श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ जीर्णोद्धार… – भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
(मॉलमध्ये हजारात खर्च करणारे, लिंबं, भाज्या विकणाऱ्या आजीकडे दोन पाच रूपयासाठी घासाघीस करताना दिसतात. शेतमालाचे भाव वाढले की ‘महागाई वाढली’ असा गळा काढणारे नेते, भाव कमी झाले की शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरून काढणार, म्हणून सरकारविरुद्ध मोर्चे काढायला मोकळे असतात.”
“बरं ते समदं श्यानपन सोड. त्या अडत्यानं मला काय इच्यारलं, ते म्हाईत हाय का न्हाई तुला? त्येच्याबद्दल बोल, काय करायचं ते सांग?”)
इथून पुढे – – –
त्यावर पांडुरंग खळखळून हसत म्हणाला, “देऊन टाक की त्याला मंदिर चालवायला. बिघडलं कुठं? अरे, तुम्ही लोक शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहत नाही. पण आता दक्षिणेत खाजगी मंदिर स्थापन करण्याचा एक मोठा व्यवसाय झालाय. तो अडत्या पाच लाख देतोय तर घे. बॅंकेचे हप्ते फेडून, नवीन सिंचन कर्ज घे आणि पुढची पिकं लावून टाक. तो अडत्या आणखी पाच लाख रुपये खर्च करून मंदिराचा जीर्णोद्धार करेल. मलाही थोडा बदल हवा आहे. वर्षानुवर्षे त्याच वास्तुत आम्ही घुसमटतोय. त्याचं नूतनीकरण झाल्यावर नवनवीन भक्तगण येतील. माझ्या भेटीसाठी शहरापासून विठ्ठलवाडीपर्यंत टेम्पोंच्या चकरा वाढतील. बुधवारच्या अभिषेकासाठी भक्तांची रांग लागेल. तो अडत्या ह्यातून खूप पैसा कमावेल, हे मात्र नक्की. पण तू काळजी करू नकोस. दहा वर्षानंतर, तो मंदिर सोडून जाईल किंवा पुन्हा तुझ्यासमोर नवीन वाढीव रकमेचा प्रस्ताव ठेवेल. त्यावर योग्य तो निर्णय घ्यायचा अधिकार तुलाच असणार आहे. ” एवढं सांगून पांडुरंग अंतर्धान पावला.
खरंतर, शेतकी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आणि कुशाबाच्या मनात चाललेला खेळच स्वप्नात प्रकट झाला होता. काही का असेना, त्याला मनातल्या द्विधा मनस्थितीतून बाहेर तरी येता आलं. गावात मात्र कुजबुज सुरू झाली—“कुशाबानं देऊळ इकायला काडलंय म्हनतात, खरंय का? ” एक वयस्क म्हातारा खाकरत खाकरत म्हणाला, “देऊळ म्हंजे गावाचा आत्मा हाय. असं कसं इकंल कुशाबा? ” हे ऐकून कुशाबाच्या मनात अपराधाची सल चाळवायची, पण लगेच पांडुरंगाची मूर्ती त्याच्या डोळ्यासमोर उभी राहायची. “देऊन टाक की त्याला मंदिर चालवायला. बिघडलं कुठं? ” असं विठ्ठलाचे शब्द त्याच्या कानात घुमायचे.
थोड्याच दिवसात त्याचं आणि अडत्याचं रीतसर रजिस्टर करारपत्र झाले. पाच लाखाचा चेक घेऊन कुशाबा कुसुमच्या सोबतीने बॅंकेत लगबगीने आला. आज त्याला दरसालाप्रमाणे कर्जमुक्तीचा आनंद अनुभवायचा होता. “हा घ्या चेक. कर्ज किती हाय त्येचा हिसाब बघा अन समदं एकदाचं बार करून टाका. ”
मॅनेजर हसत हसत म्हणाले, “कुशाबा, चेष्टा करताय होय? तुमचं कर्ज तुमच्या दोन्ही मुलांनी मिळून केव्हाच भरून टाकलेलं आहे, शिवाय तुमच्या बचत खात्यात पाच लाखाच्यावर रक्कम जमा आहे. ” कुशाबाला काय बोलावं, हे समजेनासं झालं. मॅनेजरनं पुढं सांगितलं, “हे पाच लाख आणि खात्यातले पाच लाख मिळून तुमच्या नावाने तसंच कुसुमताईंच्या नावाने मुदत ठेव करायला सांगितलं आहे. दर तीन महिन्याला तुमच्या खात्यात त्याचं व्याज जमा होईल. दोन मिनिटं थांबा” असं म्हणून मॅनेजर साहेब आत जाऊन आले, त्यांच्या हातात लाल रंगाचं पाकिट होतं. त्यातला डाग काढून त्यांच्या हातात देत म्हणाले, “हा घ्या तुमचा डाग. डाग मिळाला म्हणून इकडे सही करा. ” कुसुमच्या डोळ्यांत पाणी आलं. कुशाबानं ही धोतराच्या सोग्याने हळूच डोळे पुसले.
कुशाबा भावविभोर मनस्थितीत घरी आला. कुसुम मात्र शांत राहिली आणि तिने मुलाला मोबाईल लावून कुशाबाच्या हातात दिलं. “अनंता, लेकरा. तुझा भाऊ वसंता कुठाय? ” वसंता त्याच्याकडेच बसल्याचं अनंताने सांगितलं. “माझी अडचण न सांगताच, तुमी दोघांनी बॅंकेचं कर्ज फेडलंत, आईचं डाग सोडवलंत. मुदतठेवीत पैसे ठेवायला सांगिटल्याचं बॅंक मॅनेजरनं सांगिटलं. पन मुलांनो, माजी खूप मोठी चुकी झालीया. कर्जाचे हफ्ते फेडायचं हुते म्हनून मी तुमा दोघान्ला न सांगताच आपलं देऊळ दहा वर्सासाठी राजमल सेठना चालवायला द्यायचं म्हनून अॅग्रिमेंट केलं हाय. ”
“आबा, तुम्ही जे काही केलं आहे, ते आपल्या कुटुंबाचं हित बघूनच केलं असेल. आम्हा दोघांना एका गोष्टीचं वाईट वाटलं. एवढं मोठं संकट आलं असताना देखील तुम्ही आम्हा दोघांनाही सांगितलं नाही. आबा, तुमच्यावर संकट आलं तर ते आमच्यावरचं संकट असते हे विसरू नका. आम्ही का वेगळे आहोत? आम्ही जे काही केलं ते आमचं कर्तव्यच आहे. यंदा दिवाळीला आम्ही सगळेच गावी येत आहोत, तेव्हा समक्ष बोलू” असं म्हणून त्याने फोन ठेवला.
बॅंकेचे संपूर्ण कर्ज फिटल्याने कुशाबाला नवीन सिंचन कर्ज सहज मंजूर झालं. परंतु जे काही झालं ते बॅंक मॅनेजरच्या नजरेतून सुटलं नाही. ते सहज म्हणाले, “कुशाबा, हे संपूर्ण कर्ज शेतीच्या उत्पन्नातून भरलं असतं तर मला खूप आनंद झाला असता. असो. कुशाबा, राग मानू नका. अहो, शेतीपुढे हवामानातील बदलांचे मोठे आव्हान असते. बाजारभावात चढउतार होत असतात. अशा स्थितीत तुम्ही बहुपीक पद्धतीकडे वळायला हवं. कारण त्यातील काही पिकांना जरी चांगला भाव मिळाला तरी इतर पिकांच्या नुकसानीची भरपाई होऊन जाते. बाजाराचा अभ्यास करून आंतरपीक पद्धतीच्या अवलंबावर भर द्यायला हवं. प्रत्येक पिकाच्या जमा खर्चाचा हिशेब नीट ठेऊन अनावश्यक खर्च टाळावा. काही फळझाडं लावावीत, गाई आणि म्हशींचे पालन करून दूध उत्पादन करावं. कुक्कुटपालन, शेळीपालन याकडेही लक्ष पुरवावं. त्यातून नियमित उत्पन्न मिळवता येते. ” कुशाबाला मॅनेजरचं म्हणणं पटलं. नव्या उत्साहाने बाहेर पडला.
थोड्याच दिवसात कुशाबाच्या वावरातल्या विठ्ठल-रखुमाईच्या मंदिराचा विलक्षण कायापालट झाला. विठ्ठलवाडीत भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली होती. मंदिराच्या मागेच असलेलं कुशाबाचं शिवारही हिरवंकंच होऊन त्यात वेगवेगळी पिकं आणि फळझाडं जोमानं डोलत होती.
एका संध्याकाळी कुशाबा बांधावर उभं राहून झुळुझुळु वाहत असलेल्या पाण्याकडे पाहत होता, त्यात अस्ताला चाललेल्या सूर्याच्या किरणांचं प्रतिबिंब पडलं होतं. कुशाबाने नकळत हात जोडले आणि पुटपुटला—“अगा पांडुरंगा मायबापा! हे सगळं तुझ्यामुळेच घडून आलंय. मी खचलेलो असताना तूच मला उचलून घेतलंस. आता एकवार आम्हा दोघान्ला पंढरीला बोलवून घे, मला तुझ्या लोण्यासारख्या मऊशार पायाची लई ओढ लागून राह्यली हाय. ” आणि कुशाबा कृतार्थ मनाने घराकडची वाट चालू लागला.
– समाप्त –
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






