मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “दयासागर” – भाग – ३ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ “दयासागर” – भाग – ३ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

(विवेकने विषय काढताच तो म्हणाला,

“माय डियर जंटलमन, वी हॅव नॉट सीन मिस्टर जॉन फॉर लास्ट वन मंथ”.

“काय? कामावर आला नाही तो?”

“नाही ना, त्याची काही खबर ही नाही. तुला काय वाटतं?”

“मला वाटतं तो काम पूर्ण करण्यात गढून गेला असावा. गेल्या दोन महिन्यात मी त्याला बरेच पैसे पाठवलेत. त्यामुळे त्याला पैशाची अडचण भासणार नाही. सगळं काम पूर्ण करूनच कामावर यायचा त्याचा बेत असेल.”

“मला वाटतं तो काम पूर्ण करण्यात गढून गेला असावा. गेल्या दोन महिन्यात मी त्याला बरेच पैसे पाठवलेत. त्यामुळे त्याला पैशाची अडचण भासणार नाही. सगळं काम पूर्ण करूनच कामावर यायचा त्याचा बेत असेल.”

“मला नाही वाटत तसं. तू एकदा त्याच्या गावात जाऊन आला आहेस ना? एकदा जाऊन तर पहा”

“मलाही उत्सुकता आहेच. उद्याच जातो. तुही आलास तर बरे होईल.”

“ओ. के. , मलाही बरेच दिवस चेंज मिळालेला नाही. आपण दोघेही जाऊ”) 

इथून पुढे – – 

दुसरे दिवशी दोघेही जॉनच्या गावात येऊन पोहोचले. घर माहित असल्यामुळे शोधायला फार वेळ लागला नाही. पण घराला भले मोठे कुलूप पाहून थोडा वेळ वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तोपर्यंत दोघेही आजूबाजूला भटकून आले. त्याच्या घराला लागून असलेली जमीन पाहिली. ती तशीच होती. सारं काही पूर्वीसारखंच होतं. कुठेही बांधकामाच्या खुणा दिसत नव्हत्या. अय्यर काय समजायचं ते समजला.

” विवेक, कुठे आहे तुमचे प्रार्थना मंदिर? हीच ना ती जागा? “

“होय अय्यर, हेच त्याचं घर. त्याची जमीन. पण मला तर इथं नवीन काहीच दिसत नाही “

“आणि दिसणारही नाही. “

“म्हणजे? “

“विवेक, जॉनने तुला फसवलंय? तुला लुबाडलय. तुझे पैसे घेऊन तो पसार झालाय. मी तुला सुरुवातीलाच सावध करत होतो. पण तू ऐकले नाहीस. “

“नाही अय्यर, माझा अजूनही विश्वास बसत नाही. त्यानं बांधकाम केलेलं नाही हे दिसतच आहे. पण कदाचित दुसरीकडे काम केलं असेल. त्याची अनेक पत्रं मला आलेली आहेत. “

“खुळा आहेस. समोर पाहतोयस ना सगळं? तू बुडालायस हजारो रुपयांना. तरीही तुझा त्याच्या प्रामाणिकपणावर विश्वास आहे? अरे माणसाचं मन हे इथून तिथून सगळीकडे सारखंच असतं. त्याचा प्रामाणिकपणा किंवा अप्रमाणिकपणा स्थलकालाच्या मर्यादा सांभाळीत बसत नाही. आता पुढे काय करायचं ते ठरव. “

घराच्या पायरीवर बसून गप्पा चाललेल्या असतानाच एक वृद्ध गृहस्थ त्यांचे जवळ आले.

“आर यू इंडियन डॉक्टर्स? “

“यस सर “

“हू इज मिस्टर साने? “

विवेकने आपली व अय्यरची ओळख करून दिली. त्या वृद्ध गृहस्थाने ही आपले नाव सांगितले. तो जॉनचा शेजारी होता. तो पुढे बोलू लागला,

“मिस्टर साने, आय ॲम व्हेरी सॉरी टू टेल यू मि. जॉन इज ॲबस्कॉंडेड. मला सार माहित आहे डॉक्टर. एके दिवशी दारूच्या नशेत जॉननेच मला सारं सांगितलं आहे. त्याचा प्लॅन सांगितला. तुमच्याकडून पैसे कसे मिळत आहेत हे सांगितलं. त्याचा प्लॅन म्हणजे एक नाटक होतं. तो एक भंपक माणूस आहे. त्याने काही केलेलं नाही आणि त्याला काही करायचंही नाही. त्यानं तुम्हाला हजारो रुपयांना लुबाडले. तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतलाय. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. पण तो तुमचे सगळे पैसे घेऊन गायब झालाय तुम्ही त्याला सोडू नका. त्यांन आमची, आमच्या गावाची अब्रू घालवली आहे. तुम्ही इतक्या दुरून आलात. तुमच्यासारख्या सेवा करणाऱ्या माणसाला त्याने फसवावं याच्याइतकं वाईट दुसरं काही असूच शकत नाही. तुम्हाला काही सांगावं तर तुम्ही इंडियाला गेल्याच त्याच्याकडून समजलं. त्यामुळे सगळं माहित असूनही आम्ही काही करू शकत नव्हतो. पण आता आम्ही. तुम्हाला सगळी मदत करू. कृपा करून आमच्यावर विश्वास ठेवा. तुमचे पैसे तुम्हाला मिळालेच पाहिजेत. त्याला शिक्षाही झाली पाहिजे.”

म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून दोघेही चक्रावून गेले. आपण काय ऐकतो आहोत तेच विवेकला समजेना. अय्यरने त्याला धीर दिला.

“विवेक, हे म्हणताहेत ते बरोबर आहे. आपण जॉनचा शोध घेऊ. पोलिसात तक्रार नोंदवू. असं गप्प बसून चालणार नाही. उठ.”

विवेकने क्षणभर अय्यरकडे पाहिले. तो थांबला. पण त्याच्या चेहऱ्यावर निराशा दिसत नव्हती. मनाशी काहीतरी ठरवल्याप्रमाणे तो बोलू लागला, “नाही अय्यर, थांब. अशी घाई करून चालणार नाही. थोडा धीर धर. थोडा विचार कर. मी माझं सर्वस्व जॉनला दिल. कशासाठी? एक प्रार्थना मंदिर बांधण्यासाठी. इतक्या दूरवर भगवान कृष्णाचं मंदिर होतंय. त्याला आपण मदत करावी असं वाटणं यात काहीच चूक नाही. जो माणूस आपल्याशी चांगलं वागला त्याच्याशी विश्वासाने वागणं यातही काही चुकतंय असं मला वाटत नाही. आता आपण तक्रार करून त्याचा शोध घेऊन त्याच्याकडून पैसे वसूल करू शकू असं वाटतंय तुला? सहज शक्य होईल ते? “

” मग काय त्याला असंच सोडून द्यायचं? तुझ्या पैशांपैकी काही रक्कम तरी तुला परत मिळेल की नाही? “

“कदाचित मिळेल ही. पण पैसे परत मिळवल्याने काय काय मिळवता येईल? आत्ताची आमची मैत्री, परस्परावरचा विश्वास परत मिळवता येईल? “

“त्यानं कुठं तुझी कदर केलीय? तुझा विचार तरी काय आहे? “

“थोडे दिवस थांबायचं. काहीच करायचं नाही. आपण इथे येऊन गेलो हे त्याला नक्की समजेल. आपण त्याच्यावर लक्ष ठेवू शकत नसलो तरी त्याचं आपल्यावर नक्कीच लक्ष असणार आहे. त्याला समजू दे की आपल्याला सारं माहित आहे आणि तरीही आपण शांत आहोत. “

“त्यामुळे काय होईल? “

“त्यामुळेच तर सारा होईल. एक ना एक दिवस त्याला आपली चूक कळून चुकेल. तो आपण होऊन आपल्याकडे येईल, पश्चात्तापाने होरपळत आणि

पश्चात्तापासारखी दुसरी शिक्षा असू शकत नाही. “

“हे सार घडेल असं आजही वाटत तुला? आजच्या युगात? “

“का नाही घडणार? आपल्या तत्त्वावर असलेली आपली श्रद्धा एका मामुली माणसासाठी किंवा काही रुपयांसाठी ढासळू द्यायची का हा खरा प्रश्न आहे. मला पूर्ण खात्री आहे. अय्यर, असच घडेल. मी इथं प्रार्थना मंदिर बांधायला मदत करणार होतो ते काही दगडविटांची सुंदर इमारत निर्माण व्हावी म्हणून नाही. तर आपल्या संस्कृतीचं, धर्माचं तत्त्वज्ञान प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून. मग तूच सांग, काय शिकवले आपल्या धर्मानं, संस्कृतीने? संत महंतांनी काय सांगितल आहे? चुकलेल्यांना वाट दाखवण्यासाठी त्यांना सुधारण्याची संधी आपण द्यायला नको का? हेच तर आपल्या संस्कृतीचं तत्त्वज्ञान आहे. ते विसरून नुसती देऊळ बांधत सुटलं तर काय उपयोग? “

“धन्य आहे बाबा तुझी! आपल्याला काही हे जमलं नसतं. मला तर वाटतंय आता तू इथे असताना वेगळं मंदिर बांधण्याची आवश्यकताच नाही. एवढ्या शांतपणे विचार करणारा दयाबुद्धी असणारा तू असताना देवाच्या मूर्तीची आवश्यकता तरी काय? “

म्हातारा सारं लक्ष देऊन ऐकत होता. त्याचे डोळे पाणवले. काय बोलावं, कसं बोलावं त्याला समजेना. न राहून तो म्हणाला, ” मिस्टर साने यू आर रियली ग्रेट! मला आत्ता आठवण होते ती प्रभू येशूच्या त्या शब्दांची! त्या प्रभू पुत्राला क्रुसावर चढवले तरीही त्याने दयाबुद्धी सोडली नव्हती. तो फक्त एवढेच म्हणला होता, “परमेश्वरा यांना क्षमा कर. कारण हे काय करत आहेत हेच त्यांना समजत नाहीये. ” तुमचे आत्ताचे उद्गार यापेक्षा फारसे वेगळे नाहीत. तीच क्षमाशील वृत्ती. तेच मनोधैर्य. चुकलेल्या मेंढराला कळपात घेण्यासाठी धडपड. “

“आजोबा, मी कोणी देवदूत नव्हे. पण तुमच्या धर्मातील असो किंवा आमच्या धर्मातील मूळ तत्त्वज्ञान एकच आहे ना? दया आणि क्षमा ही तत्व काही कोणत्या एका धर्माची नाहीत. त्यांना स्थळ काळाच बंधन ही नाही. चुकलेल्यांना सुधारण्याची जास्तीत जास्त संधी द्यावी हे प्रत्येक धर्मानच सांगितलं आहे. म्हणून म्हणतो, जॉनला आपण सध्या तसंच सोडून देऊ. तो नक्की सुधारेल. आपण सगळेजण तशी प्रार्थना करू. “

 मावळत्या सूर्याच्या साक्षीने तिघेही वाट पाहू लागले एका नव्या सूर्योदयाची!

समाप्त

लेखक : श्री. सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “दयासागर” – भाग – २ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ “दयासागर” – भाग – २ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

(“त्याचं काय आहे साहेब, करायचं म्हटल्यावर काही अवघड नाही. माझ्या घराजवळची मोकळी जागा तुम्ही पाहिलीत ना? आमचीच आहे ती. तिथेच तर करायचं सगळं. प्रश्न आहे तो फक्त पैशाचाच. बघू केव्हा जमेल तेव्हा. ठीक आहे, येतो मी. ” – इथून पुढे – – 

जॉन निघून गेला. पण त्यानं रंगवलेलं स्वप्न विवेकच्या डोक्यातून जात नव्हतं. किती सुंदर स्वप्न होतं ते. स्वतः कमी शिकलेलो आहोत म्हणून ती वेळ दुसऱ्यावर येऊ नये ही जॉनची इच्छा. त्याला अशिक्षित तरी कसं म्हणायचं? पण पैसा कसा उभारायचा? सारेजण मदत करायला तयार होतील का? निदान आपण तरी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. नाही तरी आपलं असं कोण आहे या जगात? आपल्या मायदेशी आपली आई आणि आपण स्वतः. इथं मिळणारा पगार आपल्यापुरता अगदी भरपूर आहे. नाही तरी आपण इथं कोणत्या उद्देशाने आलो आहोत? केवळ पैसा मिळवायचा म्हणून तर नाहीच नाही. उलट आपल्या व्यवसायातून आपल्या देशाची, धर्माची, संस्कृतीची ओळख सर्वांना करून द्यावी हा हेतू नव्हता का आपल्या मनात? मग आता आलेली ही संधी का सोडायची? इथल्या दोन-तीन वर्षांच्या वास्तव्यात बरंच काही करता येईल.

आपला हा विचार त्यानं जॉनला बोलून दाखवला. क्षणभर काय करावे तेच जॉनला समजेना. विवेकनेही नुसते बोलून न थांबता प्रत्यक्ष कामाला सुरुवात व्हावी म्हणून त्याचं दिवशी त्याला काही रक्कम देऊ केली.

“साहेब, शुभ कार्याचा संकल्प आपण सोडलेला आहे. तुमच्या पद्धतीप्रमाणे आणि आमच्या पद्धतीप्रमाणे ही सर्वप्रथम आपण ईश्वराचे स्मरण करूया. मी एक छोटेसे प्रार्थना मंदिर बांधून सुरुवात करतो. त्यात एक छोटीशी मूर्ती असेल येशूची तर दुसरी असेल भगवान श्रीकृष्णाची. “

जॉनने विवेकचा निरोप घेतला. पुढचे आठ दिवस तो दवाखान्यात दिसला नाही. एके दिवशी सकाळी तो विवेकच्या क्वार्टरवर आला. घाईघाईने हातातले कागद टेबलावर पसरले.

“साहेब, हा पहा प्लॅन! हे छोटसं प्रार्थना मंदिर. त्यांच्या पलीकडे शाळेची इमारत. शिवाय या मोकळ्या जागेत बाग करता येईल. “

विवेकने प्लॅन पाहिला.

