सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “बालदिन…” ☆ सुश्री शीला पतकी 

(१४ नोव्हेंबर…. बालदिन… या निमित्ताने – – )

आमची पिढी खूप निरागस होती, आज्ञाधारक होती, आई-वडील सांगतात मोठी माणसं सांगतात ते योग्य बरोबर !शिक्षकांबद्दल तर कमालीचा आदर, सर्वांना अगदी घरच्यांना आणि विद्यार्थ्यांनाही! मुलगा ऐकत नाही असे होत नव्हते. भरपूर खेळलोत, बिन खर्चाचे खेळलोत. खूप आनंद मिळवला. संध्याकाळचे डबे, असेल ते भरून बागेत गेलो सहभोजनाचा आनंद लुटला.. गच्चीवरच्या अंगती पंगती केल्या.. गोष्टी सांगितल्या गोष्टी ऐकल्या.. भरपूर दंगामस्ती केली.. पुस्तक वाचली… काही जणांनी थोडीशी बदमाशी पण केली पण ती बेताचीच.. !

आता पिढी बदलली आहे. न ऐकणं ही वृत्ती झाली आहे. पालकही आपल्याला मिळालं नाही ते त्यांना द्यायचं या वेडाने पछाडलेले आहेत.

…. मध्यंतरी एक प्रसंग घडला… मी माझ्या संस्थेच्या दारात रीक्षेची वाट पाहत उभी होते दोन ते अडीच वर्षाची एक मुलगी रस्त्याच्या मधून वेडी वाकडी कशीही चालत होती पळत होती मागे आई मावशी वगैरे चार-पाच बायका होत्या. रस्ता रहदारीचा, सायकल गाड्या येत होत्या. मी त्या मुलीलाही जरा ओरडले, तिला धरून ठेवलं. शेवटी तिच्या आईला थांबून घेतलं आणि सांगितलं “अहो ती मुलगी वाटेल तशी पळते तुम्ही सगळ्या गप्पा मारताय तुमचं लक्ष नाही…. त्यावर त्या बाई म्हणाल्या 

“काय करावं ऐकतच नाही “.. प्रत्येक पालकाचे हेच म्हणणे आहे… काय करावं ऐकत नाही…. सैराट चित्रपटात एक दृश्य दाखवल आहे आमदाराचा मुलगा प्राध्यापकांच्या तोंडात मारून वर्गातून बाहेर जातो प्राचार्य त्याबाबत बोलण्यासाठी घरी जातात त्या शिक्षकांची ओळख करून देतात त्यावर आमदार साहेब म्हणतात काय करावं आमच्या प्रिन्सला रागच आवरत नाही बघा एवढा वाक्यावर तो प्रसंग संपतो ही काय पद्धत आहे ना? शिक्षकाचे थोबाडीत मारायचं… ? ते उत्तम शिकवत आहेत आणि हा फोनवर बोलतोय…. हे शिक्षण सम्राटांच्या शाळा कॉलेजातले वास्तव आहे !आज एक घटना ऐकली वाघोलीच्या कुठल्यातरी शाळेतील एका वांड व्रात्य मुलाची…. विकृतपणे तो वर्गात त्रास देत होता तेव्हा शिक्षिकेने त्याचे तोंडात दिली त्याने व त्याच्या पालकांनी शाळेकडे तक्रार केली शाळेने अर्थात काहीतरी समजूत काढली असेल पण पालकांचे समाधान झाले नाही. त्यांनी एफ आयआर दाखल केला. बहुदा पोलिसांनी मध्यस्थी केली. त्यावर पालक म्हणाले “एका गोष्टीवर मी माफ करेन.. माझा मुलगा त्या बाईंच्या थोबाडीत मारेल” काय ही मानसिकता हाच मुलगा पुढे जेव्हा त्यांच्या थोबाडीत मारेल तेव्हा या गोष्टीची जाणीव त्यांना होईल.

 हल्ली गेट-टुगेदर होतात तेव्हा मुल सांगतात, ” बाई आम्हाला पूर्वीसारखे एक एक छडी मारा ना”… अरे त्या छडी मध्ये प्रेम होत प्रेम तू सुधारावा म्हणून केलेली ती धडपड होती. लोकांच्या लेकरांना मारायची हौस नसते शिक्षकाला… परवाच मी एका लेखात लिहिलं होतं ते एका माणसाने आठवण सांगितली होती मी खूप खोडकर होतो अभ्यास करत नव्हतो पण बाईने मला मारून तयार करून घेतलं आणि त्यांच्या अंतिम काळी मला जवळ बोलून म्हणाल्या मी तुला खूप मारलं रे मला क्षमा कर विद्यार्थी सुधारावा म्हणून मारलेली छडी किंवा केलेली शिक्षा ही शिक्षकाच्या काळजाला लागलेली असते हे कोणाला जाणवत नाही.

बालदिनी पालकांनी खरोखर आपण उत्तम पालक आहोत का याच एकदा परीक्षण कराव तुमचं मुल तुमचा जीव आहे याची जाणीव आम्हाला असते ते उत्तम व्हावे चांगलं नागरिक व्हावं यासाठी सजगपणे प्रयत्न करावे लागतात नको ते छाटावं लागतं चांगलं ते वाढू द्यावं लागतं ते बालक निरागस असतं त्याला कळत नाही दंगा धोपा खोड्या या त्याच्या सहज प्रवृत्ती असतात पण त्याला योग्य वळण देणं हे आपल्या सगळ्यांचेच काम आहे पूर्वी समाजातले लोक सुद्धा एखाद्या मुलाचं वर्तन चुकीचं असेल तर त्याला सांगत असत.

एकदा सिविल हॉस्पिटल च्या बाजूने तीन मुलं एका मोटरसायकलवर बसून रस्त्यावरच्या माणसांची टवाळी करत ओरडत चालली होती गाडीला प्रचंड स्पीड होता आणि कोर्टासमोर त्यांची गाडी स्लिप झाली अपघात झाला रस्त्यावरून जाणाऱ्या ज्या लोकांची तेथे टवाळी करत होते त्याच लोकांनी त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले. हे कसले वागणे? याच्या समर्थन होऊ शकत नाही. अकरावी पास झालेल्या मुलाला वडिलांनी मोठ्या हौसेने बुलेट घेऊन दिली मित्रांसमवेत हिंडायला गेला अपघात झाला आणि जागीच खलास बापाने मृत्यू भेट दिला असं झालं …

…. कोणत्या वयात मुलाला काय द्यावं ते वापरायला तो जबाबदार आहे का कशाचाच विचार नाही एक समाज असा आहे की तो आपल्या मुलांबाबत प्रचंड सतर्क आहे आणि दुसरा बेदरकार… त्यांना प्रचंड काम आहे आणि पैसा कमवायचा आहे त्यामुळे वेळ नाही…. खालच्या माणसाला पैसा मिळवल्याशिवाय गत्यंतर नाही त्यामुळे त्याला वेळ नाही …

…. पण गंमत म्हणजे सगळ्यांची स्वप्न मुलं आहेत… प्रत्येकाला वाटतं आपलं मूल काहीतरी वेगळं व्हावं पण त्या दिशेने जाणार पालकत्व मात्र दिसत नाही….. !असो

विषय खूप मोठा आहे लिहावं तेवढं कमी आहे लिहण्यापेक्षा काहीतरी कृती करावी असं वाटतं त्या निरागस सर्व बालकांना आजच्या बालक दिनानिमित्त अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा!!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments