सुश्री अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १८ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

सत्संग- सज्जन प्रशंसा (२)

महाराजांना संतांच्या रूपात  प्रत्यक्ष पांडुरंग दिसतो. त्यांचे म्हणणे असे आहे की, गृहस्थाने देवाची पूजा करत असताना जर घरी कोणी संत मंडळी आली तर पूजा बाजूला ठेवून संतांची यथासांग पूजा करावी. प्रथम त्यांचा आदर करावा मग पूजा करण्यास घेतलेला देव शाळीग्राम असो, नाहीतर प्रत्यक्ष विष्णूची मूर्ती असो. मूर्ती पूजेच्या ऐवजी देवस्वरूप असणाऱ्या संतांचे पूजन हा धर्म आहे.

 धन्य ते संसारी/ दयावंत जे अंतरी/

 येथे उपकारासाठी/ आले घर ज्या वैकुंठी//

 लटिके वचन/ नाही देही उदासीन/

 मधुरा वाणी होटी / तुका म्हणे वाव पोटी//

संत गण, सज्जन, म्हणजे कसे असतात  याचे  वर्णन वरील अभंगात तुकाराम महाराज करतात. या लोकांच्या अंतःकरणात दया असते, म्हणून ते धन्य आहेत. कोणा परक्याला ठेच लागली तरी संतवृत्तीच्या माणसांच्या डोळ्यात टचकन पाणी येते. यांचे वास्तविक वैकुंठ हेच निवासस्थान आहे, परंतु केवळ परोपकार बुद्धीने ही माणसे लोकांमध्ये येतात. ते कधीही खोटे बोलत नाहीत, खोटी वचने देत नाहीत, त्यांची वाणी नेहमी मधुर आणि रसाळच असते. लोकांचे गुणदोष सामावून घेण्याइतके त्यांचे मन मोठे असते. त्यांची वृत्ती क्षमाशील असते. दुसऱ्याचे सुख तेच त्यांचे सुख. स्वतःच्या देहासंबंधी ते पूर्णतः उदासीन असतात.

 अशा संतांचा संग लागणे, यासाठी प्रारब्ध ही अनुकूल असावे लागते, सर्वांनाच संत संगतीचा लाभ होतोच असे नाही.

 जेथे जावे तेथे कपाळ सरिसे/

 लाभ तो विशेष संत संगे//

 पूर्वपुण्य जरी होती सानकूळ/

 अंतराय मूळ नुपजे तेथे//

 भाग्य तरी नव्हे/ धन पुत्र दारा/

निकट वास बरा/ संतापाई//

 तुका म्हणे हेचि करावी मिरासी/

 बळी संतांपाशी द्यावा जीव//

महाराज देवाजवळ एकच मागणे  मागतात की देवा, मला संतांची संगती लाभू दे. त्यांचा असा विश्वास आहे की दैव अनुकूल नसले, तरी संतांच्या सहवासात ते अनुकूल करता येईल. कारण चांगल्या संगतीचा परिणाम चांगलाच होणार. पत्नी, पुत्र,द्रव्य, एकूणच हा एक संसार म्हणजेच भाग्य असा सर्वसामान्यांचा विश्वास असतो,

परंतु महाराजांच्या मते संतांच्या चरणाशी आपण कायम राहावे, त्यांची सेवा करावी, त्यांच्यापाशी जीवही अर्पण करावा, तरच सद्गती लाभेल. दोऱ्यात ओवलेल्या सुगंधी फुलांच्या गंधाने  दोराही सुगंधित होतो.

संत, सज्जन, ज्ञानी माणसांइतके महान कोणी नाही हे तुकाराम महाराज त्यांच्या अनेक अभंगांतून सतत सांगत आहेत. त्याच आशयाच्या या अभंगाचा आपण थोडा विचार करू.

 परमार्थी  तो न म्हणावा आपुला/

 सलगी धाकूला हेळू नये/

 थोडाची स्फुल्लिंग बहुत दावाग्नी/

 वाढता इंधनी वाढविला/

 पितियाने तैसा वंदावा कुमर/

 जयाचे अंतर देव वसे/

 तुका म्हणे शिरी वहावे खापर/

 माजी असे सार नवनीत//

जो कोणी परमार्थी असेल, ब्रह्मनिष्ठ असेल, तो वयाने लहान असला तरी त्याची अवहेलना करू नये. तू लहान आहेस, तुला काय कळतंय असे बोलणे साफ चुकीचे आहे.  वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून गीतेचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारे ज्ञानेश्वर महाराज यांना आपण माऊली म्हणून का बरे वंदन करतो? या ठिकाणी तुकाराम महाराजांनी अगदी योग्य असे दृष्टांत दिले आहेत.

ते म्हणतात की अग्नीची ठिणगी लहान असली तरी लाकडाच्या योगाने मोठ्या अग्नीचे स्वरूप धारण करते. तशी परमार्थाची स्थिती आहे. ज्याच्या अंतःकरणात नित्य देवाची वस्ती असते अशा मुलाला पित्यानेही नमस्कार करावा. लोण्याचे भांडे मातीचे असले तरी डोक्यावरून वाहून नेतात, त्याचप्रमाणे ज्ञानी, वयाने लहान असला किंवा हलक्या कुळातला असला तरी तो वंदनीय आहे. सावता, माळी होता, चोखा, महार होता, नामदेव, शिंपी होता, गोरा, कुंभार होता, परंतु हे सर्व वृत्तीने संत होते, महात्मे होते, म्हणूनच वंदनीय आहेत.

देहरूपी मलीन झालेली चादर कोणत्याही साबणाने स्वच्छ करता येत नाही. संतांच्या सहवासात राहून त्यांच्या वचनानुसार वर्तन करणे हा एकच मलीनता नष्ट करण्याचा उपाय आहे, हे जाणून अत्यंत नम्रतेने तुकाराम महाराज या संत सज्जनांना उद्देशून म्हणतात…….

 पाळीतो वचन/ परी बहु भिते मन/

 करितो पायांशी सलगी/ नये बैसो अंग संगी//

 जोडोनिया कर/ उभे असावे समोर/

 तुका म्हणे संत/ तुम्ही मी बहु पतीत//

मी तुमच्या वचनाप्रमाणे जरी वागत असलो, तरी मला फार भीती वाटते, कारण माझी ती योग्यताच नाही. तुमच्या पंगतीत मी बसू शकत नाही, म्हणून तुमच्या पायाशीच मी बरा. तुमच्यासमोर हात जोडून उभे राहावे हीच माझी योग्यता आहे. अहो संत सज्जन हो, तुम्ही खरोखरच फार थोर आहात, आणि मी पापी आहे. विनम्र बुद्धी असली तरच माणूस मोठा होऊ शकतो हे तुकारामांना या अभंगातून सांगायचे आहे.

संत महिमा इतका मोठा आहे, की तुकाराम महाराज म्हणतात, संतांवर माझा सर्व भार टाकून मी निश्चिंत झालो आहे. संतांनीच मला विठ्ठलाच्या स्वाधीन केले.

  घालुनिया भार राहीलो निश्चिंती/

 मिरविले संती विठोबासी//

 लावूनिया हाता कुरवाळिला माथा/

 सांगितले चिंता/ न करावी//

 कटी कर समचरण साजिरे/

 राहिला मी बरे तीरी उभा//

 खुंटले सायास आणिक या जीवा/

 धरीले केशवा पाय तुझे//

 तुज वाटे आता ते करी अनंता/

 तुका म्हणे संता लाज माझी//|

संतांनी( विठ्ठलाने) माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, मला कुरवाळले, माझ्या सर्व चिंता दूर केल्या. मला भयमुक्त केले. कमरेवर हात आणि समचरण ठेवून तो माझा विठू भीमेच्या तीरावर उभा आहे. त्याचे पाय धरल्यामुळे माझे सर्व कष्ट नाहीसे झाले. हे अनंता, तुझ्या इच्छेप्रमाणे तू मला जसे ठेवशील तसा मी राहीन कारण माझी लाज राखणारे संतच आहेत.

संतांची संगती आयुष्यात फार महत्त्वाची आहे. संत हेच गुरु आहेत, संत हेच सन्मार्गदर्शक आहेत. गाथेतील अभंगांतून वर्णिलेला संत महिमा, गाथा वाचताना जागोजागी दिसून येतो. मी घडविले ते एक विहंगावलोकन!

क्रमशः… १८

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments