सौ राधिका -माजगावकर- पंडित

? जीवनरंग ?

☆ ‘आम्हाला समजून घ्या…’ ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित

आलिशान गाडीत बसलेल्या, गीता वाचनात दंग असलेल्या, सुटाबुटातील राघवदास शेठच्या पुढे एकदम टाळी वाजली. ड्रायव्हर त्या व्यक्तीला हाकलत होता… “ए चल! हो बाजूला. एक तर ट्रॅफिक जाम झालंय. शेठना महत्वाची काम आहेत. आणि तुझं काय रे मधेच हे झेंगटं? काही काम धंदा करा. तुम्हाला दुसरा उद्योग काय आहे म्हणा प्रत्येकापुढे टाळी वाजवून हात पसरण्या शिवाय”… गोविंदा जुना वयस्कर ड्रायव्हर होता म्हणून शेठसमोर इतकं बोलू शकला होता..

शेठ गोविंदावरच चिडले, “ही काय बोलण्याची पद्धत झाली कां तुझी? “.

“अहो साहेब नेहमीचचं आहे यांचं हे! टाळ्या वाजवून आपलं लक्ष वेधून घेतात आणि पैसे दिल्याशिवाय हालतच नाहीत. पावडर फासायला ओठ रंगवायला पैसा हवा असतो त्यांना. हा आतां भेटला ना! तो रोज येतो या चौकात. नंतर जातो समोरच्या मंदिरात आणि तिथे बसतो टाळ कुटत. “.

तृतीयपंथाच्या अगदी जवळून भराराsss.. गाडी पुढे गेली. तो घाबरून मागे सरकला. हो! तृतीयपंथीच होता तो. जगाच्या शाळेतला, वाट्याला आलेल्या भोगाने, परिस्थितीने, ग्रासलेला त्याचा चेहरा राघवदासांच्या डोळ्यासमोरून हालतच नव्हता. कां कोण जाणे शेठजींच्या मनांत त्याच्याबद्दल दया, उत्सुकता निर्माण झाली आणि योगायोग असा की दुसऱ्या दिवशी त्याचं रस्त्यावर त्याचं चौकात तो दिसला.

… समोर महादेवाच्या मंदिराचा कळस कोवळ्या उन्हात चमकत होता. सोमवार असल्याने गोविंदाला गाडी मंदिरासमोरच थांबवायला सांगितली.

आरती संपली आणि प्रसाद पुढे आला. घोगरट आवाज कानावर पडला..

“शेठ हा घ्या प्रसाद. एक सांगु कां, तुमच्या ड्रायव्हरदादांचं बोलणं मी ऐकलं, त्यांची रागारागाने माझ्या अगदी जवळून नेलेली गाडी माझ्या जीवावरही बेतली असती. तुम्हीं दिलेली भीक आम्ही या वीतभर पोटासाठी आणि या भोले बाबाच्या प्रसादासाठी वापरतो हो.! “.. असं म्हणून त्याने शेठजींच्या हातावर प्रसाद ठेवला आणि तो मंदिराच्या ओसऱीवर जाऊन बसला.

इकडे शेठजींच्या मनांत आल, कसं असेल ह्यांचं आयुष्य? कशा असतील याच्या व्यथा? …

ह्या विचाराने राघवदास अस्वस्थ झाले. आपलेपणा आणि उत्सुकता त्यांच्या मनांत दाटून आली आणि नकळत त्यांनी त्याच्याकडे मोर्चा वळवला.

… सांवरून आणि घाबरून तो बाजूला सरकला. त्याला प्रेमाने चुचकारत शेठनी विचारले,

“नांव काय रे बाळ तुझं? “.

खाली मान घालून तो म्हणाला, “भागू म्हणतात मला”

“अरे लाजतोस काय असा? तुला कुणी नात्याचं नाही कां? मला जवळचा मित्र समज आणि खुल्या दिल्याने मनातलं सांग. ”.

भरून आलेले डोळे पुसत तो म्हणाला, ” शेठ इतकी आपुलकी कुणीच दाखवली नाही हो मला, आमच्याकडे समाज कुचेष्टेने, तिरस्काराने बघतो नां! तेव्हां हृदय जळत हो आमचं! आम्हीही माणसं आहोत. आम्हाला मन, भावना आहेत. मला कुणीच नाही. पण मग मी या भोलेनाथाला माझी व्यथा आणि कथा सांगतो. कारण तोही अर्धनारी नटेश्वर होता ना”! ..

शेठजींनी भागूच्या पाठीवर शाबासकीची थाप दीली. “किती छान बोलतोस तु! शिकलास कां? किती शिक्षण झालंय तुझं? “.

 “होय शेठ. इथल्या शंकरबाबा साधुंनी मला वाढवलं. शिक्षण दिलं. समाज मला मागे रेटत होता. मला झिडकारत होता. पण बाबांनी मला पाठीशी घातलं. शंकर बाबा म्हणाले, “भूतकाळ विसर भविष्याची आशा धर आणि वर्तमानात बिनधास्त जगं. देवाला आणि दैवाला दोष देऊ नकोस जीवनाबद्दल तक्रार करू नकोस. आहे त्या परिस्थितीचा स्विकार करून समाज सेवा कर. ”.

शेठजी त्याच्या जवळ सरकले, त्याच्या पाठीवर हात फिरवून तें म्हणाले, विचार किती सुंदर आहेत तुझे, शंकरबाबांनी तुझ्या मनाला आशा आणि आयुष्याला दिशा दाखवलीय”..

“हो शेठ माझे शंकर बाबा दुसरे भोले बाबाचे अवतारच आहेत या मंदिराची देखभाल साफसफाई माझ्यावर सोपवून तें केदारनाथला गेले आहेत. माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी मार्गी लावलंय समाजाने आम्हाला झिडकारले, वेगळ्या नजरेने बघितले नां की उरातली जखम भळभळते हो! पण आपण याच समाजाचं काहीतरी देणं लागतोय ही भावना मनांत ठेवण्याचा गुरुमंत्र आमच्या गुरूंनी, शंकर बाबांनी आम्हा तृतीयपंथांनां दिला आहे.”

शेठजींची उत्सुकता चाळवली गेली होती. भळभळती जखम उरात दडवून जीवन प्रवास करणारा महाभारतातला ‘अश्वथामा’ त्यांच्या समोर बसला होता. शेटजी पण दुःखी होते. कारण एका अपघातात त्यांच् विश्व उध्वस्त झालं होतं. मनातलं दुःख बाहेर पडून ते कुठेतरी व्यक्त होणं प्रत्येक व्यक्तीसाठी आवश्यक असतं. आणि तो विश्वास भागुला त्यांनी दिला..

ते म्हणाले, “बाळा मला सांग, तुझे इतर बांधव भगिनी समाजासाठी काय काय करतात? सांगशील कां सगळं मला? खूप जण काही काही करतच असतात हो शेठ! अभिमानाने नुकताच घडलेला किस्सा मी तुम्हाला सांगतो, अमित उर्फ आम्रपाली यांनी दारोदारी चौकाचौकातून फिरून पूरग्रस्तांसाठी जोगवा मागून, आठ दिवसात, चाळीस कट्टे तांदूळ, 350, ब्लॅंकेट्स, ५०० सॅनिटरी पॅड, 100 वह्या, चणाडाळ, तेलतुपाचे डबे, साखर, चहा, पीठ, मीठ मसाला गोळा करून कार्यकर्त्यांच्या मदतीने घरोघरी पोहोचवला.

असें अनेकजणांचे अनेक किस्से आहेत. शेठजी सांगायला गेलो नां! तर आमच्या कथेची गाथाच होईल. “

हे सारं ऐकून शेठजी अवाक् झाले. त्यांच्या मनांत आलं आपण आपलचं दुःख उगाळत बसलो होतो. घरदार आहे, मानमरातब आहे, धनसंपदा प्रसन्न आहे आपल्यावर. तिचा सदुपयोग व्हायला हवा. ह्या तृतीयपंथांचेही आपण देणं लागतो. ही पण समाजसेवा, देशसेवाचआहे..

– – – स्वातंत्र्यवीर सावरकर राघवदास शेठजींचे आदर्श होते. त्यांच्या पुस्तकांचं अनेक वेळा त्यांनी पारायण केलं होतं. सावरकरांचं एक वाक्य त्यांना आवलं, “देह आणि देव यांच्या मधला प्रवास देशसेवेसाठी असावा. ” राघवदासांनी ठरवलं भागुला मदत करून, आपली धनसंपत्ती ह्या लोकांसाठी खर्च करायची. कारण हे पण माझे देशबांधव आहेत. विश्वकर्मा नाही पण महादेवापुढचा नंदी होऊन आपण सत्कर्म साधायचं. असा संकल्प सोडून, भागुच्या पाठीवर हात फिरवून, पुन्हां भेटण्याचे आश्वासन देऊन शिवलिंगापुढे ‘ओंकार’ प्रार्थना त्यांनी केली. आणि शेठजी निश्चयाने शिवमंदिराच्या बाहेर पडले..

|| ॐ नमः शिवाय ||

© सौ राधिका -माजगावकर- पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments