सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ असेही एक त्यागपत्र… ☆ सुश्री शीला पतकी ☆
आत्ताच हाती आलेल्या बातमीवरून यम लोकांमध्ये मुख्य यमदूत मृत्युधिशांक यमले आणि त्यांच्या समवेत असलेले त्यांचे असंख्य सहकारी यांनी आपले त्यागपत्र यमराज यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामध्ये ते नमूद करतात..
माननीय यमराजजी अनभिक्षित राजे यमलोक
यांचे चरणी सादर प्रणाम.
महाराज आजवर यम म्हणजे नियम यम म्हणजे धर्म अशी आमची धारणा होती. स्वर्गामधून येणाऱ्या ब्रह्मदेवाच्या आज्ञेप्रमाणे उत्तम नियमांचे पालन करीत आपण आपला यमधर्म पाळतो असे आम्हाला वाटत होते. त्यामुळे आम्हीही आपले दूत म्हणून आपण सांगाल त्याचे प्राण पृथ्वीवरून घेऊन येत असू. त्यामध्ये वृद्ध.. तरुण… बालके.. जर्रजर देहाचे वयस्कर स्त्री पुरुष… जे एकुलते एक आपल्या कुटुंबाचा आधार होते ज्यांचे.. काही तासापूर्वीच संसारात पदार्पण झाले होते… जे कोवळ्या वयात देश सेवेसाठी दिलेली कामगिरी बजावत असताना मरण पावले… आपल्या सांगण्याप्रमाणे आम्ही त्या साऱ्यांचे प्राण ग्रहण केले व यमदूत म्हणून आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले. काही जणांचे प्राण हरण करताना आमच्याही मनात अनेक शंका निर्माण होत असत तरीही आम्ही त्याचे उच्चारण आपल्यासमोर केले नाही. आपली आज्ञा नेहमीच शिरसावंद्य मानली कारण…. आपण धर्माप्रमाणे नीतीने आणि नियमाने कार्य करतो असा आमचा विश्वास होता पण कालची घटना काळजाला लागून गेली. त्यामध्ये सुमारे त अडीच तीनशे लोक यांचे प्राणग्रहण करताना आम्हाला अति दुःख झाले. महाराज त्यांचा दोष काय होता हो? आभाळात उडायचे स्वप्न घेऊन आई-वडिलांबरोबर निघालेली निरागस कोवळी लेकरे.. त्यांचे आई बाबा… मुलाला, मुलीला नातेवाईकाना भेटायला निघालेली कुटूंब वत्सल माणसे वृद्ध दांपत्य जे पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन निघाले होते. काही जण भारत देशाला भेटी देऊन तेथीले अनेक चांगल्या गोष्टी बरोबर घेऊन ते जात होते ते विलक्षण आनंदी होते…. एका सामान्य कुटुंबातली मुलगी जिला आपल्या आई-वडिलांनी विलक्षण कष्टाने शिकवले होते आणि नोकरीच्या ठिकाणी तिने दाखवलेल्या हुशारीमुळे तिला परदेशात जाण्याची संधी प्रथम मिळाली होती. त्या मुलीचे त्या कुटुंबाचे स्वप्न उद्ध्वस्त झाले वायुयान उड्डाणानंतर काही क्षणात त्याचा स्फोट व्हावा आणि क्षणभरात सर्वांची स्वप्न खऱ्या अर्थाने राखेत मिसळली जावीत.. वस्तीगृहात भोजन कक्षात भोजन करीत असलेल्या त्या वैद्यकशास्त्राच्या मुलांचा काय दोष? त्यांच्या घास हातातच आणि आम्ही त्यांचे प्राणग्रहण केले…. महाराज हे कार्य करताना आम्हालाही अतिव दुःख झाल…. खरे तर असे कधी घडले नव्हते.. त्या छोट्या मुलांसाठी जीव गलबलून आला.. अहो जगणं म्हणजे त्यांना काही माहित नव्हतं तोवरच त्यांना घेऊन या म्हणालात. कित्येक उड्डाणाचा अनुभव असलेल्या त्या हवाई यानाच्या चालकाच्या मनाची अवस्था दहा-पंधरा क्षणात काय झाली असेल? त्याला काय आठवलं असेल?… आपण तर जाणारच आहोत… हे दोन अडीचशे जीव हाकनाक जाणार… मरण सर्वात त्याला प्रथम कळले आणि तो काही करू शकत नव्हता हे दुःख होते. त्याच्यावर समवेत काम करणारे त्याचे 12 सहकारी हातात प्रवासाच्या बॅगा घेऊनआत आलेल्या त्या सुंदर उत्साही तरुणी… अहो कोवळ्या वयाची मुलं मुली ती… सारे सारे क्षणात कोळसा झाले… तीस पळात किती असंख्य विचार येऊन गेले असतील ?…. का काहीच कळले नसेल… ?.. असे असंख्य प्रश्न आम्हालाही पडले आहेत…. असो
महाराज, आम्ही कठोर आहोत निष्ठुर नाहीत फाशी देणाऱ्या जल्लादा पेक्षाही वाईट कृत्य आमच्या हातून झाले आहे. कारण तो न्याय निवाडा झाल्यानंतर दोषी ठरलेल्या माणसाला फाशी देतो. पण इथे तर कुठलाच न्याय लागला नाही… कुठलीच नीती अवलंबली गेली.. नाही कुठलाच धर्म आचारला गेला नाही… सबब आपल्या समवेत आम्ही काम करू इच्छित नाही… ! तेव्हा आमच्या सर्वांचे त्याग पत्र आपणापुढे ठेवीत आहे आपण त्यावर पुढील कारवाई करावी.
आम्हाला कल्पना आहे यानंतर आमचे काय…. ? महाराज आपली अवज्ञा झाली आहे असे आपणास वाटत असेल आणि त्याचा दंड म्हणून आपण आम्हाला पृथ्वीवर पाठवत असाल तर ते आम्ही आनंदाने स्वीकारतो कारण पृथ्वीवर सुद्धा निष्ठूर क्रूर असे वर्तन करणारी अनेक माणसे आहेत… पण पृथ्वीवर अनेक ठिकाणी आम्हाला मानवतेचे दर्शन घडते त्या मानवतेचे विलोभनीय रूप आम्ही पाहिले या अपघातानंतर संपूर्ण जग हळहळले भारतातल्या प्रत्येक कुटुंबात साऱ्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले. सारा देश दुःखात आहे अशा संवेदनाक्षम वसाहतीत आम्ही जमेल तशी गुजराण करू जागोजागी प्रेमाचे आणि मानवतेचे संदेश पोहोचू दुःखितांचे अश्रू पुसू… पण आता आपल्या समवेत काम करणे शक्य नाही… तरी कृपया आम्हा सर्वांचे त्याग पत्र त्वरित मंजूर करावे ही नम्र विनंती!
कळावे,
आता आपले नसलेले यमदूत.. (कारण आम्ही आता प्रेमदूत आहोत.)
🙏
शब्दांकन : सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





