श्री सुहास सोहोनी

??

☆ आठवणींचे हंडे  ☆ श्री सुहास सोहोनी

 

आठवणींसाठी हंडेच हवेत

तपेली नि पातेली पुरणार कशी

अलिबाबाच्या खजिन्याला गुहाच हवी

अडकुली बुडकुली चालणार कशी

१) १९५२ साली मी रत्नागिरीच्या मराठी प्राथमिक शाळा क्रमांक १ मध्ये पहिलीत दाखल झालो. तेव्हाच कुंदा तिसरीत आणि पुष्पा सातवीत गेली होती. त्या वर्षी आम्ही तिन्ही भावंडं एकाच शाळेत होतो. शाळेच्या उंच जिन्याच्या पायऱ्या धाड धाड चढून, बाजूच्या गुळगुळीत लाकडी कठड्यावरून घसरत काही सेकंदात खाली येणं, हा आम्हा मित्रांचा आवडता छंद होता! एकदा माझ्यासह आणखी एक-दोनजणं धप्पकन् खाली पडल्याचं पाहून पुष्पानं माझं मुटकुळं उचललं आणि माझ्या पहिलीच्या वर्गात नेऊन केळकर बाईंसमोर बसवलं आणि माझ्या घसरगुंडीवर बंदी आली!

२) तेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून चार-पाच वर्षंच झाली होती. स्वातंत्र्याचा उत्साह, उन्माद अजूनही तसाच होता. स्वातंत्र्य मिळालं होतं, तरीही लेंगे स्वराज्य लेंगे सारखी गाणी अजूनही कानावर पडत असत. भारतमाता, तिरंगा, झंडा यासारखे शब्द असलेली गाणी तर वेळी अवेळी ऐकू येत असत. महात्माजींची हत्या सुद्धा नुकतीच झाली होती. त्यामुळे त्यांच्या विचारांचा पगडा संपूर्ण समाजमनावर पडलेला होता. सूतकताई हा कंटाळवाणा विषय तसा कोणाच्याही आवडीचा नाही. पण आम्ही सलग सात वर्षं नेटाने हा उद्योग केला. दर आठवड्याला वीस तोळे कचरायुक्त कापूस दिला जायचा. तो साफ करणे, पिंजणे, पेळू करणे, टकळीवर/चरख्यावर सूत कातणे, त्यांच्या लड्या करणे, ते सूत हातमागावर टाकून कापड विणणे, अशी कामं. त्या लहान वयात ही कामं करण कठीणच होतं. हातमागाच्या धोट्यापर्यंत हातही पोचत नसे. पण तो जोराने सटासट खेचून त्याची पुंगळी डावी/उजवीकडे धावडवायचं काम आम्ही कसं करत होतो कुणास ठाऊक! त्या हातमागावरून काही शेले विणले जात नव्हते. त्या जाडजूड भरड कापडाची फक्त बसकटं केली जायची. ती मात्र फाटता फाटत नसत!

३) शाळेच्या रोजच्या कामकाजाची सुरुवात प्रार्थनेनं व्हायची. सर्वधर्मसमभावाचा विलक्षण पगडा असल्यामुळे आठवड्यातून चार दिवस हिंदू प्रार्थना, एक दिवस ख्रिश्चन प्रार्थना आणि एक दिवस मुस्लिम धार्मिक गद्यवचने म्हटली जायची.

श्रीदेवी शारदे वंदन करितो तुजला,, .

देवा मानस मंदिरि या,, .

ध्याउ मनी प्रभू सदा जीविचा विसावा,, .

अशा काही हिंदू धर्मीय प्रार्थना होत्या.

*

मेंढपाळ हा प्रभू कधी ने हिरव्या कुरणी मला,, .

दयाळा कृपाळा येइ प्रेषिता,, .

हे दयाघना देवा तारि तू आम्हा,, .

अशा काही ख्रिस्ती प्रार्थना होत्या.

*

मुस्लिम धार्मिक गद्य वचने आता लक्षांत राहिली नाहीत.

पुढे आम्ही सहावी सातवीत जाईपर्यंत ख्रिस्ती/मुस्लिम प्रार्थना हळूहळू बंद झाल्या आणि सर्व दिवशी हिंदू प्रार्थनाच म्हटल्या जाऊ लागल्या.

४) त्या वेळच्या परंपरेप्रमाणे, सर्व मराठी शाळांतून दसऱ्याच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम होत असत. नाच, गाणी, वेशभूषा, संवाद, नाट्यछटा वगैरे. नेहरू, गांधी, सुभाषबाबू, झाशीची राणी यांचा पेहराव करून गाणी म्हटली जायची, संवाद म्हटले जायचे. माझा मित्र विजय भाटे सुभाषबाबू खूप चांगले साकारायचा.

“ऐसे करण्याला,

ऐसे लढण्याला

गेला गेला सुभाष आपुला

या गाण्यावर तो छान अभिनय करायचा. सलग चार-पाच वर्षे त्याने सुभाष उभा केला.

आणि नंतर काय झालं नकळे. पुढच्याच वर्षी सर्व कार्यक्रमातून “सुभाष” हे नांवच नाहीसं झालं! अभ्यासातून – सांस्कृतिक कार्यक्रमांतून.

काळाचा महिमा,, . दुसरं काय?

५) आमच्या घरी लाईट आले १९५३-५४ च्या दरम्यान. तोपर्यंत रॉकेलचे दिवे होते. प्रभाकर कंदील, पत्र्याच्या छोट्या टिमक्या, असले मिणमिणते दिवे! तेही संख्येने मोजकेच. अशाच दिव्यांच्या काळोखात नानांचं ऑफिसचं काम, आईचा स्वयंपाक, पोरांचा अभ्यास चालायचा. संध्याकाळचा पहिला दिवा काडेपेटीच्या काडीने लावला जायचा. नंतर “ज्योतसे ज्योत जलाते चलो”! त्यासाठी नाना ‘सनकाड्या’ नांवाच्या एक प्रकारच्या गवताच्या काड्या घरी आणून ठेवायचे. या साऱ्यामागचा उद्देश एकच – काडेपेटी बरेच दिवस पुरते!!

लाइट आल्यावर मजा वाटली. तेव्हा बरेच दिवे २५ वॅटचे असायचे. व्होल्टेज अगदी कमी. बल्बला “ग्लोब” नाही तर “बल्प” म्हणायचे. त्यांचा प्रकाश पिवळा असायचा. इलेक्ट्रिकशिटीचा शॉक कसा असतो याचाही धक्कादायक अनुभव अनेकांनी घेतला! बल्बच्या होल्डरमध्ये बोट घालून बघणे, उपकरणे खोलून आत स्पर्श करून पहाणे, असले चाळे अंगाशी येत!!

६) आणि हेही आठवतंय की तेव्हा पाहुणे मंडळी खूप यायची-खूप रहायची. घरातलीच व्हायची. आपल्या घरी परत जातांना, “पुन्हा यायला नक्कीच आवडेल” असं आवर्जून सांगून जायची. बरं वाटायचं! अर्थात याच सारं श्रेय आई-नानांचं.

आणि हेही आठवतंय की वारावर जेवणारा कोणी ना कोणी गरीब विद्यार्थी सदैव जेवायला असायचा. माधुकरी मागायला येणाराही कधी विन्मुख परत गेला नाही. याचं सारं श्रेय आई-नानांचं. आई-नानांच्या पश्चात यापैकी अनेक जण घरी येऊन त्यांची आठवण काढायचे.

बरं वाटायचं!

आणि हेही आठवतंय की नानांना धोतराऐवजी पॅंटमध्ये ऑफिसमध्ये पहिल्यानेच पाठवलं ते उत्तमकाकांनी!

आणि हेही आठवतंय की गाण्याच्या स्पर्धेत पहिल्यानेच भाग घेऊन प्रथम पारितोषिक पटकावणारी सतरा-अठरा वर्षांची पुष्पा घरी आली ती एका हातातला बक्षिसाचा चांदीचा बिल्ला उंचावत आणि दुसऱ्या हाताने दहा रुपयांची कोरी करकरीत नोट एखाद्या पताकेसारखी फडकवत!!

त्या काळात दहा रुपये म्हणजे चेष्टा नव्हती महाराजा!!

तेव्हाच्या रत्नागिरीत पुष्पाचं गाणं म्हणजे Talk of the town झालं होतं.

वर्गातले मुलगे-मुली मला “पुष्पा सोहोनीचा भाऊ” म्हणून ओळखायला लागले. पुष्पाच्या नांवावर मी बराच भाव खाऊन होतो!

अशा आल्या आठवणी की,, .

हंड्यातलं पाणी थिरकतं,, .!

लेखक :  श्री रवि वाळेकर

प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted