मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ ‘आनंदयात्री रवींद्रनाथ’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

? पुस्तकावर बोलू काही ?

 ☆ ‘आनंदयात्री रवींद्रनाथ’ – श्री विश्वास देशपांडे ☆ परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

पुस्तक : आनंदयात्री रवींद्रनाथ

लेखक : श्री. विश्वास देशपांडे 

प्रकाशक : सोहम क्रिएशन अँड पब्लिकेशन्स, पुणे.

हे पुस्तक हातात घेतल्यावर ज्याकडे आधी लक्ष जाते ते म्हणजे त्याचे आकर्षक मुखपृष्ठ आणि रवींद्रनाथ यांचा गूढ, गहन वाटणारा परंतु शांत, निश्चयीपणा दर्शविणारा फोटो आणि ‘एकला चालो रे’ हे वाक्य.. जे जे अतिशय अर्थपूर्ण आहे. आकर्षक रंगातील मुखपृष्ठ व प्रस्तावनेतील मोजकी वाक्ये घेऊन सजलेले मलपृष्ठ.. जे पुस्तक उघडण्यापूर्वीच त्याची व्यापकता दर्शवतात. त्यानंतर पुस्तकातील ‘अर्पणपत्रिका – ज्या दोन आनंदयात्रींना समर्पित केली आहे, त्यांच्या फोटोसह दिसते प्रस्तावनेच्या शेजारील पानावर रवींद्रनाथ यांचा जो फोटो आहे, त्यातील डोळे फारच बोलके व संदेश देणारे आहेत. मा. डॉ. नरेंद्र जाधव यांची प्रस्तावना पुस्तक व लेखक यांच्या विषयी अत्यंत महत्वाची माहीती सांगते. आवर्जुन वाचावी अशी सुलभ भाषेतील प्रस्तावना! त्यानंतर मा. लेखक यांचे मनोगत वाचायला मिळते. मनोगत वाचताना लेखकांचा प्रामाणिकपणा, ऋणनिर्देश विशेष जाणवतात. पुस्तकाइतकेच वाचनीय हे मनोगत आहे.

श्री विश्वास विष्णु देशपांडे

पुढील पानावर जी अनुक्रमणिका वाचायला मिळते, ती बघून थोडे आश्चर्य वाटते, जर पुस्तकच ‘रवींद्रनाथ’ यांच्याविषयी आहे, तर अनुक्रमणिका का दिली असेल? परंतू ती वाचल्यावर लक्षात येते, हे तर त्यांचे विविध पैलू आहेत. त्या त्या लेखात त्या त्या पैलूचे दर्शन घडते.

कौटुंबिक पार्श्वभूमी रवींद्रनाथ कसे घडले, त्यांच्यावर कोणते संस्कार झाले हे समजण्यासाठी कौटुंबिक पार्श्वभूती अत्यंत महत्वाची ठरते. नव्यातील चांगले स्वीकारणे व जुन्या कालवाहय गोष्टींचा त्याग या साठी लागणारा डोळस विवेक या कुटुंबात होता. इंग्रज प्रवाहात वाहून. न जाता स्वयंप्रज्ञ वागणे कसे असावे हे वाचणे महत्वाचे आहे.

समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी सगळे कुटुंब विविधकलांचे भोक्ते होते. व प्रत्येक व्यक्तीजवळ कोणतीतरी कला होतीच. हेच संस्कार रवींद्रनाथ यांच्यावर झाले.

व्यक्तिमत्वाची जडण घडण – यालेखात त्यांच्या मनावर उत्तम संस्कार कसे घडले आणि शांतीनिकेतन विषयी महत्वाची माहिती गोष्ट रूपाने समोर येते. हे पालकांनी आवर्जून वाचायला हवे.

शांतिनिकेतनच्या स्थापनेमागील विचार – रवींद्रनाथ यांचे विचार कसे घडत गेले, अनुभवातून ते काय व कसे शिकले शाळेविषयीचे त्यांचे मत आणि त्यातून आकाराला येणार विचार लक्षात येतात.

रवींद्रनाथांच्या जगणं आनंदी करणाऱ्या शैक्षणिक संकल्पना -मानव चराचराचे कल्याण व्हावे, असे शिक्षण निसर्गातून मिळावे अशा शैक्षणिक संकल्पना वाचायला मिळतात. अर्थात वेगळे काही करणाऱ्याला विरोध असतोच. तो इथेही झालेला दिसतो

शांतिनिकेतनची स्थापना:- आलेल्या अडचणी, संकटांची मालिका असूनही त्यांचा ठाम निर्धार दिसतो.

आनंददायी शांतिनिकेतन – जीवन व शिक्षण हातात हात घालून चालले तर शिक्षण किती आनंददायी होते हे सांगणारे अनेक मौलिक विचार, प्रसंग व अनुभव यातून समजतात.

शिक्षणाचं माध्यम मातृभाषा – यात मातृभाषेचे महत्त्व सांगणारे विचार व त्याप्रमाणे केलेले आचार दिसतात. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर मातृभाषेतून भाषण करणे हे वेगळेपणाचे वागणे, आणि माणसात तफावत पडण्याची कारणे समजतात.

कमालीचा साधेपणा आणि मनाची श्रीमंती – माणसे जोडण्याची कला रवींद्रनाथांना अवगत होती. त्यातूनच अनेक ऋषीतुल्य व्यक्ती शांतिनिकेतन मध्ये येत असत. त्यातून प्राचीन परंपरेचे पुनरुज्जीवन झाले. त्यांच्या या संस्थेत साधेपणा व सौंदर्य जपले जात होते. सोन्यापेक्षा फुलातील सौंदर्य समजावून दिले जात होते

सहजता हा रवींद्रनाथांच्या शिक्षणाचा प्राण सहजता केंद्रस्थानी ठेवून ही पुस्तक निर्मिती लेखकांनी केली आहे.. सहजता आणि शिक्षणमूल्य एकत्र कसे परिणामकारक होतात ते त्यांनी दाखवून दिले.

टागोरांना महाराष्ट्राशी जोडणारी सुंदर व हळवी कहाणी बरेच काही शिकवून जाते. नाते उदात्त कसे असावे, प्रेरणादायक कसे असावे हे आवर्जून वाचावे.

बहुमुखी प्रतिभा :– घरातील वातावरणाच्या आनंदलहरी मुलांवर किती सकारात्मक परिणाम करतात आणि परिणामस्वरूप मुले किती प्रतिभासंपन्न होतात… हे लक्षात येते.

कवितेशी मैत्री वाचत असताना त्यांच्या कवीमनाची ओळख होते. हेच कवीमन विविध प्रसंगी कवितेतून व्यक्त होते. अगदी मृत्यूपूर्वी काही अर्धा ते पाऊण तास त्यांनी मृत्यूवर कविता केली होती. विविध कवितांमधून त्यांचे स्वभाववैशिष्ट्य समजते.

नाटककार रवींद्रनाथ – शिक्षण घेत असताना विविध साहित्यकृतींचा अभ्यास करत विसाव्या वर्षी त्यांनी ‘वाल्मिकी प्रतिभा’ नाटक लिहीले.

रवींद्रद्रनाथांची अपारंपरिक लेखनशैली – त्यांनी स्वतःची शैली विकसित केली. टीका सहन केल्या. अनुभवलेला निसर्ग कवितेतून प्रगट झाला.

विश्वकवी रवींद्रनाथ त्यांनी साहित्य, कला अशा सगळ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला. सारे आयुष्य समाजासाठी समर्पित केले. त्यांचा ‘गीतांजली’ काव्यसंग्रह त्यांनी परमेश्वराला अर्पण केला आहे. याने त्यांचे नाव विश्वात पोहोचले. ते जसे व्यक्त झाले तसेच जगले.

अष्टपैलू साहित्यिक त्यांचे सगळेच साहित्य असे आहे की कोणतेही पान उघडावे आणि रवींद्रनाथांना भेटावे.

सर्वात मोठी देणगी– ‘जन गण मन’.. त्याचे महत्व व त्यामागील रोचक सत्य लक्षात येते.

रवींद्रनाथांची अफाट आणि विस्मयकारक काव्यसृष्टी -त्यांच्या विविध कविता, त्यातील अर्थ, हेतू हे सगळे या पुस्तकातून समजते.

कथाकार रवींद्रनाथ कवितेचे माध्यम व्यक्त होण्यासाठी अपुरे वाटले तेव्हा त्यांनी इतर कलांचा अवलंब केला. आणि कथा वास्तवातून आलेल्या.. काबुलीवाला तर परिचित आहेच. अशा काही कथा व त्याची थोडक्यात आशय रुपाने माहिती या पुस्तकातून समजते.

स्त्रीपात्र प्रधान कथा – स्त्रियांचे भावनाविश्व व स्त्रीची प्रतिमा उजळून टाकणारं लेखन!

आणखी एक कथा- नष्टनीड- विविध भावभावनांचे कंगोरे विविध प्रसंगातून वाचायला मिळतात. यातील सर्व व्यक्तीरेखा मात्र सुसंस्कृत, समंजस आहेत. या सुंदर कथेत संयम जागोजागी दिसतो.

कादंबरीकार रवींद्रनाथ – त्यांच्या विविध कादंबऱ्यांचा आढावा, तसेच आणखी काही कादंबऱ्या यांचा परिचय या पुस्तकातून होतो.

नाटककार रवींद्रनाथ म्हणजे नाटक सृष्टीचा तारणहार म्हणता येईल. त्यांनी नाटकांचे सर्व प्रकार हाताळले. यातून त्यांचे बहुश्रुत व्यक्तिमत्व दिसते. विषयाला कलाटणी देणाऱ्या नाटकांचा आढावा या पुस्तकात वाचायला मिळतो.

रवींद्र संगीत म्हणजे एका नवीन संगीत परंपरेचा सूर्योदयच. कुटुंबातील वातावरणामुळे संगीताचा कान तयार झाला. संगीताची जाण, पारंपारिक लोकसंगीत व व्यासंग यातून रवींद्रसंगीताची अलौकिक निर्मिती घडली. त्यातील गीतांच्या चाली, संगीत, शब्द यांची सुरेल गुंफण सांगणारा एक अलौकिक प्रवास वाचकाला वाचायला मिळतो. त्यांच्या संगीतात झालेला बदल, त्याचे टप्पे, त्यात असलेले भावनांचे प्रतिबिंब, रवींद्र संगीताचे वेगळेपण, ते लोकप्रिय असण्यामागील कारणे, आणि वेगळ्याच ट्रान्समध्ये नेणारी त्यांची गीते!.. सगळंच अचंबित करणारं आहे.

रवींद्रनाथांची पत्रे – इतर साहित्याप्रमाणे यातही विविधता व वास्तविकता दिसून येते. या पत्रांचे १२ खंड प्रकाशित झाले आहेत हे वाचून फारच आश्चर्य वाटले. काही पत्रे व त्यातील मजकूर आजच्या काळातही लागू पडतो. तर काही पत्रे खूपच मार्गदर्शक आहेत. सर्वच पत्रे अत्यंत वास्तव व पारदर्शक आहेत. उदा.

‘ सुखदुःख सर्व मार्गावरच असतात पण शांती केवळ मोठ्या रस्त्यावरच असते ! ’

चित्रकार रवींद्रनाथ – त्यांना विविधतेची किती ओढ होती हे पुढील वाक्यातून समजते. ‘ शब्द मला संतुष्ट करत नाहीत. माझ्या रेषा मात्र त्यांच्या मनाप्रमाणे हसतात. असे म्हणून ते चित्रकलेकडे वळले. त्यावेळी त्यांचे वय ६५ होते, यावेळी त्यांनी या कलेची आराधना करून त्यात प्राविण्यही मिळवले.

नृत्यकलेचे पुनरुज्जीवन – नाटकातील नृत्याचे महत्व टागोरांच्या लक्षात आले होते. भारतातील नृत्य परंपरा त्यांना खुणावत होती. आणि तीही आत्मसात करून त्यांनी ५६ या वर्षी एका नाटकात नृत्य सुद्धा सादर केले होते. त्यांच्या मते नृत्य म्हणजे संपूर्ण शरीर बोलते. प्राचीन नृत्यकलेला आधुनिकतेची जोड देऊन 

विकास घडवून आणला. याही क्षेत्रात त्यांचे प्राविण्य दिसते.

भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधी रवींद्रनाथ – विविध देशांमध्ये त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरलेली होती. त्या प्रत्येक देशात विविध अभ्यास केला. ‘घरटे व पिंजरा’ यातून त्यांनी रुपकातून तांत्रिक विकास आणि नैसर्गिक गोष्टी यातील फरक दर्शवला आहे. त्यांच्या साहित्यामुळे त्यांना ‘तत्वज्ञ’ अशी मान्यता मिळाली.

मानवतावादी धर्माचा साक्षात्कार – ईश्वराची सेवा करण्याचा मार्ग म्हणजे कोणताही भेद न करता मानवाची सेवा करणे… या विषयीचे रवींद्रनाथांचे मौलिक विचार आपण वाचू शकतो.

शांतिनिकेतन ते विश्वभारती– शांतिनिकेतन ही गुरुकुल पद्धतीच्या धर्तीवर शिक्षण देणारी संस्था ते विश्वभारती वि‌द्यापीठ हा प्रवास खूप प्रेरणादायक आहे.

श्रीनिकेतनची स्थापना – स्थानिक कला व हस्तकला यांना उत्तेजन देणाऱ्या या मोठ्या सांस्कृतिक केंद्राची स्थापना करून त्यांनी स्थानिक समाजाच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवून मोठेच काम केले.

सहजपाठ : रवींद्रनाथांची अनमोल देणगी – त्यांनी विद्यार्थ्यांसाठी त्यांना परिचित वाटणारी व सहजसोपी वाटणारी ‘सहजपाठ पाठ्यपुस्तके’ यांची निर्मिती केली.

कर्मयोगी रवींद्रनाथ– ‘बोले तैसा चाले’ या प्रमाणे वर्तन असणाऱ्या रवींद्रनाथांची या पुस्तकातून छान ओळख होते.

गुरुदेवांची सजीव शिल्पे– कोणतेही काम सौंदर्यदृष्टी ठेवून केले तर ते चांगले होते… या विचारातून त्यांची विविध शिल्पे कशी सजीव आहेत याची माहिती लेखकाने दिली आहे.

गुरुदेवांची राजकीय विचारसरणी – राष्ट्रकारण व विश्वकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे त्यांचे मत होते. हीच भावना त्यांच्या कृतीमागे होती. अवघे जग एकच कुटुंब व्हावे अशी त्यांची प्रामाणिक भावना होती.. जी लेखकाने नेमकी टिपली आहे.

मैत्रीपर्व : यात जगातील विविध माणसांबरोबर मैत्रीपर्वाच्या निमित्ताने मैत्रीचा धागा कसा टिकवून ठेवला होता ते लेखकांच्या शब्दातून नीट समजते..

देखणा देहांत तो: यात त्यांच्या शेवटच्या दिवसातील आयुष्य व कार्य या पुस्तकात आपण वाचू शकतो. यातील त्यांची वाक्ये खूप महत्वपूर्ण शिकवण देतात.

दिव्यत्वाची जेथे प्रचिती – यात रवींद्रनाथांच्या वेगळ्या विचारांची – आचारांची कारकीर्द आपण वाचू शकतो.

गुरुदेवांचे संस्मरणीय विचार – यात त्यांचे काही अनमोल विचार आपल्याला वाचायला मिळतात.

मान्यवर वाचकांच्या प्रतिक्रिया – हे नक्कीच या पुस्तकाचे एक वेगळेपण म्हणायला हवे. पुस्तक प्रसिध्द होण्यापूर्वी या लेखमालेवर ज्या प्रतिक्रिया वाचकांनी दिल्या आहेत ज्याही येथे वाचायला मिळतात.

शेवटी संदर्भग्रंथाची सूची लेखकाच्या मनाचा प्रामाणिक पारदर्शीपणा दर्शवते. एकंदरीत खूप सखोल माहिती व रवींद्रनाथ यांचे जीवनकार्य या पुस्तकात वाचक वाचू शकतो. आणि याचे श्रेय लेखकांच्या या अभ्यासपूर्ण लेखनाला व त्यांच्या लेखनशैलीला आहे हे आवर्जून सांगायलाच हवे.

– – प्रत्येकाच्या संग्रही असावेच असे हे पुस्तक नक्कीच आहे.

(पुस्तकासाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा… श्री.विश्वास देशपांडे….. ९३७३७११७१८ ) 

पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “तिच्या कथा (लघुकथा संग्रह)” – लेखिका : मानसी म्हसकर ☆ परिचय – राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “तिच्या कथा (लघुकथा संग्रह)” – लेखिका : मानसी म्हसकर ☆ परिचय – राधिका भांडारकर ☆ 

पुस्तक :  तिच्या कथा (लघुकथा संग्रह)

लेखिका : मानसी म्हसकर

प्रकाशक : अक्षर शिल्प प्रकाशन.

प्रथम आवृत्ती : ५ एप्रिल २०२६

नुकताच अक्षरशिल्प प्रकाशनातर्फे (शेगाव) प्रकाशित झालेला “तिच्या कथा” हा नवोदित लेखिका सौ. मानसी म्हसकर, वडोदरा यांचा लघुसंग्रह वाचनात आल्या. लेखिका मराठी असल्या तरी गुजराथ स्थित आणि गुजराथी भाषेचा पगडा असूनही त्यांनी मायबोलीत आत्मीयतेने केलेलं सुंदर मराठी लेखन वाचून मी खरोखरच प्रभावित झाले.

या कथासंग्रहात दहा कथा आहेत. आणि पुस्तकाच्या शीर्षकानुसार त्या सर्व कथा “तिच्या कथा” आहेत. स्त्रीवादी कथा आहेत. विषयात आणि कथा उलगडण्याच्या पद्धतीत मात्र वैविध्य आहे. एकदा पुस्तक वाचायला घेतले की ते संपूर्ण वाचल्याशिवाय ठेवावेसेच वाटत नाही हा या पुस्तकाचा पहिला यशाचा टप्पा.

द्वंद्व ही या संग्रहातील पहिलीच कथा.

एक वेगळाच विषय.

एक मुलगा, आपण “गे” असल्याचा आणि एका मुलाच्या प्रेमात असल्याचा आणि त्याच्याशी लग्न करण्याचा त्याने घेतलेला धक्कादायक निर्णय त्याच्या आईला प्रांजळपणे सांगतो आणि तिथूनच आईच्या मनातलं द्वंद्व सुरू होतं. मातृत्व की समाज, निसर्ग की समाजाचे नियम या विचारात अडकतं. आईच्या मनातला हा विदारक, भावनिक आणि निर्णयात्मक प्रवास अत्यंत प्रभावीपणे लेखिकेने वर्णिला आहे.

माणुसकी

ही एक भयकथा आहे म्हणायला हरकत नाही. कथेतला नायक एका भयाण काळोखी रात्री सायकलवरून घरी चाललेला असतो. घरी त्याची मुलगी आजारी असते. तिच्याच विचारात चालला असताना एक गूढ घटना घडते आणि आपण एका भूताला घेऊन सायकल वरून प्रवास करत आहोत याची जेव्हा त्याला जाणीव होते त्यानंतर कथेला एक वेगळं वळण मिळत जातं. मनाला खिळवून ठेवणारी ही कथा आहे.

घटना

ही कथा खरोखरच तशी रहस्यमयच आहे. अविश्वासनीय घटना यात घडलेल्या आहेत. शेवट नकारात्मक आहे. घटनाक्रम, त्याविषयीचे वर्णन वगैरे पद्धतशीर असले तरी एकंदर ही कथा मनाची पकड घेत नाही.

याचसाठी केला होता अट्टाहास

कथा खूप सुंदर. लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी नवसासायासाने झालेल्या मुलाला वाढवताना केलेले अवास्तव लाड, त्याच्या चुकांवर घातलेली पांघरूणं आणि परिणामी “आपण काहीही केले तरी आपली आई आपले संरक्षण करेलच” या घमेंडखोर मानसिकतेमुळे मुलात बळावलेली गुन्हेगारी वृत्ती आणि त्यातूनच त्याच्याकडून एका कोवळ्या मुलीवर झालेला अत्याचार अखेर आईच्या डोळ्यावर बांधलेली प्रेमाची पट्टी सोडवण्यास कारणीभूत ठरते. आणि त्याच क्षणी आपल्या मुलाला माणूस म्हणून घडवण्यात आपल्यातली आई कमी पडली याची जाणीव तिला होते. समाजात घडणाऱ्या नीच घटनेवर या कथेत, लेखिकेने अतिशय प्रभावी भाष्य केले आहे. आई-पणाच्या हळवेपणातून बाहेर येऊन घेतलेला तिचा निर्णय म्हणजे या कथेतून दिलेला एक सुंदर संदेश ठरतो.

अर्जुनाचे झाड

ही कथा सुद्धा खूप छान आहे. छान लिहिली गेली आहे. आजी- नातीतल्या, झाडांची माहिती देण्यानिमित्त सुरू झालेल्या संवादापासून ते थेट “आजीचा बटवा” या आयुर्वेदिक औषध उद्योगापर्यंत पोहोचलेल्या विद्या नावाच्या एका महिलेची ही यशस्वी कहाणी आहे, लेखिकेने ही कहाणी अतिशय सुंदर रंगवली आहे. आजी नात आणि अर्जुनाच्या झाडावरचे फूल यांच्या मधल्या भावनिक नात्यांची सुरेख गुंफण लेखिकेने या कथेत केली आहे आणि त्याचबरोबर आयुर्वेदिक औषधांचे महात्म्यही मांडलं आहे.

परतफेड

परतफेड ही कथा दीर्घ आहे. ५ भागात लिहिलेली आहे. विवाहबाह्य संबंधावर असलेली कथा असूनही यात कुठेही अश्लीलपणा नाही. लेखिकेने एका ठराविक संस्कृतीच्या चौकटीत नायिकेच्या मनाचे विश्लेषण सुंदर पद्धतीने केले असल्यामुळे न पटणाऱ्या बाबीही वाचकाला स्वीकारणे भाग पडते, “असंही असू शकतं, होउ शकतं असा विचार मनात येतो. एकंदर विषयानुसार कथानकाची मांडणी सुरेख झालेली आहे.

कादंबरी

अतिशय सुंदर कथा. एका स्त्रीच्या संघर्षाची, जिद्दीची, सकारात्मक आणि सुखांत कथा.

आवडलेलं वाक्य— वास्तुशांती फक्त घराची नसते मनाची ही करावी लागते

स्वीकार

छानच कथा. सासू- सुनेच्या सुरुवातीच्या दुराव्याची आणि नंतर वात्सल्यात रूपांतर झालेल्या सुंदर नात्यांची गुंफण या कथेत वाचायला मिळते. गैरसमजुतीमुळे नात्यात कसा दुरावा निर्माण होऊ शकतो हे लेखिकेने सुरेख पद्धतीने मांडलेले आहे. त्याच नात्यात गोडवा निर्माण होतानाचं लेखन अगदी स्वाभाविकपणे आणि भावूक शैलीत त्यांनी केलेलं आहे. या कथेत मांडलेली सासु-डे आणि सून-डे ही कल्पनाही आवडली.

बस क्रमांक १०८

आई-वडील बहिणींची जबाबदारी स्वीकारत लग्न करायचं राहून गेलेल्या एका स्त्रीची ही कहाणी आहे. रोज बस क्रमांक १०८ मधून लोकल प्रवास करताना भेटणारी माणसं टिपण्याचा, त्यांच्या अंतरंगात शिरून अथवा त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून, तिच्या हातून चक्क कथा निर्मिती होते. तिच्या कथा सर्वत्र वाचल्या जातात. तिच्या कथांना पुरस्कारही मिळतात आणि या माध्यमातून तिला आनंदी जीवन जगण्याचा एक मंत्र मिळतो. लहानसं साधंच कथानक पण त्यातली वास्तवता लेखिकेने रंजकतेने मांडली आहे. कथा नक्कीच वाचनीय आहे.

१० रिकामी घागर

ही कथा वाचताना मन खरोखरच विदीर्ण होतं. त्याचबरोबर या कथेतून, स्त्रिया एकत्र आल्या तर काय चमत्कार घडवू शकतात असा महत्वपूर्ण संदेशही लेखिकेने दिला आहे.

एक गाव, गावाभोवती वाहणारी नदी आणि पाणवठ्यावर जमणाऱ्या, आपापली दुःखे मनात घेऊन पाणी भरण्याच्या निमित्ताने नदीकाठी जमून मनाला हलकं करू पाहणाऱ्या गावातल्या महिला. त्यांच्यातलीच एक विधवा कुंदा नावाची महिला. एक दिवस एका नराधमांकडून तिच्यावर अतिप्रसंग होतो त्यातूनच तिला दिवस राहतात आणि त्यानंतरचा कुंदावहिनीचा संघर्ष, निर्णय आणि त्या निर्णयास एकजुटीने साथ देणाऱ्या तिच्या सख्या.. रिकामी घागर नावाचे आंदोलन उभारून गाव पंचायतीचा निर्णय कसा बदलायला लावतात याची काळीज फाडणारी ही कथा आहे.

रिकामी घागर हे स्त्रीच्या मातृत्वासाठी वापरलेलं रूपकात्मक शीर्षकही खूप बोलकं आहे.

एकंदर हा दहा कथांचा सुंदर संग्रह.

मा. मानसी म्हसकर यांनी विविध विषयांच्या माध्यमातून स्त्रीच्या व्यथा मांडत त्यावर उपायही सुचवत वाचकांना विचार करायला लावले आहे.

लेखिकेची साधी, सरळ, ओघवती भाषाशैली, वर्णनात्मक लेखन पद्धती, मनोविश्लेषणात्मक लेखन क्षमता, कथानकाची सुयोग्य मांडणी हे प्रत्येक कथेचं वैशिष्ट्य ठरतं. त्यातून त्यांची संवेदनशीलता आणि वैचारिकता जाणवते.

पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणेच या तिच्या कथा आहेत पण यातली ती कणखर आहे, जिद्दी आहे, चिकाटीची आहे कोसळणारी नाही आणि खरोखरच पुस्तकाच्या मुखपृष्ठावर साकारलेल्या झाडासारखीच वादळ वाऱ्याशी, ऊन पावसाशी झगडत, तिच्याच मातीत पाय घट्ट रोवून उभी आहे. निर्णयक्षम आहे. हे सुंदर मुखपृष्ठ लेखिकेचे चिरंजीव शालीन म्हसकर यांच्या कल्पनेतून साकारलं आहे.

मा. प्रसाद देशपांडे यांनी या संग्रहाला सुंदर प्रस्तावना दिली आहे. त्यांच्या मतानुसार खरोखरच स्त्रीच्या भावनांचे, नात्यांचे, आणि निर्णयांचे अनेक स्तर या कथांतून उलगडले जातात.

मानसीताई, मनोगतात तुम्ही म्हटलंय, ”स्त्रीमनातील भावविश्व आणि तिच्या निर्णय क्षमतेचा प्रवास शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. ”

मानसीताई! तुमचा प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरला आहे.

मलपृष्ठावर शालीनने व्यक्त केलेले आई विषयीचे अभिमानाचे उद्गारही मनाला भिडतात.

अभिनंदन मानसी! आणि पुढील साहित्यिक वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

परिचय –  सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७ मो. ९४२१५२३६६९ radhikabhandarkar@yahoo.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ क्लेशवृक्षाच्या छायेत” (कविता-संग्रह) – कवी : राजकुमार कवठेकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?पुस्तकावर बोलू काही?

☆ “ क्लेशवृक्षाच्या छायेत” (कविता-संग्रह) – कवी : राजकुमार कवठेकर ☆ परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

पुस्तक : क्लेश वृक्षाच्या छायेत 

… बहरलेल्या काव्याचा मोहोर

कवी : राजकुमार कवठेकर 

 ९४२११०५८१३

प्रकाशक : अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर 

 ९३०९१३८४४३

पृष्ठे : १२०

मूल्य : रु. २००/-

आयुष्याचे वस्त्र हे सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेले असले तरी सुखापेक्षा दु:खाचे धागेच जास्त दाट आहेत कि काय असे वाटावे असे सर्वसामान्य माणसाचे जगणे असते. थोडेसे सुखही लाभले नाही अशा दु:खितांची संख्याही काही कमी नाही. किंबहुना दु:ख हेच जीवनातील अंतीम सत्य आहे असे म्हटले तर चूक ठरु नये. कारण ते प्रत्येक व्यक्तीने अनुभवलेले असते. ते दु:ख स्वत: भोगणे, दु:खाची जाणीव असणे,

दुस-याच्या दु:खाने व्यथीत होणे आणि त्याच दु:खाचा शोध घेत घेत याच जन्मात त्याची पाळेमुळे छाटून टाकण्याचा प्रयत्न करताना या सर्व वेदना आपल्या शब्दातून व्यक्त करणे ज्याला जमते तोच क्लेश वृक्षाच्या छायेलाही आपलेसे करू शकतो. असा कवी मग कुठलीही खंत न बाळगता आपल्या सोसण्याच्या तपामुळे क्लेशवृक्षालाही आनंदाचे फळ येईल असे आत्मविश्वासपूर्वक म्हणू शकतो. क्लेशवृक्षाच्या छायेत बसुनही

” होईल कधितरी स्वप्न हासरे खांद्यावर चे मूलऽऽ

क्लेशतरुवर फुलेल जे फुल पडेल त्याची भूल ऽऽ “

असे म्हणणारे मिरजेचे कवी, प्रसिद्ध गझलकार श्री. राजकुमार कवठेकर यांच्या ‘क्लेशवृक्षाच्या ‘

प्रत्येक पानापानातून याची खात्री पटते.

दु:खाची महिरप असणा-या या कविता संग्रहात डोकावून पाहिले तर, काहीशा आत्ममग्न असणा-या या कविने निसर्ग भावभावनांच्या विविधांगी रचना समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे आयुष्यातील चढ उतारामुळे जगणे जसे जगावेसे वाटते तितक्याच उत्सुकतेने आपण हा संग्रह शेवटपर्यंत वाचत जातो. बोलक्या मुखपृष्ठातून व्यक्त होणारा क्लेशवृक्ष आणि त्याची छाया ओलांडून पुढे जाताना, कविच्या मनाची स्पंदने शब्दाशब्दातून ऐकू येतील अशा भावकविता वाचताना एकामागून एक कविता वाचण्याची ओढ लागून रहाते.

स्मरणांचा जाच चुकत नाही. दु:खाचा पहारा उठत नाही. अशा अवस्थेत जगण्याचा हा अवजड मेणा कुठवर वाहुन न्यायचा असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. वास्तवाच्या वणव्यात मन होरपळत असताना आणि या छळवादी आयुष्याला सामोरे जात असताना दमछाक तर होतेच आहे. पण एवढे सहन केल्यावर तरी आशेची रम्य पहाट दाखवणारे एखादे वळण या वाटेवर येणार आहे का? वारंवार अश्रूच वाट्याला यावेत असा वेदनेचा शाप आयुष्याला लागला आहे. सुखांना मोकळेपणाने नांदताच येत नाही. सांत्वनाच्या आहेरांनी मनावरच्या जखमा भरून येत नाहीत. स्वप्नांचा पाठलाग चालुच आहे. या भ्रमंतीत स्वत:ला हरवून बसावे, स्वतःचा शोध स्वतःला लागूनच नये अशी अवस्था झाली आहे. हाताच्या मुठी वळल्या तरी ठोस पाऊल उचलावे एवढे बळ आणायचे कुठून? जगण्यातली अगतिकता पराकोटीला गेली आहे. सगळं समजत असून सुद्धा आंतरिक समुद्राच्या लाटा आतल्या आतच हेलकावे घेत असतात. रोज उगवणारा दिवस ही इतरांसाठी सकाळ असली तरी आपल्यासाठी मात्र ती आणखीन एका वजावटीच्या दिवसाची सुरुवात असते हे कठोर सत्य नाकारता येत नाही. दु:खाच्या सागरात हेलकावे खाणारे हे जगणे, पराभवाने ग्रासले असले तरी यशाचे गीत म्हणणे, कविने सोडून दिलेले नाही. मनातील दुर्दम्य इच्छाशक्तीने दु:खावर मात केली आहे आणि काटेरी प्रारब्धाला आशेचे जरतारी वस्त्र नेसवण्याचे धैर्य कविला मिळाले आहे. फुटक्या आरशात स्वत:चीच शेकडो प्रतिबिंबे दिसावीत तसा मी स्वत:ला पाहताना दिसतो आणि समजतच नाही मी नेमका खरा कोणता? मग लक्षात येतं, आपण तर शब्दांच्या राईत मग्न असतो. ठरलेली वाट नसतेच आपली. आपला आपल्याला तरी भरवसा आहे का? ज्यांच्यात असतो त्यांचेही आपण नसतो. कदाचित हे वेगळेपण हीच आपली खरी ओळख असेल. कविच्या आत्ममग्नतेतून आत्मशोधाचा हा प्रवास आपल्यालाही अंतर्मुख करतो.

शेवटी जगणं म्हणजे तरी काय असतं? कवीच्याच शब्दात सांगायचं तर :

जगणं असते एक कविता, कळली तर पटकन कळणारी… नाही तर आमरण छळणारी…

आपल्या आत्ममग्नतेमुळे आयुष्यातील महत्त्वाचे कितीतरी क्षण निसटुन गेले आहेत. आयुष्य हेळसांडून गेले आहे. त्यामुळे असाही प्रश्न पडतो की

‘ कुठवर जगण्याचा जाच हा सांग सोसू

 कुठवर हसण्याचे रेशमी वस्त्र नेसू?

 बहरत असताना झाड निष्पर्ण झाले

 फिरुन फिरुन पक्षी कालचे दूर गेले “

जागतिकीकरण आणि शहरीकरणाचे चटके कवीला ही जाणवत आहेत. सुखाच्या चेह-याचे पोर्ट्रेट आयुष्यभर अंगावर मिरविले तरी भंगत जाणारे नातेसंबंध कितीही जोडायचा प्रयत्न केला तरी पूर्ण एकजीव होत नाहीत हेच खरे. मग त्या पोर्ट्रेटच्या सौंदर्याकडे लक्ष न जाता केलेली डागडुजी मात्र ठळकपणे डोळ्यात भरुन राहते आणि मन ठसठसत राहते. बाल्कनीतली बाग, कॉलबेलच्या चिमणीचा चिवचिवाट, पोर्ट्रेट मधला समुद्र, अशा कृत्रिम जीवंतपणाच्या खुणा कवितेतून स्पष्टपणे दाखवल्या आहेत. दुसरीकडे ‘ दोघांचेच विश्व ‘ असले तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत चक्राकार गतीने व्यापलेल्या या जगण्यात परस्परांची भेटच होत नाही, मग संवाद तर दूरच. मोग-याचा गजरा मात्र या सर्व धावपळीत मूकपणे दरवळत राहतो. समोर आलेल्या सुखाला नाकारायच तर नाहीच. पण या सुखाच्या चाहुलीने हुरळून न जाता भोगलेले दु:ख अजूनही मनात खोलवर सलत असतं. त्यामुळे सुखाच्या श्रावणातही दु:खाचा वैशाख वणवा विझलेला नसतोच.

 ” या जगण्याचे हे असेच

 उमलत्या वेळीच ग्रासले कातरवेळीचे भय…

 कठोर निर्णयाच्या वेळीच नेमकी

 दाटून येते जुनी सय… “

तरीही

 ” तरिही जगणे… तरिही जगणे

 जरी न काही मनाप्रमाणे 

 रोज मनाने मनात कुढणे

 ठेऊन ओठांवरती गाणे “

या खंबीर मनाने प्रवास अव्याहतपणे चालुच असतो. ओळखीची खूण सापडत नाही. स्वप्नातला गाव दिसत नाही. या एकाकी प्रवासामुळे मन कधीतरी खिन्न

होणारच. मग वाटतं,

 ” पालटावा हा ऋतू माझी शमावी वेदना

 श्रावणाचा मेघ दाटो चिंब होऊ दे मना 

 सावलीचा दो घडीचा लाभु दे रे गारवा 

 या तमी एकांत रानी रे दिसावा काजवा “

नियतीच्या फे-यामध्ये सुखाची सावली येईल तेव्हा येवो. पण मनाची वेदना शमविण्यासाठी निसर्गाशिवाय दुसरा मित्र कोण असणार? या संग्रहात समाविष्ट असलेल्या निसर्ग कविता म्हणजे कविने हातात कुंचला न घेता त्याच्या मनाच्या कॅनव्हासवर शब्दांचे फटकारे मारुन चित्रित केलेली देखणी निसर्ग चित्रेच आहेत. म्हणून तर

 ” ढगांनी जसे ग्रासिले सुर्यबिंबा

 क्षणार्धात सर्वत्र सांजावले

 चकाकून जाती विजांच्या शलाका

 थवे पाखरांचे घरी पातले “.

किंवा सरी बरसू लागल्यावर

 “. लडीवाळ बाळापरी पावसाच्या

 नभाच्या कुशीतून आल्या सरी

 झळांचा बने थंडसा मंद वारा

 घुमे रानझाडीतुनी बासरी “.

यासारखे टपोरे शब्द कविच्या मानसमेघातून बरसु लागतात.

 ‘ काजळसे जमले मेघ, विजेची रेघ

 कुठे चमचमते

 ही हवा गार बोचरी, उठे शिरशिरी 

 कापरे भरते ‘ ‌

असो किंवा

 ‘ वा-याला कसले पिसे कसा घुमतसे

 नाचवी राने…

 पाण्यास मिळाले सूर खूर चौखूर

 उधळी हर्षाने… ‘.

सारख्या लयबद्ध निसर्ग कविता वाचताना मन नकळतपणे डोलू लागते. याठिकाणी सूर, खूर, चौखूर

या शब्दांतून साधलेला अनुप्रासात्मक नाद लक्ष वेधून घेणारा आहे. पावसाच्या आगमनात लग्न सोहळ्याचे मांगल्य पाहणा-या या कविला म्हणून तर पूर्ण खात्री आहे की काही काळासाठी आभाळ रुसल तरी

 “. रुसण्यातुनही हसेल माया

 काठिण्याला फोडित पाझर

 सळसळणारे वैभव लेईल 

 उद्या ; आजचे श्रांत कलेवर “

अशा निसर्गात रममाण होतानाच कविच्या हाती एक पत्र येते… तिचे ते पत्रही पाऊसरुपीच असते. भरुन आलेलं

आभाळ आणि भरुन आलेलं मन, एकीकडे घनांची तर दुसरीकडे शब्दांची होणारी दाटी, अशा मनातून कोसळणा-या पावसात चिंब भिजणारं हे पत्र आपल्यालाही कधी भिजवून टाकतं समजतही नाही.

पण हा निसर्ग असा सर्वांगानं तसाच असला तरी

‘. पाखरं ‘ मात्र पहिल्यासारखी राहिली नाहीत असे कविला वाटते. ती धिटावत चालली आहेत. घाबरणं नाही. थवेही नाहीत. चिवचिविट तर कधीच बंद झालेला.

‘ पाखरं ‘ ही रुपकात्मक कविता नव्या पिढीच्या जीवनपद्धतीचे दर्शन घडवते.

या काव्यसंग्रहात काही कविता ‘ त्याच्या ‘ आहेत, काही ‘तिच्या ‘ आहेत तर काही दोघांच्याही आहेत.

प्रेम म्हटलं की माया, हुरहूर, रुसवा, विरह, समज, गैरसमज हे सगळं आलंच. वाढत्या वयाबरोबर येणारा समंजसपणा प्रेमाकडे पाहण्याची दृष्टीही बदलून टाकतो. अपेक्षाही बदललेल्या असतात. हे सर्व भाव व्यक्त करणा-या श्री. कवठेकर यांच्या कविता वाचताना त्यांच्या मनातील कोमल भावभावना अनुभवायला मिळतात.

एका कवितेत ते म्हणतात, तिला भेटायला निघण्यापूर्वीच ते तिच्यापाशी जाऊन पोहोचलेले असतात. त्याच कवितेच्या शेवटी ते म्हणतात मी परतूनही नसतो परतलेला. तिला भेटण्याचा आवेग आणि तिचा निरोप घेतला तरी तिथेच गुंतून राहात मनाचे घुटमळणे कविने नेमक्या शब्दात मांडले आहे. तिच्या असणं म्हणजे ‘ सर्वव्यापी निरभ्र चांदणगर्भ आकाश ‘असतं.

तिच्यामुळेच तर त्याच्या आयुष्यातील अज्ञातवास संपून नवं पर्व सूरु होत असतं. या सुखाच्या चांदण्यामुळेच की काय, तिचा विरह झाला तरी तिच्या आठवणीने, तिच्या नुसत्या स्मरणानेही विरहाच्या दु:खाची बेडी तुटते. तिकडे तिची काय अवस्था असते? ती म्हणते

 “तुझा भास होई तुझी हाक येई 

 नको वाटते ही सुखाची घडी

 तुझ्या वाचुनी रे सुन्या मैफिली या

 ऋतू… आसवे… हासणे… बेगडी.

साहजिकच अशा या सखीच्या बाबतीत मग कविला वाटते,

 ” तुला वादळांचे नको हेलकावे 

 तुझे शीड डौलात जावो पुढे

 कधी भेटता तू कुठे ; ओळखीने

 पहावे… हसावे… पुरे एवढे… “

त्याला तिच्या फक्त प्रेमाचीच जाणीव आहे असे नाही तर तिच्या कर्तृत्वाचीही जाण आहे. म्हणूनच एकीकडे घर संसार आणि दुसरीकडे स्विकारलेली व्यावसायिक जबाबदारी समर्थपणे पेलताना तिची होणारी दमछाक आणि दिसणारी कर्तव्य तत्परता कविच्या नजरेतून सुटलेली नाही. कार्यमग्न असणारी तिची बोटं आणि वेळेला कवेत घेण्यासाठी तिच्या पावलांची चाललेली लगबग यांचा मेळ घालता घालता तिला दावं सोडून पळता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग कवी लिहून जातो,

 ” सखी कळते मलाही, काय दुखते सलते

 संस्कारांच्या उंब-यांशी, कसे पाऊल अडते “

अशी सखी लाभली हे आपले भाग्यच आहे. कवी म्हणतो

” जन्म अपुराच माझा तुझे फिटावया ऋण

जन्म पुन्हा पुन्हा लाभो तुझ्या इतका सुजाण “

हे भाव जसे नेमक्या शब्दात व्यक्त झाले आहेत, अगदी त्याचं नेमकेपणाने कविने आईच्या जाण्यानंतर भाव व्यक्त केले आहेत. आई गेल्यानंतर

” घर माझ्यासम आईला तेव्हाच पोरके झाले

कुठल्याच सुखाचा धागा फाटल्या मनास बसेना “

आणखी वेगळ्या शब्दांची आवश्यकता आहे का?

क्लेशवृक्षाच्या छायेत बसून भवताल न्याहाळत असताना कविनं जे अनुभवलं, जी स्वप्नं पाहिली ती आपल्या समर्थ लेखणीतून उतरवत असताना

शब्दसंपदा, उपमा, कविकल्पना अगदी सहजपणे कवितेत गुंफल्या आहेत. अलंकारिक शब्दांचे अप्रस्तुत प्रदर्शन टाळून मनाला मोकळे करणारे शब्द त्यामुळेच वाचकाला आपल्या जवळचे वाटतात.

स्मरणांचा जाच,, दु:खाचा पहारा, वास्तवाचा वणवा, स्वप्नांचे वेफर्स, बेदरकारपणाची झुलपे, भयपटासारखे सरकणारे आयुष्य, निनादत येणा-या वेदना, धीराचा कलंडणारा माठ, श्वासांचे शीड, व्याकूळपणे तिष्ठणारी माया, जडत्वापोटी येणारे तान्हुले हासरे, ही त्यांची काही उदाहरणे. किंवा

” नको म्हणूस ‘ जुनेरं ‘ जरी वस्त्र धसावले

 काल फाटक्या दिवसांना ऋतू यांनीच दाविले “

या दोन पंक्तींतून कविने गृहिणीला ज्या शब्दात आश्वस्त केले आहे ते शब्द कुणाचाही ‘ फाटका ‘ संसार झाकून घ्यायला पुरेसे आहेत.

कविच्याच शब्दात सांगायचं तर

” आणि यांच्याही पल्याड, खूप काही उरणारे

 खोल खोल काळजाशी, फुलणारे… सलणारे… “

असे आहे ज्याच्यावर लिहायला हवं असं वाटत.

पण

” कळते सारे : हवे उठाया

 बाकी रस्ता अजुन खूपसा

हवा आवरायास पसारा,

 हवी धराया पुन्हा उभारी “

हे कविचे सांगणे लक्षात घेऊ आणि

“आता मज नाही, कुठलीच खंत

 मन हे दिगंत… होऊ पाहे

अशा सात्विक समाधानाने हा काव्य शोधप्रवास थांबवतो.

 

पुस्तक परिचय – श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर” – इंग्रजी लेखक : पीटर वोहललेबेन – मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर” – इंग्रजी लेखक : पीटर वोहललेबेन – मराठी अनुवाद : गुरुदास नूलकर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर (मराठी)

लेखक : पीटर वोहललेबेन

अनुवाद: डॉ. गुरुदास नूलकर

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

पृष्ठ: २००

मूल्य: ३००₹

पीटर वोललेबेन यांचे पहिले पुस्तक ‘द हिडन लाइफ ऑफ ट्रीज’ याला मराठी वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या पुस्तकाने आपल्याला वनस्पतींच्या अज्ञात विश्वाची अतिशय सोप्या भाषेत ओळख करून दिली. ‘द सिक्रेट विस्डम ऑफ नेचर’ हे त्यांचे पुढचे पुस्तकही सोप्या भाषेत रंजक गोष्टीने सजलेले आहे. निसर्गातील क्लिष्ट गुंतागुंती, सजीव आणि निर्जीव घटकांमधील परस्परसंबंध आणि या मध्ये मानवाची भूमिका समजावून सांगताना वोललेबेन यांनी पुन्हा एकदा खूपच वाचनीय पुस्तक आपल्यासमोर आणले आहे.

यातील गोष्टी जरी प्रामुख्याने युरोप खंडावरील असल्या तरी निसर्गाचे नियम पृथ्वीवर कुठेही बदलत नाही. समशीतोष्ण प्रदेशात जो निसर्गाचा अनुभव येतो तो आपल्यासारख्या उष्णकटिबंधीय वातावरणाच्या देशात अधिक स्पष्ट दिसतो. याचे कारण म्हणजे आपल्या इथे वर्षभर सूर्यप्रकाश आणि उत्तम माती आहे. यामुळे वनस्पतींच्या असंख्य प्रजाती इथे आढळतात, आणि त्यांच्यावर उभी असलेली वैविध्यपूर्ण अन्नसाखळी पोसली जाते.

भारतातील निसर्ग हा इंद्रधनुष्यासारखा अनेक रंगांनी सजलेला आहे. हिमालयातील हिमरेषेपासून ते कच्छच्या मिठाच्या रणापर्यंत, पश्चिम घाटातील सदाहरित जंगलांपासून ते सुंदरबनच्या खाऱ्या खाड्यांपर्यंत-प्रत्येक प्रदेश एक वेगळी कथा सांगतो. अन्नसाखळी हा त्या कथांमधील धागा. ही अन्नसाखळी फक्त “कोण कोणाला खातं” इतकी साधी नाही; ती संबंधांची, परस्परावलंबनाची, आणि न जाणवणाऱ्या संतुलनाची एक जिवंत कहाणी आहे.

तुम्हाला हे माहीत होतं का?

पृथ्वीच्या परिभ्रमणावर झाडांचा प्रभाव पडतो! किंवा लांडगे नदीचा प्रवाह बदलतात हे तरी? आणि रानडुकरांच्या संख्येवर गांडुळं नियंत्रण ठेवतात?

निसर्गसृष्टीतले परस्परसंबंध गुंतागुंतीचे आणि क्लिष्ट असतात. यांपैकी अनेक संबंधांची आपल्याला कल्पनाही नाही. पण याच नात्यांमुळे निसर्गात सूक्ष्म समतोल राखला जातो. वनरक्षक म्हणून अनेक दशकं केलेल्या कामाचा अनुभव आणि नवनवीन वैज्ञानिक संशोधनाचा आधार घेत पीटर वोललेबेन आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत नेतात. त्यात निरनिराळे प्राणी, वनस्पती, नद्या, दगड आणि हवामान एकमेकांबरोबर सहकार्य करत निसर्गाची नाजूक प्रणाली संतुलित ठेवतात.

रोजामंड यंग, दि सिक्रेट लाइफ ऑफ काउजच्या लेखिका म्हणतात – – 

“ पीटर वोललेबेन हे फक्त डोळ्याने बघत नाहीत. एका दिव्य दृष्टीतून त्यांना निसर्ग दिसतो. आपल्यासारख्या प्रत्येकाला त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. “ 

अद्भुत! निसर्गात सगळे एकमेकांशी जोडलेले असतात याची वोललेबेन आपल्याला आठवण करून देतात.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन” – लेखिका :  श्री रमेश पतंगे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन” – लेखिका :  श्री रमेश पतंगे ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन

लेखक: रमेश पतंगे

पृष्ठ: १३६

मूल्य: २५०₹ 

प्रस्तावना : मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ज्येष्ठ विचारवंत, पद्मश्री रमेश पतंगे हे सिद्धहस्त लेखक आहेत. सामाजिक समरसता चळवळ आणि राष्ट्रीय विचारांची पत्रकारिता यासाठी रमेशजींनी दीर्घकाळ काम केले. ‘साप्ताहिक विवेक’चे साक्षेपी संपादक म्हणून काम करताना त्यांनी महाराष्ट्राचा सामाजिक-राजकीय कृती आराखडा तयार करण्यासाठी विपुल लेखन केले आहे. मागील दहा वर्षांपासून रमेशजी पतंगे ‘भारतीय संविधान’ या विषयावर अभ्यासपूर्ण लेखन करीत असून आतापर्यंत त्यांची संविधान विषयातील नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याच लेखनमालिकेत नव्या पुस्तकाची भर पडली असून ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ हे पुस्तक आता उपलब्ध झाले आहे.

संविधान म्हटले की, कायद्याचे पुस्तक, सर्वसामान्य नागरिकांचा संविधान विषयाशी फार संबंध येत नाही; पण रमेशजींचे वैशिष्ट्य असे की, याआधीच्या पुस्तकाप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन या पुस्तकातून कायद्यांच्या संकल्पना सोप्या भाषेत उलगडून सांगितल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीतून आणि सामाजिक न्यायाच्या परिवर्तनशील विचारांतून आकाराला आलेले भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर ते आपल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्रांतीचे भक्कम अधिष्ठान आहे. भारतीय संविधानाने कोणती क्रांती केली? या प्रश्नाचे उत्तर रमेशजींनी या पुस्तकात सोप्या पद्धतीने दिले असून ‘समान मत-समान पत’ (प्रत्येक मताचे समान मूल्य) ही संकल्पना उदयास येण्यासाठी संविधान सभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेली भूमिका समजून घेणे आवश्यक आहे. रमेशजींनी आपल्या पुस्तकात यावर सविस्तर चर्चा केली आहे. आपण जेव्हा भारतीय संविधान निर्मितीच्या प्रक्रियेचा इतिहास अभ्यास करतो तेव्हा, असे लक्षात येते की, देशाला स्वातंत्रच मिळणार हे स्पष्ट दिसत असताना १९४६ मध्ये भारताच्या संविधान निर्मितीसाठी समिती गठीत करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बंगालमधून या समितीमध्ये निवडले गेले. देशाची फाळणी झाल्यानंतर मुंबई प्रांतातून त्यांना निवडून आणण्यासाठी डॉ. राजेंद्रप्रसाद व मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी प्रयत्न केले. असे असले तरी आपला भारत एकात्म आणि समतायुक्त असायला हवा, याबाबतचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चिंतन १९१९ पासून सुरू झाले होते. ब्रिटिश सरकारने पाठवलेल्या विविध कमिशनसमोर डॉ. बाबासाहेच आंबेडकरांनी ज्या साक्ष दिल्या आहेत, त्यांचा आढावा घेऊन या पुस्तकात रमेशजींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अलौकिक बुद्धिमत्ता आणि समाजचिंतन अधोरेखित केले आहे.

नव्याने स्वतंत्र्य होणाऱ्या भारत देशाच्या नागरिकांना नवीन ओळख देणारे संविधान साकार करताना आपली सामाजिक, धार्मिक परिस्थिती काय आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कधीच विसरले नाहीत. शतकानुशतके अन्याय आणि विषमतेच्या जोखडाखाली दबलेल्या समाजाला मुक्तीची दिशा देताना आणि नव्या राष्ट्राची पायाभरणी करताना जे मूल्याधिष्ठित मार्गदर्शन आवश्यक होते, ते आपल्या संविधानाने दिले. ही मूल्याधिष्ठित व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून निर्माण करताना आपल्या देशातील समाज जीवन आणि इतिहास यांचा सुक्ष्म अभ्यास असणाऱ्या एकात्मिक समाज्याची आवश्यकता कायद्याच्या चौकटीत पूर्ण केली. संबिधान सभेतील शेवटच्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते, ‘आपण अनेक वेळा पारतंत्र्यात गेलो कारण आपण संघटित नव्हतो. ‘ संघाटित समाज हा स्वतंत्र देशाचा आधार असणार आहे. हे भविष्यवेधी चिंतन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले आहे. आज भारत एक स्थिर, सक्षम आणि प्रगतिशील राष्ट्र म्हणून जगात उभा आहे, त्यामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक चिंतनाची ठाम पायाभरणी आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान होते. अनेक देशांच्या संविधानाचा त्यांचा अभ्यास होता. एखादा कायदा करताना त्यासंदर्भात अन्य देशात काय विचार केला होता. येथे आपण काय विचार केला पाहिजे. यासंबंधी त्यांनी दीर्घ चर्चा केली आहे भारतीय समाजरचना, परंपरा आणि विविधतेचा सखोल अभ्यास असणाऱ्या मूल्यांचा समन्वय साधण्याची अद्वितीय क्षमता प्रदान करणारे संविधान निर्माण करताना आपली विद्वत्ता पणाला लावली होती. दीर्घ चिंतन, व्यापक अभ्यास आणि अनुभवाच्या आधारे तयार झालेल्या या संविधानाने सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता आणि व्यक्तीच्या प्रतिष्ठेची मूल्यव्यवस्था इतक्या प्रभावीपणे मांडली गेली की, वंचित, शोषित आणि दलित घटकांना नवसंजीवनी मिळाली आणि भारतीय लोकशाही अधिक बळकट झाली. याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे.

आपले संविधान हा केवळ एक स्थिर दस्तऐवज नाही; तर तो काळानुसार विकसित होणारा, बदलत्या परिस्थितींना सामोरे जाणारा आणि समाजाच्या गरजांनुसार स्वतःला परिष्कृत करणारा जिवंत दस्तऐवज आहे. शासनव्यवस्थेला दिशा देणारे आणि नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करणारे हे एक प्रभावी साधन आहे. सामाजिक न्याय, समान संधी, उत्तरदायी प्रशासन आणि लोकशाहीतील सक्रिय सहभाग या मूल्यांचे संरक्षण करण्यामध्ये संविधानाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वेळोवेळी स्पष्ट करून आपले संविधान हे मानवकेंद्री आहे हे आग्रहाने सांगितले आहे.

आज भारत विकासाच्या विविध क्षेत्रांत प्रगती करत असला, तरी त्या प्रत्येक पावलामागे संविधानिक चौकटीचे भक्कम अधिष्ठान आहे, ही जाणीव ठेवणे आवश्यक आहे. आपल्या संवैधानिक जाणिवा अधिक प्रबळ करण्याची ही वेळ असून सर्वसामान्य नागरिकांसोबत राजकीय क्षेत्रात, प्रशासन क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच व्यक्तींनी संविधानाचा गाभा समजून घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर रमेश पतंगे यांच्या या पुस्तकातून संविधानाकडे पाहण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सखोल आणि चिंतनशील दृष्टिकोन आपल्यासमोर मांडला जातो. या महत्त्वपूर्ण पुस्तकाचा सर्वांना उपयोग होईल, असा विश्वास वाटतो.

संविधानाविषयी व्यापक जनजागृती होणे हीच सशक्त लोकशाहीची खरी गरज आहे. ही जनजागृती करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या दीर्घ चिंतन व परिश्रमांना आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे. हे पुस्तक त्यादृष्टीने खूप महत्त्वाचे असून ते प्रत्येक नागरिकासाठी, कार्यकर्त्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा मला विश्वास वाटतो.

1949 साली संमत झालेल्या संविधानाच्या अनेक कलमांविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९१९ पासून केलेले मूलगामी चिंतन…

* दुभंगलेल्या समाजाला एकजिन्सी करण्यासाठी संवैधानिक कायद्याचा मार्ग कसा आखून दिला.

* संवैधानिक मूल्यांना संविधानाच्या भाषेत कशी दिलेली उत्तरे…

* विविधतेने नटलेल्या देशाला बांधून ठेवण्याचे महाकठीण काम संविधानाच्या माध्यमातून कसे केले…

* भारतीय संविधान हे जीवंत दस्तऐवज आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कसे मांडले…

– – या सर्वाची सहज सोप्या भाषेत या पुस्तकातून मांडणी करण्यात आली आहे.

– – कार्यकर्त्यांना विषय मांडणीसाठी आणि प्रबोधनाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असे पुस्तक

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “इथे थांबणे नाही” – लेखक : श्री रमेश घोलप ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “इथे थांबणे नाही” – लेखक : रमेश घोलप ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : इथे थांबणे नाही 

लेखक : रमेश घोलप (भा. प्र. से.)

पृष्ठ: १३६

मूल्य : २५०₹ 

‘परमेश्वरी इच्छेवर अवलंबून न राहता जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर निर्धारपूर्वक मात करून आपले संकल्प सिद्ध करणारी रमेश गौरख घोलप यांची स्फूर्तिदायक यशोकहाणी आगळी वेगळी ठरते.

संघर्षात ‘रडायचं नाही लढायचं! ‘ हा त्यांचा निर्धार पक्का होतो आणि हाच निर्धार ग्रामीण भागातून पुढे येण्यासाठी धडपडणाऱ्या असंख्य तरुण-तरुणींना दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरावा इतका महत्त्वाचा आहे.

– – पराकोटीची जिद्द आणि प्रखर आत्मविश्वास, कुठल्याही अपयशाने खचून न जाण्याची वृत्ती या आत्मकथनात ठायी ठायी दिसून येते. तरुण पिढीने आवर्जून वाचावे असेच हे पुस्तक आहे.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “द बॉडी कीप्स द स्कोअर ” – इंग्रजी लेखक : बेसेल व्हॅन डर कोल्क – मराठी अनुवाद : दीपक देवधर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “द बॉडी कीप्स द स्कोअर ” – इंग्रजी लेखक : बेसेल व्हॅन डर कोल्क – मराठी अनुवाद : दीपक देवधर ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : द बॉडी कीप्स द स्कोअर

 – – आघाताबद्दलचा आपला दृष्टिकोन बदलवणारे आणि नवी दिशा दाखवणारे पुस्तक

 – – मेंदू, मन आणि शरीर यांची आरोग्यातील भूमिका

लेखक : बेसेल व्हॅन डर कोल्क, एम. डी.

अनुवाद: दीपक देवधर

प्रकाशक : माय मिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे 

पृष्ठ: ५१२

मूल्य: ४९९₹ 

आघात (ट्रॉमा) हा जीवनाचा वास्तव भाग आहे. युद्धाचे अनुभव, लैंगिक शोषण, व्यसनाधीन पालक, कौटुंबिक हिंसा… अशा अनेक कारणांनी माणूस आतून जखमी होतो. आघात फक्त मनावरच नाही, तर शरीर आणि मेंदूवरही खोल परिणाम करतो. त्यामुळे आनंद घेण्याची क्षमता, नातेसंबंध, आत्मनियंत्रण आणि विश्वास यावरही परिणाम होतो.

जगप्रसिद्ध आघाततज्ज्ञ आणि या पुस्तकाचे लेखक डॉ. बेसेल व्हॅन डर कोल्क यांनी तीस वर्षांहून अधिक काळ आघातग्रस्त लोकांसोबत काम केले आहे आणि त्यातून बाहेर पडण्याच्या वेगवेगळ्या उपचारपद्धती विकसित केल्या आहेत, ज्या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडल्या आहेत. हे पुस्तक औषधं आणि फक्त समुपदेशन यांपलीकडे जाऊन लोकांना आपलं आयुष्य पुन्हा उभं करण्याचा मार्ग दाखवतं.

अजूनही आपण त्या सखोल ज्ञानाच्या बाबतीत खूप वर्षे मागे आहोत, पण गेल्या काही दशकांत तीन नव्या वैज्ञानिक शाखांमुळे मानसशास्त्रीय आघात, अत्याचार आणि दुर्लक्ष यांच्या परिणामांबद्दल मोठ्या प्रमाणात नवीन माहिती समोर आली आहे.

या तीन नवीन शाखा म्हणजे –

  1. न्यूरोसायन्स – मेंदू मानसिक प्रक्रियांना कशी साथ देतो याचा अभ्यास.
  2. डेव्हलपमेंटल सायकोपॅथोलॉजी मानसिक आणि मेंदूच्या विकासावर प्रतिकूल अनुभवांचा काय परिणाम होतो याचा अभ्यास.
  3. इंटरपर्सनल न्यूरोबायोलॉजी आपले वर्तन आपल्या सभोवतालच्यांच्या भावना, जैविक प्रक्रिया आणि विचारसरणीवर कसा प्रभाव टाकते याचा अभ्यास.

या नव्या शास्त्रीय शाखांमधील संशोधनाने हे दाखवून दिले आहे की, आघात, मेंदू आणि शरीरात प्रत्यक्ष जैविक बदल घडवून आणतो. यात मेंदूच्या धोक्याचा इशारा देणाऱ्या प्रणालीचे पुन्हा समायोजन होते (रिसेट होते म्हणजे लहानसहान आवाज, शब्द किंवा प्रसंगही मेंदूला मोठा धोका वाटू लागतात), तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची क्रिया वाढते, आणि महत्त्वाची व महत्त्वाची नसलेली माहिती वेगळी करणाऱ्या प्रणालीत बदल होतात. आपल्याला आता माहीत झाले आहे की, मेंदूच्या ज्या क्षेत्रामध्ये आपण जिवंत असल्याची शारीरिक, मूर्त भावना व्यक्त होते, त्या क्षेत्रावर मानसिक आघाताचा परिणाम होतो. यामुळे मानसिक आघातग्रस्त व्यक्ती त्यांच्या दैनंदिन जीवनात उत्स्फूर्तपणे व्यग्र असताना मनातील धोक्याबद्दल अतिजागरूक का बनतात हे आपण समजू शकतो. यामुळे आघातग्रस्त लोकांना अनुभवातून शिकण्याऐवजी वारंवार त्याच समस्यांचा सामना का करावा लागतो हे समजून घेण्यास देखील आपल्याला मदत होते. आता आपल्या हे लक्षात आले आहे की, त्यांचे वर्तन नैतिक अपयशाच्या परिणामस्वरूप किंवा इच्छाशक्तीच्या अभावामुळे किंवा कलंकित चारित्र्यामुळे नव्हे, तर मेंदूतील वास्तविक बदलांमुळे प्रभावित होते.

आघातासंबंधीच्या मूलभूत प्रक्रियांविषयी आपण मिळवलेल्या या नव्या माहितींमुळे, या त्रासाचे निवारण करण्यासाठी किंवा काही प्रमाणात पुनर्बाधणी करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. मेंदूची नैसर्गिक लवचीकता (न्यूरोप्लॅस्टिसिटी) वापरून आघातग्रस्त लोकांना वर्तमान क्षणात संपूर्णपणे जिवंत वाटण्यास आणि त्यांच्या जीवनात पुढे जाण्यास मदत करण्याच्या पद्धती आता विकसित करता येतात. यासाठी तीन मुख्य मार्ग आहेत.

 या पुस्तकात  

– आघातातून बाहेर येण्यासाठी न्यूरोप्लॅस्टिसिटीचा उपयोग

– ध्यान, न्यूरोफीडबॅक, खेळ आणि योग यांसारख्या उपचारपद्धती 

– आघात बरे करण्यात नात्यांची भूमिका

– शरीर आणि मेंदू यांचा परस्परसंबंध

– मन आणि मेंदू समजून घेण्यातील क्रांती

– योगसाधना, EMDR उपचार पद्धती

 

प्रभावी अनुभवकथांनी भरलेले असे हे खिळवून ठेवणारे पुस्तक. गेल्या तीस वर्षातील मानसिक आरोग्य क्षेत्रातील सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक आहे.

– – नॉर्मन डॉइज, ‘ द ब्रेन वॅट चेंजेस इटसेल्फ ‘ चे लेखक आहेत.

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “ घे भरारी” – लेखिका : सुश्री जुलेखा विकास शुक्ल ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “घे भरारी” – लेखिका : सुश्री जुलेखा विकास शुक्ल ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

“ घे भरारी “ लेखिका : जुलेखा विकास शुक्ल परिचय : हर्षल भानुशाली

पुस्तक : घे भरारी

लेखक. जुलेखा विकास शुक्ल 

प्रकाशक : मधुश्री प्रकाशन 

पृष्ठ: ३२८

मूल्य: ४००₹

घे भरारी’ हा कथासंग्रह अनुभवांचा, भावनांचा आणि वास्तवाचा आविष्कार आहे. भावनांची ऊब जपताना अति हळवेपणा टाळणाऱ्या या कथा मानवी नात्यांच्या गुंतागुंतीला थेट हात घालतात. अगदी लहान-लहान क्षणांतून त्या माणसाच्या भावविश्वाला स्पर्श करतात आणि त्यामुळे वाचकाच्या मनात नकळत घर करतात.

‘घे भरारी’ या संग्रहात जोडीदार गमावल्यानंतरही आयुष्याला नवी दिशा देण्याची जिद्द दिसते. उतारवयात स्वतःकडे नव्याने पाहण्याची जाणीव उमटते आणि समाजाच्या दबावाखाली गुदमरलेला आत्मसन्मान जागा होतो. नात्यांमधील असुरक्षिततेचा ताण, फसवणुकीनंतरही स्वतःसाठी उभं राहण्याचा ठाम निर्धार, आधुनिक जगातली अस्वस्थ तरुणाई, करियर आणि नात्यांच्या कसरतीत थकलेली स्त्री आणि शिक्षणाच्या स्पर्धेत हरवत चाललेलं बालपण हे सगळं वास्तव या कथांतून समोर येतं.

‘घे भरारी’ हा मानवी नात्यांची ताकद, आत्मसन्मानाची गरज आणि आयुष्याला नवा अर्थ देण्याची क्षमता यांवरचा विश्वास आहे. या कथा दुःख सांगतात, पण निराश करत नाहीत. उलट आयुष्य कितीही कठीण असलं, तरी मार्ग नक्की सापडतोच, हा विश्वास देतात. पात्रांची वेदना, गोंधळ, करारी निर्णय आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद वाचकाला गुंतवून ठेवते.

‘घे भरारी’ मधील मनाला भिडणाऱ्या, विचार करायला लावणाऱ्या आणि दीर्घकाळ सोबत राहणाऱ्या कथा वाचायच्या असतील, तर घे भरारी हा कथासंग्रह नक्कीच वाचायला हवा.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “म्युझिअम” – लेखक : श्री संजय दाबके ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “म्युझिअम” – लेखक : श्री संजय दाबके ☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : म्युझिअम 

लेखक : संजय दाबके 

पृष्ठ : २१२

मूल्य: ४९९₹ 

लेखक संजय दाबके यांच्या मनोगतामधून  

आपल्याला आवडणारी गोष्ट आपल्याला व्यवसाय म्हणून करायला मिळणे हा फार दुर्मिळ योग आहे, पण मी त्या बाबतीत भाग्यवान आहे. गेल्या अनेक वर्षाच्या भटकंतीत ७०/८० देशातून कधी कामाचा भाग म्हणून, कधी आवड म्हणून जवळ जवळ ७०० मोठी छोटी संग्रहालये बघून झाली. युरोप आणि भारताच्या बऱ्याच राज्यांमध्ये काही संग्रहालयांची रचना करण्याचे आणि उभारण्याचे काम हातून झाले. त्यातून एक लेखांचा संग्रह तयार झाला. हे एक प्रकारे प्रवास वर्णनच आहे. फक्त त्यात जनरल न लिहिता मला आवडलेल्या काही उत्कृष्ट संग्रहालयांबद्दल लिहिलं आहे.

संग्रहालय जर चांगलं असेल तर ती अक्षरशः एक कालकुपी असते. इजिप्तच्या अगदी देन्देरासारख्या लहानात लहान गावातल्या संग्रहालयात आपण गेलो तर, कुठले लोक तिथे हजारो वर्षांपूर्वी कसे स्थिरावले, त्यांचं जनजीवन नाईल नदीच्या साथीने कसं बहरलं याची माहिती कळते. मग आपण गावात हिंडायला जेव्हा बाहेर पडतो तेव्हा आपल्या नकळत आपण त्यांच्या चालीरीती, भाषा, संगीत याच्याकडे बारकाईने बघतो. तीच गोष्ट दुबईसारख्या अगदी लोकप्रिय शहराची. तिथे लोक जातात तेच शॉपिंगच्या उद्देशाने फार थोडे लोक जुन्या दुबईतल्या छोटेखानी दुबई संग्रहालयाला भेट देतात. १९८० पर्यंत एका अगदी गरीब खेड्यापासून आत्ताच्या झगमगणाऱ्या दुबईत एका दूरदृष्टी असलेल्या शेखच्या प्रयत्नांमुळे त्याचं कसं रूपांतर झालं याची चित्तरकथा तिथे अतिशय सुंदर स्वरूपात मांडली आहे. मग जेव्हा आपण दुबईत हिंडतो तेव्हा आपण फक्त दुबई मॉलमध्ये न जाता, जुन्या मसाला बाजारात, नदीकाठी, जुन्या मच्छी मार्केटमध्ये रेंगाळतो. लोकांची भाषा ऐकतो. स्थानिक लोक जिथे जेवतात, चहा पितात तिथे जातो. परिणामी फक्त शॉपिंग करून मिळेल त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त समाधान आपण परत येताना आपल्याबरोबर घेऊन येतो. कारण तो देश थोडा फार तरी आपल्याला समजलेला असतो आणि याच मुख्य कारण असतं आपण पाहिलेलं एक सुंदर संग्रहालय!

युरोप तर संग्रहालय शास्त्रामध्ये आद्य! तिथे इतिहास प्रचंड. फारशी आक्रमणे न झाल्यामुळे (दुसऱ्या महायुद्धाचा मात्र अपवाद) खूपसा भूगोल अजूनही शेकडो नाही तर हजारो वर्षांच्या खुणा अंगावर मिरवतोय. सोळाव्या शतकापासून जगभरच्या वसाहतींमुळे झालेली आर्थिक भरभराट आणि या सगळ्यामुळे आपला इतिहास आणि संस्कृती जिवापाड जपायची आपोआप अंगात निर्माण झालेली वृत्ती यामुळे युरोपातल्या बहुतेक देशात अप्रतिम संग्रहालये बघायला मिळतात. त्यात इंग्रज अग्रस्थानी. गेली ३० वर्षे मी सातत्याने इंग्लंडला जातोय, तिथे दीर्घकाळ राहिलोय पण अजूनही माझी इंग्लंडमधलीच काय पण राजधानी लंडनमधली सगळी संग्रहालये बघून झाली नाहीयेत.

ऐतिहासिक घरांपासून (शेक्सपिअर ते शेरलॉक होम्स) ते प्रचंड ऐतिहासिक संग्रहालयांपर्यंत (ब्रिटिश म्युझिअम, व्हिकटोरिया आणि अल्बर्ट म्युझिअम) फक्त अचंबित व्हावं इतका इतिहास जपलाय या लोकांनी!

पोलंडला गेलं तर ऑश्वित्झ इथल्या दुसऱ्या महायुद्धातल्या छळ छावणीचं मन सुन्न करणारं आता केलेलं संग्रहालयातलं रूपांतर. जगात खूप बघण्यासारखं आहे पण त्याची सुरूवात त्या त्या ठिकाणच्या संग्रहालयांपासून होते ही माझी तरी आता ठाम समजूत झाली आहे.

माझ्या जगभरच्या भ्रमंतीत आत्तापर्यंत अनेक उत्तमोत्तम, काही भव्य तर काही अगदी एका खोलीत मांडलेल्या, काही ड्रेस्डेनमधल्या ग्रीन व्हॉल्टसारख्या अगदी अनपेक्षित अनुभव देणाऱ्या अनेक संग्रहालयांपर्यंत मी जाऊ शकलो. माझ्यासारखे इतिहासप्रेमी, पर्यटन म्हणजे फक्त खरेदी असं न मानणारे खूप असतील पण, कदाचित त्यांच्याकडे वेळ थोडा असेल, अशांसाठी माझ्या प्रवासातून एकत्रित केलेले काही निवडक संग्रहालयांचे अनुभव ह्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही जणांना तरी याचा उपयोग व्हावा अशी इच्छा!

*************

या पुस्तकात  

— ४०-४५ किमी पसरलेलंसुद्धा एक संग्रहालय असू शकतं?

— नेपोलियनची शवपेटी असलेलं म्युझिअम कोठे आहे?

— वेश्याव्यवसायावर आधारितसुद्धा एक संग्रहालय आहे?

— टायटॅनिक जहाजाला अफाट प्रसिद्धी का मिळाली?

— दरवर्षी ३० लाख पर्यटक भेट देतात ते ठिकाण कोणतं?

— शेक्सपिअरच्या घरामध्ये त्याच्या कोणत्या गोष्टी जतन करण्यात आल्या आहेत?

— कोणत्या म्युझिअमवरून माणूस हजारो रुपयांचे खरेदी करून जातो?

— नशीब ठरवणारा दगड’ कोठे जतन केला आहे?

— कसं तयार झालं मिठाच्या खाणीचं म्युझिअम?

… युरोप खंडातील १३ अद्भुत म्युझिअम्स, तेथील रोमांचक वर्णने, अनाकलनीय सत्ये, ऐतिहासिक वारसा प्रभावीपणे सांगणारं हे पुस्तक खूप वाचनीय आहे.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “विचारचक्रांचा योग्य उपयोग” – लेखक : अब्राहम थॉमस – अनुवाद : स्नेहा केणी☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

श्री हर्षल सुरेश भानुशाली

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “विचारचक्रांचा योग्य उपयोग” – लेखक : अब्राहम थॉमस – अनुवाद : स्नेहा केणी☆ परिचय –  श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆

पुस्तक : विचारचक्रांचा योग्य उपयोग 

 – – – मनावर प्रभावीपणे ताबा मिळवा

लेखक : अब्राहम थॉमस

अनुवाद : स्नेहा केणी

मूल्य: ३३०₹ 

रोजच्या धकाधकीच्या जीवनाने भांबावून न गेलेली व्यक्ती सापडणे जणू अशक्यच आहे. मनात सतत गोंधळ सुरू असतो… त्यामुळे आपण नेहमी दुख, राग आणि वैतागाच्या दुष्टचक्रात अडकलेलो असतो… मग अशा परिस्थितीत मदतीसाठी पाहावे तरी कोणाकडे? याचं उत्तर आपल्यातच दडले आहे. हे पुस्तक प्रभावी मन नियंत्रणाद्वारे पुढे जाण्याचे व्यवहार्य आणि शाश्वत मार्ग सुचवते.

– – रागावर नियंत्रण कसे ठेवावे. संयम कसा वाढवावा. दुःखाला कसे सामोरे जावे. अपराधीपणाचा सामना कसा करावा. अचानक आलेल्या निराशेच्या खोल गर्तेतून कसे बाहेर पडावे. समाधानी आयुष्य कसे जगावे. जीवन अर्थशून्य भासत असल्यास, या निराशापूर्ण भावनेला कसे टाळावे. हे पुस्तक ‘इफेक्टिव माईंड कंट्रोल’ या संकेतस्थळावरील मनासंबंधीच्या ए. आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रबंधातील वर्तनात्मक पैलूंचा संक्षिप्त आढावा घेते. ईएमसी या संकेतस्थळाला जगभरातून भरघोस प्रतिसाद लाभला. १५० देशांतील सुमारे पाच लाखांहून अधिक लोकांनी या वेबसाईटला भेट दिली. इएमसी असे गृहीत धरते की आय. ए. (अंतर्ज्ञानाची नियतरीती) मुळे मनाला विगमक तर्क वापरून वृत्ती आणि वर्तन नियंत्रित करता येते.

– – हे पुस्तक शतकानुशतके ज्ञानी व्यक्तींनी आचरणात आणलेल्या साध्या सोप्या मानसिक व शारीरिक सरावांची शिफारस करते. यामुळे आपला दृष्टिकोन व कृती बदलण्यास मदत होते आणि आपण आयुष्याचे सकारात्मक अनुभव घ्यायला शिकतो.

 

परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली

पालघर 

मो. 9619800030

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares