सौ. वंदना अशोक हुळबत्ते
जीवनरंग
☆ निर्गुण साक्ष… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆
श्रीधर मॉर्निंग वॉकला निघाला होता. हिरव्यागार झाडीतून वाहणाऱ्या गार वाऱ्याने मन प्रसन्न झाले.आपोआप ओठावर गाणे आले.पावलाची गती वाढली.पावले झपाझप पडायला लागली.तेवढ्यात ग्यानबा तुकारामाचा गजर कानी पडला.भगव्या पताका डोळ्यात भरल्या.समोरून वारकऱ्यांची दिंडी येताना दिसली.श्रीधरचे पाय जागीच थांबले.किती दिवसांनी जवळून दिंडीचे दर्शन घेत होता.नवी ऊर्जा मनात भरली. चैतन्य जागृत झाले.मन हलकं हलकं झालं.श्रीधरचे मन भूतकाळ गेले.
नात्यापोत्या जवळ माझे गाव होते. घराघरात हरिपाठ होत असे.गाव सात्विक गुणांचे होते.कुणाचे कुणाशी भांडण नव्हते. तंटा नव्हता.सगळे कसे गोडीगुलाबीने रहात.राबुन खात.विठ्ठल नाम ओठांत.आषाढी वारी म्हणजे मोठा सोहळा, मोठा उत्सव.प्रत्येकाच्या गळ्यात माळ. प्रत्येक माणूस सेवाभावीवृत्तीचा.या पेक्षा आमचे घर वेगळे नव्हते. नात्यापोत्याला दिंडी मुक्काला आली की त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था अण्णा, आबा करत. अण्णा म्हणजे माझे बाबा आणि आबा म्हणजे माझे काका. तेव्हा अण्णाची, काकाची गडबड होई.वारी पुढे मार्गी लागे पर्यंत त्यांना चैन पडत नसे.मी त्यांच्या सोबत असे.मी हे सारे जवळून बघत होतो.माझे बाबा नेहमी म्हणत ” वारी म्हणजे चैतन्याचा जागर.वारी म्हणजे अध्यात्मिक जीवाचा मेळा, वारी म्हणजे एकसंघभाव.इथं सगळे भेदभाव मिटतात.इथं खऱ्या भगवंताचे दर्शन होते.ते बघायला आपली तशी दृष्टी हवी.” मी कामानिमित्त शहरात आलो.शहराचा होऊन गेलो. सुट्टी काढून जेव्हा गावी जात असे तेव्हा बाबा नेहमी म्हणत “श्रीधर बाळा काही कर.पण आयुष्यात एकदा तरी पायी वारी कर.म्हणजे जगण्याचा खरा अर्थ तुला उमगेल.देव दगडात नाही तो चैतन्यात आहे.हे वारी तुला शिकवेल ” वारी करण्या एवढी सुट्टी कधी मिळाली नाही.पायी वारी कधी घडली नाही.
आज दिंडी बघून बाबाची आठवण झाली.गावाची आठवण झाली.मी करंटा.एवढं सांगून ही मला काही पायी वारी करणे जमले नाही.पण माणसातील देव शोधण्याचा यत्न मी काही सोडला नाही.माझ्या परीने मी गरजवंताला मदत करत आलो.आता मला चैतन्याचा पुजारी व्हायचं आहे.तिथंल्या विठूरायाची भेट घ्यायची आहे.हे माझ्या हातून कधी होईल मला माहित नाही.पण ही भेट झाल्या शिवाय मी डोळे मिटणार नाही हे खरं.
“पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय!! ” गजर झाला.दिंडी पुढे गेली.
श्रीधर सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाला.मुलाबाळाचे शिक्षण, लग्न, घर यासाठी काढलेले कर्ज भागवून काही रक्कम श्रीधरने खास राखीव ठेवली होती.त्याचा कुणाला पत्ता लागू दिला नाही.एक दिवस रमाला म्हणाला “आता मला शांतपणे गावी जाऊन रहायचं आहे.तू बरोबर येशील? “
“आता हे काय नवं खुळ.”
“हे खुळ नाही.हे माझे स्वप्न आहे.”
” तिथं तुम्हाला करमणार नाही.तुमचे सगळे आयुष्य इथं शहरात गेले.इथल्या सुखसाईची सवय लागली आहे.”
“न करमायला काय झाले? माझे बालपण खेड्यातच गेले आहे.”
“मग मला कसली अडचण असणार? पण आपण तिथं करणार काय? “
” तू तयार आहेस ना.मग झालं तर. बघ मी काय काय करतो ते”
श्रीधर, रमा गावी आले.त्यांनी जमीन विकत घेतली.तिथच एक छोट घर बांधले.विठू माऊलीचे नाव घेत घेत जागा स्वच्छ केली.जागा खणली. तिथं वीस सागाची, वीस आंबाची, वीस आवळांची, वीस चिंचेची, झाडे लावली. चिक्कू, पेरू, डाळिंब अशी खुप सारी झाडे लावली.माऊलीचे नाव घेत त्या झाडांची देखभाल केली.दोन चार जनावरे घेतली.घराच्या पुढच्या भागात भाजीपाला लावला.मन निसर्गाच्या सेवेत झोकून दिले.त्यांचे ते श्रम बघून येणाऱ्या जाणारे त्यांना खुळ्यात काढत होते.शहरातील आरामदायी जीवन सोडून, कुठे झाडे लावत बसलीत आहेत ही शहाणी माणसं? यांना काही कळत नाही.
पण जसं जशी झाडे जोमाने वाढू लागली.त्यांना फुले फळे येवू लागली. तशी तिच माणसे त्यांचे कौतुक करू लागली.चहापाण्याला हक्काने घरी जावू लागली.दोघाचे कौतुक करू लागली.
तेव्हा श्रीधर म्हणे ” ही सारी विठू माऊलीची कृपा आहे.मी निमित्तमात्र आहे.”
येणारे लोक रिकाम्या हाताने कधी परत गेले नाहीत.फळे, भाजी पाला काही ना काही त्यांना ते प्रसाद म्हणून देत.
झाडांची वाढ झपाट्याने होत होती. तिथं एक छोट रानच तयार झालं होत.अनेक पक्ष्यांनी झाडावर घरटी बांधली होती.त्यांच्या किलबिलाटाने श्रीधरला जाग येत होती.स्वर्गीय सुख तो अनुभवत होता.निसर्गातील या चैतन्यात माझा विठूराया वसला आहे.हे चैतन्य मला रोज नवी उर्जा देते. झाडाची पाने हलतात तेव्हा श्रीधरला वाटते झाडे टाळ्या वाजवत हरीनाम घेत आहेत. माझा विठूराया इथल्या कणाकणात वसला आहे.तो म्हणतो तू फक्त विश्वासाने हाक मार मी इथेच आहे. झाडाची फळे म्हणजे श्रीधरला विठूरायाची भेट वाटते.तो ती फळे येणाऱ्या जाणाऱ्यांना देतो.निसर्गाच्या चैतन्यात त्याचा विठू त्याला रोज भेटतो.
एके दिवशी रात्री सोसाट्याचा वारा सुटला.बाहेर पाऊस कोसळत होता.लाईट गेली. मेणबत्तीच्या उजेडात जेवण झाले. तेवढ्यात श्रीधरला अस्वस्थ वाटायला लागलं.घाम फुटला.छातीत दुखायला लागले.रमा घाबरली.खिडकी उघडावीत तर पाऊस घरात येईल. काय करावे? मदतीला कोणाला बोलवावे? रात्री गावात डॉक्टर नसतात. मी कुणाला बोलवू? मी काय करू? निश्चय करून तिने ओढणी घेतली. त्यांने श्रीधरला पाठीला बांधले.आता मीच गाडी घेऊन शहरातील दवाखान्यात जाते.ती दाराजवळ आली.दार उघणार एवढ्यात दारावर टकटक झाली.दार उघडले तर एक व्यक्ती पावसात भिजत होती.
” माऊली. आज रात्री पुरता आसरा दे मला.”
” मला शक्य नाही.मी माझ्या पतीला घेऊन दवाखान्यात निघाले आहे.बाबा तू दुसरीकडे आपली सोय बघ.”
” तुम्ही आसरा दिला तर माझी मदत होईल तुम्हाला.”
” “
” विश्वास ठेवा माझ्यावर.ऐक माझ.पतीला बिछानावर ठेव. मेणबत्ती जरा उंच धर.” त्या व्यक्तीच्या सांगण्या प्रमाणे रमा करत गेली.तिने विरोध केला नाही.त्या व्यक्तीने काय केले माहित नाही.पण……
“र..मा….र…मा.”म्हणून हाक ऐकू आली. श्रीधरला सुखरूप बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.हात जोडले. “विठ्ठला….तुझीच रे कृपा सारी” तेवढ्यात लाईट आली.बघते तो काय…..घरात दोघांच्या शिवाय तिसरे कोणीच…नव्हते.
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६ ४१६
मो.९६५७४९०८९२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





