सौ. मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ मिळवती झाले, काय मिळवले? – भाग-२ ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
(मुलांच्या शिक्षणासाठी, भवितव्यासाठी, त्यांना कधी काही कमी पडू नये यासाठी, त्यांचे वेगवेगळे छंद सहजपणे जोपासण्यासाठी माझं मिळवतं असणं किती उपकारक आहे हे नोकरी न करणाऱ्या आयांकडे पाहून अधिकच जाणवू लागलं.) – इथून पुढे —
कुठचाही गर्व नव्हता, पैसे मिळवते म्हणून मिजास तर नव्हतीच नव्हती. पण मुलांना उत्तम त-हेने वाढवतोय, त्यांचा व्यक्तित्व-विकास साधू पहातोय याचा अभिमान, त्याहीपेक्षा हा आनंद मात्र नक्कीच खूप जास्त होता. नोकरी करतांना मुलांना पुरेसा वेळ देऊ शकत नाही ही खंत होती. ‘‘आई, इतर मुलांच्या आया कशा शाळेत येतात, बाईंशी बोलतात. तू मात्र कध्धीच येत नाहीस शाळेत. ” असं खट्टू होऊन मुलं कधीकधी म्हणायची. मन खूप कातर व्हायचं तेव्हा. वाटायचं चार दिडक्यांसाठी केवढी ही यातायात. आणि नेमक्या अशाच वेळी, मुलांच्या ट्रीपसाठी, गॅदरिंगसाठी, स्कॉलरशिपच्या स्पेशल क्लाससाठी, शाळेच्या इमारतीच्या निधीसाठी या आणि अशा असंख्य कारणांनी किती पैसे वरचेवर खर्च करावे लागतात हे आठवायचं. एकटाच कमावता असणाऱ्याच्या पगारात घरदार चालवितांना घरातल्या सर्वांच्याच मनाची होणारी कुतरओढ, सर्व आघाड्यांवर एकट्यानेच एकाचवेळी लढतांना करावी लागणारी उरस्फोड आसपास दिसायची आणि त्या माझ्या त्या चार दिडक्यांची किंमत झर्रकन् जाणवून जायची. या असल्या वारंवार उद्भवणा-या प्रसंगातून, मुलांच्या सर्व गरजा विनासायास भागविण्यासाठी पैसे मिळवणं अधिक गरजेचं आहे, नोकरी ही एक अविभाज्य गरज आहे हे वास्तव मनाला पूर्ण पटलंच होतं. आणि एकदा हे पटल्यावर उगीच खंत करत बसण्यापेक्षा, मिळणारा रिकामा वेळ जास्तीत जास्त करून मुलांसाठी राखून ठेवावा हे शक्य होतं.
या असल्या झोपाळ्यावरच बसून झुलणा-या विचारांना सोबत घेऊन काळ पळतच होता. मुलं मोठी होत होती. आवश्यक ते सर्व संस्कार, हौस, मौज-कौतुक, सगळं उरीपोटी धडपडून केलं जात होतं. त्यांच्या दुखण्या खुपण्यासाठीच जणू रजा साठत होती – संपत होती. नोकरीत मिळणा-या LTC सारख्या अनेक सवलतींचा उपयोग लहान वयातच मुलांना प्रवासाचा अनुभव, मजा मिळवून द्यायला, आपल्या देशातली सौंदर्यस्थळं दाखवायला करता येत होता. त्यांच्या आवडीचे नाटक सिनेमे, प्रत्येक वेळी भेळ-आईस्क्रीम सकट, या मिळवतेपणामुळेच फारशी तारांबळ न होता पार पडत होते. मुळात संसाराची खूप आवड होतीच म्हणून आणि नोकरीमुळे घराकडे दुर्लक्ष करते असं कोणी म्हणू नये म्हणूनही रात्रीचा दिवस करून, दिवाळीचा फराळ, गौरीगणपतीची आरास, वाढदिवसांचे केक सारं-सारं घरीच केलं जात होतं… कदाचित् जास्तच नेटकेपणाने. रजा काढून, वेळेत सवलत घेऊन, वेगवेगळ्या कारणाने सवाष्ण-ब्राह्मण जेवू घातले जातच होते. स्वत:च्या कुवतीचा परीघ पुरेसा लवचिक करून हवा तसा मोठा करण्याची ही उमेद मला नोकरीनेच दिली होती ना?
आणखी एक गोष्ट प्रकर्षाने याच काळात जाणवली. नवरा काय किंवा सासरचे इतर कोणी काय, त्यांची निगा – हो निगाच म्हणायला हवं, वेळच्यावेळी राखली की मग मी दिवसभर नोकरी करायला त्यांची हरकत नव्हती. कारण मी क्वचितही कर्तव्यात कसूर करणार नाही हे त्यांना ठाऊक होतं. म्हणून जे बरं चाललं होतं त्याला आधार परत मिळवतेपणाचाच.
आणि हो, घरात निर्माण झालेल्या कुठल्याही प्रश्नाचं खापर फोडायलाही हा नोकरीरूपी दगड होताच – सोशिक, सहनशील, सदैव हवाच असलेला, ‘तुझी काही गरज नाही’ असं गुरकावणारा समोरचा माणूस मनातून आपल्यावर खूशच आहे हे मनोमनी जाणणारा.
जरा वय वाढलं तसं घरात मदतीला कोणी बाई नेमावी असं वाटू लागलं. नोकरीच्या जीवावर उधळपट्टी चाललीय, मिजास वाढलीय् इ. बोलण्यांकडे दुर्लक्ष करण्याएवढा मनाचा घट्टपणा नोकरी करतांना केव्हाच मिळाला होता. जणू एखादा परममित्रच. शिवाय मी दोन बेरोजगारांना रोजगार मिळवून देत होते हा एक समाधान देणारा मुद्दा वेगळाच.
कितीक प्रसंग – घर की नोकरी हा प्रश्न पाडणारे – पण एव्हाना हे प्रश्न पेंढा भरलेल्या वाघासारखे असतात हे कळलं होतं. कारण प्रत्येक प्रश्नाला घरासाठी नोकरी हेच उत्तर येत होतं. कसाही विचार केला तरी. साड्या-दागिने-हॉटेलिंग यासाठीच नोकरी कधीच नव्हती. हां, नोकरीमुळे मी माझा व्यक्तित्व विकास, मुलांचे उत्तम शिक्षण, आणि एकूणच सर्व घराची आर्थिक उन्नती.. याला नक्कीच हातभार लावतेय याचा मला अभिमानच वाटायला हवा ना? अपराधीपणाची भावना कशासाठी? आल्यागेल्याला काही काळ दिलासा, लायक गरजू माणसाला जमेल तेवढी आर्थिक मदत या मिळवतेपणामुळेच शक्य होत होती. मुलांना वेळ कमी देता येत असला तरी, त्यांच्या बाबतीत कुठल्याच कर्तव्यात मी कमी पडत नाही हे मी कणखरपणाने सांगू शकत होते ना?
बाहेरगावी जावं लागेल, घराकडे, मुलांकडे दुर्लक्ष होईल म्हणून, चालत आलेली प्रमोशनची संधी मी आपणहून नाकारली तेव्हा खूप क्लेश झाले मनाला. मी माझ्यासाठी की इतरांसाठी हे द्वंद्व कित्येक दिवस चालू होतं मनात. शेवटी ‘मिळवती’ पेक्षा ‘आईचा’ विजय झाला. हे compromise – कर्तव्याचा आनंद आणि स्वत्त्व दुर्लक्षिले याचे दु:ख… दोन्हींचा एकदम अनुभव देणारं – हीसुद्धा मिळवतेपणाचीच देणगी.
आता मुलं इतकी मोठी झालीयेत की दोन वेळेची जेवणाची सोय करण्यापलीकडे, आणि बाबांबद्दल खात्री नसेल तेव्हा आईकडे पैसे मागणे यापलीकडे आईची गरज राहिलेली नाही. आणि हो, इतके दिवस, ‘‘आई, तू किती वेळ बाहेर असतेस घराच्या ” असं म्हणणारी तीच मुलं ‘‘आई तुला काही माहिती नाही, बाहेर जगात काय चाललंय् ते ” असं म्हणून माझ्यावरच गुरगुरू पहातात तेव्हा हसूच येतं मला – एक समाधानमिश्रित हसू.
असं वाटतं, ‘बरं झालं नाहीच सोडली नोकरी ते’ – हाच विचार माझ्या समवयस्क मिळवत्यांना मनात येत असणार. नाही माझी खात्रीच आहे तशी. नाहीतर स्वेच्छानिवृत्तीची सवलत असूनही फारशा मिळवत्या बायका त्याचा फायदा घेतांना दिसत नाहीत. सगळ्यांनाच जाणवत असणार की, मुलांचा सहवास, घराचा सहवास, काही प्रमाणात शरीरस्वास्थ्य यासारखं महत्त्वाचं काही गमावलं असलं तरी कितीतरी, एरवी हरवल्यासारख्या झाल्या असत्या त्या गोष्टी या मिळवतेपणामुळेच तर मिळाल्या होत्या ना? स्वत:च्या कर्तृत्वाची जाणीव, धीटपणा, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, कणखरपणा, सर्वांशी जमवून घेण्याची सवय, अशा कितीतरी आधारकाठ्या, ज्या मिळवती झाल्यावर माझ्याही नकळत सहजपणे माझ्या हातात आल्या, त्यांच्या आधारानेच तर घर-नोकरी ही तारेवरची कसरत जमून गेली. त्याबद्दल नोकरीचे आभार तरी किती मानावे?
Self help is the best help असं म्हणतातच ना?
इतकं शिकूनही फक्त स्वयंपाकपाणी करत घरी बसावं, सर्वांनी आपल्याला गृहीत धरावं, आपापल्या तालावर नाचायला लावावं, स्वत्त्व विसरायला लावावं आणि आपल्या हातात कोणतेच पत्ते नसल्याने, येणाऱ्या सगळ्या अडचणी आणि त्यासाठी फक्त स्वतःला गृहीत धरलं गेलं तरी ते सगळं मुकाट सहन करावं, यापेक्षा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून संसारातल्या संकट वाटाव्यात अशा कितीतरी गोष्टी सहजपणे हाताळायला शिकवणारं.. त्यासाठी बळ देणारं मिळवतेपण नक्कीच चांगलं नाही का?
असं म्हणून हुश्श म्हणता म्हणता दचकलेच. ५ मिनिटात केवढा प्रवास करून आलं मन.
आणि मग एकदम एक विचार चमकून गेला मनात –
‘‘ कुछ पानेके लिये कुछ खोना पडता है।” असं खेदाने म्हणण्याऐवजी, आपण दिलखुलासपणे असं का नाही म्हणावं… ‘‘ कुछ खोनेके लिए पहले कुछ पाना तो पडता है ना?”
– समाप्त –
© सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈





सगळ्या नोकरी केलेल्यांना खूप पटणारं आहे अर्थात आपल्या काळातल्या. आता खूप बदललंय, सगळ्याच कामांना बायका लावणं परवडण्याइतके पगार वाढले आहेत.आणि नवरे पण बदलले आहेत.
मंजूषा ताई खूप छान लेख!