श्री जगदीश काबरे
विविधा
☆ “माणसाचे माणूसपण…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
मनुष्य हा जिवंत प्राणी असला, तरी केवळ जैविक प्रक्रिया आणि प्रेरणांनी चालणारे यंत्र नाही. भूक लागली की अन्न घेणे, तहान लागली की पाणी पिणे, किंवा लैंगिक प्रेरणेने प्रेमसंबंध निर्माण करणे हे सर्व नैसर्गिक आहे, पण या कृतींमध्ये केवळ शारीरिक क्रिया असेल तर त्यात ‘मानवता’ नसते. आपण या कृती करतो, पण एकवेळ अशी येते की आपल्या मनात “का?” हा प्रश्न उभा राहतो. आपण का जगतो, का खातो, का पितो, का प्रेम करतो, का द्वेष करतो, हे प्रश्नच आपल्या माणूसपणाची सुरूवात असते. यंत्राला “का?” विचारता येत नाही; ते फक्त ‘कार्य’ करते. पण मानव विचार करतो. विचारच त्याला जैविकतेच्या पलीकडे घेऊन जातो. ‘का?’ हा प्रश्न म्हणजे सज्ञानतेचा प्रारंभ. एकदा हा प्रश्न पडला की सर्व अनुभवांवर एक नवा प्रकाश पडतो. भूक लागली म्हणून खाणे आणि पोषणासाठी खाणे यात फरक जाणवतो. प्रेम हे केवळ शारीरिक नसून भावनिक आणि बौद्धिकही आहे, हे कळते. प्राण्यात दोन लिंग का आहेत? हा प्रश्न जेव्हा पडतो, तेव्हा जैविक रचनेपलीकडे जाऊन प्रजोत्पादन, समाजरचना, आणि लैंगिकतेच्या नैतिक-मानसिक अर्थाचा शोध सुरू होतो. अशा वेळी आपण यंत्र नसतो, तर चेतन प्राणी बनतो.
मानवाचा विकास हा या ‘का?’ च्या शोधातच झाला आहे. आदिमानवाने आकाशातील वीज, पाऊस, आग, तारे, मृत्यू, जन्म या सगळ्यांविषयी स्वतःशीच का आणि कसे, असे प्रश्न विचारले आणि त्यातून वैज्ञानिक पद्धत जन्माला आली. विज्ञान म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत. धर्म, परंपरा, आणि समाजरचना अनेकदा उत्तरं देतात, पण तिथे प्रश्न विचारायला, शंका घ्यायला, चिकित्सा करायला वाव नसतोच. त्या उलट विज्ञान प्रश्न विचारतं, शंका घेतं चिकित्सा करतं. कारण का? विचारण्यातच प्रगती आहे. आपण जेव्हा भौतिकतेच्या पलीकडे विचार करतो, तेव्हा आपल्याला मानवतेची खरी किल्ली सापडते. विज्ञान आपल्याला मानवतेकडे नेणारा मार्ग आहे. ते केवळ यंत्रे निर्माण करत नाही, तर आपल्या विचारांना सज्ञान बनवतं. विज्ञानामुळे आपण शरीर, मन आणि निसर्ग यांच्या परस्परसंबंधाचा अर्थ शोधतो. यंत्र म्हणून शरीराचं महत्त्व नाकारायचं नाही; शरीर म्हणजे आपल्या अनुभवांचं माध्यम आहे. पण शरीराच्या मर्यादेपलीकडे जाणारा विचार म्हणजेच माणूसपण. शरीराला भूक लागते, पण मेंदूला अर्थाची भूक असते. शरीर तहानेने पाणी मागतं, पण मन म्हणजे मेंदू ज्ञानाची तहान बाळगतं. शरीर लैंगिकतेने प्रेम व्यक्त करतं, पण विचारांच्या उंचीवर ते सर्जनशीलतेत आणि करुणेत रुपांतरित होतं.
यंत्राला आदेश दिले की ते चालतं; पण माणूस विचार करून स्वतःचे आदेश घडवतो आणि इतराने दिलेले आदेश पाळायचे की नाही हे तारतम्याने ठरवतो. हीच त्याची ओळख आहे. जर आपण विचार थांबवले, प्रश्न विचारणे थांबवले, तर आपण पुन्हा यंत्र होतो — समाज, धर्म, बाजार किंवा राजकारण यांच्या नियंत्रणाखाली चालणारे यंत्र. पण ‘का?’ विचारणारा माणूस मुक्त असतो. तो कोणत्याही धर्माचा अंधानुयायी राहत नाही, कोणत्याही जात-लिंग-धर्माविषयी द्वेष बाळगत नाही, कारण त्याला समजतं की द्वेषाचं मूळ अज्ञानात आहे. मला परधर्मीयांचा राग का येतो? असा प्रश्न पडतो, तेव्हा आपण आपल्यातील भीती, संस्कार, आणि इतिहासाकडे पाहू लागतो. त्या प्रक्रियेतून जेव्हा आपण बाहेर पडतो तेव्हा आपला मानवतेकडे प्रवास सुरू होतो. म्हणूनच ‘का?’ हा प्रश्न म्हणजेच आत्मजागृती. तो प्रश्न आपल्याला स्वार्थातून परमार्थाकडे, अंधश्रद्धेतून विवेकाकडे, आणि यंत्रमानवतेतून खऱ्या मानवतेकडे नेतो. विज्ञान म्हणजे या प्रवासाची दिशा दाखवणारा दीपस्तंभ आहे. विज्ञान सांगतं की निसर्गात घडणाऱ्या सर्व गोष्टींच्या मागे काही कारण असतं, प्रत्येक क्रियेला परिणाम असतो, आणि सर्व विश्व एकमेकांशी जोडलेलं आहे. म्हणूनच विज्ञान आपल्याला अंधानुकरणापासून वाचवतं, आणि प्रश्न विचारायला शिकवतं.
मानवाचा उत्क्रांती प्रवास हा फक्त शरीराच्याच नव्हे तर विचारांच्याही उत्क्रांतीचा प्रवास आहे. एकेकाळी आपण फक्त अन्नासाठी जगत होतो, पण आज आपण अर्थासाठी जगतो. या प्रवासात ‘का?’ हा प्रश्नच आपल्याला जगण्याची चालना देतो. शरीर मर्यादित आहे, पण विचार अमर्याद आहेत. शरीर मरण पावते, पण विचार जिवंत राहतात. म्हणूनच विचारविश्वात रममाण होण्यात खरी मजा आहे. तिथे आनंद भौतिक सुखांपेक्षा गहिरा असतो, कारण तो ज्ञानातून, सत्याच्या शोधातून मिळतो. विज्ञानसाक्षरता म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील प्रयोग नव्हे, तर जीवनाकडे विवेकाने पाहण्याची वृत्ती. ‘का?’ विचारणं म्हणजेच विज्ञानसाक्षरतेचा पाया आहे. प्रत्येक प्रश्न आपल्याला नव्या उत्तराकडे, नव्या शोधाकडे घेऊन जातो. आणि या नव्या शोधातून पुन्हा नवे प्रश्न निर्माण होतात आणि पुन्हा नव्या शोधाचा शोध आपण घेऊ लागतो. अशाप्रकारे सततच्या शोधक वृत्तीमुळे आपण यंत्रापेक्षा श्रेष्ठ ठरतो. कारण आपण फक्त जगत नाही, तर जगण्याचा अर्थ शोधतो असतो. माणूस म्हणून आपली खरी ओळख विचार करणारा प्राणी अशीच आहे. आपण खाणं, पिणं, प्रजनन करणं या क्रिया केवळ शरीर सुखासाठी करतो; पण विचार करणे, जाण येणे, प्रश्न विचारणे, हे मानव प्रजातीच्या उन्नतीसाठी करतो. शरीर जगण्यासाठी आहे, पण विचार हे जीवनाचं कारण आहेत. म्हणूनच ‘का?’ हा प्रश्न पडणं म्हणजे प्राण्यापासून मानवाकडे मारलेली उंच उडी आहे. विज्ञान हा त्या उडीचा धागा आहे; जो आपल्याला ज्ञान, करुणा, आणि मानवतेकडे नेतो. शरीर, यंत्र, जग ही सर्व साधनं आहेत; पण विचार हेच अंतिम साध्य आहे. त्या विचारविश्वात रममाण झाल्यावरच आपण खऱ्या अर्थाने ‘माणूस’ होतो.
थोडक्यात, माणसाचं शरीर जैविक यंत्र आहे. भूक लागली की खातो, तहान लागली की पाणी पितो, लैंगिक प्रेरणा आली प्रेम करतो. सगळं आयुष्य असेच गेलं तरी आपल्याला काही चुकीचे वाटत नाही. पण जर तुम्हाला ‘का?’ हा प्रश्न पडत असेल तर हे सर्व काही काळाने मिळमिळीत वाटायला लागते. आपण का खातो, का पितो, आपल्याला लैंगिक भूक का लागते? हे प्रश्न पडले तर आपण प्राणी राहात नाही; आपण माणूस होतो. तसेच परधर्मीय, पारलिंगी माणसांविषयी आपल्याला राग का? येतो हे कळल्यावर आपण माणूस होतो. कारण ‘का?’ हा प्रश्न पडल्यावर आपण प्राण्यापलीकडे जातो. माणसाला माणूसपण देणारा वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपल्याला मानवतेची किल्ली उघडून देणारा मंत्र आहे. प्राणी वाईट नाहीत, शारीरिक भूक भागवणे वाईट नाही; पण विज्ञानामुळे सज्ञान झाल्यावर, विज्ञानसाक्षर झाल्यावर प्राणी अवस्थेपलीकडे, शारीरिक भुकांच्या पलीकडे जात विचारविश्वात रममाण होण्यातच खरी मजा आहे… खरे माणूसपण आहे.
© श्री जगदीश काबरे
(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)
jetjagdish@gmail. com
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

















