श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“पत्रास कारण की… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

 

 Capt. Amol Kalia,

 12, JAK LI

 02, June, 99

प्रिय आई आणि बाबा! चरणस्पर्श!

मी इथं छान आहे आणि तुम्ही सर्व छानच असाल अशी आशा करतो. मी २८ मे रोजी तुमच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण तुम्ही सर्वजण माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी गेल्याचे समजले.

मी २९ तारखेलाच इथं पोहोचलो. इथं सर्वकाही आलबेल असून तुम्ही माझी काहीही चिंता करू नका.

मी बहुदा या महिना अखेरीस दिल्लीत परतेन. तुम्हांला माझ्या लग्नाची घाई झालेली असेल तर, मी दिल्लीत आल्यावर तुम्ही माझं लग्न ठरवू शकाल! अ

आता मला तुम्हांला फोन करणे शक्य होणार नाही, मी पत्रं लिहित राहीनच. मनूदादा आणि वहिनीला माझा नमस्कार सांगा. त्यांचा कुठं आणि कधी फिरायला जाण्याचा बेत आहे?

 तुमचा,

 अमोल

पंजाबातील रोपड जिल्ह्यातल्या नांगल गावात २६ फेब्रुवारी, १९७४ रोजी जन्मलेले अमोल कालिया पुढे भारतीय सैन्यातील JAK.. JAMMU AND KASHMIR LIGHT INFANTRY दलात प्रवेश करीत पुढे कॅप्टनपदी पोहोचले. श्री. सत्पाल आणि श्रीमती उषा कालिया यांच्या पोटी जन्मलेल्या अमोल यांच्या धाकट्या भावानेही, अमन कालिया यांनीही भारतीय वायू दलात प्रवेश मिळवला होता. एकाच कुटुंबातील दोन सुपुत्र भारतमातेच्या रक्षणार्थ तैनात होते. १९९९.

पाकिस्तानने कारगिल पर्वत परिसरातील भारतीय सैन्यचौक्या कपटाने ताब्यात घेऊन तिथवर पोहोचू पाहणा-या भारतीय रसद वाहनांवर वरून अचूक हल्ले करायला प्रारंभ केला. बटालिक नावाच्या परिसरातील सुमारे १७०० फूट उंचीचा पर्वत पाकिस्तानी सैन्याने बळकावला होता. तेथून त्यांना खाली गोळीबार करणं अगदी सहज शक्य होत होतं. त्यामुळे आपल्या सैन्याच्या वाहनांचे खूप मोठे नुकसान झाले होते. शत्रूला तेथून हुसकावून लावणे अनिवार्य झाले होते. पण यासाठी पर्वतांवर चढून जाऊन लढाई करू शकणा-या सैनिकांची आवश्यकता होती.

कॅप्टन अमोल नेमके याचवेळी त्यांच्या सैन्यासह चंडीगढ येथे पोहोचले होते आणि पुढे त्यांना आराम करण्यासाठी शांतता क्षेत्रात पाठवले जाणार होते. पण एवढ्यात युद्ध पेटल्याने त्यांची सुट्टी रद्द झाली आणि त्यांच्या दलाला कारगिलमध्ये तातडीने बोलावून घेण्यात आले. कारण त्यांची J. A. K. L. I. डोंगर-द-यांत लढण्यासाठी प्रशिक्षित केली गेली होती. कॅप्टन अमोल कालिया तर पट्टीचे गिर्यारोहक आणि सैनिकी नेता होते… ते तातडीने युद्धक्षेत्राकडे निघाले. त्या दिवसाच्या आधी कॅप्टन साहेबांनी वर उल्लेख केलेले पत्र त्यांच्या घरी पाठवण्यासाठी संबंधित संपर्क यंत्रणेकडे सोपवले होते.

७ जूनच्या मध्यरात्री कॅप्टन अमोल कालिया यांच्या मातोश्री अचानक जाग्या झाल्या… त्यांनी त्यांच्या पतीला, जे सेवानिवृत्त शिक्षक होते, झोपेतून हलवून जागे केले… म्हणाल्या, ”आपल्या मुलांची खूप आठवण येते आहे… हे दोघेही ठीक असतील ना? ” कालिया सरांनी आपल्या पत्नीची कशीबशी समजूत काढली!

कालिया साहेबांच्या कुटुंबियांना हे पत्र ९ जून रोजी मिळाले… आणि एक अत्यंत धक्कादायक बातमी!

