श्री अ. ल. देशपांडे
☆ ‘ॲडमिशन : एक अनुभव…’ – लेखक : श्री. जगतसिंह बिष्ट ☆ अनुवाद : श्री अ. ल. देशपांडे ☆
दिवस भर्रकन गेलेत. आम्हाला कळले सुध्दा नाही की मंदार अडीच वर्षाचा झाला आणि शाळेत जाण्याच्या वयाचा सुध्दा. आमच्या वेळी पूर्ण सात वर्ष झाल्याशिवाय शाळेची पायरी चढू देत नसत. कधी कधी प्रवेशाच्या वेळी मुलाचे किंवा मुलीचे वय ६ वर्षे व अकरा महिन्याचे असले तरी प्रवेश नाकारल्या जात असे व मुलाचे वय एक महिन्याने कमी असल्याने पुढल्या वर्षी या, असे ऐकावे लागे. त्यावेळी कदाचितमास्तरांनी मारलेल्या छड्या मुलगा सहन करु शकावा, अशीच धारणा असावी. म्हणून संपूर्ण सात वर्षाचा घोडा झाल्यावरच शाळेत शिरकाव होत असे
श्री. जगतसिंह बिष्ट
पण माझे स्नेही जोशी हयांचा मी ऋणी आहे की त्यांनी माझा मुलगा ॲडमिशनच्या योग्य झाल्याचे माझ्या लक्षात आणून दिले. जोशी अत्यंत साधा माणूस. कुणाच्या अध्यात न मध्यात. माझ्याशी सूत कसे जुळले ते सांगता येत नाही. नाही म्हणायला ऑफिसमधे लंच झाल्यावर रस्त्यावर उभे राहून पेरु व केळी एकत्र खाणे हा एकच सकस दुवा होता आमच्यात. ते दुसऱ्यावर उपकार करण्यासाठीच जन्मले की काय न कळे. कारण इतर वेळी शांत व स्तब्ध असलेला हा गृहस्थ दुसऱ्याच्या फायद्याची गोष्ट असली की एकदम सक्रिय होतो व त्याच्या कार्यात सहर्ष, पूर्णांशाने सामील होतो. हे सर्व करण्यातच की काय त्यांच्या डोक्यावर केस उरलेले नाहीत.
त्यांनी एक जाहिरात दाखविली आणि ऑफिसच्या वेळेचा सदुपयोग करुन आम्ही संयुक्तपणे जाहिरात वाचली. आमच्या शहरातील कुठल्या एका प्रतिष्ठित शाळेत प्रवेशाच्या संबंधात ती होती. ठरल्याप्रमाणे एके दिवशी शाळेच्या विशाल आवारात निर्दिष्ट वेळेपूर्वीच फॉर्म घेण्यासाठी सहकुटुंब पोहचलो. तशी सुचना होती. स्त्री पुरुष पालकांचे घोळके बाहेरच उभे होते. एखाद्या लग्न समारंभाला जाबे तसे नटून थटून. क्षणभर कुठे मंगलध्वनी ऐकू येतोय का असा भास होत होता.
कडक इस्त्री केलेले कपडे व चकचकीत पॉलिश केलेले बुट घातलेला मी काय करावे हया संभ्रमात होतो. शेवटी माझ्या लक्षात आले की हा घोळका नसून आपापल्या मुला-मुलींच्या ॲडमिशन संबंधी प्राप्त करावयाच्या फॉर्मसाठी प्रतीक्षारत पालकांची (सहकुटुंब) रांग आहे. मी देखील त्या रांगेची सुरुवात व शेवट शोधू लागलो. अनेक पालक आमच्याच ऑफिसमधे असल्यामुळे हॅलो हॅलो करता करताच रांगेच्या शेवटी येऊन स्थिरावलो. जो पर्यंत काऊंटर उघडत नाही तो पर्यंत काही उद्योग नव्हता. फक्त आलेल्या पालकांच्या रंगीबेरंगी कुटुंबीयांना न्याहाळण्यापलिकडे. नाही तरी भर दुपारी रणरणत्या उन्हात रांगेत उभे राहून करणार तरी काय? न्याहाळतानाच लक्षात आले की, ही रंगीबेरंगी मंडळी देखील रंगीबेरंगी छत्र्यांच्या आडोशाने कुणाला तरी न्याहाळतच होती. आपण आपले केवळ पहात
पहातच पुढे सरकत होतो. खोटं कशाला बोला, मंदारच्या आईची इतर जमलेल्या आयांशी नजरेनेच तुलना करुन घेतली. तेव्हढयात नंबर लागल्याचे कळले. रु. पंधरा फक्त फेकले, फॉर्म घेतला. तो तेथेच भरुन द्यायचा होता, तो दिला व अर्धी लढाई जिंकल्याच्या आविर्भावात घरी पोहोचलो. फक्त एकच कळले नाही की केवळ फॉर्म प्राप्त करण्यासाठी त्या प्रतिष्ठित शाळेच्या संचालकांनी पालकांना सहकुटुंब का आमंत्रित केले होते? जो पर्यंत ॲडमिशन होत नाही तो पर्यंत असे फाल्तू प्रश्न करणे योग्य नव्हते.
इन्टरव्हयूचा दिवस ठरला होता. असेही कळले होतें की मुलाबरोबर त्यांच्या आई-वडिलांचा देखील इंटरव्हयु अनिवार्य आहे. फॉर्म सोबतच एक आवश्यक माहिती पत्रक जोडलेलं होतं. त्यातील काही अटी मात्र मिस्किल वाटल्या. उदाहरणार्थ शाळा-प्रवेशासाठी ३० जून रोजी मुलाचे वय साडेतीन व चार वर्षाच्या दरम्यान असायला हवे. आता पालकांनी एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्यावी असे मला वाटते. वरील वयाच्या अटीनुसार फक्त तीच मुलं किंवा मुली प्रवेशासाठी पात्र ठरतील, जी जुलै आणि ३१ डिसेंबर या दरम्यान जन्माला आले असतील. वर्षाच्या पूर्वार्धात जन्मलेलं मूल कोणत्याही परिस्थितीत हया गौरवशाली शाळेत प्रवेश घेण्याच्या योग्यतेचे राहणार नाही. सुज्ञ माता पित्यांना हे सांगणे न लगे की त्यांनी तद्नुसार प्लॅनिंग करुन मुलांना जन्मास घालावे.
इंटरव्हयू कम टेस्ट साठी विस्तृत पाठ्यक्रम पण दिला होता. पालकांच्या इंटरव्हयूचा उद्देश स्पष्ट होता की त्यांच्या आंग्लभाषेवरील प्रभुत्वाची नीट कल्पना यावी (नंतर आम्हाला कळले की ज्या पाल्यांच्या आई-वडिलांचे इंग्रजी चांगले आहे अशा विद्यार्थ्यांना शिकविणे शाळेच्या स्टाफला सोईचे होते.) मुलांना मूळ अक्षरे व संख्या विषयक ज्ञान असणे आवश्यक होते, लेखन क्षमता असल्यास उत्तम. थोडक्यात चांगले लिहिता वाचता येणं ही नर्सरी मधे प्रवेशाची अट होती. सामान्य पशुपक्षी, फळे, फुले, भाज्या, रंग, आकार आदींची मुलांना ओळख असावी. सोबतच नर्सरी राइम्सची देखील. हे सर्व पाहून माझ्या मंद बुध्दिला हे कळेना की एव्हढं सर्व जर मुलाला माहीत असेल तर मग वर्षभर शाळेतील शिक्षकगण मुलांना काय शिकविणार? पण काय करता? अडला नारायण…
अल्लड, नटखट आणि सदैव प्रसन्न असणाऱ्या आमच्या मंदारला आम्ही इन्टरव्हयूसाठी तयार करण्याच्या प्रयत्नास लागलो, मधून मधून शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच छडीचा मार द्यायला लागलो, पिळता येतील तितके कान पिळले. त्याच्या अक्षरी अज्ञानासाठी त्याच्या आईला रीतसर दोष देणे झाले. घरचे वातावरण काश्मीर घाटीसारखे तणावपूर्ण झाले.
हळूहळू संकटाचे क्षण समाप्तीकडे सरकू लागलेत आणि इन्टरव्हयूचा दिवस उजाडला एकदाचा. हसमुख मंदारच्या तोंडावरील हास्य उडालं होतं. आम्ही विशेष वेशभूषेत शाळेकडे रवाना झालो. छाती मात्र धडधडत होती.
इतर लोक आधीच पोहचले होते. परंतु आजचे वातावरण पहिल्या दिवसासारखे उत्सवी नव्हते. अधिक तर लोकांचे चेहरे लटकलेलेच होते. इंटरव्हयु सुरु झाला. सर्वप्रथम प्राचार्यांनी पालकांशी काही औपचारिक चर्चा केली. त्यांच्या इंग्रजी बोलण्याच्या शैलीवरुन लक्षात आले की, जमलेल्या पालकांचे इंग्रजी प्राचार्यांच्या इंग्रजीपेक्षा जास्त चांगले आहे. परंतु प्रवेशाच्या निर्णयाची दोरी ही प्राचार्यांच्याच हाती होती. मुलांचा इन्टरव्हयू सुरु झाला. त्यांनी मंदारला इंग्रजीतून नाव विचारले. त्याने सांगितले जरा लाजतच. नंतर दुसरा प्रश्न विचारला. आमच्या शाळेत शिकायला आवडेल काय बाळ तुला? मंदार खूप संकोचला व त्याने लाजाळूपणे हळूच मान खाली घातली. प्राचार्यांना वाटले त्याने हो म्हटले आहे. खरं तर मंदारला तो प्रश्नच मुळी समजला नव्हता. वास्तविक अनेक मुलांना देखील तो कळला नसल्याचे नंतर समजले. पुष्कळांनी हया प्रश्नाच्या उत्तरात आपापल्या वडिलांचे नाव सांगितल्याचे मागाहून कळले. नंतर अमुक रंग कोणता? शर्टाचा रंग, भिंतीचा रंग वैगरे फाल्तू प्रश्न विचारुन झाले. इन्टरव्हयूच्या दुसऱ्या भागात त्याला एका वेगळ्या खोलीत नेण्यात आले. तेथे आधीपासूनच शिक्षक बसले होते. मंदार कडून अक्षरे वैगरे लिहून घेतल्याचे समजले. खोलीत काय काय घडले हे बाहेर कळत नाही. टॉप सिक्रेट असतं म्हणे. ॲमिशनबद्दलच्या सगळ्या धांदली येथेच होतात, असे बरेच लोक कुजबुजलेत. कुणी एकाने म्हटले की ॲडमिशनच जर हवी होती तर शाळेच्या एखाद्या टिचरकडे दोन तीन महिने आधीच शिकवणीच्या बहाण्याने का पाठविले नाही? आमचा मंदार हातात टॉफी घेऊन बाहेर पडला व आम्ही घरी येण्यासाठी तयार झालो.
अन्य एक मुलगा शारीरिकदृष्टया थोडा अशक्त होता. त्याच्या आई-वडिलांनी आणलेले त्याचे जन्म प्रमाणपत्र खोटे असल्याची शंका व्यवस्थापकांनी बोलून दाखविली व त्यांना सांगण्यात आले की संबंधित डॉक्टर व दवाखान्यातील जुन्या रेकॉर्डची मूळ प्रत आणून दाखवा अन्यथा रिझल्ट राखून ठेवावा लागेल.
हे सर्व शांतपणे चालू होते. आम्हाला आश्चर्य त्यावेळी वाटले की, आम्हाला सांगण्यात आले की इन्टरव्हयूच्या प्रोसेसिंगला जवळ जवळ एक महिना लागेल आणि त्यानंतर डाकेने निकाल कळविण्यात येईल. तुमच्या पदरी निराशा पडू नये म्हणून अन्य शाळांमधून सुध्दा तुम्ही प्रयत्न करा, असे सांगण्यात आले. शिवाय तुमच्या मुलाला प्रवेश मिळावा म्हणून कोणत्याही प्रकारचें दडपण आणल्यास तुमचा मुलगा प्रवेशासाठी योग्य असूनही अयोग्य घोषित करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
हे सर्व ऐकून न्यूनगंडाने पछाडलेल्या एका दांपत्याने सांगितले की, आम्ही तर हया शाळेच्या प्रवेशासाठी मुळी उत्सुकच नव्हतो. सहज म्हणून एक अर्ज देऊन टाकला. तुम्ही जर खरोखरच तुमच्या मंदारच्या ॲडमिशनसाठी उत्सुक असाल तर मग मात्र तुम्ही व्यवस्थापकाशी थोडं संधान बांधा अन्यथा येथे प्रवेश मिळणे फारच कठीण आहे.
तूर्तास आम्ही पंधरा रुपये प्रति शाळा हया प्रमाणे जवळ जवळ एक डझन शाळांमध्ये रजिस्ट्रेशन करवून ठेवले आहे. प्रत्येक दुस-या / तिस-या दिवशी कुठल्यातरी शाळेत इंटरव्हयूसाठी चपला घासतो आहे. काही शाळा, शाळेपेक्षा दुकानासारख्याच अधिक वाटतात. छोटयाशा जागेत खुराडयात कोंबडया कोंबल्यासारखा भास होतोय. अशा शाळांमधून ३००/४०० रु. पगाराच्या अध्यापिका पब्लिक स्कूलच्या टीचरसारख्याच भासतात.
ज्या ज्या शाळांमधून जायचा प्रसंग येतो तेथे तेथे माता पित्यांचे थवेच्या थवे दृष्टीस पडतात… महाभारतासारखे. आम्ही किंकर्तव्य मूढ झाल्यागत श्रीकृष्णाची आस लावून उभे आहोत पण त्या मैदानात आमच्या रथाला पैलतीरी नेण्यासाठी पार्थसारथी दूरदूर पर्यंत सुध्दा दृष्टक्षेपात येत नाही.
(श्री. जगतसिंह बिष्ट हयांच्या “ एडमिशन का चक्कर “ हया दैनिक जागरण मधील हिन्दी व्यंग्य लेखाचा दि. १७/७/१९९० च्या दैनिक तरुण भारत, नागपूर, मध्ये प्रकाशित झालेला मराठी अनुवाद.)
अनुवादक – श्री अ. ल. देशपांडे
अमरावती
मो. 92257 05884
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈








0 श्री अ ल देशपांडे को मनोरम अनुवाद के लिए और संपादक गण को वर्षों उपरांत पुनः प्रकाशन के लिए बहुत बहुत आभार। बहुत पहले, मेरे आदरणीय अग्रज श्री अ ल देशपांडे जी ने, मेरे कुछेक हिंदी व्यंग्य-विनोद रचनाओं का मराठी रूपांतरण किया था, जिसके लिए मैं उन्हें हृदय से आभार व्यक्त करता हूं। मुझे यह कहने में कतई कोई संकोच नहीं कि उनके द्वारा किए गए अनुवाद, मूल रचनाओं से अधिक मनोरम रहे होंगे, जिसकी वजह से उनके प्रकाशन के उपरांत उन्हें मूल लेखक से भी अधिक ख्याति प्राप्त हुई। यह मेरे लिए ईर्ष्या और आनंद दोनों का विषय… Read more »