श्री मेघ:श्याम सोनावणे
🌸 जीवनरंग 🌸
☆ होय हे अगदी खरं आहे… लेखक : अनामिक ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
(निर्विवाद सत्यकथा आहे.)
“अरे बाबा लक्षात आहे ना? माझे दोनशे रुपये बाकी आहेत तुझ्याकडे. ” कुणीतरी कानात बोलले महेशच्या आणि त्याला जाग आली. अस्वस्थ होऊन उठला तो. घड्याळ्याकडे नजर टाकली. पहाटेचे तीन वाजलेले. हा आवाज ओळखीचा होता. खूप वर्षांपूर्वी अगदी महेशच्या जवळचा. पण नेमका कुणाचा ते महेशच्या लक्षात येत नव्हते. त्याने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, पण झोप आता दूर पळाली होती.
कुणाचा आवाज असावा आणि दोनशे रुपये कुणाकडून घेतले, जाम आठवेना त्याला. व्यवहाराला अगदी चोख होता तो. कुणाचा एक पैसा कधी ठेवला नव्हता. पण हे दोनशे रुपये? डोक्यात प्रकाश पडत नाहीये आपल्या.
अचानक लकलकले डोक्यात त्याच्या. गुरूचरण.. हो गुरूचरणच तो. त्याचा कॉलेजमधला लास्ट इयरचा रूम पार्टनर. एक्झाम फी भरायला नेमके दोनशे रुपये कमी पडत होते. मुदतीचा शेवटचा दिवस. कामाचे पैसे पण मिळाले नव्हते. वरखाली झाला महेशचा जीव. अन देवासारखा धावून आला गूरू.
खरेतर तीस वर्षांपूर्वी बरीच मोठी रक्कम होती ती. नंतर पैसे आले पण गुरूचरण काही कामासाठी गावी गेला होता. इथे महेशची परीक्षा संपली तरी तो परतलाच नव्हता. तेव्हा हॉस्टेलवर तसा निरोप देऊन निघून आला होता तो. गुरूचरणला महेशने पत्र ही लिहिले की रिझल्टच्या दिवशी भेटू, तुझे पैसे देतो तेव्हाच. पण त्या दिवशीही गुरू आलाच नव्हता. त्याच्या गावाकडच्या मित्राने सांगितले की तो गावीही नाही आता. नाईलाजाने महेश पैसे घेऊन परत आला.
एकदम भरून आले महेशला. ऐन वेळेस पैसे मिळाले नसते तर वर्ष वाया गेले असते त्याचे आणि तो चक्क विसरूनच गेला गुरूला. मग आठवले त्याला नुकत्याच फॉर्म केलेल्या त्याच्या कॉलेजच्या व्हाॅटसअप ग्रुपवर विषय झाला होता गुरूचा. तो दिल्लीत कुठेतरी जॉब करतो एवढेच सांगितले कुणीतरी, नंतरही काहीच माहिती मिळाली नाही गुरुबद्दल.
सकाळ होताच महेशने एकापाठोपाठ फोन करणे चालू केले मित्रांना. पण कुणालाच माहित नव्हते गुरुबद्दल. मग एक क्लू मिळाला. सध्या तो गावाला असल्याचा. गाव त्याचे चांगलेच लक्षात होते पत्र व्यवहारामुळे.. कॉलेजमध्ये असताना केलेला. पत्ता आता आठवत नव्हता. पण कुणालातरी विचारता येईल, खेडेगाव होते त्यावेळी, आता वाढले असेल तरी किती वाढणार.?
सहा तासावर गाव होते. त्याने कार काढली तेव्हा मृणाललाही आश्चर्य वाटले.. असे अचानक?
महेश गावी पोहचला तेव्हा संध्याकाळ होत आलेली. गाव तसें बऱ्यापैकी असावे तरी ही त्याने गुरूचरणचे नाव घेताच लोकांनी लगेच घर कुठे ते सांगितले. एकजण तर मोटरसायकलवर थेट घरापर्यंत आला सोबत. म्हणजे? गुरूचरणकडे येणारे अनेक असावेत?
घर जुन्याकाळी बांधलेले असावे. आता थोडा आधुनिकतेचा टच दिलेला होता टाईल्स वगैरे बसवून. महेश गाडी लावून आत जाताच त्याला बाहेर पाच मिनिटे थांबवण्यात आले आणि पाणी देऊन आत नेण्यात आले. तिथे एका पलंगावर गुरूचरण झोपलेला होता. महेशला कळलेच नाही आधी. तसे ही गुरूला बघून कितीतरी वर्षे झाली होती. पण आता त्याला बघून तर धक्काच बसला.
अगदी बारीक झालेली शरीरयष्टी. बरगड्या मोजता येतील इतक्या वर आलेल्या. गालफडं आत गेलेली. त्याने हाक मारली.. “गुरूचरण ऽऽऽ,.. गुरू…. “
गुरूचरणने मोठ्या मुश्किलीने डोळे उघडले. सुरुवातीला त्याने ओळखले नाही. नंतर त्याच्या डोळ्यात आनंद दाटून आला. “महेश ऽऽ…… तू कसा आलास? ” त्याने थरथरत्या स्वरात मोठ्या मुश्किलीने विचारले.