इकडे कारगिलमध्ये ७ जूनचा दिवस बुडाला मध्यरात्र झाली… ८ जून सुरु झाला… पहाटेचे तीन वाजले होते. कॅप्टन अमोल कालिया आपल्या १३ सैनिकांना सोबत घेऊन तो १७ हजार फुटांचा पर्वत चढू लागले. अंधार, बर्फाळ वाट आणि प्रचंड थंडी… खडा पहाड… एक एक पाऊल वर चढत सैन्य आगेकूच करीत होतं. काही वेळातच वर आरामात बसलेल्या शत्रूला यांची चाहूल लागली… आणि… पाकिस्तानी सैन्याने वरून यांच्यावर तुफान गोळीबार आरंभला. याही वादळी गोळीबारात कॅप्टन अमोल थांबले नाहीत… ते सर्वांच्या पुढे होते… शत्रूच्या अगदी जवळ पोहोचलेही होते… त्यांच्या सैनिकांपैकी LIGHT MACHINE GUN मधून गोळीबार करणारा सैनिक धारातीर्थी पडल्यावर कॅप्टन साहेबांनी स्वत: त्या GUNचा ताबा घेत तीन पाकिस्तानी सैनिक ठार मारले… आणि तितकेच जखमी केले!

सकाळी ९ वाजेपर्यंत हा संघर्ष सुरु राहिला… कॅप्टन साहेबांच्या तुकडीत असलेल्या १३ पैकी १० सैनिकांनी… हवालदार राजिंदर सिंग, नाईक पवन कुमार, लान्स नाईक लियाकत अली, लान्स नाईक मोहमद खान, रायफलमन दर्शन लाल आणि अब्दुल सलाम दार, रविंदर सिंग, ईश्तीयाक अहमद यांनी सर्वोच्च बलिदान दिले होते… आणि हवालदार कर्तार सिंग आणि रायफलमन तर्सैम लाल प्राणांतिक जखमांनी विव्हळत पडले होते… स्वत: कॅप्टन साहेबही प्रचंड जखमी झालेले होते… तरीही त्यांनी गोळीबार थांबवला नाही. पाकिस्तानी सैन्य यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक संख्येने आणि मोक्याच्या जागी होते… त्यांचे नेम चुकत नव्हते! कर्तार सिंग आणि तर्सेम लाल काही वेळातच देवाघरी गेले आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचे नेतृत्व करणारे बहादूर कॅप्टन अमोल कालिया साहेबही. साहेबांच्या मातोश्रींना पडलेले स्वप्न अशा रीतीने खरे झाले होते… त्यांनी त्यांचा सुपुत्र गमावला होता! भारतीय सैन्याला हा एक मोठा धक्का होता. पुढे आपल्या इतर सैनिकांनी आणखी बलिदाने देत हा ५२०३ बटालिक पर्वत २१ जूनला जिंकून घेतला! आणि यामुळे भारताची लढाई आणखी परिणामकारक होण्यात साहाय्य झाले!

पुढे १३ दिवस या वीरांचे मृतदेह कारगिलच्या त्या पर्वतांवर पडून होते… पाकिस्तानी सैन्याच्या तोफांच्या मा-यामुळे हे मृतदेह खाली आणणे अशक्य झाले होते! पुढे युद्ध थांबल्यावर हे काम करण्यात आले… तोवर कालिया कुटुंबीय प्रतीक्षेत राहिले… आपल्या मुलाच्या मृतदेहाची वाट पाहण्यासारखी कठीण गोष्ट जगात अन्य नसावी… त्यांच्या पार्थिवाला खांदा देत त्याच्या चितेला अग्निडाग देणे तर महाकठीण. वीरपिता श्री. सत्पाल सिंग यांनी हे कर्तव्य पार पाडले. वीरमाता उषा यांनी आपल्या लाडक्या लेकाला अंतिम मानवंदना दिली… त्याच्या विवाहाचे स्वप्न त्यांच्यासमोर चितेवर जळत जळत भस्म झाले! देशाने कॅप्टन अमोल कालिया यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करून त्यांच्या शौर्याला वंदन केले!

कारगिल युद्धात कालिया आडनावाचे दोन सैनिक भारताने गमावले… आधी कॅप्टन सौरभ कालिया आणि नंतर कॅप्टन अमोल कालिया. या अधिकारी आणि सैनिकांच्या बलिदानांच्या पायावर आजची आपली स्वातंत्र्याची इमारत भक्कमपणे उभी आहे… आपण स्वतंत्र श्वास घेतो आहोत! आज २ जून, २०२६. कॅप्टन साहेबांनी त्यांच्या माता-पित्यांना लिहिलेल्या पत्रास सत्तावीस वर्षे पूर्ण झालीत… पत्र आलं… पण कॅप्टन साहेब हुतात्मा होऊन स्वर्गाकडे प्रयाण करते झाले!

(कारगिल स्मृती.).

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted