सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “नवी पेठ जुनी झाली…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
काही कामानिमित्त नवी पेठ आणि पूर्वी राहत असलेल्या काही भागात फिरण्यासाठी गेले आणि लक्षात आलं. आणि जाणवलं… नवी पेठ जुनी झाली आहे. तरुण पोरीपोरांची गर्दी असणारी आणि चोरून चोरून एकमेकाकडे बघणारे तसेच नव्याने काही दुकानात आले आहे का याची जात आता चौकशी करणारी मंडळी आता तिथे नाहीत. आता गर्दीला चेहरा नाही आणि वयही नाही.
शशिकला इथे राहत होती हे दाखवणारी माडी पण नाही. इंडिया ग्लास दुकान बदललं. बंडे क्लाथ स्टोअर्सची पाटी गेली. मर्दाच दुकान गायब झालं. नॅशनल मधील बायकांची गर्दी कमी झाली. चिवडेवाल्या मारुती समोर फुलांचा सुगंध येत नाही. शारदा स्टोअर्स गायब झालं. तुषार रेस्टॉरंटच्या पुरी भाजीची चव संपली. टांगा स्टॅन्डवर एकही टांगा नाही. स्टार बेकरी गायब झाली. एक नंबर शाळेत असणारी पोरांची पळापळ संपली. आता तिथे दुकानांची रेलचेल झाली. शाळा जाऊन त्या इमारतीत दुकान होणं हे आपल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची पडझड दाखवतं. एक नंबर शाळेसमोर लग्नाच्या हारांची खासियत आणि दररोजच्या पूजेचे हारफुले हमखास मिळणारे मंठाळकरांचे फुलांचे दुकान संपले. चौपाड पोस्ट ऑफिस दिसत नाही. नऊ नंबर शाळा आणि विठोबाचे मंदिर असंख्य टपऱ्याने वेढले गेलयं आहे. भक्तीच्या आणि शिक्षणाच्या वाटेवर खरंच दुकानदारी सुरू झाली.. मकानाच्या बाजूला मोबाईल गल्ली लागली. विवेकानंद वाचनालय आणि जवेरीची ऍडवर्टाइजमेंटची दुकाने बंद झाली. फॅशन कॉर्नरच्यावर असणारी गट्टी सरांची नृत्य शाळा बंद झाली.
शिंदे चौकातलं तानाजी सायकल मार्ट गेलं. असंख्य पुस्तकांची वाचनाची गोडी लावणारं झुंजार वाचनालय संपलं. दळवींची गिरणी गेली. स्वातंत्र्यसैनिक द्वारकाताई देशपांडे यांची देवळातली शाळा संपली. मुलींच्या शिक्षणाचा श्री गणेशा ज्या काळात झाला ती नगरपालिकेची मुलींची एक नंबर शाळा संपली. दगडोबा भागवतांच्या चाळी गरीब माणसांच्या संसाराचे भार पेलून पेलून म्हाताऱ्या झाल्या. काळी मशीदीला लागून असलेली मुस्लिमांची तालीम बंद झाली. कुठल्याही जाती जमातीच्या पोराला व्यायामाला लावून पहिलवान करणारे आणि त्यांच्या छोट्या छोट्या कुस्त्या जिंकल्यावर मिरवणूक काढणारे मशिदीचे वस्ताद नाहीसे झाले. अण्णाप्पा व्हट्टेचे ते दुकान बंद झाले. नगरपालिकेच्या दवाखान्यात सायकलवरून येणारे व गोल टोपी हॅट घालणारे डॉक्टर लेले आता काळाच्या पडद्याआड झाले. नागनाथची ट्रान्सपोर्ट सर्व्हिस बंद पडली. त्याच चौकातलं प्रयाग बाई आणि गंगुबाईचं भाजी मार्केट बंद पडलं. बडबड करत बर्फ किसून विकणाऱ्या अम्माची बर्फ गाडी बंद पडली. वसंत सायकल मार्ट मात्र अजूनही चालू आहे, पण त्याच्या समोर असणारं तेल्याचे दुकान बंद झालं. दिलपाक हॉटेलच्या शेजारी असणाऱ्या पानपट्टीच्या टपरी जवळच्या खांबावर जळणारी दोरी संपली. श्याम सारंगने बनवलेला महाराष्ट्रीय माणसाचे आराध्य दैवत असलेल्या आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मात्र ऐटीने उभा आहे… मुजरा महाराज…
एसटी स्टँड चा बाज बदलला. ढोनसळ्यांचा आवाज संपला. राजा सलगरांची नाटकाची तालीम करत करत चालणारी कंडक्टरशिप संपली. सायखेडकरांची एसटीतली नाटकं संपली. एस. टी. तला मोठा गणेशोत्सव संपला. आडवा नळ रस्त्याने बंद झाला. लोभा मास्तरांची चाळ विस्मृतीत गेली. भागवत चित्रमंदिर समोरची माणिकचंद चाळ संपली. खिडकीतून इस्त्रीचे कपडे देणारा इस्त्रीवाला संपला. काटकर इंजिनिअरिंगची खटपट संपली. अजंठा लाॅजचा रुबाब संपला. भागवत चित्रमंदिरमधील गर्दी संपली. चित्रमंदिरच्या स्टेजवरती होणारी असंख्य नाटक विस्मृतीत गेली. बुवा तेथे बाया, तो मी नव्हेच, सीमेवरून परत जा, वाहतो ही दुर्वांची जुडी, … एकापेक्षा एक सरस नाटकं त्या मंदिराने आम्हाला दाखवली.
चित्रमंदिरच्या मागच्या बाजूला याला दासींच्या उत्कृष्ट पेंटिंगची जगात कुठेही न आढळणारी आर्ट गॅलरी संपली. भागवत मधला हॉटेलवाला इराणी, डोरकीपर दत्तोबा शिंदे,मखमलीच्या कोटावर कोल्हापुरी टोपी घालणारे छाया मंदिरचे मॅनेजर पांडे काका आणि मोहन पांडे विस्मृतीत गेले. उमा मंदिर चा बटणावर वर खाली होणारा पडदा स्मृतीच्या पटलाआड गेला. मीना टॉकीज शेजारच्या गोविंद विड्यासाठी प्रसिद्ध असणारं कुलकर्णींचं पान शॉप बंद झालं. भारत भुवनचा डोसा संपला. आशा टॉकीजसमोरच्या पैलवान बाईचा फोटो असणाऱ्या चुरमुऱ्याच्या दुकानातला डेक्कन क्वीन उदबत्तीचा वास संपला. गदगमधल्या चहाची चव पूर्वीसारखी राहिली नाही असं आमचे एक सर सांगून गेले. जुनी गिरणीच्या बाजूच्या बोळातलं फाटक संपलं.. आठ आण्यात पिशवीवर भाजी मिळण्याचे गरिबांचं ठिकाण संपलं… कडवंच्या, पात्री, करडई, तांदूळसा,फडक्यावर बांधून बसणारी आणि विक्री करणारी टेंभ्याच्या प्रकाशातली ती माणसं काळाच्या ओघात गायब झाली. जुनी गिरणीचा भोंगा तर केव्हाच बंद झाला. गिरणीतला तो ऐश्वर्यसंपन्न सत्यनारायण आजही लक्षात आहे.. प्रत्येक बाईची खणानारळाने ओटी भरली जायची, मुलांना चांदिचे चार आणे मिळायचे आणि पुरुषांना चांदीचे कमळ.. असा सत्यनारायणाचा थाट असायचा.. ते ऐश्वर्य संपलं.
… गिरणीच्या चाळीतले रात्रीच्या भजनी मंडळाचे सूर आता ऐकू येत नाहीत. टाळांचा आवाज घुमत नाही. गिरणीच्या चाळीतल्या छोट्या देवळासमोरची भूपाळी कानावर पडत नाही.. सप्ताह बंद झाले..! कौटुंबिक मराठी चित्रपटाची मेजवानी देणारे आदरणीय कलगोंडा पाटलांचे पटवर्धन चालवत असलेले प्रभात टॉकीज पार संपून गेले. वडगावकरांची चाळ संपली दुकानाच्या गर्दीत दत्ताचे देऊळ दाटी वाटीत उभे आहे. पावशे सरांच्या क्लासमधली तुडुंब गर्दी संपली. स्वस्तिकच्या दुकानाची पूर्वीची शान राहिली नाही, सुपर फाईनची गर्दी राहिली नाही, लकीत बसून चहा पिणं,.. ती मजाही काळाबरोबर गेली.. गुजरात लॉज संपलं.. भंडारे करवंदे यांची शिंप्याची दुकान संपली…
बघता बघता सोलापूरचा आमच्या जगाला समृद्ध करून गेलेला तो सुवर्ण काळ काळाच्या पडद्याआड गेला. त्या जागेच्या, त्या माणसांच्या, त्यांच्यातल्या माणुसकीच्या, प्रेमाच्या, काळी मशीद जवळच्या हिंदू मुस्लिम भाईचाराच्या, सुंदर दिवसांच्या हुंडेकरी वाड्यातल्या रम्य आठवणी बघता बघता काळाच्या पडद्याआड गेल्या.
गणपती उत्सवात जागोजागी होणारे नकलाकार पतकी यांचे नकलाचे कार्यक्रम,फाटे पार्टीचे कार्यक्रम, बत्तूल डान्सिंग पार्टी,चांद मास्तरचे मेळे काळाच्या पडद्याआड गेले. वीरा पाटलांची निष्ठेने घेतलेली हिंदू महासभेची भाषणे संपली.. रंगा वैद्यांच्या इलेक्शनमध्ये ऐकलेली आदरणीय प्राध्यापक पुजारी सर आणि फडकुले सर यांची भाषणे विस्मृतीत गेली…
… सारं सारं डोळ्यासमोरून तरळून गेलं. काळ किती बदलला याची जाणीव झाली. काळाचे ओघात किती वाहून गेलं हे लक्षात आलं त्या सुंदर काळानं आपल्याला खूप खूप दिलं.. जगणं सुंदर केलं हेही लक्षात आलं… डोळे शांतपणे मिटले तेव्हा अश्रूंचे दोन थेंब पुढच्या कागदावर पडले. मी ते हाताने पुसले आणि कागदावर पसरलेल्या निळ्याशार शाईकडे पहात राहिले … अथांग डोहात पाहिल्यासारखे…!!!
– – या सगळ्या “ गत-स्मृती “ समस्त सोलापूरकरांसाठी – – –
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈





