सौ राधिका भांडारकर

✈️ प्रवासवर्णन ✈️

☆ चला आसाम मेघालयाला… भाग – 4 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

आमच्या प्रवासाचा आता दुसरा टप्पा सुरू झाला. शीलाँग सोडताना मन थोडे जड झाले होते. पण आसामची सफर करण्यासही  मन उत्सुक होते.

आसाम हे ईशान्य भारतातले राज्य. त्याचा मुळ उच्चार असम असा आहे. असम  म्हणजे समान नसलेला प्रांत. पहाडी आणि चढ-उतार असलेले हे राज्य अतिशय निसर्गरम्य आहे शिवाय बांबू, चहा, यासाठी प्रसिद्ध आहे. . आसाम हे वाइल्डलाइफ आणि पुरातत्वशास्त्र साठी प्रसिद्ध असे राज्य आहे. आसाममधील काझीरंगा हे शहर अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. शिलॉंग ते काझीरंगा हे जवळजवळ 300 किलोमीटरचे अंतर आहे. ड्राईव्ह अर्थातच सुरेख होता. रस्ते वळणावळणाचे. दुतर्फा हिरवेगार चहाचे मळे. सुपारी, केळीची बने, लांबच लांब पसरलेले डोंगर! मेघालयातील डोंगर आपल्या सोबतीने चालतात असे वाटायचे मात्र आसाममधील डोंगर दुरूनच आपले स्वागत करतात. पण तेही दृष्य अतिशय मनोहारी वाटते. रसिक मनाला चित्तवृत्ती फुलवणारे वाटते.

काझीरंगा हे एक ऍनिमल कॉरिडॉर आहे. या जंगलात र्‍हायनो(गेंडा) हा प्राणी प्रामुख्याने आढळतो. आम्ही प्रवास करत असताना, एका जलाशयाजवळ आम्हाला तो दिसला. एक शिंगी, जाड कातडीचा, बोजड  प्राणी. डुकराच्या फॅमिलीतला वाटणारा. अत्यंत कुरूप पण वेगळा. म्हणून त्याच्या प्रथम दर्शनाने आम्ही खुश झालो. समूहातील सर्वांनी रस्त्यावर उतरून पटापट फोटो काढले. सूर्यास्त पाचलाच झाला. बाकी आजचा सगळा दिवस प्रवासातच गेला. संध्याकाळी युनायटेड-21 रिसॉर्ट हे आमचे वास्तव्य स्थान होते.

दुसऱ्या दिवशी आम्ही काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. पर्यटकांचे प्रमुख आकर्षक स्थळ म्हणजे  हे उद्यान. हे  आसाम मधील गोलघाट जिल्ह्यात आहे. भारतात १६६ राष्ट्रीय उद्याने आहेत आणि हे भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्यान आहे. १९८५ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून यास घोषित केले. हे राष्ट्रीय उद्यान एक शिंगी गेंड्या  साठी तर प्रसिद्ध आहेच शिवाय या उद्यानात, भारतात कोठेही उपलब्ध नसलेले काही प्राणी आहेत. पक्ष्यांचे उत्तम क्षेत्र म्हणूनही हे  ओळखले जाते. हंस, सारस, नाॅर्डमॅनचा हिरवा शंख, काळ्या गळ्याचा सारस असे पक्षी इथे बघायला मिळतात. इथे वाघही आहेत. जंगली पाण म्हशी इथे आढळतात. या उद्यानाची हिरवळ जगप्रसिद्ध आहे. सदाहरित असा हा जंगल प्रदेश आहे. या पार्क मध्ये आम्ही उघडी जीप सफारी केली. सकाळची प्रसन्न वेळ, दाट जंगल, जलाशय आणि मुक्त फिरणारे र्‍हायनो (गेंडे) हरणे, हत्ती, आनंदाने पोहणारी बदके. . . पक्ष्यांमध्ये निळकंठ पॅलिकेन बघायला मिळाले. रंगीबेरंगी फुलपाखरे बागडत होती. प्रदूषण विरहित जंगल सफारीचा हा मुक्त अनुभव अविस्मरणीय होता.

