सौ. गीता वासुदेव नलावडे
मनमंजुषेतून
☆ विसंवादी सूर… लेख क्र. १४ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे ☆
दहावीचा निकाल लागला आणि अनेक विद्यार्थ्यांचे फोन येऊ लागले. मी सेवानिवृत्त होऊन तीन वर्षे झाली होती पण पालक, विद्यार्थी मला विसरले नव्हते याचा आनंद वाटत होता. आज दहावी उत्तीर्ण झालेली ही मुलं प्राथमिक शाळेत असताना कशी होती ते आठवून पुनर्प्रत्ययाचा आनंद मिळत होता.
विक्रांत मोरेच्या (नाव बदललेले) आईचा फोन आला, त्यांचा रडवेला आवाज ऐकून मी म्हटलं, “अहो, इतके छान गुण मिळाले आहेत, मग रडताय कशाला?”
त्यावर त्या म्हणाल्या, “बाई, आज ही इतकं सगळं छान तुमच्यामुळे घडू शकलं.”
मला चटदिशी विक्रांत दुसरी इयत्तेत असतानाचा प्रसंग आठवला. त्याला शाळेत सोडायला त्या (त्याची आई) यायच्या. नेहमी हसऱ्या आणि प्रसन्न. सचिवालयात नोकरीला होत्या. सतत धावपळ चाललेली असायची.
विक्रांतला शाळेतून घ्यायला त्याची आजी यायची. तेव्हा तो शाळेत खूप विचित्र वागायचा. वर्गशिक्षिका नेहमी याची तक्रार करायच्या.
मग मी त्याच्याशी बोलायचे ठरवले. घरातल्यांची चौकशी केली. त्यावरून कळलं की घरी सतत भांडणं होत असावीत.
एका शनिवारी मी त्याच्या आईला शाळेत मला भेटायला बोलावलं. त्या घाबरतच आल्या, म्हणाल्या, “बाई, आता त्यानी आणखी काय घोळ घातलाय?” मी हसले, त्यांना आश्वस्त केलं, म्हटलं, “अहो, त्यानं काहीच केलं नाही. सहज तुम्हाला गप्पा मारायला बोलावलं आहे.”
आमच्या गप्पा चालू असताना, घरचा विषय निघाला की मात्र त्या सावधपणे बोलत होत्या. मी त्यांना म्हटलं,”मी त्याची शिक्षिका – बाई नाही, तुमची आई आहे असं समजा आणि मला खरं खरं सांगा. म्हणजे आपल्याला त्याच्या वागण्याचे कारण कळेल आणि त्यावर उपाय काढता येईल.”
त्यांचे डोळे भरून आले. “बाई, मला आई नाही, आणि वडिलांना त्रास नको म्हणून माझी कर्मकहाणी मी काही त्यांना सांगत नाही.”
त्यांनी सांगितलेली माहिती खरंच धक्कादायक होती. एवढ्या चांगल्या पगाराची नोकरी असणाऱ्या सुशिक्षित बायका हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार का सहन करतात? सासूबाई प्रचंड त्रास देत होत्या. घरची सर्व कामे करायची. त्या म्हणतील तसेच वागायचे. सून अगदी गरोदर असतानाही तिला दूध देताना सासू दुधात अर्धे पाणी घालून द्यायच्या. सुनेला घरात कोणत्याच गोष्टीचे स्वातंत्र्य नव्हते. पण घरही तिनेच चालवायचे, घरखर्चाची जबाबदारीही तिचीच. कारण काय तर म्हणे तापट डोक्याच्या नवऱ्याचे बॉसशी भांडण झालेम्हंकन त्याने नोकरी सोडली होती.
या सर्वावर कळस म्हणजे सासूबाई नातवाला आईविरुद्ध भडकवायच्या. ती वाईट्ट आहे, तिच्याकडे जाऊ नको असं त्याच्या मनात भरवायच्या. नातूही मग त्याच्या आईला वाट्टेल तसं बोलायचा, आईकडे जायचा नाही. या सगळ्यामुळे ती खूप दुःखी होती.
मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना शांत केलं, म्हटलं, “यातून काहीतरी मार्ग काढू.”
तेव्हापासून रोज मी त्यांच्याशी गप्पा मारत होते. या गप्पांतून नातवावर आजीचा जबरदस्त पगडा आहे हे जाणवले. मी आईला सुचवले, “थोडे दिवस तुम्हाला वेगळे राहता येईल का? तुमचा लेक आजीपासून थोडा लांब राहिला तर बरं होईल.”
.. त्यांनाही हा विचार पटला. त्यांनी स्वतःच्या हिंमतीवर कर्ज काढून ब्लॉक घेतला, मुलाला पाळणाघरात ठेवलं.
पुढच्या (शैक्षणिक) वर्षी मुलगा माझ्या वर्गात आला. वेळ मिळेल तेव्हा वर्गात आणि त्याला वैयक्तिकरीत्याही मी आईचं महत्त्व पटवून देऊ लागले.
हळूहळू तो आईशी चांगले वागू लागला. शनिवार रविवार सगळे एकत्र येत होते. सासूबाईही शांत झाल्या होत्या. त्यांना त्यांची चूक समजली होती.
आज कितीतरी वर्षांनी तो प्रसंग आठवला. परमेश्वराचे खूप आभार मानले. संसारात लागू पाहणारा विसंवादी सूर वेळीच आवरला गेला होता, मैफल सुरीली झाली होती.
– लेख क्र. १४
© सौ गीता वासुदेव नलावडे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