“तुझे दोनशे रुपये द्यायचे होते ना? ते द्यायला आलो. “
“कुठले दोनशे….? “
मग महेशने त्याला आठवण करून दिली कितीतरी वर्षांपूर्वीची आणि शंभरच्या दोन नोटा त्याच्या हातात ठेवल्या.
त्याला आठवले.. पण त्यासाठी एवढ्या दूर..? गुरूने खूप वेळ महेशचा हात हातात धरून ठेवला. जुनी मैत्री आठवत आसवे गाळत.
रात्र झाल्यामुळे गुरूचरणच्या मुलाने महेशला निघूच दिले नाही आणि गुरूचरणनेही. जेवण झाल्यावर बाहेर खाटेवर झोपतांना गुरूच्या मुलाने सांगितले सारे.
गुरूचरणच्या परीक्षेच्या नेमके काही दिवस आधी वडील तडकाफडकी वारले हार्टअटॅकने. वडिलांचे क्रियाकर्म होत नाही तोच इस्टेटीचे बखेडे उभे झाले. बरेच दिवस कोर्टकचेऱ्या चालल्यानंतर कंटाळून त्याच्या ओळखीच्या माणसाबरोबर तो थेट दिल्लीला निघून गेला. तिथे मात्र एका कंपनीत चिटकून राहण्याचा फायदा झाला. पर्मनंट झाला. तिथेच सेटल झाला.
सगळे काही सुरळीत चालू असतांना पोटाचा कॅन्सर डिटेक्ट झाला. कंपनीकडून औषधं उपचारासाठी भरपूर मदत दिली पण रोगाने दाद दिली नाही. अखेर मरायचेच आहे तर गावी जाऊनच मरू हा निश्चय करून गुरू पुन्हा गावी आला आणि आता मृत्यूची वाट पाहत आहे.
दिवसभराच्या शारीरिक आणि मानसिक थकव्याने महेशला झोप लागली तरी स्वप्नात त्याच्या बरोबर घालवलेले कॉलेजचे दिवसच दिसत होते त्याला. पहाटे कसल्याश्या गलक्याने जाग आली त्याला. अशुभाच्या शंकेने तो धावत आत गेला. शंका खरी ठरली होती. गुरूचरण रात्रीच केव्हातरी जग सोडून निघून गेला होता. त्याच्या हातात मात्र अजूनही काल महेशने दिलेले दोनशे रुपये होते.
गुरूचा अंत्यविधी करून खिशातल्या जितक्या नोटा होत्या त्या गुरूच्या मुलाच्या हातात जबरदस्तीने देऊन महेश घरी परतला. किमान आपण त्याला अंतकाळी भेटू शकलो आणि त्याच्या ऋणातून मुक्त होऊ शकलो ह्याचे समाधान घेऊन.
खूप दिवस झाले आणि अगदी अचानक एका सकाळी गुरूचरणचा मुलगा महेशच्या घरी आला. काहीश्या आश्चर्याने आणि आनंदाने महेशने त्याचे स्वागत केले. नाश्तापाणी होताच मुलाने विषय काढला. “वडिलांचे वर्षश्राद्ध आहे पंधरा दिवसांनी. तुम्हाला तेच सांगायला आलो काका. आणखी एक.. ” मुलाने रबर लावलेल्या काही नोटा त्याच्यापुढे ठेवल्या.
“हे काय….? “
“तुम्ही निघतांना मला दिलेले पैसे… आठ हजार सातशे. “
“अरे पण ते तुला खर्च करायला दिले होते. परत घेण्यासाठी नाही. आणि तुला एकदम मोजून ठेवायला कुणी सांगितले? “
“पप्पांनीं….. “
“म्हणजे ऽऽऽऽ…? “
गेले काही दिवस रोज पप्पा माझ्या स्वप्नात येतात, तुम्हाला पैसे परत करायला सांगतात. ही रक्कम ही त्यांनीच सांगितली. मी तर मोजलेही नव्हते. ते म्हणाले ‘ वर्षाच्या आत परत कर बाळा. ‘
थरथरत्या हाताने महेशने पैसे घेतले. तेवढ्यात त्याच्या मुलाने एक भारीपैकी शर्टपीस त्याच्या हातात ठेवला. काहीश्या आश्चर्याने त्याने विचारले. “हे कशासाठी? का हेही गूरूनेच द्यायला सांगितले? “
“हो. पप्पा म्हणाले, पहिल्यांदा आपल्या घरी आला माझा मित्र आणि रिकाम्या हाताने गेला. तेव्हा….. “
गुरूचरणचा मुलगा आग्रह करूनही न थांबता निघून गेला. आणि हा त्या शर्टपीसवर हात फिरवत निशब्द. हे खरेच असते का काही… गुरूने स्वप्नात येऊन आठवण देणे. मरण्याआधीची भेट… अन आता त्याच्याच मुलाच्या स्वप्नात येणे.
मृत्यूनंतर स्वप्नात येणे महेशने ऐकले होते. पण जिवंतपणी स्वप्नात येणे, याला काय म्हणता येईल….? त्याचे आपले ऋणानुबंध काय? काही गोष्टी तर्कवितर्क वगैरेच्या पलीकडील असतात.
महेशने कॅलेंडरवर गुरूच्या वर्षश्राद्ध असलेल्या दिवसाला गोल केले. हो. जावेच लागणार होते त्याला.
– एक सत्यकथा
लेखक – अनामिक
प्रस्तुती : श्री मेघ:श्याम सोनावणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




