श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “त्रिकोण…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
रात्रीचे आठ वाजले तरी घरात अंधार पाहून ऑफिसवरुन आलेल्या विशाखानं लाईट लावले.
“कशाला लावला गं”सोफ्यावर बसलेली मीना खेकसली.
“अजून किती वेळ अंधारात बसणार” शेजारीच बसलेली छाया डाफरली.
“लाईट असले काय अन नसले काय परिस्थिती काही बदलणार नाहीये” मीना.
“मलाही हेच म्हणायचंयं.नुसता विचार करून डोकं फुटेल यापलीकडे काहीही होणार नाही.हातपाय हलवायला पाहिजेत.माझं ऐका” .. विशाखाच्या बोलण्यावर दोघींनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
मीना,छाया,विशाखा जॉब करणाऱ्या रूम पार्टनर. वर्षभरापासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होत्या.तिघींची छान गट्टी जमलेली.सगळं व्यवस्थित चाललेलं पण दोन दिवसांपूर्वी मीनासोबत ऑफिसमध्ये एक घटना घडली अन सगळं बिनसलं.तिघीही प्रचंड टेन्शनमध्ये.पुढे नक्की काय करावं याविषयी एकमत होतं नव्हतं.आपसात वाद सुरू होते.
दिव्यांग असलेल्या मीनाला अल्पदृष्टीचा त्रास होता तरीही मोठ्या कष्टानं,जिद्दीनं पदवी मिळवली.कॉम्प्युटरमध्ये विशेष प्राविण्य मिळवलं.त्याच जोरावर नावाजलेल्या कंपनीत नोकरी लागली.उत्तम कामामुळे अल्पवधीत मीनाचा बोलबाला झाला.सर्वांशी मिळून मिसळून वागायची तरी तिचा द्वेष करणारे होतेच.सुट्टी असूनही महत्वाचं काम होतं म्हणून मीना ऑफिसला यावं लागलं तेव्हा अजून आठ-दहाजण सहकारी आले होते.संध्याकाळी घरी जायच्या वेळी वॉशरूमच्या बाहेर कोणीतरी मीनाचा हात धरून जवळ ओढण्याचा प्रयत्न केला.मीना जोरात किंचाळली तेव्हा बाकीचे धावत आले. तोपर्यंत हात धरणारा पळून गेला.
“मीना,व्हॉट हॅपन,”
“केवढ्या जोरात ओरडलीस.”
“काय झालं” एकामागून एक प्रश्नांचा भडीमार.मीनाचे हातपाय लटपटत होते.
पाणी पिल्यावर सावरली.
“काही नाही.पायात काहितरी आल्यासारखं वाटलं म्हणून जोरात ओरडले.”खोटं बोलून मीनानं वेळ मारून नेली पण खूप घाबरली होती.डोक्यात नाही नाही ते विचार सुरू झाले.रूमवर आली पण चित्त थाऱ्यावर नव्हतं.तोंडावर पांघरून घेऊन पडून राहिली. मात्र विशाखा,छाया आल्यावर मीनाचा बांध फुटला.जोरजोरात रडायला लागली.मीनानं घडलेला प्रकार सांगितला.विशाखा,छायाला प्रचंड धक्का बसला.
“कोण होता तो हलकट” विशाखा.
“माहिती नाही”
“म्हणजे”
“लाइट पुरेसे नव्हते त्यात माझा दिसण्याचा प्रॉब्लेम.”
“बाई!! थोडक्यात वाचलीस गं.” मीनाच्या पाठीवरून हात फिरवत छाया म्हणाली.
“हो गं.जोरात ओरडले म्हणून भामटा पळाला.”
“ऑफिसमध्ये तक्रार केलीस ना” विशाखा.
“नाही”
“का?”
“भीती वाटली.तुमच्याशिवाय खरा प्रकार अजून कोणालाच माहिती नाही.”
“तक्रार केली नाही ते चांगलं केलं,नाहीतर उगीच चर्चेला विषय आणि नसता मनस्ताप” छाया.
“आता पुढे काय करायचं समजत नाहीये.खूप टेंशन आलंय.मनात गोंधळ आहे.”डोळे पुसत मीना म्हणाली.
“काही गोंधळ नाहीये. पोलिस,ऑफिसमध्ये तक्रार देऊ.मी सोबत येते.”विशाखा.
“काही झालं नाही ना.मग कशाला विषय वाढवायचा. गप्प बस”छाया.
“आज हात धरला उद्या अजून काही केलं तर..असले विंचू वेळीच ठेचले नाहीतर पुन्हा संधी मिळाली की चावा घेतात.गप्प बसलं की अशा संधीसाधूंची हिंमत वाढते.” विशाखा संतापानं फणफणत होती.
“मीने,हिचं ऐकू नकोस.मला वाटतं सुट्टी घेऊन गावी जाऊन ये.बरं वाटेल.तक्रारीच्या भानगडीत पडलीस तर ‘आ बैल मुझे मार’ अशी अवस्था होईल.अशा घटनेत लोकांना फार इंटरेस्ट असतो.च्युईगमसारखं हाच विषय चघळला जाईल.”छाया.
“काहीही काय बोलतेस. माणसानं इतकंही घाबरट असू नये.ज्यानं केलं त्याला असाच मोकळा सोडायचा.ते काही नाही.शिक्षा ही व्हायलाच पाहिजे नाहीतर त्याची डेरिंग वाढणार.”विशाखा.
“मग तक्रार करून काय मिळणारये.आपणच आपल्या इज्जतीचा तमाशा दुनियेला दाखवायचा.एवढं करून हाती काहीच येणार नाही पण मीना मात्र चर्चेचा आणि चेष्टेचा विषय होणार हे नक्की!!त्यापेक्षा जे झालं ते वाईट स्वप्न समजून विसरून जा”छाया.
“मला पण तसंच वाटतंय आणि तसंही कोणी केलं हे शोधणं अवघडयं.”मीना.
“आम्ही ठेवला पण सगळेच तुझ्यावर विश्वास ठेवतील असं नाही.हजार प्रश्न विचारतील आणि तसंही तू सांगतीस म्हणून यापलीकडं काहीही पुरावा नाहीये.त्यात तू ऑफिसमधे वेगळचं सांगितलंय.तेव्हा नीट विचार कर.भावनेच्या भरात असा कोणातही निर्णय घेऊ नकोस ज्यानं नंतर पश्चाताप करावा लागेल.”छायाचं बोलणं ऐकून विशाखा भडकली.
“ए बाई,कशाला तिला घाबरवतेस.प्रश्न विचारले तर विचारू दे की..त्याला का घाबरायचं.कर नाही तर डर कशाला?दुसऱ्यानं माती खायची अन त्रास तू सहन करायचा.याला काय अर्थ? आणि पुराव्याचं म्हणशील तर ऑफिसमध्ये सी सी टीव्ही असतील ना.”
“ज्या ठिकाणी हात धरला तिथं कॅमेरा नाहीये.”मीना.
“पण त्यावेळेला तिथं कोण गेलं हे बाकीच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं असेल ना.”
“बाकीचे कॅमेरे चालू आहेत की नाही ते माहीत नाही आणि एकदम सगळ्यांवर संशय घेणं योग्य नाही.पुढे अजून प्रॉब्लेम्स होतील.”मीना.
“तुझं बरोबरयं.जे घडलं ते सिद्ध करणं अवघड आहे.” छाया
“ते आपलं कामच नाहीये. पोलिस आणि ऑफिस शोधतील.तू लेखी तक्रार कर.”विशाखा.
“खूप भीती वाटतेय”मीना.
“कशाची?”
“घरी कळलं तर ताबडतोब नोकरी सोडून गावी जाव लागेल नंतर एकदोन वर्षात लग्न की संपलं आयुष्य. सगळ्या शिक्षणाचा चुराडा.”मीना रडायला लागली.
“मीने,बळजबरी नाही पण विचार करून निर्णय घे.निदान ऑफिसमध्ये तरी तक्रार करावी.गुन्हेगाराला शिक्षा व्हायलाच पाहिजे.”विशाखा
“विशे,तिची अवस्था बघून बोल.जीवघेण्या प्रसंगातून वाचलीय.यापुढे ऑफिसमध्ये काळजी घे.सोबतीशिवाय कुठं जाऊ नकोस.आता शांत बसणं हेच चांगलं!!.”
“शांत काय बस.अजून मोठा प्रॉब्लेम झाला म्हणजे..” विशाखाचं ओरडणं छायाला आवडलं नाही.दोघी वाद घालायला लागल्या तेव्हा मीना केविलवाण्या नजरेनं पाहत होती.विशाखा आणि छाया दोघींचे मुद्दे बरोबर होतं. त्यामुळं मीनाचं टेन्शन वाढलं. द्विधा मनस्थिती झाली.
सबुरीचा एक तर आक्रमकतेचा दूसरा आणि निर्नायकी तिसरा असा त्रिकोण झालेला…..
—-
वाचक हो,
तुम्हाला काय वाटतं .. मीनानं काय करावं….???
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





