सौ. वंदना अशोक हुळबत्ते

??

☆ थोडं मागं वळून बघताना… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सांगली यांच्या वतीने कै.श्रीनिवास शिंदगी बालरंगभूमी पुरस्कार जाहीर झाला आणि माझ्या डोळ्यासमोर माझी आजपर्यंतची सांस्कृतिक वाटचाल आली.

.. .. मी आज हा पुरस्कार घेऊ शकते ते केवळ माझे गुरुवर्य श्री. शांताराम कमते यांच्यामुळे. सर्वात प्रथम त्यांनी माझ्यातल्या अभिनय गुणांची मला ओळख करून दिली. कलाविश्व महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर कमते सरांनी मला अभिनयाची पहिली संधी दिली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मद्रासीने केला मराठी भर्तार’, आणि ‘मोरूची मावशी’ या  दोन नाटकात मला काम दिले… आणि माझी माझ्याशी नव्याने ओळख झाली.

लहान असताना मी नकला करत होते.पण रंगभूमीवर काम करण्याचे धाडस मला कमते सरांमुळे मिळाले. श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय असताना प्रा. माणगावकर सरांनी मला ‘लोककला प्रशिक्षण शिबिरा’ला पाठविले आणि मला टर्निंग पॉइंट मिळाला. वेगवेगळ्या लोककलांची तिथे ओळख झाली. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत होतो ज्यात ओवी,भारूड, प्रबोधनपर गीते आणि पथनाट्य असे. मी प्रथमतः पथनाट्य हा प्रकार इथे अनुभवला.रस्त्यावर नाटक करणे तेव्हा नवीन होते.हा नाट्य प्रकार मला खूप आवडला.वेगवेगळ्या महाविद्यालयातून , वेगवेगळ्या गावातून हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला गेला. त्याचे जवळपास १०० एक प्रयोग झाले. यातील एक प्रयोग अविस्मरणीय ठरला. तो म्हणजे ‘आनंदवन’ मधील… बाबा आमटे, साधना आमटे, यांच्यासमोर पथनाट्य सादर करण्याची संधी मिळाली. तिथल्या वातावरणात आम्ही भारावूनच गेलो. खूप चांगला अनुभव आला.

माझ्या बालनाट्य लेखनात ‘बालरंजन’चा मोठा हात आहे.बालरंजन संस्थेच्या वतीने सलग बत्तीस वर्षे मी सांगलीत मोफत बालनाट्य प्रशिक्षण शिबिर आयोजित केले .ही संस्था श्री.सुरेश कोरे यांनी सन १९८८ मध्ये स्थापन केली.तेव्हापासून या प्रशिक्षण शिबिरात मी सहभागी होते.तिथं मार्गदर्शन केलं. मग मुलांना रुचेल, पचेल, आवडेल अशा विषयावर लेखन करावे असे वाटू लागले आणि तिथून माझ्या बालनाट्य-लेखनाची सुरुवात झाली.बालनाट्याचा पहिला प्रयोग शिबिरात होत असे– नंतर स्पर्धेसाठी. पथनाट्ये ही प्रथम शिबिरात आणि नंतर चौकाचौकात सादर झाली. बालनाट्याचे बाळकडू आता अंगात चांगलेच मुरले होते आणि त्याचा उपयोग नोकरी करत असताना झाला.

राणी सरस्वती देवी कन्याशाळा, सांगली, येथे सेवेत असताना या सगळ्या नाट्यप्रवासाचा खूप चांगला उपयोग झाला. विद्यार्थिनिंना नाटकाची ओळख करून देणे सहज शक्य झाले.आमच्या शाळेत सुरुवातीला स्नेहसंमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम तीन तासाचा होत असे. विशेष म्हणजे टेप रेकॉर्डवरती गाणी होत नसत. तबला पेटीच्या साथीनेच हा कार्यक्रम पूर्ण होत असे. इथे खूप चांगल्या गोष्टी नव्याने करण्याची, नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळाली. शाळेत असताना अनेक ठिकाणी बालनाट्ये, पथनाट्ये स्पर्धेत सादर केली. त्यांना उज्वल यश मिळाले.

– – १९९३ ला रत्नाकर मतकरी लिखित ‘कळ लाव्या कांद्याची कहाणी’ हे तीन अंकी नाटक बसवले. त्याचा प्रयोग विष्णुदास भावे नाट्यगृहात झाला. या नाटकात पंचवीस विद्यार्थिनी सहभागी झालेल्या होत्या.शाळेच्या माजी विद्यार्थिनी समितीच्या आर्थिक सहाय्यासाठी  याचा पहिला प्रयोग झाला. नंतर त्याचे  दोन-तीन प्रयोग झाले. यावेळी शाळेतील पदाधिकारी, सहकारी शिक्षक, विद्यार्थिनी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. विशेष म्हणजे श्रीमती उषा कुलकर्णी यांचे वेळोवेळी प्रोत्साहन मिळाले.

कणकवली येथील ‘नाथ पै एकांकिका स्पर्धेत’ बालनाट्य सादर करून बक्षीस मिळविले. इचलकरंजी, कराड इथेही बालनाट्यांना यश प्राप्त झाले. चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मी विज्ञान विषयक एक एकांकिका सादर केली.

२१ व्या ‘अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलना’साठी मी बोधचिन्ह केले. याच संमेलनात ‘कशी जिरवली’ हे बालनाट्य सादर केले. या संमेलनात सहभागी झाल्यावर मग आता आपलेही साहित्य प्रकाशित करावे असे वाटू लागले आणि ‘आम्ही तुमचे सोबती’ हा एकांकिका संग्रह आणि ‘शाळेला चाललो आम्ही’ हा पथनाट्य संग्रह, अशी माझी दोन पुस्तके प्रकाशित झाली.आज एकूण आठ पुस्तके प्रकाशित आहेत.

८१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आम्ही ‘अशांती’ हे पथनाट्य सादर केले होते. तेव्हा   मा. गृहमंत्री आर. आर.पाटील यांनी हे पथनाट्य पाहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ९२ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातही  विद्यार्थिनींचे पथनाट्य सादर केले. 

बालनाट्य, पथनाट्य लेखन, दिग्दर्शन याचबरोबर ‘नागा नृत्य’  बसवणे ही माझी खासियत होती. संपूर्ण जिल्ह्यात या नागानृत्याने अनेक बक्षीसे मिळवली. सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनातील सांस्कृतिक कार्यक्रमातही  हे नृत्य सादर केले होते. तसेच सांगली जिल्हा परिषद क्रीडा विभागाच्या वतीने  घेण्यात आलेल्या मिनी ऑलिंपिक स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी मी ८० विद्यार्थ्यांचे नागा नृत्य सादर केले.

विद्यार्थिनींच्या मनात नृत्य नाट्य या कलागुणांचा विकास व्हावा या हेतूने मी शालेय स्तरावर प्रशिक्षण शिबिरे घेतली. सांगली आकाशवाणीच्या शालेय कार्यक्रमात बालनाट्य, नाट्यछटा सादर करण्याची संधी विद्यार्थिनींना उपलब्ध करून दिली. सांगली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागातर्फे घेण्यात येणाऱ्या अनेक नृत्य, नाट्य स्पर्धांसाठी, तसेच लठ्ठे फेस्टिवलच्या नृत्य, पथनाट्य स्पर्धेसाठी परीक्षक म्हणूनही काम करण्याची संधी मला मिळाली. .

आता नृत्य बसवत नाही. पण नाटक स्वस्थ बसू देत नाही.बालनाट्य लेखनाचे काम आजही सुरू आहे. महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत माझी नाटके सादर होत आहेत. बालकांच्या अभिनयातली सहजता आणि निरागसता नेहमी मनाला आनंद देतात.त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य मनावरची मरगळ दूर करते. म्हणून त्यांच्यासाठी सतत काम केले पाहिजे असे मला मनापासून वाटते. 

शिंदगी सरांचे ‘मिठाईचे घर’ हे बालनाट्य मी शाळेत असताना बघितले होते.शिंदगीसर भेटले की नेहमी माझे कौतुक करत असत. ते मला गुरूस्थानी आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने हा पुरस्कार मला मिळतोय याचा मला खूप आनंद झाला आहे. यापुढेही मी बालरंगभूमीसाठी सतत कार्यरत राहीन ..

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

संपर्क – इंदिरा अपार्टमेंट बी-१३, हिराबाग काॅनर्र, रिसाला रोड, खणभाग, जि.सांगली, पिन-४१६  ४१६

मो.९६५७४९०८९२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted