचं काय?
यातून काही मार्ग निघेल याची शक्यता मला दुरास्पतच वाटत होती. मी डॉक्टरना ही अडचण सांगितली तेव्हा क्षणाचाही विचार न करता ते म्हणाले,
” ठीक आहे. त्या उद्या दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान येऊ शकल्या तर त्यांना आमच्या घरी घेऊन या हवंतर. कांहीच प्राॅब्लेम नाही. “
मला गहन वाटणारा प्रश्न असा चुटकीसरशी सुटणं हा शुभशकूनच होता माझ्यासाठी! आणि आश्चर्य म्हणजे एखादं किचकट, अवघड वाटणारं गणित चुटकीसरशी सुटावं तशी पुढची सगळी सूत्रंही आपोआप हवी तशी विनाविलंब हलू लागली..!!
त्यादिवशी मी ठरल्याप्रमाणे ताईकडे गेलो. आम्ही ट्रीपला गेलेलो आहोत हेच गृहीत धरलेल्या सर्वांना माझं असं अचानक तिथं जाणं आश्चर्य वाटावं असंच होतं.
” तू? तुम्ही ट्रीपला गेला होतात ना? मग असं मधेच? ” ताईनं विचारलं.
ट्रीप अर्धवट कां सोडावी लागली ते मी थोडक्यात सांगितलं आणि मुख्य विषयालाच हात घातला.
“पण आलो ते बरंच झालं. कारण काल रात्री घरी आल्यावर सलिलकडून सोमवारी तुझं ऑपरेशन ठरल्याचं समजलं आणि.. “
“हो रे. बघ ना काय होऊन बसलंय.. ” ताई म्हणाली. मग पुढे त्याचीच चर्चा. उदय-योगिता म्हणजे ताईचा मुलगा न् सून.. , माझे मेहुणे यांच्याकडून हे सगळं कां, कसं झालं ते सविस्तर समजलं.
” भोग म्हणायचे आपले. दुसरं काय? तरी योग्य निदान लवकर झालं म्हणून बोटावरच निभावलंय. नाहीतर कांही खरं नव्हतं. ” ताई म्हणाली.
त्या सर्वांनी मनाविरूध्द का होईना पण सगळं स्वीकारलं होतं!
“मलाही ऐकलं तेव्हा धक्काच बसला होता. यातून कांहीतरी मार्ग निघेल या आशेने आज सकाळीच सांगलीतल्या डाॅ. परांजपेंची भेट घेऊन मी त्यांना हा प्राॅब्लेम सांगितलाय. ” असं म्हणून मी डाॅक्टर काय म्हणाले ते सविस्तर सगळं सांगून टाकलं.
“तुम्ही दुसऱ्या ऑर्थोपेडिकना रिपोर्टस् दाखवून आधीच त्यांचं सेकंड ओपिनियन घेतलंय ते गरजेचंच होतं. पण तरीही सोमवारी ऑपरेशन होण्यापूर्वी उद्याच ताईला घेऊन तुम्ही कुणीतरी सांगलीला माझ्याकडे येऊ शकलात तर आपण डॉक्टरांची त्यांच्या घरीच जाऊन भेट घ्यायचीय असं ठरलंय. त्यांचं घर आमच्या घरापासून जवळच आहे. मुख्य म्हणजे ते माझ्या माहितीतले एकमेव असे डॉक्टर आहेत ज्यांनी एम. डी. आयुर्वेद आणि एम. बी. बी. एस् अशा दोन्ही डिग्रीज् प्राप्त केलेल्या आहेत. त्यांच्या घरी आजोबांपासून आयुर्वेदाचं ज्ञान आणि वैद्यकी दोन्ही परंपरेने चालत आलेलं आहे. शिवाय यांची ऍलोपथीची डिग्रीही योग्य ट्रीटमेंट देण्यासाठी त्यांना उपयोगी पडतेय. ऑपरेशन शिवाय दुसरा कांहीच उपाय नाहीय असंही रिपोर्ट्स पाहून आणि जखम तपासून ते म्हणतील कदाचित, तरीही शेवटपर्यंत आपण प्रयत्न केला नाही असं नको ना व्हायला? काय करूया? ” मी विचारलं.
” कांहीच हरकत नाही. आम्ही आईला घेऊन उद्या येतो. ” उदयची ही लगेचची सकारात्मक प्रतिक्रिया माझ्यासाठी उत्साहवर्धक होती. मी सांगलीला परतलो.
दुसऱ्या दिवशी उदय आणि योगिता कारमधून ताईला घेऊन आले. डाॅ. परांजपेनी बोटाची जखम तपासली. सगळे रिपोर्टस् नजरेखालून घातले. आणि म्हणाले,
“मी ८०% खात्री देतो. बोट वाचेल. “
ऐकून माझ्या अंगावर शहाराच आला. हे सत्य कीं स्वप्न समजेचना. ताई, उदय, योगिता यांच्या मनातली भावनाही यापेक्षा वेगळी नव्हती.
आमच्या मनातली उरलेल्या २० टक्क्यांची अनिश्चितता कां? ही शंका आम्ही न सांगताच समजल्यासारखं डॉक्टर म्हणाले,
“८०% खात्री मी देतोय ती मी तुम्हाला सांगणार असलेल्या उपायांबद्दलची. बाकी २०% तुम्ही ते सर्व उपाय किती चिकाटीने आणि नियमित करु शकाल याच्यावर अवलंबून असेल. ” ते म्हणाले. हे कसं तेही त्यांनी आम्हाला सविस्तर समजावून सांगितलं.
‘ते सांगतील त्या पध्दतीने मसाज आणि बॅंडेज अनेक दिवस चिकाटीने करावं लागेल. त्यात घरच्या इतरांचीही मनापासूनची मदतही अत्यावश्यक आहे. शिवाय पेशंटचंही न कंटाळता सातत्यपूर्ण सहकार्य हवं. फरक अगदी हळूहळूच जाणवेल पण अखेर गुण येईल हे नक्की. ‘ हा त्यांच्या सविस्तर सांगण्याचा मतितार्थ होता!
” डाॅक्टर, बोटाला मसाज आणि बॅंडेज कसं, कधी आणि दिवसातून किती वेळा करायचं ते सांगा. मी ते कितीही दिवस करावं लागलं तरी नियमित करीन. आईही ते सगळं शांतपणे करुन घेणाऱ्या आहेत. आम्ही मॅनेज करू. ” योगिता मनापासून म्हणाली. ताईचं बोट वाचायची शक्यता आहे हेच ताईच्या घरच्या सगळ्यांसाठीच असं खूप महत्त्वाचं होतं!
“उद्याचं ऑपरेशन करायचं नाहीये हे त्या डॉक्टरना लगेच सांगायला हवं. ” उदय म्हणाला.
” हो ते सांगाच. प्रयत्नाचा एक भाग म्हणून आयुर्वेदीक ट्रीटमेंट घेणार आहोत हेही सांगून टाका. त्यात लपवण्यासारखं कांहीच नाहीय. शिवाय ऑपरेशन करायचं नाहीये असं नका म्हणू. ते थोडे दिवस पुढे ढकलूया असं सांगा. ” परांजपे डाॅक्टर म्हणाले.
कोल्हापूरच्या डॉक्टरनी ‘सध्या घेत असलेल्या मी दिलेल्या गोळ्या बंद करणं धोक्याचं ठरेल’ याची कल्पना देऊन आॅपरेशन पुढं ढकलणं मान्य केलं. पण सध्या सुरू असलेली पहिली औषधं बंद करणं धोक्याचं ठरू शकेल असं निक्षून सांगितलं. अर्थात डाॅ. परांजपेनीही त्याला विरोध दर्शवला नाही हे महत्त्वाचं!
या आधी मी ‘ एखादं अतिशय अवघड आणि किचकट गणित चुटकीसरशी
सुटलं जावं तशी पुढची सगळीच सूत्रं वेगानं हलू लागली’ असं म्हटलं होतं त्याची ही सुरुवात होती!
डॉ. परांजपे यांच्या ट्रीटमेंटच्या, त्यांनी लिहून दिलेल्या गोळ्या, रोज सकाळ संध्याकाळ असं दोन वेळा बोटाला करायचा मसाज आणि जखमेला करायचं ड्रेसिंग या तीन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. मसाज साठी आवश्यक ते तेल डॉक्टर स्वतः तयार करून देणार होते. ते तेल बोटाला हलक्या हाताने मसाज करून पूर्ण मुरवायचे होते. ड्रेसिंग करण्यापूर्वी जास्त प्रमाणात पिकून लिबलिबीत झालेल्या देशी केळ्याचा गर कुस्करून त्याचा लेप जखमेवर व्यवस्थित लावून त्यावर मेडिकेटेड कापसाची घडी ठेवून मग बँडेज करायचे होते.
ट्रीटमेंट नियमित सुरू झाली. योगिताने स्वीकारलेली जबाबदारी अतिशय निगुतीने अगदी मनापासून पार पाडली. पहिले दिड-दोन महिने कांहीही फरक जाणवला नाही तरी तिने धीर सोडला नाही. नंतर मात्र अगदी कणाकणानंच पण बोटावरची सूज कमी होतेय असं मसाज करताना तिला जाणवू लागलं. आणि पुढेही खूप दिवस चिकाटीने हा नित्यक्रम असाच सुरू ठेवल्यानंतर अखेर बोटावरची सूज हळूहळू करत एक दिवस पूर्णतः उतरली. त्याचवेळी हाडांचा भुगा होऊन अतिशय पोकळ झालेलं त्या बोटाचं हाडही भरून येऊ लागलं आणि अखेर ताईचं बोट वाचलं!!
या घटनेला आज दहाबारा वर्षं उलटून गेलीयत. पण ती आठवण मात्र मी कधीच विसरू शकणार नाही. या दरम्यानच्या प्रत्येक राखीपौर्णिमेला आणि भाऊबीजेला जेव्हा ताई मला ओवाळते तेव्हा त्या निरांजनाच्या प्रकाशात माझ्याही नकळत माझी नजर तिच्या हातातल्या ताम्हणाखाली लपलेल्या तिच्या ‘त्या’ बोटाचा वेध घेत असते!!
इथं आयुर्वेदिक ट्रीटमेंटला गुण येणं हा चमत्कार नव्हताच. चमत्कार लपलेला होता तो त्या त्या वेळी घडत गेलेल्या सगळ्या घटनाक्रमांत! त्यातील प्रत्येक वळणावर ‘तो’ होताच. त्या त्या प्रसंगात ‘तो’ स्वतःच घालत असलेली असंख्य धाग्यादोऱ्यांची घट्ट वीण मला इतक्या प्रदीर्घ काळानंतर आजही स्वच्छ जाणवते आणि मी ‘त्या’च्यापुढे मनोमन नतमस्तक होतो!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈




