श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “अबोला” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
आमच्यात नेहमीप्रमाणे भांडणं झाली. समोर असताना तर भांडतोच पण फोनवर सुद्धा सुरूच होतं.
“खड्ड्यात जा” मी संतापले.
“तोंड सांभाळ”
“परत थोबाड दाखवू नकोस”
“तुझं नशीब चांगलंय. आत्ता समोर असतीस तर…. ”
“अंगाला हात लावून तर दाखव मग बघ. ”
“काय करशील”
“फार महागात पडेल. ”मी
“धमकी!! दिसते तशी नाहीये”
“सेम टू यू”
“आधी डोळे फुटले होते का?”
“मी पण हेच म्हणते. लग्नाची तर फारच घाई झाली होती. ” मी
“तिथंच माती खाल्ली ना”
“मग आता निस्तरायचं”
“अशी वागशील असं वाटलं नव्हतं”
“मलाही.. ”
“तुझ्या घरच्यांनी तर फार कौतुक केलं होतं आणि रियलमध्ये तू तर.. ”
“तू सुद्धा भोळा भाबडा होतास. लग्नानंतर खरे रंग दिसले. तू तर पक्का.. ”मी
“वाट्टेल ते बोलू नकोस. हजारदा सांगितलंय की बोलताना विचार करत जा. ”
“कसं बोलायचं तू शिकवू नकोस. मी अशीच आहे. जे वाटतं ते बोलणार”
“तेच म्हणतोय. रागाच्या भरात स्वतःवर ताबा ठेवता येत नाही. त्यामुळे नक्की गोत्यात येशील. बोलताना काळजी घे. शब्दांचे वार खूप खोलवर लागतात. ”
“आय डोन्ट केअर. गो टू xx. ”
“पुन्हा तेच. जरा सबुरीनं घे. इतकंही तोडू नकोस की नंतर इच्छा असूनही जोडता येणार नाही”
“बास उगीच ज्ञानाचे डोस देऊ नकोस. यावेळेला चूक तुझी आहे. ”
“दरवेळेला माझीच असती. काहीतरी नवीन सांग. ”
“तेच खरंय!!जरा मनाविरुद्ध झालं की घर डोक्यावर घेतोस. ही घाणेरडी सवय सोड. मग मला शिकव. ”मी.
“हा!!हा!!हा!! घाणेरड्या सवयीबद्दल तू बोलावं हाच फार मोठ्ठा जोक. ”
आमची वादावादी बराच वेळ सुरू होती. मूळ विषयापेक्षा आपला मुद्दा रेटून दुसऱ्याची चूक दाखवणं चाललेलं. नवरा-बायकोच्या भांडणात नेहमी असंच होतं. भांडणाचं फलित म्हणजे अबोला. पंधरा दिवस झाले. एकमेकांशी बोलणं नाही. काही महत्वाचं असेल तर मेसेज करायचो अन्यथा आळी-मिळी गुपचिळी. खरंतर बोलण्याची इच्छा होती पण…. ईगो आडवा येत होता.
… आमचं लव मॅरेज, तीन वर्ष रिलेशनमध्ये होतो. परस्पर विरोधी स्वभाव तरीही प्रेमात पडलो. मी तडकू, संतापी, शिघ्रकोपी, फटकळ, बिनधास्त बोलणं याचं त्याला फार कौतुक अन त्याचा शांत, संयमी, समजून घेण्याचा गुण मला आवडला. घरच्यांच्या परवानगीनं धुमधडाक्यात लग्न केलं. सुरवतीचे गुलाबी दिवस संपल्यावर वास्तवाचे चटके बसायला लागले. ज्या गुणांचे कौतुक होतं तेच वादाचे कारण झाले. सततचे खटके. नंतर नंतर अशी परिस्थिती झाली की बोलणं कमी आणि भांडणं जास्त. मग बोलचाल बंद. कधी एक दिवस तर कधी दोन तर कधी आठ दिवस सुद्धा… अर्थातच मी हट्टी असल्यानं तोच माघार घ्यायचा. स्वतःहून बोलायचा, रुसवा काढायचा मग काही दिवस सगळं सुरळीत व्हायचं पण यावेळेला वेगळंच घडलं. तो गप्प, मी गप्प. घरात विचित्र अशी अस्वस्थता. दूध संपल्याचं निमित्त झालं अन वादावादी सुरू झाली.
.. पुन्हा तू तू मै मै. शब्दाला शब्द लागून आवाज चढले. त्यानं हात उगारला.
मला ते सहन झालं नाही. तिरमिरीत खाडकन त्याच्या तोंडात मारली. दोन चार शिव्या दिल्या.
तो बिथरला. अंगावर धावून आला.
तेव्हा “जा मर” म्हणत जोरात ढकलल्यावर त्याचा तोल गेला. भिंतीवर जोरात डोकं आपटलं आणि…….
त्यानंतर सगळंच बदललं.
—
बरेच दिवस तो हॉस्पिटलमध्ये होता. पोलिस चौकशी झाली पण त्यानं सांभाळून घेतलं.
आणि रागाच्या भरात मी चुकीचं वागले. स्वतःचाच खूप राग आला. पश्चाताप होतोय.
.. त्या घटनेचा परिणाम आमच्या नात्यावर झाला.
मी आता पटकन चिडत नाही. मनाविरुद्ध झालं तरी शांत असते. म्हणतात ना, वाईटातून चांगलं निघतं. माझ्याबाबतीत हेच असावं.
तो मात्र एकदम बदलला. आता बोलतच नाही. झाल्या प्रकारानं तो खूप दुखावला गेला. तरीही रिऍक्ट झाला नाही. वरवर शांत दिसत असला तरी मनात प्रचंड वादळ आहे. माझ्याकडे तर बघतही नाही. सतत टाळतो. बोलत नाहीये. फक्त मेसेजद्वारे आमच्यात संवाद होतो. घरात पण अनोळखी प्रवाशासारखं वावरतो. हा ‘अबोला’ फारच जीवघेणा आहे. अनावधाने घडलेल्या प्रकाराबद्दल मी हजारदा माफी मागितली. समेटासाठी प्रयत्न केले. हात जोडले, रडले, विणवण्या केल्या.. परंतु शून्य प्रतिसाद.
संवादच नसल्यानं वाद नाही. आम्ही मनानं खूप लांब गेलोय. —
“ आपण वेगळे होऊ ” त्याचा मेसेज पाहून जबरदस्त धक्का बसला. हे अनपेक्षित आणि सहन करण्यापलीकडलं होतं. प्रकरण या थराला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. मी शंभर टक्के चुकलेच पण त्याचं वागणंही बरोबर नव्हतं.
.. मी बोलायचा प्रयत्न केला पण…. उपयोग झाला नाही. बोलचाल बंद करून तो अपमानाचा बदला घेत होता. खूप वाईट वाटलं पण रागही आला. तो मात्र ढिम्म !! खूप रडले नंतर विचार केला अन मेसेजला उत्तर दिलं – –
“ जशी तुझी इच्छा ”…
— — माझा राग आणि त्याचा ईगो यामुळे आमच्या नात्याला भलतचं वळण मिळालं.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






खरं आहे . समाजातलं आजकाल घडणारं हे पण एक सत्यच आहे.