“जॉन, फार मोठे स्वप्न पाहू नकोस. तुला कोण किती मदत करेल हे सांगणं अवघड आहे. म्हणून आपल्याला झेपेल तेवढेच हाती घे. “

“होय साहेब, हा संपूर्ण प्लॅन आहे. आपण सुरुवातीला फक्त प्रार्थना मंदिरच बांधायचं आहे. “

जॉन रोज येऊ लागला. रोज काही ना काही सांगू लागला. कामाची सुरुवात विवेकच्या हस्ते व्हावी म्हणून त्याने विवेकला विनंती केली. पण कामाच्या व्यापात ते जमले शक्य नसल्यामुळे विवेकने त्याला नकार दिला. जॉन दर चार-आठ दिवसांनी गावाकडे जाऊ लागला. डॉक्टर अय्यर हे सारे पाहत होता. विवेकने जॉनशी एवढी जवळीक करावी हे त्याला पटत नव्हते. त्याने विवेकला तसे सुचवूनही पाहिले. पण विवेकचा जॉनवर विश्वास होता. जॉन आयुष्यात काहीतरी चांगलं करतोय, आपला त्याला हातभार लागतोय याचा त्याला आनंद होता. या प्रार्थना मंदिराच्या रूपाने आपल्या धर्माची, संस्कृतीची ओळख इथल्या लोकांना करून देता येईल म्हणून त्याला मनापासून आनंदाच होत होता. जॉन कडून सतत येणारा वृत्तांत त्याला सुखावत होता. आज काय जागा साफ करून झाली. उद्या काय नको असलेली झाडेझुडपे तोडून झाली. एक ना दोन. कामाची जशी जशी प्रगती झाल्याचे समजत होते तशी तशी विवेक कडून पैशाची मदत ही मिळत होती.

एके दिवशी अवेळी दारावर थाप पडलेली ऐकून विवेकला आश्चर्य वाटले. कोण आलं असेल? त्याने दार उघडले. ड्युटीवरील वॉर्ड बॉय निरोप घेऊन आला होता. विवेकची आई खूप आजारी होती. त्याला ताबडतोब भारतात परतणं जरुरीचं होतं.

विवेकने क्षणभरात सामानाची आवराआवर केली. आता परत यायचे म्हणजे एक महिना तरी सहज लागेल. त्याला एकच काळजी वाटू लागली. जॉनची! एकीकडे कधी एकदा आईला भेटतो असे झालेले, तर दुसरीकडे जॉन आता भेटू शकत नाही म्हणून काळजी. त्याने एका कागदावर त्याच्यासाठी निरोप लिहून ठेवला,

“प्रिय जॉन, मला आईच्या आजारपणामुळे अचानक जावे लागत आहे हे तुला समजले असेलच. मी लवकरात लवकर परत येईन. तू तुझे काम थांबवू नकोस. ते चालूच ठेव. मला काही कारणाने लवकर येणे शक्य झाले नाही तर मी तुला तेथूनच पैसे पाठवीन. तू ही प्रोग्रेस कळवत रहा. माझा पत्ता तुला ऑफिसमध्ये मिळेलच. “— तुझा डॉक्टर विवेक साने

 *. *. *. *. *. *. *

विवेक आपल्या घरी परतला. तोपर्यंत त्याच्या आईची तब्येत फारच बिघडली होती. शेजाऱ्यांनी शेजार धर्म पाळला होता. अशक्तपणा बराच वाढला होता. आपला मुलगा आलेला पाहून तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. निस्तेज चेहऱ्यावर हास्याची एक लहर उमटली. अशा अवस्थेत दोन दिवस केले आणि तिसऱ्या दिवशी दिवस मावळतानाच तिची प्राणज्योत मालवली.

विवेकचा एकमेव आधार निखळून पडला. एवढ्या मोठ्या जगात आपण अगदी एकटे पडलो आहोत याची त्याला जाणीव झाली. या गावात, या देशात आपल्या मायेचे कोणीही नाही. मग या गावाला आपलं तरी कसं म्हणायचं? आपण कुठेही राहिलो तरी काय फरक पडणार आहे? ‘ अवघे विश्वची माझे घर ‘हेच खरं. आपण हे सर्व सोडून जायचं आणि कायमचं इंग्लंडमध्ये राहूनच आपला सेवाधर्म चालू ठेवायचा त्याने निश्चय केला. हे जुनं घर, फर्निचर सगळ्याची व्यवस्था लावायला हवी. जे काही दोन-चार नातलग आहेत त्यांचा निरोप घ्यायला हवा. दोन-चार महिने सहज लागतील. त्यानं लगेच तसे कळवून टाकलं व तो पुढच्या तयारीला लागला.

घर साफ करता करता त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. त्याच्या आईचे पासबुक त्याला मिळाले. सहज म्हणून त्याने उघडून पाहिले. एक भली मोठी रक्कम पुस्तकात शिल्लक दिसत होती. त्याने गेल्या वर्षभरात जे काही पैसे आईला खर्चासाठी म्हणून पाठवले होते त्यातील अगदी थोडीशी रक्कमच खर्च झाली होती. बाकीचे सारे पैसे जसेच्या तसे आईने शिल्लक ठेवले होते. आईच्या आठवणीने त्याचे डोळे भरून आले. आपण आईसाठी पैसे पाठवले होते. ते तिथेच झाले. आता ते आपले नाहीत. त्यांन ठरवून टाकलं. पुढच्या दोन दिवसात त्यानं कागदपत्रांची पूर्तता केली. बँकेतून पैसे मिळताचक्षणी सगळ्या रकमेचा ड्राफ्ट जॉनच्या नावानं काढून त्याला पाठवून दिला आणि मगच तो घरी आला. बऱ्याच दिवसानंतर तो समाधानी दिसत होता. आईने साठवलेले पैसे सत्कारणी लागले याचा तो आनंद होता. मधून मधून जॉनची पत्र येत होती. त्यावरून आपण जाईपर्यंत प्रार्थना मंदिर पूर्ण झालेले असेल याची त्याला खात्री वाटत होती.

चार महिने कसे निघून गेले समजले ही नाही. आज शेवटचा दिवस. उद्यापासून या घरावर आपला हक्क नाही. काल मिळालेल्या घराच्या किमतीची रक्कम जॉनला पाठवून, सर्वांचा निरोप घेऊन विवेक घरी परतला. संध्याकाळ केव्हा होते आणि मुंबईला जाणा-या गाडीची वेळ केव्हा होते असं त्याला झालं होतं.

*. *. *. *. *. *

रूमवर डॉक्टर अय्यर त्याची वाट पाहत होताच. विवेकने त्याला सारा वृत्तांत सविस्तर सांगितला. आपण सारं आयुष्य आता इथेच काढणार आणि आपल्या संस्कृतीचा प्रसार करणार हेही सांगितलं. अय्यर अस्वस्थ झाला. त्याला कसं सांगावं हे समजेना. पण केव्हातरी सांगावं लागणारच होतं. विवेकने विषय काढताच तो म्हणाला,

“माय डियर जंटलमन, वी हॅव नॉट सीन मिस्टर जॉन फॉर लास्ट वन मंथ “.

“काय? कामावर आला नाही तो? “

“नाही ना, त्याची काही खबर ही नाही. तुला काय वाटतं? “

“मला वाटतं तो काम पूर्ण करण्यात गढून गेला असावा. गेल्या दोन महिन्यात मी त्याला बरेच पैसे पाठवलेत. त्यामुळे त्याला पैशाची अडचण भासणार नाही. सगळं काम पूर्ण करूनच कामावर यायचा त्याचा बेत असेल. “

“मला नाही वाटत तसं. तू एकदा त्याच्या गावात जाऊन आला आहेस ना? एकदा जाऊन तर पहा”

“मलाही उत्सुकता आहेच. उद्याच जातो. तुही आलास तर बरे होईल. “

“ओ. के. , मलाही बरेच दिवस चेंज मिळालेला नाही. आपण दोघेही जाऊ “

– क्रमशः भाग दुसरा 

लेखक : श्री. सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “दयासागर” – भाग – १ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? जीवनरंग ❤️

☆ “दयासागर” – भाग – १ ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

लंडनच्या विमानतळावर विवेकने पाय ठेवला. क्षणभर त्याला गलबलून आलं. आपण खूप दूर येऊन पोहोचलो आहोत याची त्याला जाणीव झाली. चारी बाजूंना दिसणारा झगमगाट त्याचे डोळे दिपवू शकत नव्हता. त्याच्या डोळ्यासमोर दिसत होता तो त्याच्या गावातला एसटी स्टँड! आपण मुंबईला जाणाऱ्या गाडीत बसलो होतो. आपल्याला निरोप द्यायला आई आली होती. परदेशात जायला तिने परवानगी दिली असली तरी आता वर्षभर तरी भेट होणार नाही या कल्पनेने तिचे डोळे भरून आले होते. आपणही तिला लवकर येण्याचे आश्वासन दिले होते. ती आशा मनात बाळगूनच ती घराकडे परतली होती.

पण असं घरच्या आठवणीत गुंतून चालण्यासारखं नव्हतं. त्यानं ठरल्याप्रमाणे पुढचा प्रवास सुरू केला. लंडन पासून सुमारे दिडशे किलोमीटर लांब असलेल्या छोट्याशा खेडेगावात तो येऊन दाखल झाला. गाव अगदी छोटसं पण किती रमणीय होतं! चारी बाजूंनी वेढलेले डोंगर, कधी न पाहिलेली बर्फाच्छादित शिखरे, तांबड्या पिवळ्या पानांची झाडे, त्या खालून जाणारे काळे कुळकुळीत रस्ते आणि डोंगराच्या उतारावर पसरलेली टुमदार घरे. त्या छोट्याशा गावात मिशनची इमारत शोधून काढणं त्याला अवघड गेलं नाही. गावाच्या एका बाजूला असलेली लाल भडक दगडांची छोटीशी इमारत त्याला खुणावत होती.

पहिला दिवस कसा संपला समजलच नाही. प्रवासाचा शीण, गावाकडील माणसांच्या आठवणी, मग या सुंदर खेड्यात येणं, आल्यावर सर्व कागदपत्रे सादर करणं, प्रवेश मिळवणं, होस्टेलची रूम ताब्यात घेणं यात दिवस कसा संपून गेला त्याला समजलच नाही. आता मात्र कामाला लागायचं होतं. एक डॉक्टर म्हणून आपण इथं आलो असलो तरी आपण एक हिंदू मिशनरी डॉक्टर आहोत. प्रत्येक रुग्ण हा परमेश्वर- स्वरूप मानून त्याची सेवा करणं, इतकच नव्हे तर प्रत्येक माणसाशी त्याच पद्धतीने वागणं हाच आपला धर्म बनला पाहिजे. तशी वृत्ती आपल्यापाशी आहे याची त्याला जाणीव होती. काहीतरी वेगळं करून दाखवणं हा त्याचा पहिल्यापासूनचा स्वभाव होता. नाही तर उत्तम नोकरी मिळत असतानाही ती सोडून एका हिंदू मिशनरी हॉस्पिटलमध्ये तो कशाला आला असता?

आजचा संपूर्ण दिवस त्याने आपल्या संस्थेचा परिचय करून घेण्यातच घालवला. भारतात मुख्य कार्यालय असलेल्या या संस्थेच्या शाखा अनेक देशात पसरल्या होत्या. केवळ ग्रामीण भागात किंवा खरोखर आवश्यकता असेल अशा ठिकाणी जाऊन संस्था उघडणं, शाळा, दवाखाना, ग्रंथालय यासारख्या सोयी पुरवणं, इतकच नव्हे तर भारतीय संस्कृती, तत्त्वज्ञान, कला, धर्म यांची जगाला ओळख करून देणं हा संस्थेच्या कामाचा मुख्य उद्देश होता. विवेक इथे डॉक्टर म्हणून आला होता. त्यामुळे लोकांच्यात मिसळून जाणं त्याला सहज शक्य होतं. आपली माणसं आणि तिथली माणसं, आपला धर्म आणि तिथला धर्म सर्वकाही अगदी जवळून अभ्यासता येणार होतं. म्हणूनच तो मनोमन खुश झाला होता

… आज त्याच्या कामाचा पहिला दिवस होता. ऑफिससमोरच्या बागेतील छोट्याशा कृष्णमंदिरात जाऊन त्याने दर्शन घेतले. मनःपूर्वक प्रार्थना करुन अत्यंत उदात्त भावनेने तो दवाखान्याकडे वळला.

सर्व स्टाफशी ओळख झाली. त्याच्याबरोबर त्याच्यासारखेच आणखी दोन भारतीय होते. एक होता केरळमधला डॉक्टर अय्यर, तर दुसरा होता कानपूरचा डॉक्टर वर्मा. बाकीचे तिघे इंग्लंडमधलेच होते. डीन होते डॉक्टर सुब्रमण्यम.. एक निष्णात शल्य विशारद आणि मूर्तीमंत उत्साह! त्यांनी सर्वांची ओळख करून घेतली. सर्वांचे स्वागत केलं.

“फ्रेंड्स, वेलकम ऑल ऑफ यु! आय एम प्राऊड ऑफ माय इंडियन फ्रेंड्स हू हॅव डिसाईडेड टू डिव्होट देअर लाईफ फॉर द सर्विस ऑफ द पीपल. आय थिंक, वुई नीड नॉट वेस्ट अवर टाईम. लेट अस् स्टार्ट अवर वर्क “.

… बघता बघता कामाचा प्रचंड व्याप सुरू झाला. दिवस पाळी असो वा रात्रपाळी, विवेक प्रत्येक काम अगदी मन लावून करीत होता. पेशंटची केवळ शारीरिक वेदनाच नव्हे तर त्याचं मानसिक दुःखसुद्धा समजून घेत होता. त्याला माहीत होतं की सगळेच पेशंट्स काही आपल्याशी खरं बोलत नाहीत. सांगितलेली पथ्य पाळत नाहीत. औषध घेण्यात टाळाटाळ करतात. पण कुणावरही न रागवता, सर्वांशी गप्पा गोष्टी करत तो पेशंटला सगळं काही करायला भाग पाडत होता. दिवसभर पेशंटच्या विश्वात रमावे आणि आपली ड्युटी संपली की पुस्तकांच्या जगात हरवून जावे. दवाखान्यातलेच नव्हे तर गावातले कितीतरी रहिवासी त्याचे अगदी चांगले मित्र बनले होते. आपल्या देशातील गमतीजमती सांगण्यात, आपल्या संस्कृती विषयी बोलण्यात, आपल्या धर्माविषयी, राष्ट्रपुरुषांच्या विषयी काय सांगू आणि काय नको असं त्याला होत असे. डॉक्टर अय्यरबरोबर तत्त्वज्ञानावर गप्पा मारताना रात्र कशी संपून जाई त्याला समजत सुद्धा नसे. डॉक्टर स्मिथच्या हिंदू धर्माविषयीच्या खुळचट कल्पना दूर करता करता त्याला कितीतरी गोष्टी समजावून सांगाव्या लागत असत. तो आल्यानंतर त्यानं कित्येक पेशंट्सना नुसत्या योगांच्या उपचाराने बरं केलं होतं. कित्येकांना व्यसनापासून मुक्त केलं होतं. कित्येकांना चक्क भक्तीमार्गाला लावलं होतं… कुणावरही कसलीही सक्ती न करता.! याचा परिणाम एकच झाला… तो म्हणजे डॉक्टर विवेक अगदी अल्पकाळात लोकांचं दैवत बनला.

अशाच एके दिवशी विवेक आपल्या क्वार्टरवर परतला. दारातच पायरीवर वॉर्ड बॉय बसलेला.

“काय रे जॉन, असा उदास का?

“काय सांगू साहेब, बरेच दिवस सांगीन म्हणतो. पण धीरच होत नाही “.

“हे बघ, आधी आत ये? नि:संकोचपणे सांग सगळं. काही होतंय का? “

“हॅ, आपल्याला काय होणार साहेब? चोवीस तास औषध आपल्या अवतीभवती असतात. कोणता आजार होतोय असं वाटलं की खा गोळी. “

“मग अडचण काय आहे? “

“साहेब, अडचण आहे ती पैशांची. घरात सतत काही ना काही प्रॉब्लेम चालूच आहेत. पगार कसा पुरायचा? पैसा कसा पुरवायचा हेच समजत नाही. “

“अरे, मग मी काय करू म्हणतोस? “

“साहेब, शक्य असेल तर थोडेफार पैसे. ,.. फार नाही दहा पाउंड दिलेत तरी चालेल “

“तेवढ्याने भागणार आहे काय? ते संपतील. पुन्हा काय? त्यापेक्षा आपल्या गरजा कमी कशा करता येतील ते बघावं “

“चलतो साहेब, मोठ्या अपेक्षेने आलो होतो. “

“अरे, बस बस. असा वैतागू नकोस. मी देतो तुला आत्ता पैसे. पण उसनवारी करणं बरं नव्हे एवढेच माझं सांगणं. “

“तेही बरोबर आहे साहेब. आता तुम्ही म्हणता तसंच करतो. फालतू खर्च एकदम बंद. “

“तसं केलंस तर फार बरं होईल. “

…. पैसे खिशात टाकून आभार मानून जॉन पळाला. इतक्यात डॉक्टर अय्यर तिथे आले.

“हॅलो मिस्टर साने, काय दानधर्म केलात का? “

“दानधर्म कसला रे? त्याची थोडी नड होती, म्हणून दिले थोडे पैसे. “

“व्हेरी गुड, आता विसरून जा ते पैसे. “

” का? “

” तो काही प्रामाणिक माणूस नाही “.

“तुझा काही अनुभव? “

“नाही, पण त्याच्याविषयी ऐकलय तसं. “

“मग जाऊ दे. प्रत्यक्ष अनुभव नसताना आपण अविश्वास दाखवणं मला बरोबर वाटत नाही “

“ओ. के. जंटलमन. लेट अस् हॅव अ डिनर “

…. पंधरा दिवस झाले असतील नसतील. जॉनने प्रामाणिकपणे पैसे परत आणून दिले. मग हे नेहमीचेच होऊन बसले. जरूर भासली की जॉननं हात पसरावेत. विवेक देईल तेवढे पैसे त्याने घ्यावेत आणि काही दिवसांनी प्रामाणिकपणाने परत करावेत. जॉन आता मोकळेपणानं बोलत असे. घरची सुखदुःख सांगत असे. आपल्या खेड्याविषयी बोलत असे. विवेकही त्याच्या मैत्रिने सुखावला. हा वॉर्डबॉय आपला मित्र केव्हा झाला त्याला समजलही नाही. एका वीकेंडला तो त्याच्या गावीही जाऊन आला. त्याचं घर पाहिलं. छोटसं शेत पाहिलं. बदल म्हणून इथे यायला हरकत नाही असंही त्यानं ठरवलं.

“डॉक्टर साहेब, एका गोष्टीचं फार वाईट वाटतं “

“कोणत्या रे? “

“आपण शिक्षण जास्त घेतलं नाही याचं. नाहीतर चार पैसे जास्त मिळवता आले असते. “

“मग आता शिकतोस? मी शिकवतो तुला. “

“आता? काय लक्ष लागणार आहे शिक्षणात? पण एक विचार मात्र मनात येतो. “

“कोणता? “

“आपल्या गावात एक शाळा काढावी. छोटीशीच. छोटसं प्रार्थना मंदिर बांधावं. “

“वा, सुंदर आहे की कल्पना. पण या सगळ्याला पैसा लागणार आणि कोण करणार हे सगळं? कुठे करणार? इतकं सोपं नाही ते. “

“त्याचं काय आहे साहेब, करायचं म्हटल्यावर काही अवघड नाही. माझ्या घराजवळची मोकळी जागा तुम्ही पाहिलीत ना? आमचीच आहे ती. तिथेच तर करायचं सगळं. प्रश्न आहे तो फक्त पैशाचाच. बघू केव्हा जमेल तेव्हा. ठीक आहे, येतो मी. “

– क्रमशः भाग पहिला 

लेखक : श्री. सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हेतू – – (अनुवादित) – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघःश्याम सोनवणे ☆

श्री मेघःश्याम सोनवणे

? जीवनरंग ?

☆ हेतू – – (अनुवादित) – मूळ इंग्रजी लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मेघःश्याम सोनवणे 

आमच्या घरातला तो तपकिरी रंगाचा सोफा माझा खूपच आवडता होता… बाबांनी तो मुंबईहून मागवला होता. मी त्याच्या मऊ गादीवर उड्या मारायचो… कधीकधी मी त्यावर झोपायचोही. ताई चे, माझ्या बहिणीचे लग्न ठरले तेव्हा सोफा येऊन एक महिन्यापेक्षा कमीच वेळ झाला होता… लग्नाची तयारी जोरात सुरू झाली होती. बाबांनी लग्नासाठी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतून आणि बँकेतून सर्व पैसे काढले होते. लग्न मोठ्या थाटामाटात साजरे झाले.

बाबांनी माझ्या बहिणीच्या सासरच्यांना लग्नासाठी खूप सामान पाठवले होते… मला आठवतही नाही की काय काय पाठवले होते. मी माझ्या आईला विचारले होते की माझ्या बहिणीचे लग्न झालेल्या घरात अशा वस्तू नाहीत का… आईने माझ्याकडे हसत हसत पाहिले आणि म्हणाली, “सर्व काही आहे बेटा, पण हे सर्व मुलींच्या लग्नाच्या वेळी द्यावेच लागते… “

ताई आता नवीन पलंगावर झोपेल याचा मला आनंद झाला… ताई आता नवीन खुर्चीवर बसेल…

लग्न तर पार पडले होते, पण लग्नानंतर काही दिवसांनी, जेव्हा मी शाळेतून घरी परतलो तेव्हा मला घराबाहेर एक ट्रक उभा असलेला दिसला… बाबा त्यावर आमचा तपकीरी रंगाचा सोफा ठेवत होते. मी धावत खोलीत गेलो. मी बाबांना विचारले, “आपला सोफा कुठे चालला आहे, मग आता मी कुठे बसणार?” 

बाबा म्हणाले, “पुढच्या महिन्यात आपण एक नवीन सोफा घेऊया. “

आमचा सोफा ताईच्या घरी गेला होता… नंतर आमच्या घरी कधीच नवीन सोफा येऊ शकला नाही… आम्ही खोलीत लोखंडी खुर्च्या ठेवल्या होत्या, पण मला त्यावर बसण्याची अजिबात इच्छा होत नव्हती.

ताई च्या लग्नाला सहा महिने झाले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच ताई आईला भेटायला आली तेव्हा ती खूप रडत होती. आई बराच वेळ तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती… आई म्हणत होती, “आपण तरी काय करू शकतो? काही लोकांचे मन कधीच भरत नाही… पण वेळ सर्वकाही ठीक करेल. ” मला संपूर्ण गोष्ट समजली नाही, पण आई मनाच्या हेतूंचे महत्त्व समजावून सांगत राहिली.

लग्नानंतर काही महिन्यांनी, ताईचा धाकटा दिर आमच्या भाऊजींसोबत आमच्या घरी आला होता. तो माझ्याच वयाचा असावा. पण जेव्हा तो आमच्या घरी आला तेव्हा असं वाटलं की जणू काही कुणी खास महत्वाचा पाहुणा आला आहे. आई रोज सकाळी ताईच्या दिराला ग्लास भरून दूध द्यायची. त्याचं आवडतं जेवण घरी बनवलं जायचं… बाबा त्याला सतत सोबत फिरायला घेऊन जायचे…

ज्या दिवशी तो जाणार होता, त्या दिवशी त्याच्यासाठी खूप नवे कपडे खरेदी केले गेले होते. पहिल्यांदाच मला वाटले की मी कधी कुणाचा दिर बनेन… असो, ज्या दिवशी माझे भाऊजी परत जाणार होते, त्या दिवशी माझ्या ताईच्या दिराने त्याला माझा कॅरम बोर्ड पाहिजे असा आग्रह धरला.

माझा कॅरम बोर्ड… मला तो माझ्या जीवापेक्षाही जास्त आवडता होता. मी माझ्या मित्रासोबत रोज संध्याकाळी कॅरम खेळायचो. मी तो माझ्या ताईच्या दिराला का देऊ? पण बाबांनी मला समजावले, “बेटा, तू तो त्याला दे… ” 

“मी देणार नाही… तो माझा आहे… ” 

“मी तुला एक नवीन घेऊन देईन… ” 

“तूम्ही म्हणाला होतात की आपण एक नवीन सोफा घेऊ… तो तरी कुठे आला बाबा… “

बाबा गप्प बसले, पण माझा कॅरम बोर्ड माझ्या बहिणीच्या दिराला देण्यात आला होता… त्यानंतर चाळीस वर्षे उलटून गेली आणि मी कॅरम कधीच खेळलो नव्हतो. कॅरम बोर्ड गेला होता. मी माझ्या बहिणीच्या दिराला माझा कॅरम बोर्ड दाखवल्याबद्दल मलाच वाईट वाटत होते, राग येत होता. मी बरेच दिवस दुःखी होतो. मग मी माझ्या आईला विचारले की माझ्या भाऊजींनी त्यांच्या धाकट्या भावासाठी नवीन कॅरम बोर्ड का खरेदी केला नाही. त्यांनी माझा सोफा आणि कॅरम बोर्ड का घेतला. ” 

पहिल्यांदाच, माझ्या आईने मला सांगितले, “काही लोकांचे हेतू कधीच पूर्ण होत नाहीत, बेटा… माणसाचे पोट भरलेले असो वा नसो, त्यांचे हेतू मात्र पूर्ण झालेच पाहिजेत. ” असे म्हणत, माझ्या आईने तिचे डोळे पुसले आणि मला तिच्या पदरात घेतले.

बरीच वर्षे उलटून गेली. आता मला सोफा ही आवडत नाही, कॅरम बोर्डही नाही…

एके दिवशी, दिल्लीतील एका मॉलमध्ये जेवत असताना, बर्गरची जाहिरात पाहून मी थबकलो… त्यावर लिहिले होते, “पोट भरेल, पण मन नाही… मी माझी पत्नी सुधाला म्हटले की हे कंपनीचे लोक अशी चुकीची माहिती देतात. ते म्हणतात की पोट भरेल, मन नाही…. ‘पोट भरले नाही तरी मन भरेल’ असे लिहायला पाहिजे होते… पोट भरण्यापेक्षा हेतू पूर्ण करणे, मन भरणे जास्त महत्वाचे आहे. या जगात, ज्याचं मन भरलेलं नाही, त्याच्याकडे सर्व काही असूनही, ते दुसऱ्यांच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करतात, ज्यांचे मन समाधानी नसते… त्यांच्या घरात कोणाचीही बहीण आनंदी राहू शकत नाही, व स्वतः ते ही नाही.

हिंदी कथा लेखक – अनामिक  

मराठी अनुवाद – श्री मेघःश्याम सोनवणे

नाशिक.

9325927222

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “जाणीव…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

☆ “जाणीव…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

गेले काही दिवस त्याचं मन थार्‍यावर नव्हतं. ऊदास झालं होतं.. भरकटलं होतं.. सध्या कुठलीच गोष्ट मनासारखी घडतं नव्हती. कंपनीने दोन महिन्यापूर्वी त्याला कामावरून कमी केलं होतं. चार-पाच ठिकाणी त्याने प्रयत्न केला होता पण काम होत नव्हतं. आज एके ठिकाणी तो गेला होता तिथेही त्याची निराशा झाली होती. वैतागुन मोटरसायकल घेऊन तो निघाला.

आई समोर होती.. म्हणाली,

” अरे देव बघत असतो रे… तो दाखवेल तुला मार्ग… होईल सगळं नीट. जरा धीर धर रे बाळा… “

” तरी पण… जरा जाऊन येतो. रात्री मित्राकडेच राहीन. ” 

तिरीमिरीतच तो निघाला.

तो ऐकणार नाही हे आईला कळतं होतं. ती शांत होती. तो अमोलकडे जाऊन मन मोकळे करून येईल… हे तिला माहित होते. फोन सुध्दा न घेता तो बाहेर पडला.

त्याला आज कुणाशीच बोलावंसं वाटत नव्हतं. तो निघालाच..

मनात म्हणाला…

आई बिचारी भोळी आहे. तिला जगाची काही ओळख नाही. तिचा आपला देवावर प्रचंड विश्वास… जसं काही सगळं काही तिचा देवचं करतो… जाऊ दे…

संध्याकाळ झाली होती. आज त्याला अमोलकडे पण जावसं वाटेना. तो सुसाट वेगाने गडाकडे निघाला… त्याच आवडतं ठिकाण… तिथे पायथ्याशी जाऊन जरा शांतपणे बसू असे त्याने ठरवले.

आता वस्ती मागे पडली होती. मोकळा रस्ता होता. त्याच्या नेहमीच्या वळणावर त्याला झाड दिसलं.. तो वळला.. आता थोड्या वेळातच गडाचा पायथा…

मध्येच गाडी कुरकुरायला लागली.. आणि अचानक खरखर आवाज करत बंद पडली. तो वैतागला.. आजचा दिवसच खराब आहे…

खूप वेळा किक मारली… मग गाडी चालू झाली.

आता त्याच आसपास लक्ष गेलं. अंधार चांगलाच गडदं झाला होता. जोरात वारा वाहत होता.

त्या वाऱ्यानी हलणारी झाडं वेगळीच वाटत होती. अंधारात रस्ताही दिसेनासा झाला होता. विचारांच्या तंद्रीत आपण दुसऱ्याच रस्त्याला लागलो आणि आपली वाट चुकली हे त्याच्या लक्षात आले.

आकाशात बघितलं तर चंद्र, चांदण्या नव्हत्याच… नुसताच अंगावर येणारा काळाभोर काळोख.. कसाबसा तो गाडी हळूहळू चालवत होता.

 कुठे जातोय समजत नव्हतं. त्याच्या मनात आलं..

 चकवा लागला की काय…

कुठला आहे हा रस्ता…

थांबायची पण भीती वाटायला लागली होती.

अचानक एखादं हीस्त्रं श्वापद येऊन आपल्याला खाऊन टाकेल की काय असही क्षणभर त्याला वाटलं… भीतीची लहर अंगभर लपेटली होती.

कुठल्या संकटात अडकलो आहोत हेच कळत नव्हते… काळोखी वाट संपतच नव्हती…

तो तसाच पुढे निघाला. त्या भयाण शांततेत गाडीचा आवाज अंधार चिरत जातं अजूनच कर्कश्य वाटत होता.

अशाच सैरभैर अवस्थेत त्याला काहीतरी चमकल्या सारख दिसलं.

लांबवर दिसत असलेल्या त्या क्षीण उजेडाच्या दिशेने हिम्मतं धरून तो निघाला.

जवळ गेल्यावर गाडीच्या उजेडात त्याला शेंदूर लावलेला दगड दिसला. त्याच्यासमोर एका खोलगट दगडात तेल वात लावलेली होती. त्या वातीचाच प्रकाश त्याला दिसला होता. देवासमोर नारळ फोडलेला होता. त्याच्या जीवात जीव आला. दिवा आहे म्हणजे इथे निश्चितच कोणीतरी असणार…

इतक्यात आवाज आला,

” कोण आहे रे”

” मी… मी गडावर निघालो आणि वाट चुकलो. “

“थांब आलोच ” असं म्हणत एक म्हातारा काठी टेकत आला.

” अरे लेकरा आज अमोशाला असा रात्रीचा कशाला निघालास? आता अंधारात गडाची वाट सापडायची नाही. रात्र झालीय थांब इथचं”

गत्यंतरच नव्हतं. म्हाताऱ्याने पाणी दिलं. खरंतर भुकेची जाणीव झाली होती. म्हाताऱ्याने ते ओळखलं. अर्धी भाकरी आणि थोडीशी भाजी असलेला डबा त्याला दिला.

” हे खा.. एवढेच आहे बघ” 

न बोलता तो खायला लागला.

त्या झोपडीत मिणमिणणारा तेलाचा दिवा तेवढा होता.

म्हाताऱ्याने बाहेर जाऊन देवा समोरचा अर्धा नारळ आणला. त्याचे तुकडे केले.

” अमोशाचा असला तरी प्रसादाचा आहे घे… “

म्हणून त्याला दिले. तो निमूटपणे खायला लागला. म्हणाला,

” आजोबा असं इथं एकटं झोपायला तुम्हाला भीती नाही वाटत? “

” अरे कशाची भिती? आपण घाबरलो की जग घाबरवतयं बघ.. आपण ताठ राहायचं.. सामना करायचा. एक मारलं तर आपण दोन मारायचे ” आजोबा अगदी शांतपणे म्हणाले. तो त्यांच्याकडे बघायला लागला.

खाऊन झालं तसं हात धुवायला तो बाहेर गेला. त्याला वाट दाखवणारा दिवा आता शांत झाला होता. विझला होता.

आजोबा म्हणाले, ” चांगल्या घरचा दिसतोस मग अशा अवेळी गडावर कशाला निघालास”.

“सहजच वाटलं निघालो”

” वाटलं की केलं… असा वेडेपणा करू नये रे.. थोडं थांबावं.. विचार करावा… वेळ बघावी… बरं ती चादर घे आणि झोप आता”

तो सतरंजीवर आडवा झाला. तरी त्याला लवकर झोप लागेना…

 म्हाताऱ्याने ते ओळखलं म्हणाला,

“अरे झोप येईना का? तू झोप बिनघोर मी आहे ना.. काळजी नको करू… “

त्यांच्या शब्दांनी त्याला एकदम आश्वासक वाटलं…

” मी आहे ना.. “

या शब्दांनी त्याला आईच्या देव्हारात असलेल्या फोटोतील स्वामींचा चेहरा समोर आला त्याच्या खाली हेच शब्द लिहिलेले होते…

आज आपण अचानक इथे कसे आलो? हे आजोबा काय भेटले… त्यांनी तीच चार वाक्य कशी म्हटली… हे सगळं त्याला गुढ… अलौकिक वाटत होतं…

आता मनावरचा ताण कमी झाला. खरंच आपण इतके का गडबडून गेलो? जाऊ दे थोडे दिवस… काहीतरी निघेल मार्ग…

विचारांच्या नादात झोप कधी लागली त्याला कळलंच नाही.

सकाळी सूर्यप्रकाशाच्या उजेडानी त्याला जाग आली. आपण कुठे आहोत याचे भान आले. उठून तो बाहेर आला.

“झाली का झोप? ये.. “

म्हातारा म्हणाला.

” निघतो आता आई वाट बघत असेल. “

त्यानी आजोबांना वाकून नमस्कार केला. म्हणाला,

” तुम्ही भेटलात म्हणून.. नाहीतर रात्रीचा कुठे भरकटलो असतो कोण जाणे. “

” अरे वाट चुकलेल्याला आसरा द्यायचा.. त्यात काय एवढं… आणि कोणाला घरात घ्यायचं कळतं रे.. आता नीट घरी जा. “

” हो”

निघताना काळ्यामीट्ट अंधारात वाट दाखवणाऱ्या.. शेंदूर लावलेल्या दगडाच्या देवाकडे तो गेला. खाली बसून त्यानी नमस्कार केला. डोळ्यातून घळंघळं पाणी वाहत होते. याच देवाने त्याला रात्री प्रसाद दिला होता.

त्याला एकदम आईची आठवण झाली.

त्याचं मन भरून आलं.

मनात विचार आला.. काल रात्री ते आजोबा देवासारखे धावून आले… खरंतर म्हातारी माणसं नेहमी बोलतात तसंच साधंच बोलले पण… त्या चार शब्दांनी त्यांनी माझी समजूत काढली… असच वाटलं

मात्र एक कोडं त्याला पडलं होतं. कालच्या त्या अंधाऱ्या भयाण रात्री.. वाऱ्यात… एवढ्याशा तेलात तो दिवा टिकला कसा?

विझला कसा नाही?

निघताना आई म्हणाली होती..

” देव आहे रे “..

आईच्या त्या देवानीच तो दिवा आपल्यासाठी पेटता ठेवला..

म्हणजे ” तो ” असतो तर…

जाणिवेचा एक छोटासा दिवा आज त्याच्या अंतरंगात पेटला होता.

त्याच्याही नकळत…

कालचा मनातला राग जाऊन कुठलीतरी एक आत्मिक शांतता आत्ता त्याला वाटत होती… माझ्याकडे अनुभव, कॉलिफिकेशन आहे. मी अजून नेटाने प्रयत्न करीन तो मनाशीच म्हणाला..

संकटात असतानाच त्याची प्रचिती येते.

त्या विझलेल्या दिव्याला… शेंदूर लावलेल्या देवाला मनोभावे नमस्कार करून तो घरी निघाला…

कालचा अंधारा रस्ता आता झगझगीत सूर्यप्रकाशानी ऊजळला होता…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जळता निखारा… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ जळता निखारा… — भाग – २ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(गौरीला फार वाईट वाटायचं. या सुंदर मुलीच्या नशिबी हे सुख लिहायला देव कसा विसरला. का असा शाप या निष्पाप जिवाला? ” गौरीच्या जिवाला घोर लागायचा.)

इथून पुढे – – 

आता प्रसन्न रिटायर झाला. आजपर्यंत त्या दोघांना कुठेही ट्रीपला, बाहेर जाता आलं नाही.

यावेळी मात्र गौरी म्हणाली, “ आपण जाऊया ना हो एकदा तरी परदेशी ट्रीपला. कधीही गेलो नाही आपण दोघेच असे. आपल्या सोसायटीतल्या बर्वे गोखले फॅमिली जात आहेत दोघे दोघे. जायचं का आपण? ”

प्रसन्न म्हणाला, ”अग पण मग विभाचं काय करायचं? का तिला घेऊन जायचं? ”

“नको नको. आपणच जाऊ की हो फक्त दोघे. फक्त एकच महिन्याचा प्रश्न आहे. येताना आपण माझ्या मावस बहिणीकडे पण लंडनला जाऊन येऊ. किती वर्षे ती तिकडे आहे आणि आपल्याला बोलावतेय की. असे फक्त महिनाभर जाऊन येऊया. मी शुभाला विचारू का? विभाला महिनाभर ठेवून घेतेस का तुझ्या घरी? ती नाही म्हणायची नाही असं वाटतंय. ”

प्रसन्न म्हणाला, “ बघ विचारून. पण जमणार नसेल तिला तर मग आपल्याला जाता येणार नाही गौरी.”

शुभाचा बंगला मोठा होता. मागे पुढे अंगण, छान बाग, मागे झोपाळा. नशीब काढलं होतं शुभानं. गौरीच्या मनात आलं.

गौरी शुभाच्या घरी गेली. शुभाला सुट्टीच होती त्या दिवशी. तिच्या सासूबाईंनी स्वागत केलं शुभाचं.

”या या गौरीताई. किती दिवसानी आलात. साहिल ची आठवण येते की नाही? बघा तरी किती गुंड झालाय हल्ली.” साहिलला झोपाळ्यावर घेऊन बसत त्या हसून म्हणाल्या.

गौरी हसत म्हणाली ”नाही कशी येत या गुंडूची आठवण.. पण शुभा आणते ना दर रविवारी त्याला. रमतो अगदी तो “ 

गौरी आत गेली. शुभाच्या बेडरूममध्ये दोघी बसल्या.

“काय ग आई? आज अचानकच? ”

“शुभा, तुला एक विचारायचं होतं. अग आपल्या सोसायटीतली जोडपी चालली आहेत युरोप ट्रिप ला. आम्हाला आग्रह करत आहेत या म्हणून. मग तसेच लंडनला तुझ्या शशीमावशीकडे जाऊन येऊ.

तर तो महिना विभा तुमच्याकडे राहू देत का? म्हणजे मला अजिबात तिची काळजी रहायची नाही. तिला एकटीला कशी सोडू आपल्या घरी मी? ” गौरीच्या डोळ्यात पाणी आलं.

शुभा तिच्याजवळ बसली. ”आई, जरूर जा तुम्ही. मी नक्की संभाळीन विभाला. त्यात काय एवढं ग? सासूबाई पण नाही म्हणणार नाहीत. एकच महिन्याचा तर आहे ना प्रश्न? जा तुम्ही. तसेही तुम्ही कुठेच जाऊ शकत नाही ग विभामुळे. ओळखीचे लोक जात आहेत तर जरूर जा.”

निर्धास्त होऊन गौरी घरी आली.

संध्याकाळी शुभाने समीरला सांगितलं. ” आपल्याकडे विभाला महिनाभर येऊ दे ना? आईबाबांना बिचाऱ्यांना कधीच कुठं जाता येत नाही. मी हो म्हटलं म्हणून तू रागावला नाहीस ना समीर? ”

समीर म्हणाला, “फार गुणी आहेस तू शुभा. याच तुझ्या सरळ साधेपणावर मी भाळलो ना? अग येऊ दे तिला. मी कसा रागावेन तुझ्यावर?”

आणि मग गौरी प्रसन्न निर्धास्त मनाने, विभाला शुभाकडे पोचवून ट्रीपला गेले.

शुभाच्या सासूबाईंना विभा आलेली फारसं रुचलं नाही असं वाटलं शुभाला. एरवी त्यांचं आणि शुभाचं अतिशय पटायचं. होत्याच त्या हुशार आणि मनमिळाऊ. शुभा सारखी गोड मुलगी घरात आल्यावर त्यांना आनंदच झाला. समीर एकुलता एक असल्याने त्यांची मुलीची हौस राहिलीच होती. दोघी सासू सुना खूप मजा करत. खरेदी करायला बरोबर जात. हॉटेलात दोघीच जाऊन छान एन्जॉय करत. कदाचित आपण त्यांना न विचारताच विभाला इकडे आणलं म्हणून त्यांना राग आला असेल असं म्हणून शुभाने तो विषय कानामागे टाकला.

विभा पहिल्यांदा बुजली पण मग रुळली शुभाच्या घरात. छोटा साहिल तर सतत तिच्या बरोबर असायचा. त्याला घेऊन ती झोपाळ्यावर बसली की सासूबाई काहीतरी काम काढून तिच्याजवळ बसायच्या. न जाणो, चुकून तो हिच्या हातून पडला तर?

त्या दिवशी शुभाला ऑफिस चं काम होतं म्हणून ती ऑफिसला गेली आणि समीर घरीच होता. विभा एकटीच बागेत झोपाळ्यावर बसली होती. मोठे झोके घेत असताना तिची ओढणी वाऱ्यावर उडत होती. केस मोकळे सुटून झोक्याबरोबर पंख्यासारखे पसरत होते. तिचा चेहरा आनंदाने फुलून लालबुंद झाला होता नुसता. अनिमिष डोळ्यांनी समीर तिच्याकडे बघत उभा होता. काहीतरी कामासाठी सहज बागेत आलेल्या सासूबाईंनी समीरकडे बघितलं. विभाकडे बघत असलेली त्याची नजर त्यांना वेगळंच सांगून गेली. आपल्या आईची चाहूल लागताच, तिची नजर चुकवत समीर घरात निघून गेला. सासूबाईंच्या पोटात धस्स झालं पण तरीही असं नसेल म्हणून त्यांनी आपल्या मनाची समजूत घातली. विभाचं अप्रतिम लावण्य कोणालाही भुरळ घालेल असंच होतं.

त्या दिवशी ती बागेत झाडांना पाणी घालत होती. तिचा घरातलाच गाऊन भिजून गेला होता. वर खोचलेल्या गाऊन मधून तिचे गोरेपान नितळ गुडघे आणि पोटऱ्या दिसत होत्या. पुन्हा एकदा सासूबाईंना समीर तिच्याकडे भान हरपून बघताना सापडला. पुन्हा त्यांची नजरा नजर झाल्यावर समीर आत निघून गेला. आता मात्र सासूबाई बेचैन झाल्या. चाणाक्ष आणि अनेक पावसाळे बघितलेल्या त्या बाईना हे लक्षण ठीक दिसलं नाही.

त्यांना शुभाशी एकटीला बोलायची संधी मिळत नव्हती. अचानक, त्या दिवशी समीर घरी नव्हता पण शुभा घरात एकटी होती. , साहिलला घेऊन त्याला संभाळणारी मुलगी आणि विभा बागेत गेल्या होत्या. सासूबाईंनी शुभाला हॉल मध्ये बोलावलं.

“शुभा, जरा आपला चेहरा आरशात नीट बघितला आहेस का? किती ओढलेला चेहरा, हे कळकट गाऊन, कधी केस नीट शेप देऊन कापलेले नाहीत. बघते आहेस ना?” 

हसून जवळ बसत शुभा म्हणाली, “ हे काय आज सासूबाई? मी नेहमीचीच तर आहे तुमची शुभा”

सासूबाई गंभीरपणे म्हणाल्या, ”हो. पण गोष्टी बदलण्याच्या आत डोळे उघडून बघ बायो. तू विभाला घरी आणलं आहेस ते चांगलंच केलंस. ती आणि तू जुळ्या बहिणी ना? तिचा चेहरा, कांती रूप बांधा कुठेही जराही धक्का लागलेला नाहीये. आणि तू? बघ निरखून स्वतःकडे शुभा. तिची थोरली बहीण दिसतेस तू हल्ली. ”.. त्यांनी काय झालं आणि स्वतः पाळत ठेवून बघितलेलं तिला सांगितलं.

“ शुभा, माझा मुलगा लाखात एक आहेच ग. पण शेवटी तो पुरुष आहे बाळा. त्या रूपाचा त्याला मोह पडणारच. ती आहेच तशी अप्सरा. हे बघ माझ्या सुने, काही विपरीत घडायच्या आत ही जोखीम तू आईबाबांकडे नेऊन पोचवावीस हे उत्तम. दोन दिवसात ते येत आहेत ना? आता हिला अजिबात जास्त ठेवून घेऊ नकोस. तिला बुद्धी कमी आहे, समज उणी आहे हे असलं तरी तारुण्य मुसमुसतं आहे नुसतं. पुरुषाला हेच फक्त हवं असतं मुली. फक्त सुंदर शरीर. तू वेळीच शहाणी हो. विपरीत घडूच देऊ नकोस. अग बाईसारखी बाई असून मला तिच्याकडे बघावंसं वाटतं, तर समीर तर पुरुष आहे बेटा.

हा जळता निखारा घरी आणून आपल्याच सुखी संसाराला आग नको लावू शुभा. पटतंय का? आणि आत्ताच नव्हे तर पुन्हा कधीच आणून विषाची परीक्षा बघू नकोस मुली. अडचण असली तर तू माहेरी रहायला जात जा पण ही जोखीम इथे आणू नकोस. ”

.. शुभा तिथून उठून गेली.

रात्री तिने निष्पापपणे झोपलेल्या आपल्या बहिणीकडे बघितलं. झोपेत तिचा गाऊन वर गेला होता आणि मांड्या उघड्या पडल्या होत्या. केस डोळ्यावर महिरप करत होते आणि निरागस विभा झोपेत हसत होती. शुभाने तिचा गाऊन खाली केला. हळुवारपणे तिला मायेने पांघरूण घातले. अत्यंत प्रेमाने तिचा पापा घेतला. सगळ्या जगाची माया तिच्या पोटात दाटून आली. या भाबड्या जिवासाठी तिचा जीव नुसता कासावीस झाला.

दुसऱ्याच दिवशी शुभाने विभाला मार्केटमध्ये नेले. ती अगदी हरखून गेली. तिला शुभाने कितीतरी छान ड्रेस गाऊन, कायकाय तरी घेऊन दिले. नव्या लेदरच्या बॅगमध्ये हे सगळं भरलं.

“सासूबाई, आज विभाला आईबाबांकडे पोचवून येते हं. ” भरल्या डोळ्यांनी शुभा म्हणाली.

तिने त्यांना मिठी मारली. “ थँक्स थँक्स सासूबाई. माझ्या हे कधीही लक्षात आलं नसतं हो. जग माझ्या सारखं सरळ साधं आहे असंच वाटतं हो मला. पण तुम्ही किती शहाण्या आहात. थँक्स. मला सावध केल्याबद्दल. आणि वेळीच माझा संसार वाचवल्या बद्दल पण. मी आता जरा स्वतःकडे पण लक्ष देईन “.

शुभाने आपली कार काढली आणि विभाला शेजारी बसवून म्हणाली,

“ चला! जायचं ना आपल्या आईबाबांकडे?”

– – आणि वळणं घेत शुभाची कार माहेरच्या रस्त्याला लागली.

– समाप्त – 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ जळता निखारा… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ जळता निखारा… — भाग – १ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

लग्नानंतर चार वर्षांनी दिवस गेल्यावर गौरी अगदी हरखून गेली. किती वाट बघत होती ती या दिवसाची. प्रसन्न सुद्धा अगदी खूष झाला. गौरीच्या सासूबाईंना तिला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं. माहेरी आईवडील आनंदी झाले.

पाचव्या महिन्यात सोनोग्राफी झाल्यावर समजलं, गौरीला जुळी बाळं होणार आहेत. गौरी घाबरून गेली. एकदम दोन मुलं कशी काय वाढवायची म्हणून तिला भीतिच वाटली. पण सासूबाई आई म्हणाल्या, त्यात काय ग घाबरायचं?आम्ही आहोत ना?होईल सगळं छान. आनंदात रहा आता.

सगळीकडची कौतुकाची डोहाळजेवणे सगळं पार पडलं. यथावकाश गौरीला दोन जुळ्या मुली झाल्या. किती छान होत्या त्या. पण अगदी वेगळ्या दिसत होत्या. एक गोरीपान आणि दुसरी सावळी.

गौरी आणि प्रसन्न, बाळांना घेऊन घरी आले.

सासूबाईंनी भाकरतुकडा ओवाळून टाकला आणि गौरी घरात आली.

दोन दोन बाळं संभाळताना तिचा जीव मेटाकुटीला यायचा. पण दोघी मुली शांत होत्या.

तीन महिन्यांच्या झाल्यावर मुलींचं जोरदार बारसं केलं आणि शुभा विभा अशी जोडीच्या बहिणींची नावंही जोडीची ठेवली त्यांच्या आत्याने.

दिवस भरभर पळत होते नुसते.

शुभा दिसायला सावळी, नाकडोळे नीटस पण अगदी सामान्य होती दिसायला. विभा मात्र गोरीपान सुंदरच आणि कुरळे केस किती सुंदर दिसत तिला. बघणारे म्हणत, या जुळ्या आहेत?अजिबातच वाटत नाही. किती वेगळ्या आहेत हो या दिसायला.

मुली जसजशा वाढत होत्या तसं गौरीच्या लक्षात येऊ लागलं, विभाची प्रगती व्हावी तशी होत नाहीये. शुभा पालथी पडून सरकायला लागली तरी विभा अजून कुशीला वळत नाही. तिने मुलांच्या डॉक्टरांकडे विभाला तपासायला नेले. त्यांनी नीट तपासले आणि म्हणाले, मला वाटत हिच्या मेंदूची जरा कमी होतेय. ही स्लो लर्नर व्हायची शक्यता आहे. बघूया आपण. पण लक्ष ठेवा. काही औषधे देऊन त्यांनी गौरीची पाठवणी केली.

गौरीला हा शॉकच होता. एक मुलगी चपळ, सगळे तिचे माईल स्टोन्स सुंदर आणि दुसरीची प्रगती कासवाच्या गतीने होतेय. पण त्यावर इलाज नव्हता. जसजशा मुली मोठ्या व्हायला लागल्या तशी विभा आणखीच सुरेख दिसायला लागली.

गौरीने उत्साहाने दोघींना जवळच्या नामांकित शाळेत प्रवेशासाठी नेले. शुभाला त्यांनी लगेचच प्रवेश दिला. विभाला प्रश्न विचारले. , तिला ते समजलेही नाहीत. ती नुसती बघत उभी राहिली. प्रिंसिपल बाईनी गौरीला सांगितलं, “सॉरी मिसेस गोरे. या मुलीला आम्ही ऍडमिशन नाही देऊ शकत. तुम्ही हिला स्पेशल स्कूललाच घाला. शुभाला दिलीय आम्ही ऍडमिशन. , “

गौरी घरी आली. आता हे सत्य तिला स्वीकारणं भागच होतं.

प्रसन्नला तिने हे सांगितलं. त्यालाही याचा धक्का बसला. पण म्हणाला, “घालूया आपण विभाला त्या शाळेत. तिथे चांगली प्रगति होईल तिची. , असा धीर नको सोडू गौरी. मी कायम आहे तुझ्या बरोबर. ”

दोन मुली वेगवेगळ्या शाळेत जायला लागल्या. शुभाची शाळेत छानच होती प्रगति.

विभा रोज शाळेत जायची. गौरी जीवतोड मेहनत करून तिचा अभ्यास घ्यायची. पण एकेक गोष्ट शंभर वेळा शिकवून सुद्धा विभाच्या लक्षात ते राहीलच अशी खात्री नव्हती. कशीबशी विभा आठवी पर्यंत गेली.

शुभा अतिशय उत्तम गुण मिळवून कॉलेजला गेली.

गौरीच्या पोटात तुटे, आपल्याच दोन मुलीतला जमीन अस्माना एवढा फरक बघून.

शुभासुद्धा खूप काळजी घेई आपल्या बहिणीची, तिला वेळ होईल तशी.

एकदम बघितल्यावर विभाला समज कमी आहे हे पटकन लक्षात येत नसे. त्यातून तिचे अप्रतिम रूप नजरेत भरण्यासारखे. पण चार वाक्य बोलली की समजायचं काहीतरी गडबड आहे या मुलीत. समोरचा हळहळ करायचा. पण गौरी, शुभाने कधीही तिला कमी लेखलं नाही. त्या दोघी तिला सगळीकडे घेऊन जात आपल्याबरोबर.

विभा अजूनही शाळेच्या कार्यशाळेत जात होती. तिथे मेणबत्त्या करायला, छोटी कामे करायला शिकवत या मुलांना. हळूहळू का होईना, विभाच्या लक्षात शिकवलेल्या गोष्टी येत आणि सरळ सरळ असेल ते ती करू शके. त्याचे थोडे पैसेही तिला शाळा देत असे.

शुभा एमबी ए उत्तम तऱ्हेने पास झाली आणि तिला एका छान कंपनीत चांगला जॉबही मिळाला. समीर तिच्याच टीम मध्ये काम करणारा इंजिनीअर मुलगा. रोज त्यांची कामानिमित्त भेट होत असे. जरी त्यांची डिपार्टमेंट्स वेगळी असली तरी लंच ला, किंवा मीटिंग्जना ते भेटत असत.

अचानक समीरने एक दिवस शुभाला विचारलं, ”शुभा, तुझा लग्नाचा काय विचार आहे?कुठे ठरलंय का?”

शुभा गंभीर झाली. ”समीर, तुला मी कधी सांगितलं नाही. मला जुळी बहीण आहे. विभा तिचं नाव. दुर्दैवाने ती गतिमंद आहे रे. अगदी मतिमंद नाही पण स्लो लर्नर आहे. मी कसा विचार करू लग्नाचा?आई बाबांनंतर तिची जबाबदारी माझ्यावरच येणार. आत्ता ठीक आहे रे. पण नंतर काय होईल मला माहीत नाही. ”शुभा खिन्न होऊन म्हणाली.

दुसऱ्या दिवशी समीर तिला पुन्हा भेटला. ”आपण तुमच्या घरी जाऊ शुभा. मी तुझ्या आईबाबांना भेटतो आणि बघतो तुझ्या बहिणीलासुद्धा. पण मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे शुभा. मला आवडतेस तू.”

पुढच्या आठवड्यात समीर, त्याचे आईवडील शुभाच्या घरी गेले. त्यांनाही शुभा आवडली होतीच.

गौरी आणि प्रसन्नने त्यांचे मनापासून छान स्वागत केलं. विभाला आतून बोलावलं. विभा येऊन आईशेजारी बसली. समीर त्याचे आईबाबा विभाच्या देखण्या रुपाकडे बघतच राहिले.

गौरीने तिला सांगितलं, ” विभा, या डिशेस कप ट्रे आत ठेव हं नीट. ”

विभा आत गेल्यावर गौरी म्हणाली, ” ही माझी दुसरी मुलगी विभा. वरून समजत नाही पण ही स्लो लर्नर आहे. हिची कोणतीही जबाबदारी आम्ही शुभावर पडू देणार नाही. तिच्यासाठी आम्ही भरपूर पैसे ठेवणार आहोत. पण ही अशी आहे हे सत्य आम्ही कोणापासून लपवणार नाही. आता निर्णय तुम्ही घ्या. ”

समीर घरी गेला. त्याचे आईवडील म्हणाले, ”अरे समीर कशाला करतोस ही मुलगी?पैसे कितीही ठेवलेले 

असले तरीही शेवटी तिची जबाबदारी शुभावर येणारच. बघ बाबा. शुभा छानच आहे. पण तरी पुन्हा नीट विचार कर बाबा. ”

पण समीरचा निर्णय पक्का होता.

चार महिन्यांनी एका चांगल्या मुहूर्तावर शुभा समीरचं लग्न गौरी प्रसन्न ने अगदी थाटामाटात करून दिलं. भरल्या डोळ्यांनी शुभा सासरी गेली.

काळ कोणासाठी थांबतो?

शुभाला दिवस गेले आणि योग्य वेळी तिला छान मुलगा झाला. अगदी छान नॉर्मल मुलगा बघून सगळ्याना आनंद झाला. छोट्या साहिल ची प्रगति बघून गौरीने सुटकेचा निश्वास टाकला.

कुठेतरी मनातून तिला भीति होती, न जाणो, शुभाचं बाळ विभासारखं गतिमंद नाही ना होणार?

पण तसं झालं नाही. साहिल एकदम नॉर्मल बाळ झाला. त्याचे वेळच्यावेळी रांगणे, मान सावरणे, थोडे शब्द बोलणे गौरीला सुखावून जाई.

विभासुद्धा बाळाजवळ बसे त्याला खेळणी दाखवे. त्याची दुपटी बदले. गौरीला फार वाईट वाटायचं. या सुंदर मुलीच्या नशिबी हे सुख लिहायला देव कसा विसरला. का असा शाप या निष्पाप जिवाला?” गौरीच्या जिवाला घोर लागायचा.

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कान – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ कान – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

(हास्यविनोद करतांना घरात एकच हास्यकल्लोळ उडायचा. बाबांना काही एक समजत नसे. त्यांना वाटायचे की त्यांच्या घरातली माणसे देखील त्यांची खिल्ली उडवण्यात मागे पुढे पाहत नाहीत.)

इथून पुढे – – – 

उजव्या कानाच्या मागे हात ठेऊन ते त्याला पुढे ओढण्याचा प्रयत्न करायचे. जणू कांही आपल्या कानालाच ते बजावत, -” जा रे बाबा, कांही ऐकू येत असेल तर बघ. ” पण अडेलतट्टू आणि नालायक मुलासारखा त्यांचा कान वळून बघत परत सरळ व्हायचा, जणू एखादे रंगहीन आणि अर्थहीन बिना पत्त्याचे पत्र उलट टपाली घरी परत यावे. डावा कान देखील उजव्या कानाचे अनुकरण करायचा. कुठल्याही आवाजाशी देणे घेणे नसलेला तो कुठलाच संदेश पोहोचवायचा नाही. वैतागून जणू त्यांना शिक्षा देण्यासाठी बाबा आपल्या दोन्ही कानांना ओढत बसायचे. पण खरे तर ती शिक्षा त्यांच्यासाठीच होती.

कित्येकदा तर समोर बसलेल्या माणसाला बघून बाबा हसण्याचा अभिनय देखील करत, इतके पोकळ हास्य की त्यामुळे ते स्वतःच आतून पूर्णपणे कोलमडून पडत. समोरच्या माणसाशी ते इतक्या जोराने बोलत की तो घाबरून जाई. ते अजून काय करू शकत होते? त्यांना वाटायचे की ते हळू बोलले तर समोरचा माणूस ते ऐकू शकणार नाही. त्यांचे पौरुष वैतागून चिडचिड करायचे. घरातील सदस्य त्यांच्यापासून नजर चोरायचे. ह्या लहान लहान गोष्टी असूनही त्यांना खूप तीव्रतेने टोचायच्या, त्यांना मनातल्या मनात सतत सलत राहायच्या. या मानसिक यातना सतत झेलत राहिल्याने त्यांच्या स्वभावात बदल झाला तो कायमचाच! पांढरेसफेद कडक इस्त्रीचे कपडे बाबांच्या मनातील सुरकुत्यांना मात्र वाचवू शकत नव्हते. मनावर पडलेल्या त्या मोडक्या तोडक्या अढ्या आणि सुरकुत्या कधी कधी बाहेर येऊन त्यांच्या वैयक्तिक जीवनाला आपल्या आडव्या तिडव्या रेषांमध्ये गुंतवून ठेवीत.

बाबा जिवंत असतांना त्यांच्या या असहायतेबाबत कुणी कधीच विचार केला नव्हता, ना शीनाने, ना तिची लहान बहीण बीनाने. शैलू तर तसाही बाबांबद्दल कधीच विचार करीत नसे. बाबाच काय, कुणाचाही विचार करणे त्याच्या स्वभावातच नव्हते. उरली ती आई, ती सदासर्वदा घरकामांत अडकून बसलेली असे. बाबांच्या या नैराश्याला त्यांच्या स्वभावाचेच एक अंग मानून ती गप्प असे. आपल्या लाडक्या मुलाला, शैलूला तर ती कधीच नाराज करीत नसे. उलट त्याला समजावत ती म्हणे, “बेटा, तू आपल्या बाबांना तर ओळखतोस ना! त्यांना रागवायची सवयच आहे. ” 

बाबांची ही तीक्ष्ण वेदना त्यांच्या स्वभावात भिनली होती. त्यामुळे त्यांच्या एकाकीपणाला आणखीनच खतपाणी मिळत होते. त्यांच्या कानाच्या या अकार्यक्षमतेने त्यांना कुठेच थारा मिळत नव्हता, अगदी घरीही. बाबा शेवटच्या श्वासापर्यंत एका विचित्र अव्यक्त कोंडमाऱ्यात जीवन कंठीत होते. फक्त मृत्यूद्वारेच या दुष्टचक्रातून त्यांची सुटका होऊ शकली. त्यांची सर्वात जीवघेणी व्यथा ही असावी की त्यांचे दुःख कोणीही समजू शकत नव्हते. त्यांचे तक्रार करणारे डोळे आईलाही म्हणायचे – “किमान तू तरी मला समजून घे! ” 

आई आपल्या लाडक्या मुलाच्या चिडचिड करण्याचे यथायोग्य कारण देत बाबांच्या शांततेत भरच घालीत असे. शीनाला देखील आपल्या बाबांचे दुःख तेव्हा जाणवले जेव्हा तिला स्वतःला कमी ऐकू यायला लागले. दिवसाच्या कित्येक वेळा जेव्हा तिला नीट ऐकू येईना, तेव्हां त्या प्रत्येक क्षणी बाबांचा अगतिक चेहरा तिच्या मनाच्या आत खोलवर सामावून जात असे. तेच दुःख कित्येक पटीने वृद्धिंगत होत आतल्या आत तडफडत असे. परदेशात वास्तव्यास असतांना पहिल्या मुलाच्या जन्मानंतरच तिला हे जाणवू लागले होते. कोण काय बोलतंय हे तिला नीटसे समजत नव्हते. दुसऱ्यांचे शब्द जणू रेशमी धाग्यांसारखे एकमेकांत गुंतत जायचे. या रेशीमगाठी सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न करतांना त्यांची गुंतागुंत आणखीनच वाढत जाई. त्या अर्थहीन शब्दांचे अनेक असंबद्ध अर्थ निघायचे. ती कधी काहीतरी बोलत असे, तर कधी कांहीच बोलू शकत नसे. जग आपली थट्टा करेल याची तिला भीती वाटत असे. कित्येकदा कोणी कांहीही बोलले किंवा विचारले तरी ती आपली मान हलवून सहमती दर्शवायची. मग ती प्रश्नार्थक नजरेने समोरच्या माणसाकडे पाहायची जणू तिच्या कानांनी कदाचित बरोबर अंदाज लावला असावा. पहिल्यांदाच, अशाच कांही न ऐकू येण्याच्या प्रसंगावर तिच्या स्वतःच्या पतीने म्हटले होते – “तुला कामाची गोष्ट बरोब्बर ऐकायला येते. बाकीच्या गोष्टी मात्र ऐकू येत नाहीत. ” 

त्या क्षणी, तिच्या अकार्यक्षमतेच्या तीव्र पीडेमुळे तिला जाणीव झाली की बाबूजींनी आयुष्यभर किती मानसिक त्रास सहन केला असेल, जेव्हा की शीनाला हे सर्व जास्त काळ सहन करावे लागले नाही. जोवर हा जनुकीय दुष्परिणाम शीना आणि बीना या दोन मुलींपर्यंत पोहोचला, तोवर वैद्यकशास्त्राची प्रगती घराघरात पोहोचली होती. शीनावर एक लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आमोरासामोर होणारे संवाद चांगल्या प्रकारे सुरु झाले होते. बस, कोण्या इतर खोलीतून आवाज आला तर ऐकायला येणे कठीण जायचे. शीनाच्या शस्त्रक्रियेनंतर बीनावर देखील असाच शल्योपचार करण्यात आला. मात्र शस्त्रक्रियेनंतरही नीट ऐकू न येण्याची भावना संपूर्णपणे कधीच नाहीशी झाली नाही. आजही असे अनेकवार असे घडते. ऐकू आल्यानंतरही असे वाटत राहते की कदाचित आपल्याला ऐकू आले नाही.

या फलकावर ‘कर्णबधिर मूल’ असे शब्द वाचताक्षणी, त्या सर्व आठवणी ताज्या होऊन एकामागून एक अखंडपणे पाझरू लागल्या. त्या मुलाच्या वेदनेशी एकाकार होऊन आत खोलवर दबलेले अतीत उकरताच त्याची टोकदार टोचणी तिला सलायला लागली. जेव्हा शरीराचा कोणताही भाग त्याच्या कर्तव्यापासून विमुख होतो तेव्हा मानवी मेंदू किती एकाकी होत असतो, असहाय्य आणि विवश! जर हे मूल जन्मापासूनच बहिरे असेल तर ते त्याचे आयुष्य कसे कंठणार कोणास ठाऊक! आता तर म्हणे ए आय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची देखील मदत मिळू शकते. या मुलाबाबत कदाचित असे झालेले नसावे. म्हणूनच तर सरकारकडून हे फलक लावण्यात आलेले आहेत. कोणाचाही आवाज न ऐकता माणूस कसा जगू शकतो! अशा परिस्थितीत तो आयुष्यभर स्वतःशीच बोलेल. स्वतःच ऐकेल आणि स्वतःच उत्तर देईल!

 आवाजाशी पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या त्या निरागस मुलासाठी हा शब्द निरर्थक होता. या मार्गावरील प्रत्येक घरावरून जातांना शीनाला विचार करीत होती की, हे मूल कुठल्या घरात राहत असेल. तिला त्याला एकवार तरी बघायचे होते. तिला स्वतःचे दुःख त्याच्यापुढे व्यक्त करायचं होतं. त्याला सांगायचं होतं की येणारे दिवस त्याच्यासाठी कसे असतील? किंवा ऐकू न येताही तो पेन, ब्रश, छिन्नी-हातोडा किंवा इतर कोणत्याही कलेच्या माध्यमातून आपली क्षमता सिद्ध करू शकेल. जिथे त्याला स्वतःला बोलावे लागणार नाही, तिथे त्याच्या कलेनेच शब्द धारण करावेत, अशा शब्दांनी लोकांना मोहून घ्यावे आणि प्रशंसा करणाऱ्या कैक लोकांच्या डोळ्यांतून त्याचे कौतुक ओसंडून वाहावे. त्याला या माध्यमातून जे जे बोलायचे आहे ते ते समजून घेण्याचा त्या रसिकांनी प्रयत्न करावा.

ओठांच्या आकारावरून कितीतरी शब्द समजू शकतात! सांकेतिक भाषेचीही त्याला मदत होईल. पण हजारोंपैकी फक्त एकालाच त्या सांकेतिक भाषेचे ज्ञान असू शकते. आज, जेव्हा मुले त्यांचा बहुतेक वेळ आयपॅड आणि फोनच्या सानिध्यात घालवत असतात, तेव्हा हे मुलाचे जग त्याच्या मूक जगात बंदिस्त राहिले असावे.

आधी तर तिला त्या रस्त्यावर एकही मूल दिसले नाही, आणि तिने एखाद्याला पाहिले तरी तिचे मन अंदाजच लावीत बसायचे की कदाचित हा मुलगा तोच तर नव्हे! तिच्या विचारांच्या गुंत्यात सायकल चालवणाऱ्या, हॉर्न वाजवणाऱ्या, समोरच्या वाहनाशी टक्कर झाल्यानंतर खाली पडणाऱ्या मुलाच्या अपघाताच्या भयंकर दृश्यांची मालिकाच दृश्यमान व्हायची. वेदनेचा सूर आणि स्वराचा राग एकच होता, यदाकदा वाजत असायचा. किंबहुना असेही म्हणता येईल की त्या स्वरात कुठलाच राग समाहित नव्हता. होती ती निव्वळ नीरव शांतता, बाबांच्या, तिचीच्या स्वतःची, तिच्या धाकट्या बहिणीची बीनाची, आणि त्या अज्ञात मुलासोबत 

अवचितपणे निर्माण झालेली अनुभूती, एकमेकांशी जोडलेली एक अनवरत वेदना!

भूतकाळातील आणि वर्तमानातील त्या क्षणांमागे वेड्यासारखे धावण्याची कित्येक कारणे समोर आली. या घाईगडबडीत धावतां धावता ऊर भरून येतांना आणि काळीज धडधडत असतांना शीनाच्या मनात अवचितच एक विचार आला -” ऐकू न येणाऱ्यांना निसर्गाने ती कर्णक्षमता दिलेली नसते. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांना ऐकू येत असतांना देखील ते ऐकत नाहीत. ऐकणाऱ्यांना ती क्षमता दिलेली असूनही बरेच लोक आहेत जे ऐकल्यानंतरही ऐकत नाहीत. ” त्यांच्यासाठी वापरल्या जाणारे सामान्यतः शब्द असत, “नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे”. अर्थात तुम्ही कांहीही आणि कितीही सांगितले तरी कांही लोक एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात. शीनाच्या मोठ्या भावाला, शैलूला बाबांनी कांहीही सांगितले तरी तो त्याकडे कानाडोळा करून चालला जात असे. प्रत्येक ठिकाणी असे कितीतरी शैलू असतील! शासन, सत्ता, खुर्चीने माजलेले शैलू!

***

आता फिरत असतांना जाणवणारी गुलाबी थंडी ऋतूपरिवर्तनाचे संकेत देत होती. काही दिवसांतच बर्फाच्छादित उंच सखल जमिनीवर अशा प्रकारचे चालणे पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलले जाईल. शीनाच्या पायांनी ‘कर्णबधिर मूल’ च्या फलकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून कधी मार्गक्रमण करायला सुरुवात केली हे तिचे तिलाही कळले नाही. तिने वाटेवरील चार पाचच घरे ओलांडली असतील, तेव्हां तिला एक लहान मुलगा त्याच्या वडिलांसोबत खेळताना दिसला. त्याचे वडील त्याच्या हाताच्या बोटांनी सांकेतिक भाषेत त्याला खेळाबद्दल काहीतरी समजावून सांगत होते. ते मूलही आपल्या डोळ्यांनी त्या संकेतांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याला आपल्या वडिलांच्या संकेतांचा अर्थ समजला आहे असे तो त्यांना संकेतांनीच समजावून सांगण्याचा आणि संवाद साधण्याचा यत्न करत होता. वडिलांचे बोलणे समजून उमजून त्यांना तो प्रतिसादही देत होता. त्याक्षणीच शीनाला वाटले की कदाचित हे तेच मूल असावे जे आपल्या वडिलांशी ‘सांकेतिक भाषेत’ बोलत होते.

त्याच क्षणी, त्या खेळणाऱ्या मुलाचा चेंडू घसरत येत शीनाच्या समोर येऊन पडला. तिने खाली वाकून चेंडू उचलला आणि मुलाला परत केला. मुलाने प्रेमभराने आभार व्यक्त करण्याचा संकेत करीत स्वतःचा उजवा हात आपल्या हनुवटीवर ठेवला. शीनाच्या डोळ्यांनीही तितक्याच प्रेमाने प्रतिसाद दिला. मुलाच्या त्या आभार मानण्याच्या गोंडस संकेतात जणू हरवून जात स्मितहास्य करीत शीनापुढे जात राहिली. तोवर तिला दुसऱ्या कोपऱ्यावरील तो फलक परत दृष्टीस पडला. आज मात्र त्या फलकावरील आकृती हसत खेळत, जिवंतपणाने रसरसलेली आणि चक्क बोलतांना दिसत होती. मुलाच्या डोळ्यातील चमक कुणास ठावे कशी त्या फलकात सामावून गेली होती. अत्यंत बोलके डोळे! पाहणारे, त्या नजरेतून शिकणारे, समजून घेणारे आणि त्यासोबतच ऐकणारे भावपूर्ण डोळे. त्या मुलाचे डोळे कानांची जबाबदारी देखील अतिशय उत्तमरित्या पार पाडायला शिकलेले आहेत हे बघून शीनाला अंतरंगात आत्यंतिक समाधान वाटत होते.

समाप्त

हिन्दी कथालेखिका : सुश्री हंसा दीप 

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कान – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ कान – भाग १ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

शीनाचे नवे घर असे कांही नवीन होते की जणू कांही पृथ्वीग्रहाच्या ऐवजी दुसऱ्याच एखाद्या ग्रहाच्या अंगणात पाऊल ठेवल्याचा भास होत होता. घरांच्या बाहेर माणसांच्या अस्तित्वाच्या कुठल्याच खुणा जाणवत नव्हत्या. रस्यावर मुलांच्या खेळण्याचा आवाज येत नव्हता. सडकेवर एकही प्रेमी युगल हास्य विनोद करीत रमत गमत फिरतांना दृष्टीस पडत नव्हते. रस्त्यावर ये जा करणाऱ्या माणसांनाच एखाद्या नैसर्गिक चमत्कारासारखे समजून एकही म्हातारबाबा घराबाहेरील व्हरांड्यात आरामखुर्चीवर रेलून आनंद घेतांना आढळत नव्हते.

रस्त्यांवर शांतता! घरांमध्ये शांतता! माणसांत देखील शांतता आणि फक्त शांतता!

इथला निसर्ग मात्र शांत नव्हता. वृक्षांच्या फांद्या सळसळणाऱ्या वाऱ्याचे आनंदाने स्वागत करीत त्याच्या तालावर ठेका धरीत झुलत होत्या. पुष्पसंभाराचे उमलणे आणि कोमेजणे अव्याहतपणे सुरूच होते. सुंदर फुलांची प्रतीक्षा करणाऱ्या अनेक लहानखुऱ्या वनस्पतींच्या अंगाखांद्यांवर कोवळ्या कळ्या फुटत होत्या तर दुसरीकडे पिकलेली पिवळी पानगळ गळून पडत होती.

शीना अस्वस्थ होती. इथे जीवन असल्याची समस्त लक्षणे होती, मात्र नीरव शांततेच्या गडद धुक्यात हरवलेली! शहराचे एक टोक २४ तास गजबजलेले, तर त्याच शहराचे दुसरे टोक निर्जन आणि उजाड! एकात उत्साहाने रसरसलेल्या जिवंत माणसांची गर्दी तर दुसऱ्यात नीरव मौनाची पडछाया. इतकं असूनही एकापेक्षा एक प्रशस्त बंगले कुणाचेही मन मोहून घेत, जणू सुंदर वास्तुकलेचे कॅनव्हासवर चितारलेले आकर्षक चित्रच! या विशाल बंगल्यांतून कोणी माणूस बाहेर पडेल अशा आशेने तिचे डोळे आसपास भिरभिरत. अरे हो, माणसे नाहीत पण एखाद दुसरी गाडी गॅरेज मधून बाहेर पडतांना किंवा आत शिरतांना दिसे. या आलीशान गाड्यांचे आवाजही आलीशान होते. कधी उगाचच चिरकी फट-फट नाही, तसेच चुकूनही पों-पों हॉर्नचा आवाज ऐकू येत नसे. कुठलाही कर्णकटू ध्वनी न करता या विशाल गाड्या लागलीच गॅरेजच्या स्वयंचलित दरवाज्यांमधून सर्रकन आत घुसत.

बर्फाच्छादित वातावरणाचा अनुभव घेतल्यानंतर आलेल्या आल्हाददायी सायंकालीन वेळी या मनुष्यविहीन मार्गिका बरंच कांही सांगून जात.

बंगल्यांच्या खिडक्यांतून हलकेच बाहेर डोकावणाऱ्या मंद प्रकाशामुळे तिथे माणसे वास्तव्य करून आहेत हे कळायचे. शहराच्या किनाऱ्यावर वसलेल्या या प्रशांत आणि निवांत परिसरास शीनाने पहिली पसंती दर्शवली होती, परंतु तो इतक्या प्रमाणात शांत आणि एकाकी असेल याचे तिला खूपच आश्चर्य वाटले.

इथे बरेच कांही नवीन होते. सहज फेरफटका मारतांना आता शीनाची नजर एका फलकावर पडली. तो एक असा फलक होता जो तिने यापूर्वी कधीही आणि कुठेही पाहिला नव्हता. साहजिकच चालता चालता तिचे पाय त्याच ठिकाणी खिळले. पिवळ्या रंगाच्या त्या फलकावर लिहिले होते “कर्णबधिर मूल”! त्या कोपऱ्यापासून दुसऱ्या टोकाला गेल्यावर देखील तसाच फलक उभारलेला होता. आता उत्सुकतेपोटी ती तिसऱ्या कोपऱ्यापर्यंत गेली आणि काय आश्चर्य! तिला तिथेही परत तसाच फलक आढळला. चार दिशांना जाणाऱ्या चारही रस्त्यांच्या कोपऱ्यांवर तोच फलक ठाण मांडून बसला होता. बहुदा या लांबलचक गल्लीच्या समोरासमोर असलेल्या घरांमधील कुठल्यातरी घरात असे मूल असावे ज्याला ऐकू येत नसेल. म्हणूनच त्या रस्त्यांवर ये जा करणाऱ्या वाहन चालकांसाठी हा एक संकेत सूचक फलक होता. त्यासोबतच त्यांना ताकीद असावी, की त्यांनी हे रस्ते ओलांडताना ही बाब कटाक्षाने लक्षात ठेऊन मंद गतीने वाहने चालवावीत.

… तो फलक निव्वळ एक फलक नव्हता, ना त्यावरील एक मुलाची आकृती एक निर्जीव आकृती होती! त्यामागील संदेश म्हणजे निसर्गाने दिलेला एक निर्मम आणि निर्दयी संदेश! एक नैसर्गिक विपदा, विवशतेच्या महासागराच्या कधी उसळणाऱ्या तर कधी माघारी वळणाऱ्या अजस्त्र लाटा. अशी असह्य पीडा, जिच्या संगतीनेच एका निर्व्याज बालकाला संपूर्ण आयुष्य कंठायचे आहे.

एकाएकी त्या फलकाआडून तिच्या बाबांचा चेहरा डोकावू लागला. तेच दुःख, तीच वेदना! तिच्याकडे टक लावून बघणारे विवशतेने भरलेले त्यांचे नेत्र शीनाला त्या दिवसांकडे परत घेऊन गेले. शीनाच्या बाबांनी कर्णबधिरतेचा शाप वर्षानुवर्षे भोगला. त्याच असहाय अवस्थेत ते आयुष्याचे उरलेले दिवस कंठत होते. शेवटी त्याचा शापाचे ओझे वागवीत त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या आनुवांशिक व्याधीचा प्रभाव शीनापर्यंत पोहोचला होता. इतकंच काय, बीना ही तिची लहान बहीण देखील याच व्यंगाने पीडित होती. जसजसे वय वाढत होते, तसतसे कानांनी ऐकू येणे कमी कमी होत होते. तिच्या कानांनी तर जणू असहकाराच्या पुकारला होता आणि कांहीही न ऐकण्याची जणू शपथच घेतली होती. आवाज ऐकू यायचे, पण त्यांचे अर्थ मात्र अनाकलनीय असत. तिचे कान जन्मापासून होते म्हणून आपल्या जागी निमूटपणे असण्याचे इतिकर्तव्य नाईलाजाने पार पडत होते, पण ज्यांच्याद्वारे कांही ऐकायला येत नसेल ते कान म्हणजे निरूपयोगी अस्तित्व विहीन अवयवच म्हणायचे.

ज्याच्यामुळे हा फलक लावला होता ते मूल कदाचित जन्मजात कर्णबधिर असावे. अगदीच ऐकू न येणे आणि कमी ऐकू येणे या दोहोंमध्ये बराच फरक असतो. दोन वेगवेगळ्या व्यथा. एकीत कानांनी कधी आवाज ऐकलेलाच नाही. सजावटीसाठी एखाद्या प्रदर्शनात मांडलेल्या निर्जीव वस्तूसारखे ते चेहेऱ्यावर ठेवलेले असतात. बस्स, त्याहून अधिक कांहीही नाही. दुसरीत तिच्या बाबांसारखी परिस्थिती! कोणे एके काळी कानांनी व्यवस्थित ऐकू यायचं, पण वाढत्या वयानुसार कानांनी ऐकू येणे हळू हळू कमी होत गेले. जणू काम करता करता एखादा मुलगा उद्धटपणे असहकार पुकारीत काम करायचे बंद करतो, त्याने पूर्वपदावर यावे यासाठी तुम्ही लाख प्रयत्न करता, पण सारे कांही उलट्या घागरीवर पाणी! अशा अवस्थेत कित्येक प्रकारचे ध्वनी फसफसून कानांशी आदळून परत जात. जणू समोरच्या माणसाने असे कांही षडयंत्र रचले आहे की त्याचा आवाज कानाच्या पडद्यापर्यंत पोचणारच नाही, आणि तसाच त्याच्याकडे परत निघून जाईल.

गतकाळाचे फिक्कट पिवळसर थर उलगडतांना शीनाचे विचार आता काळाच्या दरीत खूप खोलवर पोचले. त्या काळी भारतातील गावांत आवश्यक असलेल्या बऱ्याच वस्तूंचा तुटवडा जाणवत असे, मात्र शुद्ध हवा आणि स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असे. बहुतेक याच कारणामुळे आरोग्याच्या बाबतीत गाव सामान्यतः निरोगी होते. गावातील रहिवासी तंदुरुस्त, सशक्त आणि निरोगी होते.

मात्र इतके निरोगी वातावरण असूनही शीनाच्या स्वतःच्या मोठ्या घरात एक अव्यक्त व्यथा होती. कुणालाही ऐकू न येणारी वेदना, एकांतातील मुका विलाप! जर कोणी माणूस शारीरिक आजारामुळे अंथरुणाला खिळलेला असेल तर ते लगेच समजण्यासारखे आहे, मात्र जेव्हा एखादा चालताफिरता माणूस आतल्या आत आपल्या अदृश्य आजाराशी झुंजत असतो तेव्हा त्याला कोणाकडून सांत्वन कसे मिळणार? शीनाच्या बाबांचा आजारही असाच होता. त्यांचे असहाय जीवन दुःखात गेले. त्यांच्या आयुष्याचा संघर्ष विचित्रच होता, कारण त्यांना वर्षानुवर्षे ऐकू येतच नव्हते. शीनाला जेव्हांपासून समजायला लागले, तेव्हांपासून तिने त्यांना अशाच अवस्थेत पाहिले होते. बऱ्याचदा ते बोलणाऱ्याच्या हलणाऱ्या ओठांवरून अंदाज बांधायचे. तो काय बोलला, त्याने काय विचारले हे समजून घेण्याच्या आशेने ते त्याच्याकडे टकमक बघत बसायचे. वारंवार बोलणाऱ्याने आपल्या शब्दांची पुनरावृत्ती करूनही जेव्हा ती गोष्ट त्यांना ऐकू यायची नाही आणि म्हणून कळायची देखील नाही, तेव्हा ते अंदाजाने उत्तर द्यायचे. त्यांचे उत्तर बहुदा ८० टक्के चुकीचेच असायचे. पण त्यासोबतच त्यांचा आत्मविश्वास, हिम्मत, तीव्र इच्छाशक्ती हे सर्व ढासळून पडायचे. समोर असलेला माणूस गोंधळलेल्या अवस्थेत त्यांच्याकडे बघत राहायचा. तो असंतोषाने डोके हलवत असे आणि आतल्या आत कोलमडलेले तिचे बाबा देखील निराशेने डोके हलवीत बसत.

त्या काळात कुठल्याही प्रकारचे श्रवण यंत्र गावात पोचणे शक्य झाले नव्हते. उपचारांची देखील कोणतीच व्यवस्था नव्हती. त्या जमान्यात कोणी विचारही केला नसेल की अशा कामचुकार कानांना वठणीवर आणायचा देखील उपाय असू शकतो. कधी कधी तर बाबांच्या विचित्र आणि अप्रासंगिक उत्तराने समोरच्या माणसाची हसून हसून पुरेवाट होत असे. मात्र बाबा निष्कपटपणे त्याच्या तोंडाकडे फक्त बघत बसत. हसणाऱ्याचे तर हसू थांबत असे, मात्र त्यानंतरही बाबांच्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात त्या हसण्याचे आवाज घुमत असत. त्या तिरकृस्त क्षणांच्या टोचणीचे आवाज एखादा खिळा ठोकल्यासारखे त्यांच्या कानावर जोरजोरात आदळत असत…. ठक-ठक-ठक-ठक!

कानांत अव्याहतपणे वाजणाऱ्या या अनिश्चिततेच्या फुंकणीचे कर्कश आवाज इतर ध्वनी ऐकण्याची मुळी परवानगीच नाकारत असत. “काय? काय? काय? ” हे शब्द मुखात असे कांही ठाण मांडून बसत की, त्यांच्याशिवाय एकही प्रश्न त्यांच्या मुखातून बाहेर येत नसे. व्यवसायात, कामकाजात, दुकानात वगैरे वारंवार तेच तेच प्रश्न विचारीत ते आपले काम कसेबसे उरकत असत. मात्र घरी आणि नातलगांच्या घोळक्यात असतांना गप्पा गोष्टी करणे हे त्यांच्याकरता एखाद्या शिक्षेपेक्षा कमी नसे. कित्येकदा तर “माझी तब्येत बरी नाही” किंवा “कामासाठी बाहेर जायचंय”, असे सांगून उठून जात ते आपली सुटका करून घेत. त्या दिवशी बाबा मुद्दामच दुकानातून रात्री खूप उशीरा घरी परतत. तोंवर मुलेबाळे, इतकंच काय, आमची आई देखील झोपी गेलेली असे.

बाहरच्या लोकांना ते या ना त्या कारणाने टाळू शकत होते, मात्र त्यांना घरच्या लोकांचा सामना करावाच लगे. शैलू या त्यांच्या मोठ्या मुलाची चिडचिड त्यांना त्रस्त करीत असे, तीक्ष्ण काट्यांसारखी खोलवर रुतून जखम करीत असे. यासाठी ते स्वतःलाच अपराधी समजत. जणू त्याने सांगितलेली गोष्ट न ऐकू येणे हा त्यांचाच खूप गंभीर गुन्हा होता! बाबूजींपर्यंत आपले शब्द पोचवण्यासाठी शैलू खूप ओरडून बोलायचा. इतक्या जोरात की बाबा लगेच त्याला म्हणत, “ओरडू नकोस रे. ”

पुन्हा बोलावे लागू नये म्हणून तो आपली सर्व शक्ती एकवटून आणि आणखीनच आकांताने ओरडून त्यांना म्हणायचा, “असं जोरात ओरडल्यावरच तर तुम्हाला ऐकू येतंय”. असे आकांडतांडव करीत शैलू रागाने लाल झालेला नाकाचा शेंडा फेंदारीत फरशीवर धड धड पाय आपटत बाहेर चालला जात असे. धाडकन दरवाजा बंद केल्याचा आवाज नंतर कितीतरी वेळ खोलीत घुमत राहायचा. शैलूचे चिडचिड करणारे तरुण लालभडक डोळे बाबांच्या वयस्कर झालेल्या डोळ्यांना भिडल्यावर जणू आग ओकत असत. त्याच्या डोळ्यातले भाव बाबूजींना लगेच वाचता येत असत. झालेल्या अपमानाचा असा दारुण अनुभव आल्यावर त्यांच्या मनात क्रोध आणि निराशेसोबतच असहाय्यतेच्या गडद सावल्याही झाकोळून येत. अशा प्रकारे शैलूला दरवाजातून बाहेर जातांना बघत ते अपेक्षेने मागे वळून बघत. कदाचित आमच्या आईच्या नजरेत सहानुभूतीच्या रेषा दिसतील अशी त्यांना किमान आशा असे, कुणीतरी जखमेवर नरम कापसाचा बोळा हलकेच फिरावावा तशी! पण त्यावेळी त्यांना फक्त वळून मागे फिरणाऱ्या आईची पाठच नजरेस पडत असे.

तीन मुले आणि पत्नी, या आपल्याच कुटुंबीयांसमोर बाबा अगदी असहाय होऊन जायचे. घरातील इतर सर्वजण एकमेकांबरोबर गप्पा मारायचे. हास्यविनोद करतांना घरात एकच हास्यकल्लोळ उडायचा. बाबांना काही एक समजत नसे. त्यांना वाटायचे की त्यांच्या घरातली माणसे देखील त्यांची खिल्ली उडवण्यात मागे पुढे पाहत नाहीत.

– क्रमशः भाग पहिला 

हिन्दी कथालेखिका : सुश्री हंसा दीप 

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ दुभंग… — भाग – ३ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? जीवनरंग ❤️

☆ दुभंग… — भाग – ३ ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(नातेवाईक स्त्रियांपासून काहीशी दूर ती एकटीच एका कोपर्‍यात खुर्चीवर बसलेली होती. डाॅक्टरांचा चेहराही दुःखाने विदीर्ण झालेला. पण पुरूष आणि त्यातून स्वतः डाॅक्टर असल्याने ते संयम राखून होते. 

‘तिच्या वेदना बघवत नव्हत्या, त्यातून तिची सुटका झाली, ‘एवढंच ते बोलले.)  इथून पुढे – – – 

दिवसकार्य आटोपून डाॅक्टर परत हाॅस्पिटलला येऊ लागले. दोनच दिवसांनी त्यांना एका महत्त्वाच्या काॅन्फरन्ससाठी दिल्लीला जायचं होतं. आता सुकन्या एकटीच घरी कशी राहणार, म्हणून त्यांनी त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून स्वैपाक करणाऱ्या मावशींना रात्री तिच्यासोबत थांबायला सांगितलं होतं. इतर वेळी त्या रात्री आठनंतर घरी जायच्या. पण डॉ. च्या बायकोसोबत एक नर्स कायम घरात असायची. त्या दिवशी दुपारी दोन वाजता डाॅक्टर दिल्लीला निघून गेले. रात्री नऊ वाजता नंदिनीला त्यांचा फोन आला. सुकन्याला एकदम खूप ताप भरला होता आणि त्या स्वैपाकीण मावशी घाबरून गेल्या होत्या. तर नंदिनी त्यांच्या घरी जाऊन जरा सुकन्याला बघून आणि तिला औषध देऊन येईल का?  घरात औषधं आहेत पण त्या मावशींना काही इंग्रजी नीट वाचता येत नाही. 

नुकतीच जेवणं झाली होती आणि नंदिनी मागची आवराआवर करत होती. मुलं टी.व्ही. बघत होती. सासूबाई तिला म्हणाल्या, ‘मी आवरते बाकीचं. तू जाऊन ये तिकडे.’ तिनं मुलांना बाय केलं. सासऱ्यांनी बरोबर येऊ का विचारलं, पण नंदिनी एकटी जाईन म्हणाली आणि स्कूटी घेऊन पोचलीसुद्धा तिकडे वीस मिनिटात!

तिनं थर्मामीटर लावून बघितला तर सुकन्याला १०३ ताप होता. डाॅक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तिनं सुकन्याला गोळी दिली आणि ती तिच्याजवळ बसली. मावशींना थंड पाण्यात मीठ घालून आणि दोन रूमाल आणायला सांगितलं आणि सुकन्याच्या कपाळावर ती घड्या ठेवत राहिली. दीड तासानंतर घाम येऊन ताप १०१ पर्यंत उतरला. तापामुळे सुकन्यानं संध्याकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. मावशींनी स्वैपाक केला होता, पण त्याही जेवल्या नव्हत्या. नंदिनीनं त्यांना जेऊन घ्यायला सांगितलं, तोपर्यंत ती सुकन्या जवळ बसली. त्यांचं जेवण होईपर्यंत अकरा वाजले होते. नंदिनीला घरी परत जायचं होतं. सुकन्या कण्हत होती. पण तिला झोप लागल्यासारखं वाटत होतं. नंदिनीनं थर्मामीटर लावला तर ताप परत १०२ झाला होता. तिला तसंच सोडून कसं निघणार?  नंदिनीनं घरी फोन केला, सासूबाई तिला म्हणाल्या, ‘थांब तू तिथेच. घरची काळजी नको करू. तसंही रात्री एकटी घरी येण्यापेक्षा सकाळी तिला बरं वाटलं की ये. म्हणजे आम्हाला तुझीपण चिंता नाही. 

सुकन्याचा ताप वाढत होता. चार तासानंतर परत तिने सुकन्याला गोळी दिली. रात्रभर ती सुकन्याच्या कपाळावर पाण्याच्या घड्या ठेवत राहिली. मावशी तिथेच खाली अंथरूण घालून आडव्या झाल्या होत्या. पहाटे साडेपाचनंतर ताप पूर्ण उतरला आणि सुकन्या शांत झोपली. नंदिनीचा तिथेच खुर्चीवर बसल्या बसल्या डोळ लागला. तिला जाग आली तेव्हा आठ वाजले होते. तिनं गडबडीनं घरी फोन केला. मुलं डबा घेऊन शाळेला गेली होती. मावशींनी नंदिनीला चहा आणून दिला. तोंड धुवून चहा घेतल्यावर तिला जरा फ्रेश वाटलं. मग मावशींना विचारून 

स्वैपाकघरात जाऊन, तिनं तूप-मीठ घालून भाताची पेज बनवली आणि सुकन्याचं काही एक न ऐकता तिला जबरदस्तीने ती भरवली. नंतर तिला आराम करायला सांगून नंदिनी घरी गेली. मावशी तिथेच थांबणार होत्या डाॅक्टर येईपर्यंत. 

नंदिनी घरी येऊन आवरून अकराच्या सुमारास पुन्हा डाॅक्टरांच्या घरी गेली. तिनं सुकन्याला हात-पाय धुवून कपडे बदलायला लावले. मग घरून नेलेलं मुगाचं सूप गरम करून तिला प्यायला लावलं. आता सुकन्या जरा फ्रेश झाली होती. तिनं नंदिनीचे आभार मानले. मावशींना तिच्या जेवणाबद्दल सूचना देऊन नंदिनी हाॅस्पिटलला कामावर गेली. पुन्हा ताप आला किंवा बरं वाटत नसेल तर फोन करायला सांगून, तिनं मावशींना आपला मोबाईल नंबर दिला. चारच्या सुमारास डाॅक्टर घरी आले. त्यांनी नंदिनीचे मनःपूर्वक आभार मानले. 

सुकन्या तर नंदिनी मावशीच्या प्रेमातच पडली होती. ती अधूनमधून नंदिनीशी फोनवर बोलू लागली. नंदिनीही आईवेगळी पोर म्हणून तिला सुट्टीच्या दिवशी मुलांसोबत राहायला बोलवू लागली. तीही कधी नंदिनीच्या हातचं इडली-सांबार, आजीच्या हातचं थालीपीठ खायला हक्कानं येऊ लागली. तिला नंदिनी, तिची मुलं आणि घरात आजी-आजोबा यामुळे नंदिनीकडचं वातावरण खूप आवडायचं. डाॅक्टर साने तिला घरी न्यायला रात्री कार घेऊन यायचे, पण ते सहसा वरती घरात येत नसत. पण घरातून काही वेळा त्यांच्यासाठी डबा भरून दिला जात असे. 

नचिकेतची दहावीची परीक्षा संपली त्या दिवशी मुलांनी सिनेमा बघायचा आणि हाॅटेलमध्ये जेवायला जायचा बेत ठरवला. आजी-आजोबा नाही म्हणाले बरोबर जायला, पण मग नंदिनी आणि डाॅक्टरांना मात्र मुलं जबरदस्तीने घेऊन गेली. प्रताप कॅनडाला गेल्यापासून नंदिनीचं असं बाहेर जाणं तर बंदच झालं होतं. त्यामुळे सासू-सासऱ्यांनीही तिला जायचा आग्रह केला. सुकन्याने पण आपल्या बाबांनी आलं पाहिजे असा हट्ट धरला. डाॅक्टरांनीही आजवर स्वतःला हाॅस्पिटलच्या कामात बुडवून घेतलं होतं. बायकोच्या आजारपणामुळे असे मजेचे प्रसंग त्यांनाही दुर्मिळच होते. रात्री सिनेमा संपल्यावर नंदिनी आणि मुलांना घरी सोडून मग डाॅक्टर लेकीसोबत आपल्या घरी परतले. खूप दिवसांनी नव्हे तर वर्षांनी असा तणावरहित वेळ अनुभवायला मिळाला होता. सुकन्याचे दहावीचे क्लास सुरू होईपर्यंत मंडळी अनेकवेळा आउटिंगला जाऊन आली. नंदिनी आणि डाॅक्टर यांच्यात मुलांबाबत काही ना काही बातचीत होऊ लागली. 

नचिकेतला मेडिकलला जायची इच्छा होती. त्यामुळे तो डाॅक्टर काकांशी त्याबाबत चर्चा करत असे. दोन्ही कुटुंब जवळ येत होती. हाॅस्पिटलमध्ये मात्र नंदिनी आणि डाॅक्टर कामापुरतंच बोलत असत. प्रतापचा संपर्क तर तुटलाच होता. पैसे येणंही आता बंद झालं होतं. मुलांनाही आडवळणाने का होईना हे कळून चुकलं होतं की आपले बाबा आता आपले राहिलेले नाहीत. 

काळ पुढे सरकत राहिला. नचिकेत डाॅक्टर.. कार्डिओलाॅजिस्ट झाला. सुकन्या सी. ए. तर नेहा फिजिओथेरपिस्ट झाली. तिघांनी आपापले जोडीदार स्वतःच निवडले होते.

त्यानंतर नेहाने मुलांना त्यांच्या वडिलांबद्दल सत्य परिस्थिती सांगितली. दोन्ही मुलांना वडिलांचा खूप राग आला आणि आईवर ओढवलेल्या परिस्थितीचं दुःखही झालं. आपल्या भल्यासाठी ती एकटी हा भार वाहात राहिली, या जाणिवेने तिच्याबद्दल अपार कृतज्ञता वाटली. यापुढचं तिचं आयुष्य तरी सुखाचं जावं यासाठी काय करता येईल हा विचार ती दोघं करू लागली. नंदिनीचं आत्ताचं वय जेमतेम ४८ वर्षांचं होतं. 

सुकन्यानेही आईच्या आजारपणामुळे वडिलांनी कोणत्या परिस्थितीला तोंड दिलं हे जवळून अनुभवलं होतं. त्यांना उर्वरित आयुष्य तरी सुख-समाधानात घालवता यावं, अशीच तिची इच्छा होती. डाॅक्टरांनी नुकतंच ५६ व्या वर्षात पदार्पण केलं होतं. तिन्ही मुलांनी आपल्या जोडीदाराबरोबर आणि मग आजी-आजोबांसोबत याविषयी चर्चा केली. 

एक दिवस नंदिनीच्या सासू-सासऱ्यांनीच नंदिनी आणि डाॅक्टरांना एकत्र बोलावून असं सुचवलं, की तुम्ही दोघं कायमचं एकत्र येण्याचा विचार का करत नाही?  आम्ही दोघं आता थकत चाललो आहोत. मुलं तर आपापल्या आयुष्यात पुढे जाणार होती. 

प्रथम दोघांना हे रूचलं नाही. पण आपल्याला एकमेकांच्या सहवासात आनंद मिळतो आणि सुरक्षित वाटतं, हे एव्हाना दोघांच्या लक्षात आलं होतं. 

विचाराअंती त्यांनी पुढील आयुष्य एकत्र काढण्याचा निर्णय घेतला होता, पण तिन्ही मुलांची लग्न झाल्यावरच! नंदिनीला सासू-सासऱ्यांचीही काळजी वाटत होती. आजवर त्यांनीच तिला भक्कम आधार दिला होता. पण त्यांनी स्वतःहून वृद्धाश्रमात राहायची तयारी दर्शविली होती. पोटचा मुलगा कायमचा अंतरला, पण सून आणि नातवंडांमुळे आपलं आत्तापर्यंतचं आयुष्य समाधानात गेलं, अशीच त्यांची भावना होती. 

डाॅक्टरांनी आता कोकणात आपल्या गावी लांज्याला एक हाॅस्पिटल उभारायचं ठरवलं होतं. तिथे अल्प दरात आणि सर्व प्रकारचे वैद्यकीय उपचार रूग्णांना मिळावे, अशी सोय करण्याची त्यांची इच्छा होती. समाजाचं ऋण काही अंशी तरी फेडावं हा उद्देश होता. जुन्या घराची डागडुजी करून, शांतपणे आयुष्य घालावं असं त्या दोघांनी ठरवलं होतं. नंदिनीनं अजून प्रतापपासून घटस्फोट घेतला नव्हता. पण त्याचं त्यांना फारसं महत्त्व वाटत नव्हतं. पण आता नेहाच्या लग्नाच्यावेळी तो अचानक भारतात आल्याने, तेही शक्य होणार होतं. वकिलांशी त्या संदर्भात बोलणं चालू होतं. 

नचिकेतची इच्छा असेल तर दुबई सोडून पुण्याचं त्यांचं हाॅस्पिटल त्यानं चालवावं असा प्रस्ताव. त्यांनी त्याच्यापुढं ठेवला होता. त्याची बायको रश्मी ही चाईल्ड स्पेशालिस्ट होती. 

नंदिनी आजच डाॅक्टरांसोबत कोकणात जायला निघणार होती. नंतर नेहा-पराग बेंगलोरला आणि सुकन्या-सलील नाशिकला रवाना होणार होते. आजी-आजोबा एक महिनाभर आपल्या घरातच राहणार होते. शारदाबाई स्वैपाक आणि इतर कामं करणार होत्या. पुढच्या महिन्यापासून ती दोघं मुळशी जवळच्या वानप्रस्थ या वृद्धाश्रमात राहायला जाणार होती. आणि प्रताप त्यांना सांगत होता की तो आता कायमचा इथे आला आहे.

आई त्याला म्हणाली, ‘आता वेळ निघून गेली. आता इथेही तुझं कोणीच उरलं नाही, या घराच्या भिंतींशिवाय! ‘

समाप्त

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares