डाॅ. मीना श्रीवास्तव

? जीवनरंग ?

☆ बाक – भाग २ (भावानुवाद) – डॉ हंसा दीप ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव 

डॉ. हंसा दीप

(तो त्या सर्वांबद्दल विचार करायचा आणि आनंद व्यक्त करायचा. त्या सर्वांना प्रोत्साहन देत असतांना, आतल्या आत कुठेतरी आणि कधीतरी स्वतःबद्दल विचार करतांना उदास होणे हे तर स्वाभाविकच होते.) – इथून पुढे —- 

 मैदानात पाणी पोहोचवणे, कर्णधाराचा संदेश देणे आणि मैदानातील खेळाडूंना शुभेच्छा देऊन परत येणे हे ठरलेले होते. मग तो दिवस आला जेव्हा संघातील तीन खेळाडूंना एकाच वेळी पेटके यायला लागले. मात्र इतरांचा हा त्रास त्याच्यासाठी संधी बनली. आता मैदानात जायची पाळी त्याची होती आणि ज्या दिवसाची तो गेली कित्येक वर्षे वाट पाहत होता तो दिवस आला. तो नेटवर सतत सराव करीत होता. त्याचे हात चांगलेच स्थिरावले होते. तो इतरांपेक्षा अधिक मेहनत करत होता आणि त्याचे आरोग्यही त्याला चांगल्या प्रकारे साथ देत होते. प्रत्येक खेळाडूच्या कमकुवतपणाची स्थाने त्याच्या मनात घट्ट रुजली होती. शेवटी इतकी वर्षे धीर धरल्याचे त्याला गोड फळ मिळाले.

आतापर्यंत तो इतरांचा जयघोष करीत त्यांना प्रोत्साहित करीत होता, पण आता मैदान त्याच्या जयजयकाराने दुमदुमले होते. पण वर्षानुवर्षांपासून ज्या आनंदासाठी तो अत्यंत आसुसलेला होता, जो आनंद त्याने पूर्णपणे अनुभवला देखील नव्हता, नेमक्या त्याच वेळी एका जबर दुखापतीने त्याला बाकावर तर सोडाच, थेट घरीच बसवले. मात्र याच बाकाच्या कृपेने तो केवळ एक उदयोन्मुख खेळाडूच नाही तर एक लढाऊ व्यक्ती बनला. बाकावर बसून प्रेक्षकासारखा सामना बघणे आणि विरोधी संघाचा सामना करण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरणे हे दोन संपूर्णपणे वेगळे अनुभव होते. याच संघर्षशील वृत्तीने त्याच्या नशिबाची दारे सताड उघडली. त्या प्रतिक्षेच्या क्षणांत त्याने दाखवलेली संयमी वृत्तीच त्याचे सर्वात मोठे आणि महत्वाचे संचयित धन बनले. तेव्हापासून आजतागायत त्याने मागे वळून पाहिले नाही. हा बाकच त्याची प्रचंड शक्ती बनली. याच बाकावर बसलेला असतांना तो शगुनला सर्वप्रथम भेटला होता, इथेच शगुनने त्याला तो बाप बनणार आहे, ही गोड बातमी दिली होती आणि याच बाकावर त्याला शगुन गेल्याचे देखील कळले होते. या बाकाभोवतीच त्याच्या आयुष्याचे कित्येक अध्याय लिहिल्या गेले होते, आणि हो! अजून किती लिहिण्याचे शिल्लक होते कोणास ठाऊक!

 तो फक्त कामातून निवृत्त झाला होता, आयुष्यातून नाही. तो अनेक ठिकाणी गेला, पण त्या प्रत्येक ठिकाणी तो बाक हजर असायचा. तो त्याला जणू कांही प्रेमळ साद घालत होता, “ये ना! तुझ्या स्वागतासाठी मी इथेही हजर आहे बरं कां! ” निवृत्तीपूर्वी बाक त्याचा सवंगडी होता आणि आता निवृत्तीनंतर तर तो त्याचा आधारच बनला. त्याच्यासाठी बाक ही निव्वळ चार पायांवर उभी राहिलेली निर्जीव अशी बसण्याची जागा नव्हती. त्याच्या आयुष्यात या बाकाला वेगळाच अर्थ होता. या बाकाच्या प्रत्येक पायाने त्याला किती मोठे योगदान दिले. पहिल्याने व्यवसाय बहाल केला, दुसऱ्याने कुटुंब दिले, तिसऱ्याने त्याला आशेने जगायला शिकवले आणि चौथ्या पायाने त्याचा ध्यास जिवंत ठेवला. अशाप्रकारे, त्याच्या आयुष्यातील आनंदाची प्रसन्न पहाट असो वा दुःखाची कठीण काळरात्र, प्रत्येक प्रसंगी हा बाकच त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला.

 कधीकधी तो एकटाच बसायचा. मग त्याच्या जीवनात शगुनने प्रवेश केला. दोनाचे चार हात झाले. त्यांच्या संसारवेलीवर दोन कळ्या उमलल्या आणि मग काय, मुलांसोबत चाराचे आठ हात झाले. दोन्ही मुले मोठी झाली. त्यांना पंख फुटले आणि ते त्यांच्या आसमंतात विहार करायला उडून गेले. पुन्हा एकदा, फक्त ते दोघेच पती-पत्नी असे दोघेच मागे राहिले. काळ पुढे सरकत होता आणि एक दिवस हे वर्तुळ पूर्ण करीत शगुन देखील त्याला एकट्याला सोडून निघून गेली, कधीही न परतण्यासाठी! आता फिरून तो शून्यावर येत एकटाच उरला. इकडे तिकडे भटकत जीवनचक्राचे वर्तुळ पूर्ण करीत जिथून सुरुवात केली होती तिथेच तो परत येऊन पोचला. जणू एखादा मूर्ख माणूस आपल्याच घरापासून फारकत घेत दूर दूर भटकून येत परत त्याच घरी येऊन विसावतो. काळाच्या प्रवाहात जुने इमले ढासळत होते आणि नवीन वास्तू बांधले जात होते. अनेक ठिकाणी बाकडे गायबच झाले होते. वयोमानाने थकल्यामुळे आता तो फार दूर जाऊ शकत नव्हता. त्याने आपल्या मुलांकडे तक्रार केली, “माझी शगुन मला सोडून गेली आणि आता एकाकीपणाच्या या वेदना मला असह्य होत आहेत. ” त्याच्या लाडक्या लेकीने यावर एक कल्पना सुचवली, “बाबा, आता तुमच्या अंगणातच तुमचा आवडता बाक बनवून घ्या बरं. बघा, आपल्या स्वतःचा बाक असला की तुमचे सुख तुमच्याच हाती असेल. हवे तेव्हां आणि हवे तितके बसा, आडवे व्हा, अंमळ एखादी छानशी डुलकी घ्या किंवा मस्त झोप काढा. ” हे ऐकल्यासारशी जणू संपूर्ण जगाचा आनंद एकवटून त्याच्या चेहऱ्यावर झळकला होता. लगेचच एका तयार आरामदायी बाकाची ऑर्डर देऊन तो मागवल्या गेला. त्यावर स्थानापन्न होताच त्याच्या चेहऱ्यावरील हास्य म्हणाले, “ह्यॅ! एवढी लहानशी गोष्ट! हे तुला आधीच कां सुचले नाही? ” 

 मात्र प्रत्यक्षात घडले असे की जसजसे दिवस मंदगतीने पुढे सरकत होते तसतसा त्याचा एकमात्र प्रवास खोलीपासून अंगणातील बाकापर्यंतच सीमित झाला. तरीही हे समाधान होते की, कसा का होईना हा प्रवास सुरु होता. त्याच्या मालकीचा तो बाक भलेही घरात होता तरी त्यावर बसल्या बसल्या तो विचारांच्या वेगवान स्वैर अश्वावर आरूढ होत दूरवर मैलोनमैल फिरून यायचा. वर्षानुवर्षे जपलेल्या आठवणींचे चर्वितचर्वण अनवरत सुरूच असायचे. आणि मग, आपल्या स्वतःच्या बाकावर बसण्याचा अपरिमित आनंद काय वर्णावा! त्यात काय नव्हते! प्रेम-ममता, आदर-सन्मान, संवेदना -धैर्य, मोह-माया सर्व कांही!

 उणीव होती एकच, ती म्हणजे वर्तमान स्वीकारण्याचे धाडस! निष्क्रिय क्षणाची संख्या वाढत वाढत शेवटी असंख्यांवर जाऊन पोहोचली. ते क्षण त्याला टोचून टोचून भयंकर वेदना देत गेले. कधीकधी दगडांचे घासून घासून वाळूत रुपांतर व्हायचे तर कधी वर्षे उलटल्यानंतर त्याच रेतीचे ढीग जमा होत तेच कठोर खडक बनत. इतिहासाच्या पानांचे देखील असेच परिवर्तित होणारे थर असत. सरतेशेवटी, एके दिवशी, त्याच्याच प्रिय बाकावर बसल्या बसल्या तो अनंताच्या यात्रेला निघाला, कधीही परत न येण्यासाठी! निर्जीव बाक तिथेच ठामपणे बसला होता चार पायांवर, कुठल्या तरी अनामिक पथिकाची वाट पाहत! अखेरचे मिटण्यापूर्वी त्याच्या अदृश्य, तरीही सजीव नेत्रांनी बाकाकडे रोखून पाहिले. त्या बाकावर एक धूसर प्रतिमा उमटत होती. त्याने ओळखले! बाकावर तूलीच बसलेली होती!

– समाप्त –

हिन्दी कथालेखिका : सुश्री हंसा दीप 

मराठी अनुवाद : डॉ. मीना श्रीवास्तव 

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
5 1 vote
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments