सौ. दीपा नारायण पुजारी
पुस्तकावर बोलू काही
☆ मनातलं भावविश्व – लेखिका – सुश्री ज्योती जोशी ☆ परिचय – सौ. दीपा नारायण पुजारी ☆
पुस्तक परिचय
पुस्तक : मनातलं भावविश्व
लेखिका – सौ. ज्योती जोशी
प्रकाशिका – विद्या अनिल फडके
मनोरमा प्रकाशन
पृष्ठे -२००
किंमत -३८०/-
लेखिका सौ. ज्योती जोशी यांचं हे पहिलंच पुस्तक. एका गृहिणीनं आपल्या मनात येणारे विचार कागदावर उतरवावेत, त्या विचारांना ललितलेखांचं रुप लाभावं आणि त्या ललितलेखांना पुस्तकाची बांधणी लाभावी ही एक सुंदर स्वप्नसाखळी आहे, नाही का? पण मनोरमा प्रकाशनानं हे स्वप्नं साकार केलं आणि संग्रही ठेवावं असं हे पुस्तक वाचकांच्या भेटीला आलं. श्री. भरत जाधव यांच्या कुंचल्यातून साकारलेलं मुखपृष्ठ लक्षवेधक आहे. लेखिकेच्या मनातला साकुरासारखा बहरलेला वृक्ष, गुलाबी फुलांचे घोस, संथ वाहणारी नदी, उगवता सूर्य या पार्श्वभूमीवर स्वतःतच मग्न असणारी कुणी ‘ती’ – – हे चित्र तिच्या मनातलं विश्व या पुस्तकात उलगडलं आहे याची खात्री देते.
पन्नास लेखांचं हे तसं छोटेखानी पुस्तक. सहज हातात घ्यावं आणि मनात येईल ते पान उघडावं आणि वाचावं. सलग वाचण्याचं बंधन नसल्यानं कधीही, कसंही वाचता येतं. मनोगतात लेखिका म्हणते, “मनोगत म्हणजे सुखाचं प्रसरण आणि दु:खाचं नि:सरण. लेखिकेचं स्वतःचं एक परीघ आहे. सर्वसामान्य स्रियांप्रमाणे तिचं कुटुंब हे तिचं विश्व आहे. या विश्वातील भावभावना, यातील आनंद, दु:ख नाती या सगळ्यांनी तिच्या मनात फेर धरला आहे. हा भावनिक फेर शब्दबद्ध होऊन लेखात उतरलेला दिसतो. तसंच बाहेरच्या विश्वातील अनुभवही तिला बोलतं करतात, लिहितं करतात. या पुस्तकातील अनुभव काठावर उभं राहून घेतलेले नसून लेखिका ते अनुभव, ते क्षण सजगतेनं जगली आहे.
‘वटपौर्णिमा’ या पहिल्याच लेखात क्षणोक्षणी येणारे अनुभव लेखिकेला कशी चेतना देतात याचं वर्णन वाचकांच्या मनाचा ठाव घेतं. क्षण क्षणिक न राहता तिच्या मुठीत कसे सामावतात याची गंमत वाटते तसेच लेखिकेच्या विचारांची आंदोलनं आपल्यापर्यंत तितक्याचं तीव्रतेने पोचतात. शब्द लालित्यिबरोबर तिला असलेलं सामाजिक भानही वाचताना लक्षात आल्या वाचून रहात नाही. मोकळा श्वास या लेखात तिचं हे सामाजिक भान चांगलंच जाणवतं. श्रद्धा, अंधश्रद्धा या कल्पना झुगारून देऊन तिच्यातली माणुसकी तिला एका ट्युमर झालेल्या जोगतिणीला जटा कापून ऑपरेशनसाठी राजी करते तेव्हा तिच्या जाणिवा कशा सजग आहेत हे लक्षात येतं. निव्वळ शब्द वापरून जागे व्हा असं म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करणं जास्त आव्हानात्मक आहे. हे आव्हान ती सहजपणे पेलते.
‘सखा ग्रीष्म’ हा लेख वाचताना लेखिकेचं वेगळेपण लक्षात येतं. ग्रीष्म तिचा सखा आहे, तो तिला आवडतो, इथंच तिचा दृष्टिकोन समजतो. ग्रीष्म ऋतूतील नयनमनोहर निसर्ग तिला खुणावतो, ऋतुचक्रातील या ऋतुचं अनन्य साधारण महत्त्व सांगताना ती रणरणत्या दुपारकडं बघण्याची सकारात्मक दृष्टी देते.
बालपणाशी, आई वडिलांशी, आत्या, काकू अशा नातेवाईकांशी तिची जुळलेली नाळ सुद्धा या लेखातून जाणता येते. ’उंटावरचाशहाणा’, ‘गोदाक्का’ ही काही उदाहरणं देता येतील.
‘दिवाळी, होळी’, या सारख्या सणांच्या लेखातून आपलं आत्मभान कसं जागृत झालं याविषयी बोलते. स्वतःतल्या ‘मी’ ला शोधणं, षड्रिपुंना जिंकण्याचा प्रयत्न करणं, यांसारख्या प्रयत्नांविषयी वाचताना कौतुक वाटतं.
कर्तव्यदक्ष गृहिणी म्हणून वावरताना ती स्वतःतल्या कलाकारला जागं ठेवते. संगीत आणि चित्रकला या कलांची आवड जोपासणारी ही लेखिका तिच्या कलाकार रुपात लेखात भेटत राहते. ’रंगसंवेदना’, ‘हे सुरांनो चंद्र व्हा’, ‘संगीत कला’ अशा काही लेखांचा उल्लेख येथे करावासा वाटतो. पण कलाकाराचं मन कमी अधिक प्रमाणात सगळ्याच लेखातून आपल्या भेटीला येतं. त्यामुळंच सर्जनशील, संवेदनक्षम व्यक्तिमत्त्व वेगवेगळ्या लेखातून व्यक्त झालेलं आढळतं. ‘कलाबाई कला शोधतेय’ म्हणत जीवनाचा आनंद देणारे सूर कोणते हे सहज सांगून जाते. संगीतामुळं संस्कार होतात. तसंच संगीत ही एक थेरपी आहे. शब्दांवर सुरांचे संस्कार झाले की गाणं बनतं. ते गाणं ह्रदयापासून गायलं की आत्मशोधाचा मार्ग सापडतो. विविध रंगांनी आयुष्याचं इंद्रधनु रंगवताना काळ्या रंगातलं रंग सौंदर्य उलगडून दाखवते. पांढऱ्या रंगाची शुभ्र फुलं आणि पांढरे पीस यातून विरक्तीचा रंग देखील सौंदर्यानं खुलू शकतो हे सांगते. रंगांचं महत्त्व सांगताना गाण्यांचे दाखले दिले आहेत. लेखिकेची गाण्यांबरोबरची मैत्री या सगळ्या लेखांमधून जाणवत राहते. सुरांप्रमाणेच शब्दही तरल, लयदार, ठेका घेत, विविध विषय आळवत गिरक्या घेत वाचकांपर्यंत पोहचतात. ’हे सुरांनो चंद्र व्हा’ या लेखात पुन्हा एकदा लेखिकेचे हे सुर आपल्याला भेटतात.
बायकांची खरेदी हा मुळातच थट्टेचा विषय. या विषयावर लिहिताना खरेदीचा टेम्पो आल्यावर बायका कशी टेम्पो भरून खरेदी करतात हे रंजक करून ‘गोडुला’ ‘वरकमाई’या लेखात मांडले आहे. परदेश प्रवासात सुद्धा बॅगा भरभरून, जास्तीची बॅग विकत घेऊन खरेदी करतील पण शॉपिंगचा हव्यास सुटणार नाही हे सत्य खुमासदार शैलीत विषय मांडणी करून सांगितले आहे.
मोती पोवळे सोडून ‘शाळीग्राम’ निवडणारी, मैत्रीचा ‘स्मृतीगंध’ जपणारी, भूतकाळात न रमता वर्तमानातलं वास्तव स्विकारणारी, भारतीय संस्कृतीचा सार्थ अभिमान असणारी, मोनालिसाच्या चित्रातलं तिचं सौंदर्यापेक्षा तिला तिच्या चेहऱ्यावरचं हास्य जास्त विचारप्रणव बनवतं. लडाखच्या पहाडी रागाचे सूर कानावर पडत असताना, ज्ञानेश्वरांच्या अभंगात, भक्तीरंगात रंगणारी अशी वेगवेगळ्या रुपात लेखिका भेटत राहते. आपण तिच्या भावविश्वाशी हळूहळू तद्रुप होत जातो.
– – असे हे भावस्पर्शी पुस्तक रसिकांनी आवर्जून वाचावे असेच आहे.
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
फोन नं : 9665669148 ईमेल : deepapujari57@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





