डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ वाट काचेची… ☆ डॉ. शैलजा करोडे

दुपारचे जेवण आटोपून प्रभाकरराव झोपाळ्यावर विसावले होते. सावित्रीबाईंनीही किचनमधील कामे संपवून दिवाणखान्यात मोर्चा वळविला. आरामखुर्चीवर ऐसपैस बसत त्या थोड्या विसावल्या हल्ली पायांनाही खूप रग लागते, गुडघे अतोनात दुखतात म्हणत गुडघ्यांवर तीळाच्या तेलाने त्या अलगद माॅलीश करू लागल्या.

” झोपलात काय हो “

” नाही ग, यावेळी झोप कसली. डोळे पेंगू लागले तसा आडवा झालो. लगेच दहा मिनिटात झोप गायब. “

” बरं आता निवांतपणा आहे तर बोलते. आपल्या अलकाच्या लग्नाचं मनावर घ्यायला हवं, यावर्षी तिचं शुभमंगल उरकलं कि आपण जवाबदारीतून मोकळे. माझ्या भावानं सुचवलंय स्थळ. मुलगा देखणा आहे, उच्चशिक्षित आहे, कौटुंबिक पार्श्वभूमिही चांगली आहे. आपण त्यांना निमंत्रण द्यायचं काय? “

” हो देऊया ना, का नाही द्यायचं? चांगलं स्थळ असेल तर नक्कीच विचार करू. “

” मग मी माझ्या भावाला फोन करते “

आई बाबांचं बोलणं आपल्या रूममधून अलका ऐकत होती. आई आता मामाला फोन लावणार. निमंत्रण जाणार, मंडळी येईल, तत्पूर्वी आपण आता बोललं पाहिजे. प्रितेशविषयी सांगितलं पाहिजे.

” आई ” अलकाने दिवाणखान्यात प्रवेश केला. ” ये ये अलका. आता तुझाच विषय सुरू होता ” ” ऐकलंय आई मी सगळं. पण मला काही सांगायचंय तुम्हांला ” ” अग हो, काय सांगायचं ते सांग ना बेटा, त्या परवानगी कसली मागतेस. मनमोकळेपणे बोल. ” ” आई बाबा, माझं प्रेम आहे प्रितेशवर ” ” कोण आहे हा प्रितेश? कोणाचा मुलगा? ” ” माझ्या काॅलेजात एकाच वर्गात आहोत आम्ही. लोकनेते प्रतापराव जाधवांचा मुलगा आहे प्रितेश जाधव. ” ” अलका राजकारणातील ती माणसं. आपल्यासारख्या सामान्यांना ती झेपतील काय? नको पोरी हा विचार नको करूस. तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधेन मी. पण हा हट्ट नको. ।

बाबा माझं प्रेम आहे प्रितेशवर. त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत. मी लग्न करीन तर प्रितेशशीच. नाही तर कोणाशीही नाही. ” ” भलताच हट्ट करू नकोस पोरी. बाप आहे मी तुझा. तुझ्या भल्याचाच विचार करीन. ” ” तुम्ही माझ्या भल्याचा विचार करताय. मला चांगलं स्थळही पाहून देणार, पण मला प्रितेश नाही मिळनार बाबा जो माझा श्वास आहे. माझा श्वासचं हिरावून घेऊन एका निर्जीव पुतळीचं लग्न लावणार का तुम्ही

” प्रभाकरराव निरूत्तर झाले. काय बोलणार होते ते. पोरीच्या हट्टापुढे त्यांनी नमतं घेतलं. ते स्वतः प्रतापराव जाधवांकडे निमंत्रण देण्यास गेले. ” काय म्हणताय राव. प्रितेशचं प्रेम आहे तुमच्या मुलीवर. मोठा छुपा रुस्तमचं निघाला पोरगा. विचारतो त्याला आज. तसं असेल तर येतो तुमच्याकडे प्रितेश व त्याच्या आईसह.

दिवाणखान्यात मंडळी बसली होती. कांदा पोहे, मुलगी दाखविण्याचा कार्यक्रम संपला.

” प्रभाकरराव मुलांंनी स्वतःचं पुढाकार घेऊन जमवलंय. आमच्यासाठी काही कामचं ठेवलं नाही. फक्त अक्षंता टाकायच्या. आता पुढचं आपण ठरवाचंय. प्रितेश माझा धाकटा चिरंजीव. शेवटचं लग्न माझ्या घरातलं, त्यामुळे सगळी हौस मौज झाली पाहिजे. लक्षात येतंय ना तुमच्या. हुंडा वगैरे नको आम्हांला. पण आमचं घराणं, आमच्या प्रतिष्ठेला साजेसं असं लग्न झालं पाहिजे. लग्नकार्य एखाद्या चांगल्या रिसाॅर्टमध्ये व्हावं. पाहुण्यांची बडदास्त राखली जावी. त्यांचा योग्य तो मानपान झाला पाहिजे. माझी अनेक शुभचिंतक, हितचिंतक मंडळीही राहिल. त्यांच्याही स्मरणात हे लग्न राहावं म्हणून त्यांनाही सुंदरशी भेट द्यावी. त्यांचे लाखमोलाचे आशीर्वाद वधूवरांना मिळणार आहेत, त्यापुढे हा खर्च अगदीच नगण्य आहे, नाही काय? “

” होय प्रतापराव मी करीन ही सगळी व्यवस्था. मुलं खुश तर आपण खुश. “

” कसं बोललात, द्या टाळी ” म्हणत प्रतापराव गडगडाटी हसले.

” प्रभाकरराव, मुलांच्या खुशीसाठी करतोय आपण सगळं. मुलीला हळद लागणार, नवरी बनून जाधव घराण्याची सून होणार, ती कशी साजेशी हवी ना, लंकेची पार्वती थोडीच राहणार. म्हणून फार नाही हो फक्त 50 तोळे सोनं घाला मुलीच्या अंगावर, अर्थात ते तिचं स्त्रीधनचं राहणार आहे. जावई श्रीविष्णूचं रूप मानून तुम्ही कन्यादान करणार, मग त्याचा योग्य सन्मान वरदक्षिणा देऊन तुम्ही करणारच आहात यात मला तरी शंका वाटत नाही. “

” होय, करीन मी सगळं माझ्या लेकीच्या सुखासाठी “.

प्रभाकररावांनी जाणलं ही लालची मंडळी आहे. त्यांनी परत अलकाला समजावण्याचा प्रयत्न केला ” अलका विचार कर. मी तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधेन बेटा. बाप आहे मी तुझा. तुझं कल्याण व्हावं, तू सुखी राहावीस हीच इच्छा आहे ग माझी. तुला जर काही त्रास झाला तर मला सहन होणार नाही बेटा “. पण अलका ऐकायलाच तयार नव्हती. “बाबा माझं प्रेम आहे प्रितेशवर आणि स्त्री आयुष्यात एकचदा प्रेम करते. तुम्ही दुसरं चांगलं स्थळही शोधाल माझ्यासाठी, पण मी सुखी होऊ शकेन काय? उलट आम्हां तीन जीवांच्या आयुष्याची राखरांगोळी होईल. कोणीच सुखी होणार नाही बाबा. प्रितेश नाही तर कोणीच नाही. राहीन मी जन्मभर अविवाहित. नका काळजी करू तुम्ही. ” शेवटी लेकीच्या हट्टापुढे बाबांना झुकावच लागलं.

माझं शुभमंगल पार पडलं आणि मी जाधवांच्या उंबरठ्यावरील माप ओलांडले. बाबांनी लग्नात कसलीही कमतरता भासू दिली आहे. वरपक्षाकडून छोट्या मोठ्या बारीक सारीक मागण्या होत्याच, पण बाबांनी कसलीही कटकट न करता सहज पूर्ण केल्या. रूखवतात संसारोपयोगी भांडी कुंडी गोदरेजची कपाटे, सोफा सेट, दोन लाकडी दिवाण, झोपाळा सगळं सगळं दिलं. सांजोर्‍या, करंज्या, पाच प्रकारचे लाडू, शेव, चकली सगळं सोबतीला दिलं. माहेर सुटलं, मन हळवं झालं, निरोप देतांना बाबा डोळ्यातील अश्रू लपवू शकले नव्हते.

माझ्या सासरीही काही धार्मिक विधी पार पडले. कुलदेवता व विविध दर्शन ही पार पडले. आणि हनीमून साठी आम्ही निघालो. नैनितालच्या टाॅवर हाॅटेलमध्ये दहा दिवसांचं बुकिंग बाबांनीच करून दिलं होतं. नवजीवनाची मी रंगविलेली स्वप्न, प्रितेशच्या रुपात मनासारखा मिळालेला जोडीदार, नैनितालमधील सुखद गारवा देणारं वातावरण मला रोमांचित करीत होतं. ” काय ग अलका, थंडी वाजतेय काय? ” ” नाही तर ” ” मग अंग एवढं कसं शहारलंय. ” ” नैनितालचा गारवा तर जाणवणारचं ना “. ” हूमम, बातमे दम है, चल मग तुझा गारवा लगेच दूर करतो की म्हणत त्यानं मला बाहुपाशात ओढलं. ” ” अहो, काय हे. ” ” माझ्या बायकोशीच बोलतोय ना, जगावेगळं तर काही करत नाही आहे ना “. ” तसं नाही हो ” ” मग कसं ” ” मला बाई ” म्हणत माझी मान लज्जेने खाली गेली तशी माझी हनुवटी उचलत त्याने माझ्या डोळ्यात पाहिलं, माझे डोळे नकळत बंद झाले आणि त्याक्षणी त्यानं माझं हलकसं चुंबन घेतलं “

नैनितालहून परतले. सासुबाईंच्या मैत्रिणी, काही नातलग नवीन सूनबाईला बघायला येतच होते. राजकारण्यांचं घर असल्याने कार्यकर्त्यांचा राबताही राहात होता. मी हळूहळू अंदाज घेत होते. प्रत्येकाचा स्वभाव जाणून घेत होते. नव्या नवलाईचे दिवस असल्याने घरातील सगळेही बरे वागत होते.

दिवाळी आली. मलाही माहेराची ओढ लागलेली. पहिला दिवाळीसण असल्याने बाबा जावयाला निमंत्रण द्यायला आले. मला व प्रितेशला कपडे, प्रितेशला सोन्याची अंगठी दिली. प्रितेशने लॅपटाॅपचीही मागणी केली. बाबांनी सव्वा लाखाचा लॅपटाॅप घेऊन दिला. हळू हळू माझ्या माहेराहून विविध वस्तूंची पैशांची मागणी होऊ लागली. नंतर हे प्रमाण वाढू लागलं तसा मी विरोध केला. मग माझा छळ होऊ लागला. ” हजारो मुली सांगून येत होत्या माझ्या मुलासाठी. पण प्रितेशचं प्रेम होतं म्हणे हिच्यावर. मुलाच्या सुखासाठी केला समझोता. पण दळभद्री निघाली. आमचंच नशीब फुटकं”. घरातून असे विविध टोमणे, माझ्या माहेरच्या लोकांचा उद्धार करणे, मी काही बोलली तर मारहाण करणे सुरु झाले. त्यात मला कडक डोहाळे लागलेले. पण माझ्या तब्येतीकडे सगळेच दुर्लक्ष करायचे, ज्याच्यावर माझं प्रेम होतं, लग्न करुन त्याच्या जीवनात आले तो प्रितेशही दुर्लक्ष करू लागला, माझं ऐकेनासा झाला. माहेरी ही सर्व वार्ता सांगितली तर बाबा म्हणाले मुलीचं पहिलं बाळंतपण माहेरी होतं. मी तुला न्यायला येतो. काळजी करु नकोस. अशा अवस्थेत मन शांत ठेव. बाळाच्या जन्मानंतर होईल सगळं ठीक.

अमेयचा जन्म झाला, आणि जणू त्रिभुवनाचं सुख माझ्या कुशीत आलं. मी माझं सारं दुःख, विवंचना विसरले. बाळाचं आगमन मला संजीवनीसमान होतं. माझ्या सासरी कळवलं. पण कोणी बाळाला बघण्यास आले नाही.

कामाच्या व्यापात जमत नाही म्हणाला प्रितेश. ” असं कोणतं काम आहे प्रितेश कि बाळाला तुम्ही भेटत नाही. ” ” बाळाला भेटण्यासाठी बाळ माझं तर पाहिजे ” ” काय बोलताय तुम्ही, असं बोलवतं तरी कसं ” आणि मला चक्कर आली. मोबाईल खाली पडला. आई धावत आली, तिने मला सावरले.

 

बाळ दोन महिन्यांचा झाल्यावर बाबांनी मला सासरी पोहचविले. घरातील लोकांच्या वागणुकीत खूप फरक पडला होता. पण बाळासाठी, संसार टिकविण्यासाठी मी सगळं सहन करीत होते. प्रितेश आता वारंवार माझ्या अंगावर हात उचलत होते. मारहाणीचे व्रण माझ्या शरीरावर उमटू लागले होते.

माझी नणंद शोभासाठी स्थळपाहणी सुरु होती. आणि एकाठिकाणी पसंतीही झाली. आता बैठक होणार होती देवाण घेवाणीची. त्यात नवपरिणित जोडीसाठी मुंबईत एक फ्लॅट पाहिला होता. चांगल्या लोकेशनमधील 3BHK फ्लॅटची किंमत तीन करोड होती.

कधी नव्हे त्या सासूबाई चांगलं बोलू लागल्या. ” किती वाळलीस ग. बरं नाही का? अमेय खूप त्रास देतो ना. उद्या जाऊ दवाखान्यात. शोभानेही गरमागरम उपमा आणला. ” आण वहिनी बाळाला दे माझ्याकडे. तू आधी नाश्ता करुन घे “

हळूच सासूबाईंनी माहेरचीही चौकशी केली. अलका, शोभा या घरची मुलगी, आपली जवाबदारी. तिला फ्लॅट घेऊन द्यायचाय आपल्याला. काही रक्कम कमी पडतेय. सव्वा ते दीड कोटी. तुझ्या बाबांना सांग तेवढी मदत करायला. शेवटी आपल्या घर परिवारासाठी तुझंही कर्तव्य आहे ना. ” पण मी यावेळी खमकी होती, स्पष्ट नकार दिला, ” कितीदा मदत करायची हो माझ्या माहेरच्या लोकांनी. माझ्या सुखासाठी आजवर भरपूर लुटलं त्यांनी तुमच्यावर. त्यांनी कमवायचं आणि तुम्हांलाच देत राहायचं काय? स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवायचं काय त्यांनी”

” अरे देवा देवा, एवढं काय आणलंस ग तू माहेराहून कि त्यांना घरावर तुळशीपत्र ठेवावं लागलं. आम्ही काही कमवतचं नाही. तुझ्या माहेरच्या मेहेरबानीवरचं जगत आहोत नाही काय? तुझं माहेर तालेवार, आम्ही भिकारडे नव्हे काय? मग कशाला राहातेस या भिकारी लोकांमध्ये. जा की माहेरी. ” मी तशीच मुसमुसत राहिले. बाळ लहान, नवर्‍याचं बदललेलं वागणं, माहेराहून पैसे आणण्यासाठी सतत तगादा, वारंवार मला होणारी मारहाण. कंटाळले मी या जीवनाला. नको हे जीवन, नको तो काचेच्या वाटेवरील संसार,. नको आईबाबांनाही त्रास, त्यांचं ऐकलं नाही मी, प्रेमात आंधळी झाले होते. पण ते प्रेम नव्हतं, तो एक सौदा होता. पाहिजे तेव्हा त्यांची मागणी पूर्ण करणारा. पण आता ही चूक मी सुधरवणार. माझ्यामुळेच घडतंय ना हे सगळं आणि जीवनभर घडतच राहणार, आईबाबांना त्रास देणारी मी पनवतीचं ठरणार. नाही, नाही, हे सगळं थांबलं पाहिजे, थांबवलं पाहिजे. मी थांबवेन. बस झाला निर्णय. आजच याची अंमलबजावणी झाली पाहिजे. लावीन गळफास, होईल थोडी तडफड, मग एकदम शांत शांत शांत.

(ही कथा पूर्णतः काल्पनिक असून यातील कथानक व पात्रांशी कोणी व्यक्ती व संस्थेचे नामसाधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा)

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments