डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ नाती गुंतागुंतीची… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

प्राचीला आज केतन बरोबर पार्टीला जायचं होतं. खरंतर प्राची या असल्या पार्ट्यांना अगदी कंटाळून गेली होती. पण तिचा इलाजच नव्हता. केतन आर्मीत असल्याने तिला हे सगळं आता अंगवळणी पडलं होतं. आवड नसूनही तिला जावं लागायचं.. नाईलाजास्तव.

खरं तर ती एक उत्तम शिक्षिका. पीएचडी करून दिल्लीत नामांकित कॉलेजमध्ये ती प्रोफेसर होती.

केतनच्या होणाऱ्या बदल्या, मुलांच्या शाळा यामुळे प्राचीला इतकी वर्षं कायम एका ठिकाणीच नोकरी करता आलीच नव्हती. पण आता मात्र केतनने दिल्लीतच शेवटचं पोस्टिंग मागून घेतलं आणि त्यामुळे आता प्राची या कॉलेजमध्ये छान जॉब करत होती. दोन्ही मुलं मोठी झाली होती… परदेशात सेटल झाली होती. प्राचीचं लग्न खूप लवकर झालं होतं आणि मुलंही पाठोपाठ झाली होती. त्यामुळे आता प्राची पन्नाशीतच सुटवंग झाली होती..

मे आणि दिवाळीच्या सुट्टीत कॉलेजला सुट्टी मिळाली की प्राची मुलांकडे जाऊन येई. सुना मुलंही खूष होत आईबाबा आले की.

… चार दिवसांपूर्वी अचानकच प्राचीला अनुजाचा फोन आला.

“ प्राची, अगं मी अनुजा बोलतेय. मी दिल्लीत आलेय. येऊ का तुला भेटायला? क्षमाकाकूंनी तुझा नंबर दिलाय आणि तुला द्यायला खाऊसुद्धा दिलाय. कधी येऊ मी ? आणि फक्त एकच आठवडा आहे बरं का दिल्लीत.. मग पुण्याला परत जाणार आहे. ”

इतक्या दिवसांनी अनुजाशी बोलून प्राचीला खूप आनंद झाला.. ती भेटणार याचा आनंद तर काय वर्णावा.

… तिचं मन एकदम खूप वर्ष मागे गेलं आणि पोहोचलं ते पार नातू वाड्यात.

– – – त्या वाड्यातली ती गुण्या गोविंदाने राहणारी बिऱ्हाडं, मधलं मोठं अंगण. खेळायला भरपूर जागा.

नातू काकूकाका फार छान होते. सगळ्या मुलांना त्यांचा धाकही होता आणि आदरही होता. त्याच वाड्यात प्राची आणि अनुजाचं बिऱ्हाड अगदी शेजारी शेजारी होतं.

… किती घट्ट मैत्रिणी होत्या त्या दोघी. त्यांना इतर मैत्रिणी लागायच्याच नाहीत खरं तर.. चोवीस तास दोघी एकत्र… शाळेत जाता-येता एकत्र, डबा खायलाही एकत्रच.

अनुजाची आई म्हणायची, ” मला मुलगा असता तर सून करून घेतली असती हो प्राचीला. ज्याच्या नशिबात ही असेल तो बेटा खरंच भाग्यवान. ” 

अनुजा भाट्यांची एकुलती एक मुलगी. प्राचीचे वडील जरा चांगल्या हुद्द्यावर होते. सहसा फारसे कोणात मिसळत नसत ते.

… त्या दिवशी अचानक ते एका तेरा चौदा वर्षाच्या मुलीला घरी घेऊन आले. आईने विचारलं, “ अहो. ही कोण?” 

उद्वेगानेच प्राचीचे बाबा म्हणाले, “ सांगतो गं बाई.. त्याचसाठी माझ्या आईचा फोन नव्हता का आला मागच्या आठवड्यात ? ऐक.. ही रजनी. आईने आम्हाला कधीच काहीच सांगितलं नाही.. पण ही आमच्या बाबांची मुलगी आहे. आम्हाला हे काहीच माहीत नव्हतं.. अधूनमधून आई-बाबांची धुसपूस ऐकायला यायची, पण आम्ही लहानच होतो तेव्हा. ”..

“ ऐक.. बाबांचे एका गोव्याकडच्या बाईशी संबंध होते. आणि त्यांनी ते कधीच नाकारले नाहीत. त्या बाईंची ही मुलगी… म्हणजे माझी सावत्र बहीणच झाली… त्या बाईंना कॅन्सर झाल्याचं निदान झालं. बाबांना त्यांनी लगेच काही सांगितलं नाही. पण दुखणं सीरियस झाल्यावर त्यांनी बाबांना बोलावून घेतलं आणि त्यांच्या कडून रजनीला संभाळण्याचं वचन घेतलं. रजनी आता तेरा वर्षाची आहे. आपल्या प्राचीहून सात आठ वर्षांनीच मोठी. काही दिवसांनी माझे बाबा गेले आणि आता रजनीची आई पण गेली.

मग माझी आई गोव्याला जाऊन रजनीला घेऊन आली. कमाल आहे आमच्या आईची पण – – आणि आता माझी आईच आजारी आहे म्हटल्यावर मी हिला आपल्या घरी घेऊन आलोय. माझी ऐपत नाही हिला कुठे हॉस्टेलवर वगैरे ठेवायची. आता तू सगळ्याना असंच सांग की ही तुझी लांबची भाची आहे म्हणून. ” 

अर्थातच प्राचीच्या आईला हे अजिबात आवडलं नाही. पण रजनीला घरात घ्यावंच लागलं. रजनी बिचारी कानकोंडी झाली. दिसायला सुरेख होती. गाणी तर इतकी सुंदर म्हणायची… तिला कॉर्पोरेशनच्या शाळेत घातलं. ‘ रजनीला ताई म्हणायचं’ असं सांगितलं प्राचीला तिच्या आईनं. वाड्यात सगळ्याना सांगितलं,

”अहो माझ्या कोकणात रहाणाऱ्या लांबच्या बहिणीची मुलगी हो ही. माझी भाची. बिचारीचे आईवडील गेले म्हणून आली आमच्या घरी. बिचारी अनाथ पोर आता राहील आमच्या प्राचीबरोबर. ”.. आईने प्रकरणावर पांघरुण घातलं.

रजनी अभ्यासात यथातथाच होती. कशीबशी पास व्हायची. तिला गोव्याची आठवण यायची. कितीतरी वेळा मागच्या पायरीवर एकटीच बसून रडत असायची रजनी.

.. आईला ती कधीच आवडली नाही. रजनीला तिने खायला प्यायला, कपड्यालत्त्याला कमी केलं नाही. पण ते तितकंच..

रजनी घरात निमूट वावरायची. तशीही ती लहानच होती. आपण या घरात आश्रित आहोत ही भावना कायम असायची तिच्या मनात. केवढा उरक होता तिला कामाचा. न बोलता कितीतरी काम उरकून टाकायची ती.

तिचा आवाज अतिशय सुंदर होता. तिला बाबांनी हौसेने गाण्याच्या क्लासला घातलं. प्राचीला मात्र अजिबात आवाज नव्हता आणि आवड तर त्याहून नव्हती. पण रजनी हौसेने गाणं शिकायची. मग आई धुसपूस करायची… ” हो. वळणाचं पाणी वळणालाच जाणार. कमाल झाली हो आमच्या सासऱ्यांची. बरी सुचली ही थेरं. स्वतः गेले मरून आणि आमच्या बोकांडी हे पाप बसवलं… “

आई स्वतःशी बडबड करायची. पण प्राचीच्या बाबांसमोर हिम्मत नव्हती त्यांची बोलायची.

प्राचीला मात्र ही रजनीताई फार आवडायची.. ती विचारायची सुद्धा आईला..

“ का ग आई तू तिच्याशी अशी वागतेस?तिला आई नाही म्हणून अशी वागतेस हो? बिचारी माझी रजनीताई. ” रजनीचे डोळे भरून यायचे. प्राचीला जवळ घेऊन ती आपले डोळे पुसायची.

रजनी दहावी पास झाली. “ मला कॉलेजला नाही जायचं. मला गाणंच शिकायचं आहे पुढे. “ तिने प्राचीच्या बाबांना सांगितलं. निमूटपणे बाबांनी तिला क्लास लावला. स्वतः जाऊन चौकशी करून आले. आणि रजनी गाणं शिकू लागली.

“ आता रजनीच्या लग्नाचं बघा म्हटलं.. पुरे झाली गाणी बजावणी. ” आई चिडून म्हणायची.. “ बघा एखादा गरीब होतकरू मुलगा. आपण देऊ लग्न करून. ”

एक दिवस अचानक रजनी क्लासहून घरी आलीच नाही. प्राची जाऊन बघून आली तर क्लासला कुलूप होतं. सगळीकडे शोधलं पण रजनी कोणालाच दिसली नाही.

– – एक पैसा न घेता रजनी घर सोडून निघून गेली.

आज आठ दहा वर्षे घरी राहिलेली मुलगी न सांगता निघून जाते याचं फार वाईट वाटलं तिच्या आईबाबांना.. त्याहून जास्त अपमान वाटला होता खरंतर 

“ जाऊ दे. आपल्याच हाताला यश नाही “ असं म्हणत ते दोघे गप्प बसले.

– – या गोष्टीला आता अनेक वर्षे झाली होती. सुरुवातीला वाड्यातले लोक बोलबोल बोलले आणि मग गप्प बसले. रजनीला सगळं जग विसरून गेलं.

यथावकाश प्राचीचं अनुजाच्या चुलत भावाशी लग्न झालं. अगदी घरच्यांच्या पसंतीने, मागणी घालून.

केतन आर्मीमध्ये होता आणि एकदम पसंत पडण्यासारखाच होता. प्राचीला तर आवडलाच होता तो. तिच्या आईवडिलांनी हौसेने तिचं लग्न करून दिलं.

.. प्राची सासरी निघाली तेव्हा आईच्या डोळ्यातलं पाणी खळत नव्हतं. आणि का कोण जाणे पण आज इतक्या वर्षांनंतर तिला रजनीच्या आठवणीनेही गहिवरून येत होतं.

डोळे पुसत ती म्हणाली होती, “ कुठे असेल रजनी? वनवासी पोर हो ते. सुखी असो कुठेही असेल तिथे. ” पोटात माया होतीच त्यांच्या तिच्याबद्दल. अखेर म्हणालीच होती आई की ‘ दिलं असतं की हो नीट लग्न करून रजनीचं. पळून कशाला जायचं म्हणते मी. सुखात राहो बापडी ‘. बाबांच्या आईने रजनीच्या नावचे थोडे दागिने बाजूला ठेवले होते ते बाबांना दिले तिने.. आली कधी तर देऊया असं ठरवलं होतं त्यांनी.

न राहावून आई बाबांना म्हणाली होती.. ‘ मुलगी चांगलीच होती हो. पण तो माझ्या सासऱ्यांचा, तुमच्या वडिलांचा इतिहास आठवला की माझं डोकंच सटकायचं. पण तिचा काय दोष होता त्यात?”

ही गोष्ट अजून प्राचीला माहीत नव्हती. रजनी आपली लांबची बहीणच आहे असंच समजत होती ती.

पुढे प्राचीच्या बाळंतपणासाठी आई तिच्याकडे गेली. केतनचं पोस्टिंग होतं पार लांब साऊथ मध्ये. आपण नसलो तर केतनचे जेवणाचे हाल होतील म्हणून प्राचीने आईलाच तिकडे बोलावून घेतलं.

मायलेकी नेहमी रजनीची आठवण काढायच्या. शेवटी एक दिवस आई तिला म्हणाली, “ प्राची. आता सांगते तुला सगळं. बहीण कसली ग ती तुझी?आत्या लागते ती तुझी… सावत्र आत्या… तुझ्या आजोबांची ठेवलेल्या बाईची मुलगी. आणि आता तू समजू शकतेस की काय वाटलं असेल आम्हाला हे लपवून ठेवताना आणि तिला आपल्या घरात आणताना? मला समजायचं ग की तिचा काहीच गुन्हा नाहीये यात. पण माझं डोकं फिरायचं तिला बघून. पण आता मात्र खरंच तिच्याबद्दल वाईट वाटतं ग प्राची. मी तिला काही कमी नाही केलं, पण मायाही नाही केली कधी. असेल तिथं सुखात राहो बिचारी ”. खऱ्या कळवळ्याने आई म्हणाली.

– प्राची हे ऐकून स्तंभितच झाली. “ तरी आई, तुझं चुकलंच. म्हणूनच ती घर सोडून गेली असेल. ” प्राची म्हणाली.

प्राचीला गोड गोंडस मुलगा झाला. आई तीन महिने राहिली होती तिच्याकडे.

पुन्हा दुसऱ्या बाळंतपणाला मात्र प्राची आईकडे पुण्यात आली. कारण तेव्हा केतनचं पोस्टिंग खूपच लांबच्या आणि अवघड ठिकाणी होते.

दुसराही मुलगाच झाला प्राचीला.

काळाची पानं भराभरा उलटत गेली. प्राचीचे मुलगे मोठे झाले. खूप शिकून परदेशी निघून गेले. प्राचीचेआईबाबाही थकले. अनेकवेळा दिल्लीला लेकीकडे येऊन राहू लागले.

… आत्ता अनुजाचा फोन आल्यावर हा सगळा चित्रपट प्राचीच्या डोळ्यासमोरून झरझर सरकून गेला.

“अनुजा, ये उद्या जेवायलाच. भावाच्या घरी आमंत्रण लागतं हो ग? ये बघू रहायलाच. ”

प्रेमाने अनुजाला दटावत प्राची म्हणाली.

क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments