सौ राधिका भांडारकर

✈️ प्रवासवर्णन ✈️

☆ चला आसाम मेघालयाला… भाग -1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

कोव्हीड थोडा आटोक्यात आला.

गेली दोन वर्ष मनात या विषाणूने भयाचे घर केले होते.  आता थोडे मुक्त झाले आणि पर्यटन खुले झाल्यामुळे प्रवास प्रेमींनी  प्रवासाचे बेत आखण्यात सुरुवात केली.

देशाच्या उत्तर-पूर्व विभागातल्या आसाम मेघालय ला भेट देण्याचे आम्हीही ठरवले.  एका वेगळ्याच भौगोलिक आणि सांस्कृतिक राज्याची ही सफर खूपच अविस्मरणीय ठरली,  या सफरीची सुरुवात आसाममधील गुवाहाटी या व्यापारी शहराच्या, लोकप्रिय गोपीनाथ बॉर्दोलोई या आंतरराष्ट्रीय विमानतळापासून सुरुवात झाली.  आम्ही मुंबई छत्रपती शिवाजी विमानतळावरून इंडिगो फ्लाइट ६४३४ ने इथे आलो.  सोबत वीणा वर्लड ग्रुपचे आकाश व इतेश हे अतिशय उत्साही आणि या भागातले माहितगार असे सफर मार्गदर्शक आमच्या बरोबर होते.  आमचा २६ जणांचा समूह होता.

गुवाहाटी ते शिलॉंग हा आमच्या प्रवासाचा पहिला टप्पा होता. आमच्यासाठी विमानतळावर टॅक्सीज उभ्याच होत्या. मेघालय हे भारतातील उत्तर पूर्व राज्य असून शिलॉंग ही या राज्याची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे,  त्याच्या उत्तर व पूर्व भागात आसाम राज्य तर पश्चिमेस व दक्षिणेस बांगलादेश आहे.  १९७२ साली मेघालय राज्य आसाम पासून वेगळे झाले.

गुवाहाटी ते शिलाँग हा ड्राइव्ह अतिशय सुखद होता दुतर्फा उंच उंच पहाड, बांबूची बने, उंच उंच सुपारीच्या बागा, केळीच्या बागा, सुखद गारवा आणि डोंगरावर उतरलेले ढग असा सृष्टीचा नजारा अतिशय लोभस होता.  वाटेत उमीअम या मानव निर्मित विशाल तलावास  भेट दिली.  शीलाँग पासून हे ठिकाण साधारण १५ किलोमीटर अंतरावर आहे आणि पर्यटकांचे खास आकर्षण आहे. याचा विस्तार जवळजवळ २२० स्क्वेअर मीटर आहे  चहूबाजूला डोंगर, खासी वृक्ष, आणि तलावाचे अनोखे निळे पाणी तिथे आपल्याला खिळवून ठेवतात.  आमचे तसेच झाले. पउल निघतच नव्हते पण पुढे जायचे होते., .पूर्वी या तलावावर एक हायड्रो प्रोजेक्ट होता परंतु सध्या तो बंद आहे असे समजले,

एलिफन्टा फॉलस

या राज्यांचे  मेघालय हे नाव किती सार्थ आहे हे जाणवत होतं. उंच उंच डोंगर आणि त्यावर विहरणारे काळे मेघ हेच या राज्याचे वैशिष्ट्य!  हे सारे बघत असताना मनात येत होतं की आपल्या देशात किती विविधता आहे! सृष्टीची विविध रूपे पाहताना थक्कच व्हायला होते,  अंतराअंतरावर बदलणारी मानव संस्कृती पोशाख खाद्य,जीवन पद्धती ही खरोखरच अचंबित करते.

मेघालय मध्ये फिरताना जाणवले ते सृष्टीचे अनेक चमत्कार,  इथे अनेक नैसर्गिक गुहा आणि धबधबे पाहायला मिळतात.  वर्षा ऋतूचे अजून आगमन झाले नव्हते तरीही उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे डोळ्यांचे पारणे फेडतात.

एके ठिकाणी रबर प्लांटची मुळे वाढून एकमेकात अशा पद्धतीने गुंतली गेली आहेत की त्याचा एक मोठा पूल तयार झाला आहे, यास रूट ब्रिज असेच म्हणतात. एका नैसर्गिक ब्रीज वरुन चालताना सृष्टीच्या या दिव्य कामगिरीचा अचंबा वाटत होता. मात्र रुटब्रीजला प्रत्यक्ष पाहण्यासाठी काही अवघड चढउतार पार करावे लागतात.

१८९७ साली  मेघालयात प्रचंड भूकंप झाला होता. डोंगर कोसळले होते. इतस्ततः दगड दगड पसरले होते, ज्यावेळी ही विस्कळीत स्थिती पूर्ववत करण्यात येत होती त्यावेळी तिथे एक भलामोठा दगड एका छोट्या दगडावर व्यवस्थित स्वतःला तोलून स्थिर असलेला आढळला.  तो तसाच ठेवला गेला.  आजही तो तसाच आहे आणि आता हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे.  या दगडास बॅलन्सिंग रॉक असेच म्हणतात निसर्गाचे आणखी एक नवलच म्हणावे !!

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments