सौ. ज्योती कुळकर्णी 

? मनमंजुषेतून ?

☆ रंगांच्या रानात हरवले… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

खरंच! आपल्याला नुसत्याच काळ्या-पांढऱ्या,किंवा कुठलाच रंग न ल्यायलेल्या जगात वावरायला आवडेल का? नाही नं! बरोबरच आहे.अशा बेरंगी आयुष्यात रमायला कुणाला बरं आवडेल? कारण मानवी जीवनच मुळी रंगीबेरंगी नवरसांनी नटलेले आहे.

आकाशाच्या निळ्या रंगाचे तर लहानपणापासून कोण कौतुक! चित्रकलेची वही घेऊन बसल्यावर वेडे वाकडे का होईना निळ्या आकाशाचे ब्रशचे फर्राटे मारल्याशिवाय समाधानच मिळत नसे.उगवतीचा केशरी सूर्य, हिरव्या डोंगरामधून उगवला की मगच निळ्या आकाशाचे चित्र पूर्ण होत असे.हळूहळू त्या आकाशात प्रेमाचे गुलाबी रंग केव्हा भरल्या गेले ते कळलेच नाही.

कृष्णाचा रंगही निळासावळाच नाही का? कृष्णाच्या बालरूपा पासून,राधा, द्रौपदी सोबत असलेल्या सगळ्या रुपातला कृष्ण आवडतोच नं!त्या निळ्याने रुक्मिणी, सत्यभामे सोबत केलेली प्रीती ही आवडते आणि अर्जुनाला सांगितलेली गीताही आवडते.कृष्णाच्या जीवनात तरी किती रंग भरलेले होते! म्हणूनच त्याला विविध रंगांची उधळण केलेलं मोरपीस आवडत असेल.आपल्यालाही आवडतंच नाही का?

नेहमीच्या करड्या रंगातल्या पक्षापेक्षा निराळ्या रंगाचा पक्षी दिसला की त्याच्या मागे धावतोच आपण! पृथ्वीवरच्या येवढ्या मोठ्या बागेत नाना रंगांचे पक्षी आकर्षित करतात आपल्याला मग आपणही आपल्या छोट्याशा बागेत,घरात बंदिस्त करू बघतो त्यांना! हरवून जातो सगळ्या रंगात!

आपण कितीही म्हटले ‘श्रावणात घन निळा बरसला’ तरी निळा घन मात्र कधी बरसत नाही.त्याला काळं सावळं व्हावचं लागतं! ‘घनश्याम श्रीधर’  पण सुंदरच असतो नं!तो मेघश्याम घन घनदाट होऊन काळ्याभोर धरणीला प्रेम सरींनी न्हाऊ घालतो तेव्हाच हिरवे हिरवे अंकुर जन्माला येतात आणि ते काळ्या आईच्या अंगावर डोलत झुलत खेळताना बघून आपल्यालाही किती आनंद होतो नाही!

पावसाळ्यात तर अवघी सृष्टी  हिरवाईने नटलेली असते.जिकडे तिकडे निसर्गात भरलेले हिरवे रंग बघून आपल्याही मनात स्वप्नांचे पक्षी उडायला लागतात.तो हिरवा रंग आणखी कशा कशात रंग भरतो? उगवलेल्या भाज्या, धान्य इ.त निरनिराळे रंग भरून क्षुधेच्या यज्ञकुंडाला शांत करतो.

क्षुधाग्नी एकदा शांत झाला की मनात प्रीतीचे एकेक रंग तरंगायला लागतात.मग हेच रंग लेखक, कवींच्या झरणीतून झरायला लागतात आणि निरनिराळे सुंदर शब्दचित्र आपल्यापुढे उभे करतात.काव्य, शास्त्र,विनोदात रमणारे मन प्रफुल्लित होते.तर कुणी तेच रंग ब्रशवर घेऊन प्रति निसर्ग चितारून आपल्याला नेत्रसुख देण्याचा प्रयत्न करतात.आपल्याही मनाचा पक्षी  त्यात हरवून आणि हरखून जातो नं!

जीवनाचा शेवटचा रंग आपल्याला उचलून नेणारच असतो.तोपर्यंत परिसरातील अवघे रंग वेचून आपल्या मागे सगळ्यांना आपली आठवण राहील असे काही तरी चितारून जाता येते.आता ते चित्र चांगले रंग घेऊन सुंदर करायचं की वेडे वाकडे ब्रश फिरवून कुठलाही रंग कुठेही मिसळून कुणाचं सुंदर असलेलं रंगविश्व उधळून जायचं, हे मात्र ज्याच्या त्याच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते.

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted