☆ “विवेकीयांची संगती” – लेखिका : श्री अतुल देऊळगावकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : विवेकीयांची संगती
– “वो सुबह हमी से आयेगी…”
लेखक : अतुल देऊळगावकर
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पृष्ठः २४७
मूल्य: ३९५₹
एप्रिल १९५०. कंपनीच्या कामासाठी राय यांना पाच महिने लंडनला पाठवायचं ठरलं. राय दाम्पत्य कोलंबोहून जहाजानं लंडनकडे निघालं. राय सोळा दिवसांच्या प्रवासात ‘पाथेर पांचाली’ संबंधी सुचणाऱ्या कल्पना लिहू लागले. त्यासोबत रेखाचित्रं होतीच. रेन्वा, व्हिक्टोरिया डा’ सिका आणि आयझेंस्टाइन यांच्या पावलांवर पाऊल टाकायचं, हे त्यांनी ठरवलंच होतं. वेशभूषा नाही. स्टुडिओ वा सेट नाही. गाणी नाही. प्रत्यक्ष गावात, साध्या माणसांना घेऊन चित्रपट करायचा. कथेतलं वास्तव थेट भिडवण्यासाठी त्यांचे विचार सतत चालू होते. ते लंडनमध्ये सहा महिन्यांत शंभर सिनेमे पाहून परत भारताकडे निघाले. परतीच्या प्रवासात ‘पाथेर पांचाली’ कागदावर पूर्णपणे उतरला होता. ते परत आले तेव्हा भारतातला पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरवला जाणार होता. त्यात अकिरा कुरोसावा, रोझेलिनी, डी’ सिका यांसारख्यांचे चित्रपट होते. ‘राशोमान’ पाहताच त्याच्या प्रेमात पडलेले राय म्हणतात, ‘ती अस्सल जपानी कलाकृती होती. त्यामुळेच ‘पाथेर पांचाली’तील अस्सलपणाची खात्री पटली आणि ठरवलं की, हे करायलाच पाहिजे. ‘
‘पाथेर पांचाली’ ही हरिहर, त्यांची पत्नी सर्वजया, वृद्ध चुलत बहीण इंदिरा ठाकुरन, मुलं अपू-दुर्गा आणि अनेक छोट्या पात्रांची आहे. पूजापाठ करणाऱ्या दरिद्री हरिहरला दोन वेळचं जेवण मिळवणंसुद्धा कठीण आहे. त्यात या कुटुंबातील व्यवहाराचं चित्रण आहे. माणुसकी, लबाडी, ओलावा आणि निरागस बालपण… सगळं काही त्यात आहे. कादंबरीने कमीत कमी शब्दांत सूक्ष्म तपशील पकडल्यानं कवितेची उंची गाठली होती. राय पटकथा लिहून मोकळे झाले. दरम्यान, विभूतिभूषण वारल्यानं त्यांच्या पत्नी रमाबाईंकडून परवानगी घेतली आणि भांडवल गोळा करायची तयारी सुरू झाली. त्यांनी कल्पना मुव्हीजच्या भट्टाचार्यना गाठलं. त्यांनी शांतपणे कथा ऐकली. रेखाचित्रं पाहिली. दहा दिवसांची मुदत मागितली. चौथ्या दिवशी रमाबाईंचा भाऊ धावत राय यांच्याकडे आला. ‘कल्पना मुव्हीज हक्क मागतेय. प्रसिद्ध दिग्दर्शक देवकी बोस यांना घेऊन ‘पाथेर पांचाली’ करणार, म्हणताहेत. ‘…
डॉ. नॉर्मन बोरलॉग, डॉ. अमर्त्य सेन, मृणाल सेन, डॉ. सुधीर कक्कर, अनिल अग्रवाल, कुमार केतकर, माधुरी पुरंदरे, भागवत धोंडे, जयंत वैद्य आणि इतर अनेक विचारवंतांच्या कार्याचा प्रेरणादायी वेध या पुस्तकातून उलगडतो.
विचारांना समृद्ध करणाऱ्या आणि परिवर्तनाची प्रेरणा देणाऱ्या असामान्य व्यक्तिमत्त्वांच्या सहवासात घेऊन जाणारे हे पुस्तक प्रत्येक जिज्ञासू वाचकासाठी अनमोल ठरते.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “ऑपरेशन सिंदूर” – लेखक : ले. जन. सुदर्शन हसबनीस (नि.) – अनुवाद : डॉ. प्रसाद कुलकर्णी ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : ऑपरेशन सिंदूर
लेखक : लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस (निवृत्त.)
अनुवाद : डॉ. प्रसाद कुलकर्णी
पाने : २३६
किंमत : ₹३९५ / –
हे पुस्तक एप्रिल 2025 मध्ये घडलेल्या पहलगामवरील भीषण दहशतवादी हल्ल्याचे आणि तत्पश्चात भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दिलेल्या निर्णायक लष्करी प्रतिसादाचे सविस्तर आणि प्रभावी वर्णन सादर करते.
पाकिस्तानच्या पाठिंब्याने कार्यरत दहशतवादी पायाभूत संरचनेवर भारताने संयमाच्या भूमिकेतून बाहेर पडत गुप्तचर आधारित, अचूक हवाई व जमिनीवरील कारवाया कशा प्रकारे केल्या, या धोरणात्मक परिवर्तनाचा सखोल ऊहापोह पुस्तकात मांडलेला आहे.
सशस्त्र दलांनी हाती घेतलेल्या विविध महत्त्वपूर्ण मोहिमा तसेच घटनेनंतर घडलेल्या जटिल राजनैतिक प्रयत्नांचेही यात तपशीलवार विश्लेषण आले आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी, घटनाक्रमांचे तटस्थ विवेचन आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोन यांच्या माध्यमातून, या घडामोडींनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात तसेच प्रादेशिक स्थैर्यात कसा महत्त्वपूर्ण व दीर्घकालीन बदल घडवून आणला, हे पुस्तक प्रभावीपणे उलगडते.
… सुस्पष्ट भाषा, तार्किक रचना आणि सोप्या पण प्रभावी शैलीमुळे हे पुस्तक विविध स्तरावरील वाचकांसाठी सहज वाचनीय तसेच पूर्णतः समजण्यास सुलभ ठरते.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “कर्तव्यपूर्ती” – लेखक / संपादक : कर्नल आनंद बापट (नि.) / प्रा. डॉ. सुभाष भावे ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : कर्तव्यपूर्ती
लेखक / संपादक : कर्नल आनंद बापट / प्रा. डॉ. सुभाष भावे
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स
सशस्त्र सेनादलातील शिपाई व अधिकाऱ्यांविषयी सामान्यजनांच्या मनात नेहमीच एक सुप्त आकर्षण असते. सैन्यदलातील कठोर अनुशासन, खडतर प्रशिक्षण, सीमावर्ती व दुर्गम प्रदेशात कुटुंबापासून दूर राहून व्यतीत केलेला सेवाकाळ, शत्रूसोबत झालेल्या चकमकी आणि त्यामधून सैनिकांनी गाजवलेली मर्दुमकी, अशा विषयांवरच्या रम्य कथा ऐकण्यात सर्वांनाच औत्सुक्य वाटते.
परमवीर चक्र किंवा तत्सम शौर्यपदके प्राप्त केलेल्या वीरांच्या अनेक कथा आजवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. परंतु, प्रत्येक सैनिकाच्या आयुष्यात कधी ना कधी, अत्यंत अवघड असे परीक्षेचे क्षण येऊन गेलेले असतात. भारतीय सैन्यदलांमध्ये असेही असंख्य वीर आहेत ज्यांनी शत्रूसोबत लढताना किंवा इतर काही कठीण प्रसंगांमध्ये असामान्य कामगिरी केलेली आहे, परंतु त्यांना प्रसिद्धीचे वलय लाभलेले नाही.
भारतीय नौदल, हवाई दल आणि भूदलातील अशाच काही शूर सैनिक व अधिकाऱ्यांच्या एकवीस सत्यकथांचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे. आजवर प्रकाशझोतात न आलेल्या वीरांच्या कथादेखील वाचकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने हे पुस्तक संपादित केलेले आहे. लेखकांचा अल्प परिचयदेखील त्यांच्या कथांसोबत दिलेला आहे.
युद्धाच्या रम्य गोष्टी ऐकता-ऐकता, कधीतरी त्या कथा ऐकणाऱ्यांना स्वतःच अशा एखाद्या युद्धकथेचा भाग होण्याची स्फूर्ती मिळावी हा या पुस्तकाचा खरा हेतू आहे. या पुस्तकातील शौर्यकथा जर अधिकाधिक लोकांनी, आणि विशेषतः किशोरवयीन मुलामुलींनी व तरुण-तरुणींनी वाचल्या आणि त्यातून प्रेरणा घेऊन असेच शूरवीर घराघरातून उदयाला आले, तर या कथांचे मूळ लेखक आणि प्रस्तुत पुस्तकाचे संपादक भरून पावतील.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एका प्रसिद्ध साहित्यिकाने म्हटले आहे. आयुष्य हे एक रियाज आहे. या विचारात जीवनाचे सार आहे. कोणतीही व्यक्ती एका दिवसात प्रगल्भ होत नाही. सातत्यपूर्ण प्रयत्न, निरंतर अभ्यास, चिंतन मनन, निरीक्षण आणि जीवनाकडे पाहण्याचा संवेदनशील दृष्टिकोन यांच्या रियाजातूनच व्यक्तिमत्व घडत असते. वस्तू व सेवाकर विभागातील सहायक राज्यकर आयुक्त तथा लेखिका सौ. मोहिनी हेडावू-किन्हीकर यांच्या ‘मनातलं’ या ललित लेखसंग्रहाचे वाचन करतांना हा विचार वारंवार मनात येत राहीला. प्रशासकीय जबाबदा-या सांभाळतानाही लेखिकेने आपल्या संवेदनशील मनाला जपले आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनात कार्यालयीन अनुभवांपेक्षा माणूस आणि जीवन अधिक ठळकपणे दिसते. या संग्रहातील प्रत्येक लेख हा जीवनाच्या एखाद्या साध्या अनुभवातून मोठा आशय उलगडून दाखवतो. भाषा अत्यंत सुलभ, कुठेही कृत्रिम अलंकाराचा अतिरेक नाही. म्हणूनच हे लेख वाचतांना ते वाचकाच्या मनात सहज उतरतात. या पुस्तकातील काही निवडक लेखांनी माझ्या मनावर उमटविलेला ठसा येथे मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. ‘मोनालिसाः सृजनाची अमरता’ या पुस्तकातील पहिल्याच ललित लेखात लेखिकेने मोनालिसा आणि लिओनार्दो दा विंची या फ्रेंच चित्रकारातील काल्पनिक पत्रसंवाद रचला आहे. त्यात मोनालिसा आपले भावविश्व व्यक्त करते. ‘तू तर मर्त्य आहेस; मी मात्र अमर झाले आहे’ हे मोनालिसाचे वाक्य अत्यंत प्रभावी वाटते. कलाकार नश्वर असतो; परंतु त्याची सृजनकृती त्याला अमरत्व प्राप्त करून देते. हा गहन विचार या लेखातून व्यक्त होतो. हा लेख वाचतांना मला विनायक होगाडे यांच्या डिअर तुकोबा या पुस्तकातील काल्पनिक संवादाची आठवण झाली.
‘रिचार्जिंग रिलेशनशीप’ संवाद मनामनांचा आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या माणसांशी संवाद साधायलाच विसरत चाललो आहेत. हा लेख याचे आत्मपरीक्षण करायला भाग पाडतो. मी इतका व्यस्त आहो का? की दोन मिनिटेही माझ्या माणसांसाठी वेळ देऊ शकत नाही? हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. लेखिकेच्या जीवनात लोकसंग्रह आणि संवादाला असलेले महत्व या लेखातून जाणवते. हा लेख वाचतांना डेल कानेंगी यांच्या How to win afriends and influence the people या पुस्तकाचे मला स्मरण झाले. आंतरवैयक्तिक संबंध कसे जोपासावेत याचे मार्गदर्शन दोन्ही लेखनातून मिळते. ‘तुर्कनामा- मीना प्रभू’ प्रवासातून घडणारे संस्कार मीना प्रभू यांच्या तुर्कनामा या पुस्तकावरील लेखिकेचे परीक्षण वाचतांना प्रवास म्हणजे केवळ पर्यटन नसून संस्काराची प्रक्रिया आहे हे प्रकर्षाने जाणवते. प्रवासातून इतिहास, संस्कृती, खाद्य संस्कृती आणि समाज समजून घेण्याची दृष्टी विकसित व्हावी हा संदेश या लेखातून मिळतो. तुर्कीतील लोकांनी आक्रमणांच्या काळात जीवितरक्षणासाठी जमिनीखाली उभारलेल्या निवासस्थानांचा उल्लेख वाचतांना प्रतिकुल परिस्थितीतही माणूस जगण्याची आशा कशी जपतो Scanned with OKEN Scanner याची जाणीव होते. त्यामुळे हा लेख वाचतांना मला व्हीक्टर फकल यांच्या ‘मॅन्स सर्च फॉर मिनींग’ (Man’s Search for Meaning) या पुस्तकाची आठवण झाली. संकटातूनही अर्थपूर्ण जीवन जगण्याची प्रेरणा या दोन्ही लेखनातून समानपणे जाणवते. ‘माझी आवड: आंबा’ हा लेख माझ्या विशेष आवडीचा ठरला. कोकणातील हापूस आंब्याचा रंग, सुगंध, स्पर्श आणि चव यांचे लेखिकेने केलेले वर्णन हे फळाचे वर्णन राहत नाही तर जीवनातील आनंदाचा उत्सव बनतो. हा लेख वाचतांना मला एक वैयक्तिक प्रसंग आठवला. एकदा मी माझ्या घरच्या अंगणातील झाडाचे केशर आंबे लेखिकेला दिले होते. त्यावेळी त्यांनी आंब्याचा आनंद अगदी याच संवेदनशीलतेने व्यक्त केला होता. त्यामुळे मला हा लेख अधिक जिव्हाळयाचा वाटला. माझ्या दृष्टीने आंबा हे केवळ फळ नसून लेखिकेच्या बालपणातील आठवणी, साधेपणा आणि जीवनतील आनंदाचे प्रतीक आहे. ‘मनाचे उत्खनन’ आत्मपरीक्षणाचा प्रवास निरंजन घाटे यांच्या फार फार वर्षांपूर्वी या पुस्तकातील उत्खनन या संकल्पनेचा संदर्भ घेऊन लेखिकेने मनाचे उत्खनन ही सुंदर कल्पना उभी केली आहे. या लेखाने मला सर्वाधिक अंतर्मुख व्हायला भाग पाडले. राग, देष, लोभ, मोह, भीती यासारख्या भावनांकडे तटस्थपणे पाहण्याचा संदेश या लेखातून मिळतो. हा लेख वाचतांना तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेली विपश्यना साधना आणि वर्षभरापूर्वी मला आलेला विपश्यनेचा अनुभव पुन्हा जागा झाला. आपल्या अंतर्मनात डोळसपणे डोकावणे कसे गरजेचे आहे हा संदेश या लेखातून वाचकांना मिळतो. ‘रोमान्सः अनुभूतीचा नवा अर्थ’ रोमान्स या शब्दाचा केवळ प्रेमाशी संबंध नसतो. जीवनातील साध्या क्षणांचा मनापासून अनुभव घेणे-वाफाळलेला चहाचा घोट, झाडांचा स्पर्श, फुलांचा सुगंध, स्वैर चालणे, समुद्राची गाज हे ही रोमँटिक असू शकते अशी व्यापाक संकल्पना लेखिकेने मांडली आहे. हा लेख वाचल्यानंतर जीवनातील छोटया छोटया गोष्टींकडे नव्या नजरेने पाहावेसे वाटते. ‘मनातलं’ हा ललित लेखसंग्रह वाचतांना मला सतत एक गोष्ट जाणवत राहिली. जीवनातील साध्या अनुभवाकडे संवेदनशीलतेने पाहिले तर त्यातूनही साहित्य जन्म घेऊ शकते. ‘मनातलं” हा ललित लेखसंग्रह केवळ वाचण्याचा नाही, तर जगण्याचा अनुभव आहे. साध्या अनुभवांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची दृष्टी हा संग्रह वाचकाला देतो. म्हणूनच हा संग्रह केवळ साहित्यप्रेमींनी नव्हे, तर जीवन अधिक समृध्द करु इच्छिणा-या प्रत्येकाने वाचला पाहिजे.
(टीपः हा लेख वाचक म्हणून लिहिलेला वैयक्तिक अभिप्राय आहे.)
परिचय : नारायण काळे
राज्यकर निरीक्षक, वस्तू व सेवाकर विभाग
प्रस्तुती : मोहिनी हेडावू
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ ‘आहे हे असं आहे’ – लेखिका : गौरी देशपांडे ☆ परिचय – सुश्री संगीता कुलकर्णी ☆
पुस्तक : आहे हे असं आहे (कथा संग्रह)
लेखिका : गौरी देशपांडे
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह
पृष्ठ: १६७
मूल्य: २७० ₹
पुस्तके ही केवळ अक्षरांची मांडणी नसते; ती मानवी मनाचा आरसा असतात. ती विचारांना चालना देतात, भावनांना शब्द देतात आणि जीवनातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रेरणा देतात. काही पुस्तके वाचून संपतात तर काही मनात कायमची रुजतात. मराठी साहित्यात अशा प्रभावी लेखिकांमध्ये गौरी देशपांडे यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. त्यांच्या ‘आहे हे असं आहे’ या कथासंग्रहाने माझ्या विचारविश्वावर विशेष प्रभाव टाकला.
‘आहे हे असं आहे’ हा केवळ कथासंग्रह नाही तर मानवी मनातील सूक्ष्म भावभावनांचा, नात्यांतील गुंतागुंतीचा आणि आधुनिक जीवनातील वास्तवाचा संवेदनशील वेध घेणारी साहित्यकृती आहे. गौरी देशपांडे यांच्या कथा वाचताना प्रत्येक पात्र आपल्या आसपासचेच वाटते. त्यांच्या आनंदात, वेदनेत, संघर्षात आणि एकटेपणात वाचक नकळत सहभागी होतो. हीच त्यांच्या लेखनाची खरी ताकद आहे.
या पुस्तकातील भाषा साधी असली तरी ती अत्यंत अर्थगर्भ आणि काव्यमय आहे. शब्दांचा अनावश्यक डौल न मिरवता लेखिका थेट मनाशी संवाद साधतात. नात्यांमधील प्रेम, अपेक्षा, तुटलेपण, स्वातंत्र्याची ओढ आणि व्यक्तिमत्त्वाचा शोध या विषयांना त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले आहे. त्यामुळे प्रत्येक कथा वाचल्यानंतर मन बराच वेळ विचारमग्न राहते.
या पुस्तकाने मला जीवनाकडे अधिक समंजस नजरेने पाहायला शिकवले. प्रत्येक व्यक्तीच्या वागण्यामागे तिचे अनुभव, संघर्ष आणि भावविश्व दडलेले असते, याची जाणीव या कथांनी करून दिली. दुसऱ्यांविषयी सहानुभूती, संवादाचे महत्त्व आणि नात्यांमधील विश्वास यांचे मूल्य या पुस्तकामुळे अधिक स्पष्ट झाले. जीवन काळे किंवा पांढरे नसते त्यात अनेक छटा असतात, हा महत्त्वाचा विचारही या पुस्तकातून उमगला.
गौरी देशपांडे यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे वास्तववाद, मनोविश्लेषण आणि स्त्रीमनाचे सूक्ष्म चित्रण. त्यांच्या कथा कोणताही उपदेश करत नाहीत.. त्या वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करतात. म्हणूनच त्यांच्या साहित्याचा प्रभाव दीर्घकाळ मनात टिकून राहतो. त्यांच्या लेखणीतून व्यक्त होणारी संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा प्रत्येक वाचकाला अंतर्मुख करतो.
आजच्या बदलत्या समाजात नाती, मूल्ये आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांविषयी नव्याने विचार करण्याची गरज आहे. अशा वेळी गौरी देशपांडे यांचे साहित्य अधिक अर्थपूर्ण वाटते. त्यांच्या कथा माणसाला स्वतःकडे आणि समाजाकडे अधिक संवेदनशील दृष्टीने पाहायला शिकवतात.
म्हणूनच ‘आहे हे असं आहे’ हा कथासंग्रह माझ्यावर प्रभाव पाडणारा अप्रतिम ग्रंथ आहे. त्याने मला केवळ साहित्याचा आनंद दिला नाही तर जीवन समजून घेण्याची नवी दृष्टीही दिली. विचारांना समृद्ध करणारे, मनाला स्पर्श करणारे आणि माणुसकीची जाणीव अधिक गहिरी करणारे हे पुस्तक मराठी साहित्यातील एक उल्लेखनीय ठेवा आहे.
अनुभूतींच्या विविध रंगांचे रसाळ कोलाज: ‘माझे कथाविश्व‘
जगण्यातील साधेपणा जेव्हा शब्दांचे बोट धरून कागदावर उतरतो, तेव्हा ‘माझे कथाविश्व’ सारखी एक नितांत सुंदर साहित्यकृती आकारास येते. श्रीमती जयश्री लेंभे लिखित आणि मुद्रिका कमर्शिअल प्रिंटर्स (शुक्रवारपेठ) तर्फे प्रकाशित झालेला हा कथासंग्रह म्हणजे केवळ कथांचा पुंजका नसून, मानवी स्वभावाच्या, नातेसंबंधांच्या आणि भावभावनांच्या विविध छटांचे एक देखणे शब्दविश्व आहे. लाभलेले सुबक मुखपृष्ठ (स्वराली लेंभे) आणि मा. किसन चौधरी सरांची पुस्तकाविषयीची उत्सुकता वाढवणारी अभ्यासपूर्ण प्रस्तावना पुस्तकाच्या सौंदर्यात भर घालते. लेखिकेचे छोटेखानी पण प्रगल्भ मनोगत वाचकाला या विश्वात प्रवेश करण्यासाठी उद्युक्त करते.
दैनंदिन जीवनातील तत्त्वज्ञान आणि मिश्कील निरीक्षण यातून साकारलेल्या या संग्रहातील कथांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे लेखिकेची विलक्षण निरीक्षणशक्ती. ‘निर्मलाची पाककृती’ मधील खुसखुशीतपणा असो वा ‘आजीची शाळा’ मधील त्या इवल्याशा बाळाने दिलेली आर्त साद प्रत्येक गोष्ट थेट काळजाला भिडते. ‘भैरवनाथ प्रसन्न’ आणि ‘मान न मान में तेरा मेहमान’ (मांंजराच्या रूपातील पाहुणीची कथा) या कथांमधून लेखिकेचा मिश्कील आणि हसता-हसता अंतर्मुख करणारा स्वभाव दिसून येतो. ‘समज’ आणि ‘वेडी माणसं’ या कथा मानवी मनातील गैरसमज आणि स्वभावातील विक्षिप्तपणाचे अचूक पण तितकेच सहानुभूतीपूर्वक चित्रण करतात.
संस्कार, कर्तव्य आणि भावनांचा त्रिवेणी संगम
दीर्घकाळ शिक्षण क्षेत्रात घालवलेल्या आदर्श मुख्याध्यापिकेचे संस्कारक्षम पैलू ‘सत्वपरीक्षा’, ‘२५ नंबरचा विद्यार्थी’ आणि ‘चांदण्यातली चांदी’ या कथांमधून प्रकर्षाने जाणवतात. विद्यार्थ्यांबद्दलची प्रामाणिक आपुलकी आणि नातवंडांवर होणारे मूल्यांचे संस्कार वाचकाच्या मनावर गारुड करतात. कौटुंबिक जिव्हाळ्याचे दर्शन घडवणारी ‘कोटाची कोपरी’ आणि प्रत्येक गृहिणीला स्वतःचा शोध घ्यायला लावणारी मैत्रिणीची गोष्ट म्हणजे ‘रखमी’ या कथा कौटुंबिक मूल्यांची वीण घट्ट करतात.
परमेश्वरी अधिष्ठान आणि अध्यात्माची प्रचिती
लेखिकेच्या संवेदनशील मनाला लाभलेली अध्यात्माची जोड पुस्तकाला एक वेगळीच उंची देते. ‘वारी पंढरीची’, ‘अतर्क्य’ (अपघातातून आजोबांचे बरे होणे), आणि ‘विठ्ठला पांडुरंगा’ या कथांमधून विठ्ठलनामाचा गजर आणि परमेश्वरी अस्तित्वाची प्रचिती वाचकाला भारावून टाकते. ‘मेडिटेशन’ सारख्या गंभीर विषयावर स्वतःचीच गंमत सांगत लेखिकेने मांडलेले जीवन जगण्याचे मोठे तत्त्वज्ञान कौतुकास्पद आहे.
ऋतूंचे आणि आठवणींचे सोहळे
दिवाळीच्या फराळाची पंगत डोळ्यांसमोर उभी करणारी ‘फराळ’ ही काव्यात्मक कथा आणि ‘आठवणीतील दिवाळी’, ‘आठवणीतला पाऊस’ या रचना वाचकाला स्वतःच्याच बालपणात आणि भूतकाळात घेऊन जातात, जिथे वाचकही त्या आठवणींच्या पावसात चिंब भिजून निघतो. ‘आनंदाचा चष्मा’ चढवून मस्त आनंदी राहण्याचा संदेश देणाऱ्या आणि ‘येन केन प्रकारेण’ मधून संस्कृत श्लोकांचा मतितार्थ सोप्या भाषेत मांडणाऱ्या कथा संग्रहाची समृद्धी वाढवतात.
अनुभवावर आधारित सुंदर कथाविश्व!
साध्या सोप्या भाषेचे आत्मियता वाढवणारे लेखनविश्व!
वाचकांचा मूड आनंदी करणारे एक नितांत सुंदर शब्दविश्व!
वाचकांना खिळवून ठेवणारे माझे कथाविश्व!
‘माझे कथाविश्व’ हे पुस्तक वाचताना केवळ पानांवरचे शब्द वाचल्याचा भास होत नाही, तर लेखिकेसोबत एका समृद्ध प्रवासाला निघाल्याचा अनुभव येतो. साधी, ओघवती आणि मनाला भिडणारी भाषा, प्रसंगांची जिवंत गुंफण आणि सकारात्मक शेवट ही या पुस्तकाची वैशिष्ट्ये आहेत. वाचकाचा मूड क्षणात आनंदी करण्याचे आणि त्याला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे. प्रत्येक रसिकाने संग्रही ठेवावे आणि आवर्जून वाचावे असे हे एक उत्तम ‘कथाविश्व’ आहे!
पुस्तक परिचय – सुश्री विभावरी कुलकर्णी
सांगवी, पुणे
मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ खांद्यावरचे स्टार्स – लेखक : गजानन राजमाने ☆ परिचय – प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
पुस्तक : खांद्यावरचे स्टार्स
— आगळावेगळा पत्ररूप परिचय
लेखक – गजानन शिवलिंग राजमाने.
प्रकाशन – पॉप्युलर प्रकाशन
किंमत – ३००₹
प्रिय मित्र गजानन,
खरंतर हे अनौपचारिक पत्र तुझ्यातल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यापेक्षा मित्र म्हणून असलेल्या प्रवासासाठी. तुझे ‘खांद्यावरचे स्टार्स ‘ हे पुस्तक सध्या सर्वत्र वाचनीय व प्रेरणीय बनलेले आहे. याचा मनस्वी अभिमान वाटतो. तू घडविलेल्या प्रत्येक कथेतल्या नायकाला उकलत असताना त्यांना माणुसकीची वाट दाखण्यासाठी तू आणि तुझ्या टीमने केलेल्या प्रत्येक धाडशी पावलांना मनोमन सलाम करावासा वाटतो.
हा प्रवासच खरंतर खडतर. पण तुझ्या चाणाक्ष नेतृत्वगुणाने तो सुखकर झालेला. तुझं पुस्तक मार्केटमध्ये येण्यापूर्वी त्याचे मुखपृष्ठ मला शेअर करताना ” अरुण आता मी तुझ्या साहित्यिक जातीतला झालो ” हा मेसेज मी मनाच्या स्क्रीनवरून अजूनही त्या स्क्रिनवर पाहतो.
९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सातारा येथे पुस्तक विक्रीच्या स्टॉलवर – खांद्यावरचे स्टार्स- बनलेली गर्दी डोळे भरून पाहताना उत्साहाने घेतलेली गळाभेटही दोस्ता काळजात जपून ठेवली आहे.
तसा माझा आणि तुझा प्रवासच खडतर. तुझ्या आणि माझ्या वडिलांची कथा थोडीशी सारखीच. बनपुरीच्या एका आळीतला मी आणि दुसऱ्या आळीतला तू जरी असलो तरी आख्या बनपुरीच्या आळ्या-गल्ल्या- मळ्यात वावरलेलो आपण दोघेही.
लहानपणी भिमराव वस्ताद गावातल्या पोरांना पहाटे लवकर उठवून ओढ्याच्या वाळूत, गांवदरीच्या ढेकळात कुस्त्या शिकवायचे. गावातली तालिम पुन्हा जिवंत होण्याचा तो सदृढ काळ. मल्लखांबावरच्या कसरतीचा काळ अजूनही डोळयापुढून हलता हलत नाही. तू माझ्यापेक्षा तीन ते चार वर्षाहून लहान, पण खेळात चाणाक्ष व चपळ होतास. लहान असणारे आपण सर्वजण पहाटे पहाटे एकमेकांना उठवायला जायचो. ओढयात, रानात शड्डू ठोकायचो. तुझे वडील किश्ताक शिवायचे. ते किश्ताक घालून पैलवानकी गाजवताना हुरूप संचारायचा. डिप्स, उठयाबशा कुथून काढायचो. गांवदरीची विहीर, धेंड्याची विहीर, जाधवाची विहीर मनसोक्त पोहण्याचे त्यावेळी स्विमिंग पूल वाटायचे.
कराटे शिकायचा एक काळही त्यावेळी आकर्षणाचा बिंदू होता. डबलबार, सिंगलबार, कराटे, बॅक किक, साईड किक, जंप किक, नानचाकू याच्या मोहात पडलेलो आपण सगळेच. त्यात तू सगळ्या बाबीत तरबेज होतास. सांस्कृतिक चळवळीच्या प्रत्येक कलेचा आनंद आपण उपभोगलाय. खरंतर ही तुझी स्तुती नाही; पण बालपणाचा कष्टपद पण सुखाचा असणारा तो काळ खराखोटा करण्यासारखा नव्हताच. ते अस्सल जगणं होतं आपलं. हीच सुरवात होती अंधारमय जीवन प्रकाशित करण्यासाठीच्या धडपडीची. कदाचित ती प्रेरणास्थळे असतील आपल्या बालपणीच्या प्रत्येक कृतीची. तुझं माझं शैक्षणिक केंद्र खरंतर समांतर असलेलं आणि योगायोगाने ते एकच असलेलं होतं असं मला पुन्हा पुन्हा जाणवत राहतं. तुझी माझी बनपुरी – खरसुंडी – सातारा – आटपाडी – कोल्हापूर ही या शैक्षणिक जडणघडणीची केंद्रे म्हणजे तुला मला घडवलेली समांतर केंद्रे म्हणजे निव्वळ योगायोग. खरंतर बनपुरीच्या मातीत संस्कारीतपणे घडलेलं बालपणच तुझ्या खांद्यावरच्या स्टार्सचं चमकणं असावं.
मनात धग, मनगटात रग व खांद्यावर जबाबदारी घेण्याची साहसी वृत्ती या मातीने तुझ्या अंगाखांद्यावर दिलीय हे अभिमानानं तुझ्याबद्द्ल सांगताना मला आकाश ठेंगणं ल्यासारखं वाटतंय.
तुझं पोलिस अधिकारी होऊन तरुणांना प्रेरणा देणारं काम मला तर प्रचंड भावलं आहे. तुझ्या सहकार्याने बनपुरीत सुरू असलेली सामाजिक, शैक्षणिक, वैचारिक क्रांतीची चळवळ प्रत्येक वर्षी गावातल्या तरुणामध्ये चार चाँद लावत असते. त्यात तु येणाऱ्या पिढीचा प्रेरणा स्त्रोत बनून असतोस सर्वांपुढं. प्रत्येक वर्षी प्रशासकीय सेवेत नवीन भरती झालेल्या तरुणांना व नवीन बनलेल्या अधिकाऱ्यांना गावात बोलवून त्यांचा कौतुक सोहळा गावासमोर करणं ही गावची वैचारिक व प्रेरणादायी दिवाळीच असते. या उजेडातूनच गावातली कितीतरी मुलं मुली प्रशासकीय सेवेत भरती झालेली आहेत. कित्येक त्या वाटेवर आहेत. हे अभिमानाने सांगावेसे वाटते. शहिद विष्णू पुकळे स्मारक म्हणजे गावाचं अत्युच्य प्रेरणा स्थळच आहे. या सर्वांचा तु साहेब नसून मित्र बनून राहतोस प्रत्येकाच्या मनामनात. ही उर्मी, हा जोश तुला पाहिल्यानंतर सळसळत राहतो प्रत्येक नवयुवकांच्या मनात जिद्दीने नवे क्षितिज कवेत घेण्यासाठी.
आता तुझ्या पुस्तकाविषयी – खरंतर हे पुस्तक अंधारमय जीवन प्रकाशित करण्यासाठी अविरत जगण्याचं प्रेरणास्त्रोत बनलं आहे.
तुझे ‘ खांद्यांवरचे स्टार्स ‘ पुस्तक वाचताना तु प्रत्येक पानावर उलगडत जातोस. ती उर्मी, ती धग, ती रग पानापानात सळसळत राहते. फक्त कर्तव्य करायचे म्हणून नाही तर माणुसकीचा धागाही जपायचा हा तुझा निर्धार पुस्तकातील प्रत्येकाच्या कहानीत सकारात्मक जीवन जगायला भाग पाडतो. पोलिस सेवेतील अधिकाराची कर्तव्ये बजावत असताना सकारात्मक दृष्टीने घडविलेले परिवर्तन हा मुख्य गाभा या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
आत्मसमर्पणाच्या वाटेवरचा दिलेर- क्रांतीची आस बाळगून वाट चुकलेला एक तरुण. क्षमा की शिक्षा अशी द्विद्या अवस्था असताना त्याला अंधारातून प्रकाशात आणण्याची आनंददायी बनवलेली क्षमेची वाट तुझे स्टार्स चमकवणारी ठरलीय. एकेकाळच्या मालेगावमधील क्रुर गुन्हेगार भवानीदादाला तुम्ही पैंगबरांचा दाखविलेला मार्ग वाखाणण्यासारखा आहे. ” मैं गुनाह की राह, सब छोड़कर नेकी पर चलूंगा ” असे म्हणणारा भवानीदादा ‘खुदा की कसम ‘ देऊन जातो तेव्हा त्या त्या धर्मातील माणसांच्या मनातील शोध घेत तो पूर्णत्वास घेऊन जाणे ही यापेक्षा सर्वोच्च कामगिरी ती काय असू शकते असे वाटून जाते. पुढे भवानी दादा ‘ पुलिस की दुँवा ‘ हा स्टार आयुष्यभर जोपासणारा नदीम भाई बनतो हा क्षणच परम्मोच्च होऊन गेलाय.
अजान आणि आरती मधील धर्माची शिकवण आणि त्यातील प्रेमाचा विजय पुण्यकर्माचे प्रतिक बनला आहे. तळहाताचा पंजा नसलेला शाहीद ‘ धरती का तारा ‘ बनून जातो. मॉलिवूड, मालेगावचा मुशायरा, ग्रीन मालेगाव ड्राईव, सेल्फी फ्रॉम मालेगाव या सगळ्या कामातून पोलिसांनी सामाजिक साहाय्याचे पोलिसींग करीत सर्वच समाजमनांना एकत्र बांधून ठेवण्याची उदाहरणे दुर्मिळ अशीच आहेत.
आपल्या मौल्यवान शरीराला मादक वस्तूंनी बरबाद करण्यापेक्षा अनेकांची आयुष्ये व्यसनाने बरबाद होण्यापासून वाचविणेचे पूण्यकाम करताना तुझ्या वडीलांनी स्वतःमध्ये केलेला बदल आणि तू नानांना केलेला सॅल्युट यांचा रेशमी धागा बनलेल्या क्षणाला सलाम करावासा वाटतो. त्यांचे प्रेमाने भरलेले डोळे पाहून तुमची झोळी त्यांच्या दुवा आशीर्वादाने भरल्याचे वाटणे हे मनाला खूप भावून जाते. तुझ्या होमगार्ड असणाऱ्या नानाला पोलिस अधीक्षक असणारा तू पोलिसी युनिफॉर्ममध्ये सॅल्यूट करतोस तेव्हा मलाही ऊर भरून त्यांना सॅल्यूट करावासा वाटतो. परमेश्वराने दिलेल्या खाकी वर्दीचा वापर नेक कामासाठी करणे हे शिवधनुष्य तुम्ही उचललं आहे याचा सार्थ अभिमानही वाटतो. कुंटणखान्यातील कमला नावाच्या आईच्या निकिता या मुलीला बारावीला ८२ % टक्के मार्क पडलेले पाहून तिचे कौतुक करताना तिने हातावर ठेवलेला पेढा त्यांच्या कटू कहानीला गोड करून जातो. आणि तिला आयपीएस बनण्याच्या जिद्दीला प्रकाशमय दीप लावण्याचे तुमच्या टिमचे कसब जनामनातली घरं प्रज्वलित होण्यासाठी स्वयंदीपाचे काम करतात.
अविरतपणे पोलिस आपल्या खांद्यावर असणारी अभयदानाची जबाबदारी संभाळत असतात. आपल्या प्राणांची बाजी लावून अविरत अभयदान देणारे तुम्ही सर्वजण गौरवाची प्रतिके बनून स्टार्स चमकवत राहता हे कार्य खूपच महान आहे.
सातारच्या अंध नामदासचे रक्तदानाचे पुण्य काम इन्सानियत के लाल रंग दाखवून जाते. ‘ शहिदों ने बलिदान दिया, हम रक्तदान करेंगे ‘ ही भावना देशप्रेमाच्या रंगात एकरूप होते. समाजाला खरी दृष्टी देणारा नामदास शरिराच्या धमन्यातून जीवनोत्सव बनून वाहू लागतो. छाती पोलिसांची आणि हृदय शिक्षकांचे बनून तुम्ही दिव्य कर्तव्ये पार पाडता तेव्हा ज्ञानाची ज्योत तुमच्या स्टार्सना लख्ख उजळवून टाकते.
एका हातात प्राण आणि दुसऱ्या हातात रायफली घेऊन तुम्ही नक्षलवाद्यांच्या आयुष्याला माणुसकीचा दिलेला आधार तुमच्या टिमच्या निस्वार्थी आणि निर्मळपणाचे उत्तम उदाहरण आहे आणि ते नागणडोह सारख्या गावात दिसते.
आदिवासींची संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी माणुसकीचा आधार देत शस्त्र नको पण सन्मानाचे वस्त्र देण्याचे काम तुम्ही प्रशासनाच्या मदतीने केले याचा मनस्वी अभिमान या प्रसंगातून वाटला. स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तनाची कास धरणाऱ्या मरकाम यांना मलाही विसरणे शक्य नाही. अजीम शेखच्या काळोखमय आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पाडून तु व तुझ्या टिमने दिव्य असे कर्तव्यच पार पाडले हे आणखी विशेष!
फौजदार तयार करणारी फॅक्टरी, पिपरखारी गावावर नक्षलवाद्यांनी पेरलेली दहशत, बंदुकी शिवाय नक्षल बिमोड, कुपोषितांच्या आयुष्यातील लाल क्रांती, केसरी रंगाच्या साडीत कमळासारखी खुलून दिसणारी आजी, नशेत भरकटलेल्या मिनाक्षीच्या आयुष्यातून तिची नशा कायमची उध्वस्त करण्यासाठी केलेला संगदोष उपाय, विदर्भातील डॉनला चड्डीवर अनवाणी फिरविणारी कामगिरी, लोकांना भयापासून मुक्ती देणारी खाकी वर्दितली तुमची सेवा असे कितीतरी प्रसंग या पुस्तकातून प्रेरणा देत राहतात.
ज्यांच्याकडे मूर्त स्वरूपात ‘स्टार्स’ नसले तरी हजारो लाखो जणांचे स्टार प्रशासकीय कर्तव्याने चमकविण्याचे भाग्य तुम्हाला लाभले आहे. त्यामुळेच या पुस्तकातील २१ घटनातील प्रसंग वाचताना समाजातील व्यवस्थेसाठी सकारात्मक दृष्टीने तुम्ही तुमचे ‘खांद्यावरचे स्टार्स ‘ घेऊन केलेले काम आमच्याही मनात तुमच्या खांद्याला खांदा देऊन चमकविण्याची उर्मी निर्माण करते. आम्हालाही तुमच्या ‘खांद्यावरच्या स्टार्स ‘ चा सार्थ अभिमान वाटत राहतो. तुमच्यातल्या या लोकसेवक स्टार्सना कडक सॅल्युट देण्यासाठी नकळत माझे कर कपाळाला स्पर्श करतात आणि गर्वाने माझ्या मातीतल्या तुझ्यासारख्या दोस्ताला उराउरी भेटताना छाती गगनाला भिडते.
(हा लेख लिहीत असताना तुझी मुंबईच्या पोलिस उपायुक्त पदी बढती होणं हे सुद्धा एक चमकणारं विलक्षण स्टारच आहे. मागच्याच आठवड्यात तुझे अभिनंदन करण्यासाठी फोर्स वन च्या कार्यालयात तुला भेटलो तेव्हा तु कडकडून मारलेली मिठी आणि फोर्सवन चा सगळा परिसर फिरवून दाखविलेला तो कतृत्वाचा आणि अभिमानाचा क्षण आणि गप्पात रंगलेले चार तास विसरता येत नाहीत. तो क्षण सदैव माझ्या काळजात कोरून ठेवला आहे. तू भेट दिलेल्या या पुस्तकाच्या पहिल्या पानावर तुझ्या हस्ताक्षरात माझ्यासाठी लिहलेल्या ओळी खांद्यावरचे स्टार्स झाल्यासारख्या मलाही भासू लागल्या आहेत.)
अल्पावधीत अनेकांच्या खांद्यावर चमकत राहणारे विक्रमी खपाचे तुझे पुस्तक प्रेरणा देणारे चिरंतन स्रोत बनले आहे. या पुस्तकातल्या सर्व प्रसंगाना आणि पुस्तकासाठी राबलेल्या सर्व हातांना मनोमन सलाम आहे.
अंधारमय जीवन प्रकाशित करणारे तुझे ‘खांद्यावरचे स्टार्स ‘ सदैव चिरंजीवी राहो. प्रशासकीय अधिकारी हा पूर्णतः तुझ्यासारखा समाजसेवक असायलाच हवा ही प्रेरणा तुझ्यामुळे सर्वांना मिळो. हे पुस्तक अनेकांचे दिपस्तंभ ठरो. या सदैव सदिच्छा आणि भरभरून मित्रप्रेम!
तुझा मित्र…
प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर
मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली
९४२११२५३५७…
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “होर्मुझचे महायुद्ध” – लेखक : श्री विजय लोणकर ☆ परिचय – श्री हर्षल सुरेश भानुशाली ☆
पुस्तक : होर्मुझचे महायुद्ध
लेखक: विजय लोणकर
पृष्ठ: १९२
मूल्य २९५₹
इतिहासाच्या पानांवर नजर टाकली, तर एक सत्य ठळकपणे जाणवते ते म्हणजे, जगातील प्रत्येक मोठ्या युद्धाच्या मुळाशी केवळ भूमी, धर्म वा विचारधारा नसते, तर त्या युद्धाची खरी नाळ असते ती संसाधनांच्या, विशेषता ऊर्जेच्या नियंत्रणाशी हॉर्मुझची सामुद्रधुनी हे त्याचे आजचे जिवंत उदाहरण आहे. जगातील एक तृतीयांश खनिज तेल याच अरुंद जलमार्गातून वाहते, या एका भौगोलिक बिंदूवर जो वर्चस्व गाजवतो, तो जगाच्या अर्थव्यवस्थेचा श्वास नियंत्रित करतो; हे कटू, पण अटक वास्तव आहे.
हॉर्मुझच्या अरुंद जलपट्टीत त्याच एका कारणाने आज एक ऐतिहासिक वादळ घोंघावत आहे. एकीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ‘अमेरिका फर्स्ट’ची गर्जना, दुसरीकडे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची अस्तित्वाची लढाई आणि मध्यभागी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांचा ‘इस्लामी क्रांती’चा अखंड निर्धार, तसेच आता इराणच्या सर्वोच्च नेतेपदी असलेले अली खामेनी यांचे पुत्र मोजताबा अली खामेनी या तीन व्यक्तिमत्त्वांच्या संघर्षामध्ये जगाचा नकाशाच बदलण्याची क्षमता आहे.
थोडक्यात सांगायचे तर, या संघर्षाच्या केंद्रस्थानी केवळ भू-राजकारण नाही, तर व्यक्तिमत्त्वांचेही महत्त्वाचे स्थान आहे. त्यांची आक्रमक आणि सुरक्षिततेकडे झुकणारी भूमिका, त्यांची अनिश्चित पण ठाम धोरणात्मक भाषा आणि यांचे दीर्घकालीन प्रतिकाराचे तत्त्वज्ञान, हेही तितकेच महत्वाचे आहे. या तिघांच्या विचारसरणीने (खामेनी आज नसले तरी त्यांच्या मार्गाने जाणारा इराण) आणि या तिघांच्या निर्णयांनी या संघर्षाला एक वेगळीच धार दिली आहे, हे युद्ध केवळ शस्त्रांचे नाही, तर इच्छाशक्ती, अहंकार आणि राष्ट्रीय स्वाभिमान यांचाही संघर्ष आहे.
याच अभूतपूर्व संघर्षाचे सखोल आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करणाऱ्या विजय लोणकर यांच्या ‘होर्मुझचे महायुद्ध’ या पुस्तकात केले आहे.
या संघर्षाच्या केंद्रस्थानी केवळ भू-राजकारण नाही, तर व्यक्तिमत्त्वांचेही महत्त्वाचे स्थान आहे. इतिहास हा केवळ घटनांनी नाही, तर निर्णय घेणाऱ्या माणसांनी घडतो आणि या संघर्षात तीन व्यक्तिमत्त्वे सर्वाधिक निर्णायक ठरली आहेत : डोनाल्ड ट्रम्प, बेंजामिन नेतान्याहू आणि अली खामेनी.
अमेरिकेचे माजी आणि पुन्हा सत्तेत आलेले राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका या संघर्षात अत्यंत गुंतागुंतीची आहे. ‘अमेरिका फर्स्ट’ या तत्त्वज्ञानाने चालणारे ट्रम्प एकीकडे युद्धाचे समर्थन करतात, तर दुसरीकडे ‘मी युद्ध संपवणारा माणूस आहे’ असा दावाही करतात. त्यांची धोरणात्मक भाषा अनिश्चित असली, तरी ठाम असते. इराणवर कठोर आर्थिक निर्बंध लादणे, इराणच्या लष्करी नेतृत्वाला थेट लक्ष्य करणे आणि त्याच वेळी वाटाघाटींचे दरवाजे उघडे ठेवण्याचा आव आणणे; हे ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य आहे. त्यांची अनिश्चितताच त्यांचे सर्वांत मोठे धोरणात्मक अस्त्र बनते; कारण शत्रूला पुढचे पाऊल कळत नाही. इराणशी थेट युद्ध नको, पण इराणला सतत कमकुवत ठेवायचे: हीच ट्रम्प यांची रणनीती आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची भूमिका या संघर्षात सर्वाधिक आक्रमक कारवाया करण्यास मागे-पुढे पाहत नाहीत. इराणच्या अणुतज्ज्ञांच्या हत्या, इराणच्या संगणक प्रणालींवर सायबर हल्ले, गाझा आणि लेबनॉनमधील हिझबुल्लांविरुद्ध एकाच वेळी लढत इराणला उत्तर देणे; हे सर्व नेतान्याहू यांच्या दीर्घकालीन रणनीतीचे भाग आहेत. ते युद्धाला केवळ लष्करी समस्या मानत नाहीत, तर ते अस्तित्वाचे एक संकट मानतात. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक सवलत म्हणजे इस्रायलच्या भविष्याशी केलेली तडजोड आहे, म्हणूनच ते अनेकदा आंतरराष्ट्रीय समुदायाच्या विरोधातही आपला मार्ग धरतात.
अली खामेनी हे इराणचे सर्वोच्च नेते. त्यांचे दीर्घकालीन प्रतिकाराचे तत्त्वज्ञान या संघर्षाला एक वेगळेच परिमाण देते. खामेनी यांनी चार दशकांहून अधिक काळ अमेरिका आणि इस्रायल यांच्या दबावाखाली इराणला टिकवले आहे. त्यांची रणनीती थेट टकरावाची नाही, तर ती ‘हळूहळू थकवण्याची’ आहे. प्रॉक्सी गट, हिझबुल्ला, हमास, हुती हे सर्व खामेनी यांच्या दीर्घकालीन प्रतिकाराचे विस्तारित हात आहेत. अत्यंत कमी खर्चातील ड्रोनने महागड्या अमेरिकन संरक्षण प्रणालींना थकवणे, होर्मुझची सामुद्रधुनी कधीही बंद करण्याची धमकी जिवंत ठेवणे आणि अण्वस्त्र कार्यक्रम हे अंतिम संरक्षणकवच म्हणून जपणे; ही इराणची तीन मुख्य अस्त्रे होती आणि आहेत. त्यामुळे त्यांची हत्या झाल्यानंतरही इराण कडवी लढत देत आहे. इराणला याची जाणीव आहे की, अमेरिका आणि इस्रायल यांना इराणचे पूर्ण पतन परवडणारे नाही; कारण त्यानंतर येणारी अस्थिरता त्यांच्यासाठीही घातक ठरेल. हीच जाणीव खामेनी यांना दशकांनंतरही प्रतिकार करण्याची ताकद देते.
या तिघांच्या विचारसरणी आणि निर्णयांनी या संघर्षाला एक वेगळीच धार दिली आहे. हे युद्ध केवळ शस्त्रांचे नाही, तर इच्छाशक्ती, अहंकार आणि राष्ट्रीय स्वाभिमान यांचाही संघर्ष आहे.
परिचय : श्री हर्षल सुरेश भानुशाली
पालघर
मो.9619800030
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ “सत्य असत्याशी मन केले ग्वाही” – लेखक : श्री जी. डी. पारेख☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆
पुस्तक : सत्य असत्याशी मन केले ग्वाही
लेखक : जी डी पारेख
प्रकाशक : गोल्डनपेज पब्लिकेशन, पुणे (पुस्तकासाठी संपर्क : ७७२२००५०८१)
एकूण पृष्ठे : १९६
किंमत : ₹ ३५०
संत तुकाराम महाराजांचे नाव महाराष्ट्रात सर्वांच्या ओठांवर आहे; परंतु त्यांच्या विचारांचे खरे आकलन मात्र दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे. अभंगांचे पठण, वारीची परंपरा आणि ‘ग्यानबा-तुकाराम’चा जयघोष मोठ्या श्रद्धेने केला जात असला, तरी तुकोबांनी मांडलेली समता, बंधुता, मानवता, विवेक, नीतिमत्ता आणि अन्यायाविरुद्धचा संघर्ष यांचा मूळ आशय अनेकदा झाकोळला जातो. अशा वेळी जी. डी. पारेख लिखित ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा ग्रंथ संत तुकारामांचे केवळ भक्तिपर दर्शन घडवत नाही, तर त्यांच्यातील मानवतावादी तत्त्वज्ञ, समाजप्रबोधक आणि नैतिक क्रांतिकारक यांचे प्रभावी दर्शन घडवतो. संत तुकाराम महाराजांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतले, त्यांच्या अभंगांना कंठस्थ केले, त्यांच्या नावाने लाखोंच्या संख्येने वाऱ्या केल्या; परंतु तुकोबांच्या विचारांचा आत्मा किती जणांनी स्वीकारला? हा प्रश्न आज पूर्वीपेक्षा अधिक तीव्रपणे उभा राहतो. कारण एका बाजूला तुकारामांच्या ‘भेदाभेद अमंगळ’चा जयघोष सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला समाजात द्वेष, जातीय विद्वेष, धार्मिक ध्रुवीकरण, असहिष्णुता आणि अंधश्रद्धांचे पुनरुज्जीवन होताना दिसते. अशा काळात जी. डी. पारेख यांचा ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा ग्रंथ केवळ तुकाराम महाराजांवरील आणखी एक पुस्तक म्हणून समोर येत नाही; तो तुकोबांच्या मूळ विचारांचे पुनराविष्कार घडवणारा आणि आपल्या सामाजिक विवेकाला जागवणारा वैचारिक दस्तऐवज म्हणून उभा राहतो.
‘भक्तीला नीतीचे वाहक बनवून मानवतेचा सोपान गाठू पाहणारा वारकरी रूपातील दार्शनिक’ हे या ग्रंथाचे उपशीर्षकच त्याच्या आशयाचे सार सांगून जाते. तुकोबांची भक्ती ही कर्मकांडी नव्हती, ती माणसाला माणसाशी जोडणारी होती. त्यांचा धर्म हा कोणत्याही जातीचा, पंथाचा किंवा सत्तेचा धर्म नव्हता; तो मानवतेचा धर्म होता. त्यांच्या अभंगांतून व्यक्त होणारा ईश्वर हा अन्याय, विषमता आणि दांभिकतेला मान्यता देणारा नसून सत्य, करुणा, समता आणि नीतिमूल्यांचा पुरस्कार करणारा आहे. लेखकाने या सर्व पैलूंचा अत्यंत अभ्यासपूर्ण आणि समकालीन संदर्भात पुनर्विचार केला आहे.
या ग्रंथाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो तुकोबांना वर्तमानाशी जोडतो. आज समाजात संविधानिक मूल्यांबद्दल वाढती उदासीनता वाढत असताना, ‘भेदभेद अमंगळ’ म्हणणाऱ्या तुकोबांच्या विचारांची नव्याने आठवण करून देण्याची गरज लेखक प्रकर्षाने मांडतो. समता, सामाजिक न्याय, बंधुभाव, करुणा आणि मानवतेची ही मूल्ये भारतीय संविधानाचा आत्मा आहेत, तीच मूल्ये संतांनी शतकांपूर्वी आपल्या अभंगांतून लोकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला होता, हे या ग्रंथातून प्रभावीपणे अधोरेखित होते. या ग्रंथाची खरी ताकद त्याच्या वर्तमानाशी असलेल्या संवादात आहे. आज वारीत संविधान, पर्यावरण, समता आणि सामाजिक न्याय यांचे प्रबोधन करणाऱ्यांवर संशय घेतला जातो; काही वेळा त्यांना ‘अर्बन नक्षल’ या अपमानास्पद विशेषणांनीही हिणवले जाते. अशा वातावरणात लेखक अत्यंत नेमकेपणाने दाखवून देतात की, भारतीय संविधानाचा आत्मा आणि संत तुकारामांचा विचार यांच्यात मूलभूत विरोध नाही, तर विलक्षण साम्य आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय, मानवी प्रतिष्ठा आणि सर्वसमावेशकता ही मूल्ये संविधानाने स्वीकारण्याच्या कित्येक शतके आधी तुकोबांनी आपल्या अभंगांतून लोकांच्या मनात रुजविण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच संविधानाची बाजू घेणे म्हणजे संतपरंपरेपासून दूर जाणे नव्हे; उलट तिच्या मूळ आत्म्याशी प्रामाणिक राहणे होय, हा महत्त्वपूर्ण संदेश हा ग्रंथ देतो. अशा पार्श्वभूमीवर ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ म्हणणाऱ्या तुकोबांच्या वारीत पर्यावरणसंवर्धनाचा संदेश देणे किंवा समता व संविधानाची आठवण करून देणे हे वारकरी परंपरेशी विसंगत नसून तिच्या मूळ आत्म्याशी सुसंगतच आहे, असा ठाम विचार हा ग्रंथ मांडतो. त्यामुळे वारीचा अर्थ केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक प्रबोधनाची लोकचळवळ म्हणून पुन्हा समजून घेण्याची प्रेरणा तो देतो. तुकोबांच्या वारीत पर्यावरणाचा संदेश नसेल तर तो कुठे असणार? समाजात समतेचा संदेश नसेल तर भक्तीचा अर्थ तरी काय उरतो? लेखक असे अनेक अस्वस्थ करणारे प्रश्न उपस्थित करतो. त्यामुळे वाचक केवळ पुस्तक वाचत नाही, तर स्वतःच्या श्रद्धा, मूल्ये आणि सामाजिक जबाबदारी यांचाही पुनर्विचार करू लागतो.
तुकारामांचे धर्मयुद्ध हे कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नव्हते; ते अज्ञान, दांभिकपणा, बुवाबाजी, अन्याय, जातिभेद आणि धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या शोषणाविरुद्ध होते. भक्तीला विवेकाची आणि नीतिमूल्यांची जोड नसल्यास ती समाजाला मुक्त करण्याऐवजी गुलाम बनवू शकते, हा अत्यंत महत्त्वाचा संदेश लेखक तुकोबांच्या अभंगांच्या आधारे स्पष्ट करतो. त्यामुळे हा ग्रंथ संतसाहित्याचा तसेच आजच्या सामाजिक आणि राजकीय वास्तवाला भिडणारा वैचारिक हस्तक्षेप ठरतो. तुकारामांनी ज्यांच्याविरुद्ध संघर्ष केला, तो ब्राह्मणांच्या विरोधात नव्हता तर त्यांच्या वर्णवर्चस्ववादी प्रवृत्तीच्या विरोधात होता. धर्माच्या नावाखाली चालणारा व्यापार, अंधश्रद्धा, बुवाबाजी, जातिभेद, नैतिक अधःपतन आणि विवेकशून्यता यांच्या विरोधात त्यांनी उभे केलेले धर्मयुद्ध आजही तितकेच सुसंगत आहे. त्यामुळे तुकोबांना केवळ टाळ-मृदंगात किंवा दिंडीत शोधून चालणार नाही; त्यांना समाजाच्या विचारविश्वात पुन्हा प्रतिष्ठित करावे लागेल. जी. डी. पारेख यांचा हा ग्रंथ नेमके तेच कार्य करतो.
आज संतपरंपरेचे नाव घेऊन तिच्यात पुन्हा एकदा ब्राह्मणी विचार मिसळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भक्तीला विवेकापासून, धर्माला नीतिमत्तेपासून आणि वारीला सामाजिक प्रबोधनापासून वेगळे करण्याची धडपड होत आहे. अशा वेळी ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ हा ग्रंथ तुकोबांच्या मूळ मानवतावादी परंपरेची आठवण करून देतो. संतांचा वारसा जपायचा असेल, तर त्यांच्या नावाचा जयघोष करण्यापेक्षा त्यांच्या विचारांचा स्वीकार अधिक महत्त्वाचा आहे, हे तो ठामपणे सांगतो. संतपरंपरेवर जमा झालेली संकुचित विचारसरणीची धूळ झटकून तिच्यातील सार्वकालिक मानवतावादी तेज पुन्हा अनुभवायचे असेल, तर हा ग्रंथ नक्कीच वाचला पाहिजे. आजच्या महाराष्ट्रात संत तुकारामांचे नाव मोठ्या श्रद्धेने घेतले जाते; आता धार्मिक पुनरुज्जीवनवादाच्या काळात त्यांच्या विचारांनाही तितक्याच प्रामाणिकपणे समजून घेण्याची वेळ आली आहे. त्या दिशेने वाट दाखवणारा हा एक महत्त्वपूर्ण, चिंतनगर्भ आणि काळाची गरज ठरलेला हा ग्रंथ आहे.
हा ग्रंथ वाचून तुकोबांची प्रतिमा अधिक स्पष्ट होते. भक्तीतून नीती, नीतितून समता आणि समतेतून मानवतेचा मार्ग दाखवणारे तुकाराम आजच्या महाराष्ट्राला पुन्हा या ग्रंथातून भेटतात. म्हणूनच हा ग्रंथ केवळ संतसाहित्याचा अभ्यास नसून, वर्तमानाला प्रश्न विचारणारा, समाजाला आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आणि मानवतावादी महाराष्ट्राची दिशा दाखवणारा एक महत्त्वपूर्ण वैचारिक ग्रंथ आहे. हा ग्रंथ लिहून जी डी पारेख यांनी प्रबोधनाला आणखी सशक्त केले आहे. जी डी पारेख यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम……
☆
परिचय : श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
काही पुस्तकं इतकं वेड लावतात की ती कितीही वेळा वाचली तरी समाधान च होत नाही.. ती पुन्हा पुन्हा वाचावीत असच वाटतं राहतं.. त्यातलच एक पुस्तक म्हणजे नॉट विदाउट माय डॉटर हे पुस्तक… मूळ अमेरिकन लेखिका बेट्टी मेहमुदी ह्यांनी लिहलेले आणि लीना सोहनी ह्यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक म्हणजे संकट काय असतात आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी किती पराकोटीची जिद्द असावी लागते याचं उत्तम उदाहरण आहे.. इच्छा असेल तर मार्ग नक्की मिळतो ह्या वाक्याची प्रचिती जागोजागी ह्या पुस्तकात येते… एक पुरोगामी विचारांची आधुनिक अमेरिकन स्त्री आणि तिने तिच्या चार वर्षाच्या मुलीसाठी केलेला संघर्ष ह्याची ही कहाणी… अमेरिकेत नोकरी निमित्त आलेला एक इराणी माणूस “मूडी” आणि एका सुशिक्षित घटोस्फोटित दोन मुलांची आई असणाऱ्या अमेरिकन महिलेची “बेट्टी” ची संघर्षमय प्रेम कहाणी म्हणजे हे पुस्तक..
अमेरिकेसारख्या आधुनिक जगात वावरणारा एक इराणी माणूस मूडी.. पेशाने डॉक्टर असणारा बेट्टी ला भेटतो.. तो तिचा डॉक्टर म्हणून.. पुढे भेटीगाठी वाढतात.. गोष्टी वेल्हाळ स्वभावामुळे मूडी लवकरच बेट्टी ला ही आवडू लागतो.. बेट्टी च्या दोन्ही मुलांना ही हा नवीन बाबा आवडू लागतो… कालांतराने बेट्टी आणि मूडी लग्न करतात.. चौघांचा सुखाचा संसार सुरू होतो.. बेट्टी स्वतःच्या नोकरी मध्ये उच्च पदावर पोहचते.. मूडी ही आपल्या क्षेत्रात नाव कमवत असतो.. पार्टी, पिकनिक, सगळं अगदी छान सुरळीत सुरू असत..
… अशीच काही वर्ष जातात आणि माहतोब चा जन्म होतो.. सोनेरी केसांची, निळ्या डोळ्यांची माहतोब सगळ्या घरात आनंद घेऊन येते.. वरून दिसायला तर आनंदी कुटुंब असत.. पण.. मूडी चा भाचा इराण वरून येतो आणि ह्या कुटुंबाला नजर लागते.. हळूहळू मूडी मधला कट्टर इराणी बेट्टी ला दिसू लागतो.. छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांना खटकू लागतात.. मूडी चा भाचा आणि तो फारसी भाषेत तासनतास गप्पा मारत असतात..
आणि एक दिवस मूडी जाहीर करतो की आपण इराण ला जाऊन माझ्या कुटुंबीयांना भेटून येऊ.. ते वाट बघतायत.. भावनिक होऊन तो बेट्टी ला समजावतो तरीही बेट्टी च्या मनात पाल चुकचुकत असतेच.. पण त्याचा प्रेमापोटी 15 दिवस त्याच्या सोबत जाण्यास ती तयार होते…
….. इथे कथानक एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचत.. बेट्टी, माहतोब आणि मूडी इराणला जायला निघतात.. तिथल्या परंपरे प्रमाणे बेट्टी ने पूर्ण कपडे घालावेत अस फर्मान निघत पण ते ही ती करते.. चादोर (एक इराणी पेहराव) जो की जाड्या भरड्या कपड्यांचा अगदीच विटकरी रंगांचा असतो.. एक केस ही दिसू नये असा पोषाख.. त्या ड्रेस मध्ये बेट्टी ची होणारी घालमेल.. त्या चार वर्षाच्या माहतोब साठी ही हाच नियम.. ती ही एक स्त्रीच ना म्हणून.. इथून सुरू होते एका कट्टर इराणी मुस्लिम छळवादी, स्त्रियांना गुलाम समजणाऱ्या एका नवऱ्याच्या सो कॉल्ड पुरुषी मनोवृत्तीची कहाणी…
इराण ची त्या काळातील ती परिस्थिती.. ते गलिच्छ राहणीमान.. वर्षानुवर्षांपासून अंघोळ न करता राहणाऱ्या स्त्रिया.. अंघोळी मुळे आजार होतात हा समज बाळगणाऱ्या स्त्रिया.. टॉयलेट ची ही सोय नसलेली घर.. अन्नाच्या नावाखाली वाट्टेल ते खाणारी कुटुंब.. स्वागताच्या विचित्र विचित्र पद्धती.. आणि हे सगळं जेंव्हा बेट्टी सारखी अमेरिकेतून आलेली स्त्री पाहते तेंव्हा पुढच्या दिव्याची कल्पना येते आणि ती शहारून जाते.. चार वर्षाची माहतोब केविलवाणी होऊन जाते… आपल्या समोर काय वाढून ठेवलंय ह्याची दोघी माय लेकीना कल्पना येते.. लवकरच मूडी आपले रंग दाखवायला सुरुवात करतो आणि एक दिवस अमेरिकेत कधीही न परतण्याचा विचार जाहीर करून टाकतो.. पायाखालची जमीन सरकते म्हणजे काय ते बेट्टी ला कळून चुकत… तो पर्यंत दोघींचे ही पासपोर्ट मूडी ने ताब्यात घेतलेले असतात… अमेरिके विषयी चा प्रचंड द्वेष, राग.. त्यात बेट्टी अमेरिकन म्हणून तिला घरच्या स्त्रियांकडून मिळणारी वागणूक हे सगळं सहन करण्यासाठी एक परमेश्वर च आपली मदत करू शकतो ह्याची जाणीव माय लेकिना होते आणि सुरू होतो एक जीवघेणा अनुभव.. बेट्टी ला तिच्या घरच्याशी फोनवर ही बोललं दिलं जात नाही.. तिचे परतीचे सगळे दोर कापले जातात.. अशा परिस्थितीत ही ती आपण आपल्या मुलीसह ह्या कैदेतून सुटायच हा निश्चय करते.. त्यासाठी केलेले तिचे प्रयत्न तिची जिद्द.. चिकाटी म्हणजे हे पुस्तकं… नवऱ्याची क्रूर मारहाण… मुलीवरचा राग.. प्रचंड मानसिक दडपण.. माहातोब आणि बेट्टी चा विरह… हे सगळं वाचताना रडू नाही आलं तरच नवल… त्या नंतर आहे ही परिस्तिथी स्वीकारली आहे हे मूडी ला दाखवण्यासाठी केलेली धडपड, आणि एका बाजूला सुटकेसाठी चे प्रयत्न ह्याची उत्कंठा वर्धक कहाणी म्हणजे हे पुस्तक.. आपल्या मुलीसाठी तिच्या भवितव्यासाठी.. केलेल्या एका आईच्या संघर्षाची ही कथा… आणि जवळजवळ दिड ते दोन वर्ष ह्या यातनादायी, स्त्रियांना कसपटा समान समजणाऱ्या, अगणित बंधनं असणाऱ्या समाजामध्ये काढणे म्हणजे नरकयातनाच.. तरी ही इच्छा तिथे मार्ग हे आपल्या वडिलांचं वाक्य आठवून आठवून जगणाऱ्या एका जिद्दी आईची ही कहाणी… तिची सुटका ती कशी करून घेते, आपल्या मुलीसोबत मायदेशी जाऊ शकते की नाही हे सगळं एकदा तरी वाचलच पाहिजे…
हे पुस्तक मी आज पर्यंत चार पाच वेळा तरी वाचलं असेन पण प्रत्येक वेळी बेट्टी वेगळीच वाटते.. नवीन काहीतरी वाचतो आहोत असा फिल येतो.. आणि आपल्या समोर असणाऱ्या अडचणी, संकट किती क्षुल्लक आहेत हे कळून चुकत.. आणि जगण्याची एक नवी प्रेरणा मिळते.. जेव्हा जेंव्हा अडचणीत आहोत आणि आता काय करू अस वाटतं तेंव्हा मी बेट्टी चा संघर्ष वाचते आणि मग कळत अरे आपल्याकडे तर खूप काही आहे.. स्वातंत्र्य, उत्तम कुटुंब, आपले विचार मांडण्याची संधी आणि मुख्य म्हणजे प्रत्येक व्यक्ती.. तिचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे हे मानणारा समाज.. हे इतकं असूनही जेंव्हा आपण कुरकुर करतो तेंव्हा हे पुस्तक एकदा वाचलं की खाडकन डोळे उघडतात..