श्री मोहन निमोणकर
इंद्रधनुष्य
☆ “स्वित्झर्लंड, लंडन की भारत?” – लेखक : डॉ. सुशांत पाटील ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
… आपण कुठे जास्त सुखी आहोत?
आजकाल सोशल मीडियाच्या काळात आपल्याला अमेरिका, लंडन किंवा स्वित्झर्लंडचे फोटो पाहून वाटतं, “काय नशीब आहे या लोकाचं””! किती सुंदर बर्फ आणि किती स्वच्छ हवा!” पण मित्रांनो, एक डॉक्टर म्हणून आणि निसर्गाचा अभ्यासक म्हणून मी तुम्हाला सांगेन, ‘दुरून डोंगर साजरे’ ही म्हण इथे तंतोतंत लागू पडते.
आज आपण जगातील मोठ्या देशांची हवामान स्थिती आणि आपला भारत किती ‘नशिबवान’ आहे, याचा वास्तववादी आढावा घेऊया.
१. स्वित्झर्लंड: केवळ पर्यटनासाठी सुंदर, जगण्यासाठी कठीण!
स्वित्झर्लंड म्हटलं की डोळ्यासमोर येतो पांढराशुभ्र बर्फ. पण विचार करा:
गोठलेले आयुष्य: तिथे वर्षातील ७ ते ८ महिने कडाक्याची थंडी असते. जो बर्फ फोटोंमध्ये छान वाटतो, तोच बर्फ जेव्हा घराच्या दारासमोर ३-४ फूट साचतो, तेव्हा तो काढताना नाकी नऊ येतात.
शेतीचा अभाव: हवामानामुळे तिथे आपल्यासारखी विविध कडधान्ये, फळे किंवा भाजीपाला पिकवणे अशक्य आहे. त्यांना बहुतेक अन्नधान्य आयात करावे लागते.
२. लंडन (यूके): सूर्यप्रकाशासाठी आसुसलेले लोक लंडनच्या हवामानाचा भरवसा कोणीच देऊ शकत नाही.
नेहमीचा पाऊस: तिथे कधीही पाऊस पडतो, त्यामुळे लोक सतत छत्री घेऊन फिरतात. पण तो पाऊस आपल्यासारखा ‘चिंब भिजवणारा’ नसतो, तर तो हाडे गोठवणारा आणि ओलसर असतो.
विटामिन-डी ची कमतरता: तिथे कित्येक आठवडे सूर्यदर्शन होत नाही. यामुळे तिथल्या लोकांमध्ये हाडांचे आजार आणि ‘डिप्रेशन’ (उदासीनता) मोठ्या प्रमाणात आढळते. म्हणूनच तिथे उन्हाळ्यात थोडा जरी सूर्य दिसला की लोक पार्क मध्ये धावतात.
३. अमेरिका: निसर्गाचा रुद्रावतार
अमेरिका हा देश जेवढा प्रगत आहे, तेवढाच तो नैसर्गिक आपत्तींनी घेरलेला आहे.
बर्फाची वादळे (Blizzards): अमेरिकेत जेव्हा बर्फाची वादळं येतात, तेव्हा वीज पुरवठा खंडित होतो, हीटिंग सिस्टम बंद पडते आणि लोक घरातच गोठून मृत्यू पावल्याच्या घटना दरवर्षी घडतात.
टोर्नेडो : तिथल्या काही राज्यांमध्ये इतकी भयानक चक्रीवादळं येतात की अख्खी घरं हवेत उडून जातात. अशा भीतीखाली जगण्यापेक्षा आपला भारत कितीतरी पटीने सुरक्षित आहे.
४. रशिया आणि कॅनडा: उणे ५० अंशांचा छळ
या देशांतील काही भागांत तापमान उणे ४० ते ५० अंशांपर्यंत जातं. तिथे साध्या पाण्याचा बर्फ व्हायला काही सेकंद लागतात. अशा ठिकाणी राहणं म्हणजे निसर्गाशी रोजचं युद्ध असतं.
मग आपला भारत ‘नशिबवान’ का?
आपण महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर राहणारे लोक खरंच भाग्याचे आहोत,
कारण: न मोजता मिळणारा सूर्यप्रकाश: आपल्याला वर्षभर मोफत ‘व्हिटॅमिन-डी’ देणारा सूर्य मिळतो, जो जगातील निम्म्या देशांना मिळत नाही.
मोजून चार-चार महिने: निसर्गाने आपल्याला बदलायची संधी दिली आहे. उन्हाळ्यात आपण आंबे खातो, पावसाळ्यात निसर्गाच्या हिरवाईचा आनंद घेतो आणि हिवाळ्यात आल्हाददायक वातावरणात काम करतो.
अतिरेक नाही: आपल्याकडे रशियासारखा हाडे गोठवणारा बर्फ नाही की दुबईसारखं अंगाची राख करणारं ऊन नाही. आपल्याकडे ‘मध्यम’ मार्ग आहे.
अन्नधान्याची श्रीमंती: आपल्या हवामानामुळे आपण वर्षातून ३-३ पिके घेऊ शकतो. ताज्या भाज्या, फळे जे आपल्याला सहज मिळतात, ते परदेशात ‘लक्झरी’ मानले जातात.
डॉक्टरांचा सल्ला:
परदेशाचे फोटो पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नका. आपण अशा भूमीत जन्माला आलो आहोत जिथे निसर्ग आपली ‘माय’ बनून काळजी घेतो, ‘वैरी’ बनून नाही. या सुवर्ण हवामानाचा आनंद घ्या, व्यायाम करा आणि निरोगी रहा.
लेखक: डॉ. सुशांत पाटील
(मोरया क्लिनिक, अक्कोळ)
संकलन आणि प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