1. ब्रह्मपुत्रा 2.आसामी कलकुसर 3. आसामी जेवण

आसाम मधले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथली ऑर्किडची लागवड. इथली ऑर्किड्स ही जगातल्या इतर ऑर्किड्स पेक्षा निराळी आहेत असा आमचा टूर गाईड सांगत होता. या फुलांना सहाच पाकळ्या असतात शिवाय झाडांच्या पानावर संपूर्ण सरळ आणि समांतर रेषा असतात. . ऑर्किड पार्कमधला फेरफटका नेत्रसुखद होता. . अनेक रंगांची ही ऑर्किड्स मनमोहक होती. त्यांची नावेही गमतीदार होती. बटरफ्लाय ऑर्किड, लेडी ऑर्किड वगैरे. . नावाप्रमाणेच फुलांचे आकार होते. याच पार्क मध्ये कॅक्टस आणि औषधी वनस्पतींची लागवड केलेली आहे. विविध रोगांवर या वनस्पतींचा कसा उपचार होऊ शकतो याची भरपूर माहिती आम्हाला मिळाली. शंखपुष्पी, अश्वगंधा शतावरी, काळीहळद, बांबू वगैरेची झाडे पाहायला मिळाली. एका लिंबाच्या झाडाला भरपूर लिंबे लगडली होती. हे झाड माझ्या लक्षात राहिले ते लिंबांच्या आकारामुळे. एकेक  लिंबू पपई सारखे लांबट आणि मोठे. शिवाय हिरवेगार. चवीलाही अतिशय स्वादिष्ट.

पारंपारिक  आसामी जेवणाचा आस्वाद इथे आम्हाला घेता आला. भल्यामोठ्या थाळीत १४ वाट्या होत्या. या  आसामी थाळीत तिथेच पिकणार्‍या भाज्या प्रमुखांनी होत्याच. फणस केळफुल, कारली, भेंडी, तोंडली, बटाटे असे नाना प्रकार होते. तेल नसलेल्या उकडलेल्या भाज्या. डाळी आणि भरपूर भात. खीरही होती. खार नावाच्या माध्यमात ते बनवतात. स्वयंपाकात सरसोचे  तेल वापरतात. सुरुवातीला या तेलाच्या वासाने खावेसे वाटेना पण हळूहळू सवय झाली. वेगळ्या चवीचे आणि आकर्षक असे हे आसामी भोजन होते.

आसामी लोक हे मांसाहारी आहेत. त्यांचे प्रमुख खाणे भात आणि करी (कालवण)हेच आहे. ते गोमांस खातात. रस्त्यारस्त्यावर गोमांस विक्रेत्यांची उघडी दुकाने पाहताना मात्र, मन शहारले. त्या वेळी जाणवलं की आपली खाद्यसंस्कृतीची मुळे किती खोलवर रुजलेली आहेत. !गाय हे आपल्यासाठी दैवतच आहे. त्यामुळे या दुकानांवरुन जाताना नकळतच डोळे झाकले जातात.

आसाम मध्ये बांबूचे प्रचंड उत्पन्न आहे. त्यामुळे इथली घरे, कुंपणे, फर्निचर, सजावट ही सारी बांबूची असलेली आढळते. नंबर फिफ्टी फोर, द हाऊस ऑफ अ  बांबू डोर…या गाण्याची आठवण झाली. मेघालयातही बांबूचा फार मोठा व्यवसाय आहे. इथला हस्तकला व्यवसाय ही बांबू शी निगडीत आहे. बांबू पासून केलेल्या अनेक कलात्मक कलाकृती इथे पहायला मिळतात.

इथल्याच एका म्युझियमला आम्ही भेट दिली. यामुळे आम्हाला आसामच्या पारंपरिक संस्कृतीची ओळख झाली. त्यांची स्वयंपाकाची भांडी, चुली, शेगड्या, हत्यारे, राजाराणी चे पोशाख, दागदागिने, वगैरे पाहायला मिळाले. आपल्याकडील महिला जसा पारंपारिक पद्धतीने डोक्यावरून पदर घेतात, तसेच इथल्या स्त्रिया मेखला आणि गामोशा हे वस्त्र पांघरतात. हे वस्त्र म्हणजे स्त्रियांची अब्रू राखणारे. . असा संकेत आहे. आणि इथल्या बहुतांश स्त्रियांच्या अंगावर ते दिसतेच. ते छान दिसते. पारंपारिक असले तरी सुटसुटीत आहे. आणि त्याचा आगळावेगळा लुक मला आवडला. एखादं आपण विकत घ्यावं का असा विचारही माझ्या मनात आला.

आसाम सफरी मधले वैशिष्ट्य म्हणजे तिथले बिहू हे लोक नृत्य. आपल्याकडे जसे कोळी नृत्य हा लोक परंपरेचा आणि लोककलेचा प्रकार आहे, त्याच पद्धतीचे बिहू हे लोक नृत्य. काहीसे लावणी प्रकाराशी ही त्याचे साम्य वाटले. बिहू हा आसाम चा सण आहे. आसाम हे कृषिप्रधान राज्य आहे. आणि बिहू हा तेथील शेतकर्‍यांचा सण आहे. हा वर्षातून तीनदा साजरा करतात.

पहिला रंगीन बिहू. हा 1४ एप्रिल पासून महिनाभर धूमधामपणे साजरा होतो. साधारण वसंतोत्सव सारखा हा सण असतो. युवक युवतींच्या प्रणयाला बहार आणणारा. त्यावेळची गीते आणि संगीत हे शृंगारिक असते. लगीन सराईचेही हेच दिवस.

दुसरा बिहू म्हणजे कंगाल बिहू. हा ऑक्टोबर म्हणजे कार्तिक महिन्यात असतो. यास कार्तिक बिहू असेही म्हणतात. हा दोनच दिवसांचा सण असतो. कारण या वेळेस शेतकरी, त्याच्या जवळचे सगळे पैसे शेतीसाठी गुंतवतो. त्यामुळे तो भविष्याच्या चिंतेत असतो. आणि कंगाल ही झालेला असतो.

तिसरा बिहू हा  भोगी बिहू म्हणून साजरा होतो. संक्रांतीनंतर हा सोहळा असतो. यावेळेस शेतकरी आनंदात असतो कारण पीक पाणी चांगले होऊन शेतकऱ्यांच्या खिशात पैसे खुळखुळत असतात. हा अठवडाभर साजरा केला जातो.

बिहू हे लोकनृत्य अतिशय देखणे. ठेकाबद्ध, तालमय आणि जोशपूर्ण आहे. त्यातील बांबू नृत्य हे फारच चलाखीने आणि चपळाईने केले जाते. टाइमिंग आणि एनर्जी याची कमाल वाटते. त्यांचा पोशाखही अतिशय आकर्षक आहे. पुरुष गुडघ्यापर्यंत धोतरासारखे वस्त्र घालतात. अंगात जॅकेट. डोक्यावर आसामी पद्धतीची टोपी. गळ्यात माळा वगैरे घालतात. स्त्रियांचे वस्त्र गुडघ्यापर्यंत आणि कमरेभोवती घट्ट असे नेसलेले असते लाल आणि पिवळसर रंगाची ही वस्त्रे असतात. डोक्यावर घट्ट आंबाडा आणि ऑर्किडच्या फुलांचा गजरा माळलेला असतो. गळ्यात हातातही फुलांच्या माळा असतात. या सर्व  नर्तिका अगदी वनराणी सारख्या दिसतात. चपळ आणि हसतमुख. खासी भाषेतील त्यांची गीतं, नीट लक्ष देऊन आपण ऐकली तर आपणास समजू शकतात. अर्थ आणि भाव कळतात. संगीत ही अशी भाषा आहे की मानवाच्या मनातले भाव ते सहज टिपतात. त्यासाठी बोली भाषेचा अडथळा होतच नाही. या लोकनृत्यासाठी वाजवली जाणारी वाद्य म्हणजे ढोल (ढोलकी )ताल (टाळ मंजिरी )टोपा, पिपा. ही सारी बांबूपासून बनवलेली तालवाद्य आहेत आणि त्यांचा एकत्रित मेळ एक जोशपूर्ण संगीताचा अनुभव देतो. एकीकडे हे नृत्य चालू होते आणि बाहेर निसर्गाचे तांडव नृत्य चालू होते. ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा एक ताल. सारेच संगीतमय झाले होते. आसामच्या या पावसाचा अनुभव फार आल्हाददायक होता.

गुवाहाटी आणि ब्रह्मपुत्रेचं विशाल दर्शन …तिसऱ्या भागात वाचूया )

धन्यवाद !!

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments